धाराशिव, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र तुळजापूर, कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसर विकास आराखड्याची महत्वाची बैठक आज घेण्यात आली.
श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन-साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठा पैकी श्री. तुळजाभवानी देवी, तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे १ ते १.५ कोटी भाविक श्री क्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १,८६५ कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवलाआहे. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.

हा प्रकल्प जलद गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही गोष्टी समांतर पातळीवर करण्यात याव्यात अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्याचे परिवहन मंत्री यांनी सांगितले. तसेच प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्तगण व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात असे ही सांगितले.
श्री तुळजाभवानी देवीच्या अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा आणि पुजारींचा विरोध असल्याने त्यांच्या भावनांचा आदर करत श्री तुळजाभवानी देवीचे शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश दिले.

या बैठकीला छ.संभाजीनगर विभागाचे विभागिय आयुक्त जितेंद्र पापळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्या सह धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉ. मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी वृंद उपस्थित होते.

श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पामुळे तुळजापूर शहराचा कायापालट होणार असून या प्रकल्पामुळे अनेक नवीन रोजगारांची संधी देखील येथील नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात असून त्यामुळे येथील सर्व नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत.