Home आपलं शहर BSUP प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरण!

BSUP प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरण!

0
BSUP प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरण!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्याच कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे ‘धाडस’ करतील काय?

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील 146-ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शहरातील अनेक विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त व त्यासोबत संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिका मुख्यालयात आयोजित केलेली होती. या बैठकीमध्ये अनेक विकासकार्याशी संबंधित सविस्तर चर्चा करीत असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्याच मतदारसंघात गेल्या जवळपास वीस वर्षांपासून सुरू असलेल्या ‘BSUP’ योजनेचा देखील आढावा घेतला. ज्या लोकांना अद्यापही घरं मिळालेली नाहीत त्यांना लवकरात लवकर घरं कशी देता येतील? इमारतींचे काम किती दिवसात पूर्ण होईल? याबाबत शहर अभियंता दीपक खांबीत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्याशी चर्चा केली.

ही चर्चा सुरू असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी BSUP योजनेमध्ये भ्रष्टाचार करून ज्या लोकांनी एका पेक्षा अधिक गाळे आणि सदनिका लाटल्या आहेत किंवा ज्या लोकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका मंजूर करून घेतल्या आहेत अशा लोकांवर लवकरच गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवणार असल्याचा इशारा दिला. “BSUP योजनते भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना अजिबात माफी दिली जाणार नाही, मग ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असोत किंवा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असोत कुणाचीही गय केली जाणार नाही” असे त्यांनी स्पष्ट केले.

परंतु आता मोठा प्रश्न असा आहे की BSUP योजनेमध्ये ज्या राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकापेक्षा अधिक सदनिका लाटल्या आहेत, किंवा ज्यांनी बोगस कागदपत्रे सादर करून स्वतःला पात्र झोपडी धारक ठरवून घरं मिळविली आहेत त्यापैकी काही जण हे पूर्वीपासून तेव्हांची शिवसेना आणि आत्ताची शिंदे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत तर काही जण इतर पक्ष सोडून आता शिंदे गटाच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. म्हणजेच ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेच कार्यकर्ते झाले आहेत.

त्याच बरोबर ह्या BSUP योजनेत बोगसगिरी, भ्रष्टाचार करणाऱ्यांपैकी काही जण तर नेहमीच सावली सारखे प्रताप सरनाईक यांच्या सोबत फिरताना दिसत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या इतर काही पक्षातील लोकांनी तर स्वतःचे पाप लपवून ठेवण्यासाठीच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला असून “प्रताप सरनाईक यांचे कार्यकर्ते झाल्यास मंत्री महोदय आम्हांला वाचवतील” अशी अपेक्षा ह्या बोगसगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांच्या आश्रयास आलेल्या ‘झोलर’ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात पाठवण्याचे धाडस दाखवतील का? की महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नुसती भीमगर्जना करून निवडणुकी नंतर “‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप” या प्रमाणे “चौकशी सुरू आहे” हे कारण सांगून प्रकरण दाबून ठेवतील? हे पाहावे लागेल.

काय आहे हे BSUP भ्रष्टाचार प्रकरण?

शहरी भागातील गरीब गरजू लोकांना पक्की घरं मिळावीत म्हणून तत्कालीन केंद्र सरकारने BSUP ही योजना लागू केली होती. मिरा-भाईंदर शहरात काशिमीरा येथील जनता नगर झोपडपट्टी येथे गेली वीस वर्षे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर केंद्र सरकारने निधी देण्याचे बंद केले आणि ही योजना अर्ध्यावर सोडून बासनात गुंडाळून ठेवली. त्यानंतर पुढे महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या मदतीने ही अपूर्ण योजना पूर्ण करण्याचे ठरविले परंतु महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते यांनी या योजनेत वारेमाप भ्रष्टाचार करून या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेचा बट्याबोळ केला. त्यामुळेच आजही ही योजना अपूर्ण अवस्थेत असल्याचे आरोप केला जात आहेत.

अगदी सुरुवातीलाच ही योजना राबविण्यासाठी ज्या ‘पुनित कन्सल्टन्सी’ नावाच्या ठेकेदाराला BSUP योजनेच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते सुरुवातीलाच त्याला काम न करताच जवळपास पन्नास कोटी रुपये बेकायदेशीरपणे अदा करण्यात आल्याचा आरोप केला गेला. पुढे त्याच पुनित कन्सल्टन्सीच्या संगनमताने सर्वेक्षण करत असताना एकाच घराला वेगवेगळे दरवाजे दाखवून त्या एकाच घरातील दोन-दोन तीन-तीन लोकांना वेगवेगळ्या घराचे सदस्य दाखवून फोटोपास बनवून हजारो झोपड्यांची संख्या फुगविण्यात आली.

आत्ताचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कट्टर कार्यकर्ते असलेले जनता नगर झोपडपट्टीत राहात असलेल्या लातूर जिल्ह्यातील काही लोकांनी तर त्यांच्या गावाकडील अनेक नातेवाईकांना इथे आणून त्यांची बोगस कागदपत्रं बनवून त्यांना जनता नगरचे रहिवासी भासवून त्यांच्या नावाने सदनिका मिळविलेल्या आहेत, तर काही आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते यांनी आपल्या स्वतःच्या नावाने किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावाने एकापेक्षा जास्त घरं मिळविली आहेत. त्यानंतर ह्याच सदनिका महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी, राजकीय पक्षांचे काही कार्यकर्ते आणि दलाल यांच्या संगनमताने खुल्या बाजारात सर्रासपणे विक्री केल्या जात आहेत.

या भ्रष्टाचाराचा भांडाफोड झाल्यानंतर व अनेक वर्तमानपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडे जेव्हा अनेक लोकांनी तक्रारी केल्या तेव्हा मिरा-भाईंदर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली परंतु तिथेही महापालिकेच्या त्या “धीरूभाई” ने सगळे मॅनेज केले असल्याची चर्चा आता सुरू आहे. त्यामुळे BSUP योजनेतील खरे भ्रष्टाचारी कधी पकडले जातील का? त्यांच्यावर कधी काही कायदेशीर कारवाई होईल का? हा देखील एक मोठा प्रश्न असल्याचे बोलले जात असून हा मुंबईतील आदर्श घोटाळ्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.

146 ओवळा-माजीवडा मतदार संघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि आता परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांच्याच मतदारसंघात गेली वीस वर्षे ही योजना अपूर्ण अवस्थेत असताना आणि ही योजना सुरू झाली तेंव्हा पासूनच ह्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप उघडपणे केले जात असताना आतापर्यंत प्रताप सरनाईक यांनी ह्या योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचारावर लक्ष का घातले नाही? आत्ताच ह्या योजनेत लक्ष घालण्याचे कारण काय? हा देखील मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच बरोबर याच BSUP भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्याच काही कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना अभय दिले जाईल? की ह्याच कार्यकर्त्यांना कारवाईची भीती दाखवून त्यांचा वापर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत करून घेतला जाईल? हे लवकरच स्पष्ट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.

Spread the love