Home Blog Page 100

उद्धव ठाकरेंची शिवतीर्थावर शिवसैनिकांसमोरच हात जोडून मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. या बंडखोरीमुळे ५ सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षाचेच दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले. दादर मधील शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. या टीकेलाही नंतर एकनाथ शिंदे गटाने जशास तसे उत्तर दिले. दरम्यान, शिवसेनेच्या या दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता शिवसैनिकांसमोरच हात जोडून एक मोठी घोषणा केली आहे. मी महाराष्ट्राचा विभागनिहाय दौरा करणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते. याआधीही मी याबद्दल सांगितलेले आहे. पुढेही सांगत राहीन. लवकरच मी महाराष्ट्राचा विभागनिहाय दौरा करणार आहे. मी तुमचे याआधीही आभार मानलेले आहेत. आताही तुमच्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सध्या सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेला आहे. शिवसेना पक्ष कोणाचा तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याच्या जोरावर शिंदे गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर अधिकार सांगितला जात आहे. तर नोंदणीकृत पक्षातील नियमावलीचा आधार घेत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आमच्याडेच राहील असा दावा उद्धव ठाकरे समर्थकांकडून केला जात आहे. दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात असताना निवडणूक आयोग काय निकाल देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या जागतिक इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पुरुष व २२ वर्षाखालील मुलांच्या संघाचा सहभाग..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (डब्लूआयसीएफ) च्या वतीने ८ ते १५ ऑक्टोबर २०२२ या कलावधीत इनडोर क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियात आयोजित केला आहे. या स्पर्धेत भारतासह, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, द.आफ्रिका, यूएई व सिंगापूर हे आठ संघ सहभागी झाले आहेत. तर २२ वर्षाखालील गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका व न्यूझीलंड हे संघ सहभागी झाले आहेत. २०१४ साली न्यूझीलंड व २०१७ साली दुबई येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ चौथ्या स्थानी राहिला होता. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातील खेळाडूंवर मोठी कामगिरी करण्याची जबाबदारी असेल.

पुरुषांचा भारताचा पहिला सामना इंग्लंड विरुध्द ९ ऑक्टो. रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ११:३० वाजता सुरू होणार आहे. दूसरा सामना सिंगापूर विरुध्द १० ऑक्टो. रोजी सकाळी ७:३० वाजता होणार आहे. तिसरा सामना विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुध्द १० ऑक्टो. रोजी दुपारी १:३० वाजता होणार आहे. चौथा सामना यूएई विरुध्द ११ ऑक्टो. रोजी सकाळी ५:३० वाजता होणार असून पाचवा सामना त्याच दिवशी श्रीलंके विरुध्द दुपारी १:३० वाजता होणार आहे. सहावा सामना १२ ऑक्टो. रोजी दुपारी १:३० वाजता न्यूझीलंड विरुध्द होणार असून सातवा व शेवटचा साखळी सामना १३ ऑक्टो. रोजी दुपारी १:३० वाजता द.आफ्रिके विरुध्द होणार आहे. १४ ऑक्टो. रोजी उपांत्य व १५ ऑक्टो. रोजी अंतिम सामने होतील.

२२ वर्षाखालील भारतीय संघ ९ ऑक्टो. रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ३:३० वाजता ऑस्ट्रेलिया विरुध्द खेळणार आहे. १२ ऑक्टो. रोजी सकाळी ७:३० वाजता द. आफ्रिके विरुध्द व १३ ऑक्टो. रोजी सकाळी ७:३० वाजता न्यूझीलंड विरुध्द खेळेल.

भारतीय पुरुष संघ : गिरीश के.जी (कर्णधार), धनुश भास्कर (उप-कर्णधार), एरीज अजीज, दैविक राय, खिजर अहमद, रुमान चौधरी, मोहसिन नदाम्माल, नामशीद वायप्रथ, सूरज रेड्डी, विजय गौडा, यतीश गौडा, संदीप मायांना (प्रशिक्षक) व एम. एस. पुंजा (व्यवस्थापक) या स्पर्धेमध्ये मुख्य सहकारी असतील.

मराठी पाट्यांची पाहणी मुंबई महापालिका सोमवारपासून करणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबई महापालिकेनेही मराठी पाट्यांच्या नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. त्याकडे कानाडोळा करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी, मुंबई महापालिकेमार्फत मुंबईतील नेमक्या किती दुकाने, आस्थापनांनी त्याचे पालन केले आहे, हे तपासले जाणार आहे. त्यानंतर त्यांना नोटीस दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१) च्या कलम ६अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनास कलम ७ नुसार ‘मराठी भाषेतून नामफलक लावणे’ बंधनकारक आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठी पाट्यांविषयी आदेश जारी केल्यानंतर पालिकेनेही त्यासाठी धोरण आखले आहे.

मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने आणि आस्थापना असून, त्यापैकी केवळ अडीच लाख दुकानांनी मराठी पाट्या लावण्याच्या नियमांची पूर्तता केली आहे. उर्वरित अडीच लाख दुकानांनी याबाबत हलगर्जीपणा दाखविल्याने पालिकेनेही कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी पाट्या अनिवार्य करताना पालिकेने ३० जूनची मुदत दिली होती. त्यानंतर व्यापारी संघटनांच्या विनंतीवरून ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र ही तारीख उलटून गेल्यानंतरही पाच लाख दुकानांपैकी ५० टक्के म्हणजे अडीच लाख दुकानांनी त्याची अंमलबजावणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मराठी पाट्या प्रकरणी व्यापारी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. अशा परीस्थितीत मराठी पाट्यांचे नियम पालिकेच्या माध्यमातून कसे राबवले जातील, याकडे लक्ष दिले जात असल्याचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.

 

अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे गट हे आता आपापल्या पक्षासाठी कोणतं नाव वापरू शकतात ? ऍड. उज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा आणि शिवसेना हे नाव आगामी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वापरण्यास घातलेल्या बंदीच्या निर्णयावर ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गट निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात,’ असं प्राथमिक मत ऍड. उज्वल निकम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे.

निवडणूक आयोगाचा हा अंतिम निर्णय नाही. दोन्ही गटांकडून पुरावे सादर करणे, युक्तिवाद करणे या गोष्टींना बराच कालावधी लागू शकतो, त्यामुळे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लक्षात घेता निवडणूक आयोगाने हे तात्पुरते आदेश पारित केले असल्याचं ऍड. उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. ‘या निर्णयाविरुद्ध दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते. दोन्ही गटांना अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जर उमेदवार उभे करावयाचे असतील तर ते निवडणूक आयोगाच्या निकालाला ते आव्हान देऊ शकतात, शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत निकाल देण्यास निवडणूक आयोगाला वेळ लागू शकतो, साधारणपणे सहा महिन्यात निवडणूक आयोगाकडून अंतिम निकाल अपेक्षित असतो. निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहेत. आता तोंडी पुरावा काय सादर केला जातो, या दोन्ही गोष्टी लक्षात घेता आयोगाचा निकाल तसेच शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबतच्या वादाचे भवितव्य हे ठरेल,’ असंही यावेळी बोलताना ऍड. उज्वल निकम यांनी सांगितलं.

दोन्ही गटांसमोर नावासाठी आता कोणते पर्याय ?

‘दोन्ही गटांना आगामी निवडणुकांमध्ये ‘शिवसेना’ हे नावच वापरता येणार नाही का ? याबाबत यापूर्वीच्या अशा प्रकारणांमध्ये दिलेले निकाल अभ्यासावे लागतील. तसेच शिवसेना नावाच्या पुढे आणि मागे काहीतरी शब्द घालून ते दोन्ही गटांना वापरता येऊ शकतं,’ असं मत ऍड.उज्वल निकम यांनी मांडलं आहे.

गटातटातील विखुरलेल्या बौद्ध समाजाने एकत्र यावे – भन्ते राहुल बोधी


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बौद्ध समाज डोंबिवली तर्फे आज डोंबिवली पूर्व येथे गांधीनगरातील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात आज ‘कठीण चिवरदान सोहळा, वर्षावास सांगता समारंभ व भव्य धम्म रॅली २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली शहरात गेल्या तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या विभागात संपन्न झालेल्या वर्षवासाचा सांगता समारंभ सामुदायिकपणे करण्याचे योजिले होते.

समाजामध्ये डॉ.बाबासाहेबांची जयंती छोट्या मंडळ, विभाग आणि गटांमध्ये साजरी होते. त्यामुळे डॉ.आंबेडकरांनी दिलेली बौद्ध धम्माची संस्कृती आपल्या समाजात रुजली गेली पाहिजे. आज जो समाज गटातटात विखुरला गेलेला आहे तो अपेक्षित नाही. समाजाला एकत्र करायचे असेल तर बौद्ध धम्म शिवाय दुसरे कुठलेही माध्यम नाही असे प्रतिपादन भन्ते राहुल बोधी यांनी डोंबिवली येथील वर्षावास सांगता सोहळा कार्यक्रमाच्या वेळी केले.

वर्षावास सांगता समारंभाचे बौद्ध समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या सोहळ्यानिमित्त कठीण चिवर दान सोहळा व धम्म रॅली २०२२ चा सोहळा पार पडला. सुमारे पन्नासहून अधिक भन्ते सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात पुढे बोलताना भन्ते राहुल बोधी यांनी सांगितले की, वर्षावास हा बौद्ध धर्मात सुमारे २५०० वर्षापासून चालत आलेले प्रतिक आहे. जे भारतात नव्हे तर जगात सुद्धा प्रसिद्ध आहे. वर्षावास ही संस्कृती आपल्या समाजात रुजली पाहिजे, आत्ताच्या तरुण पिढीवर बुद्ध धम्म्माच्या विचाराचा प्रभाव पडल्यास भावी पिढी सुसंस्कृत होईल. बौद्ध समाजाचा आर्थिक, सामाजिक विकास होऊन बौद्ध समाज आदर्श पिढी म्हणून जगासमोर यावा या विचाराचे मंथन म्हणजे ‘वर्षावासाचे नियोजन’ असल्याचे महाथेरो राहुल बोधी यांनी सांगितले.

 

तर भन्ते आनंद महाथेरो यांनी आपल्या देशात बुध्दांनी दिलेला शांततेचा संदेश आणखी खोलवर रुजवला गेला तर शांती नांदण्यास मदत होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. वर्षावास काळात भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञान संपादन करायचं असते. भगवान बुद्धाच्या धम्माच्या झेंड्या खाली सर्व समाज एकवटला पाहिजे. भगवान बुद्धाच्या धम्माचा सर्व जगात प्रसार होत आहे. हा बुद्धांचा देश आहे म्हणून ह्या देशात बुद्ध हवा युद्ध नको असे सांगत सर्व बौद्ध समाजाने एक व्हावे असा संदेश येथील उपस्थित उपासकांना त्यांनी दिला.

या वर्षावास सांगता समारंभ व भव्य धम्म रॅली २०२२ चे मुख्य संयोजक भन्ते राहुल बोधी थेरो, प्रमुख मार्गदर्शक भन्ते डॉ. एन.आनंद महाथेरो, रॅलीचे स्वागत, सांगता समारंभाचे नियोजन अध्यक्ष डी. डी. जाधव आणि कार्यकारिणी, महिला मंडळ सम्यक धम्म सामाजिक संस्था, गांधीनगर, डोंबिवली यांनी आयोजन केले.

तर भोजनदान व विशेष मदत अंकुश गायकवाड, किरतकर कुटुंबीय, विश्वविकास गायकवाड, बिरजू जाधव, धम्मविवेक जाधव, वर्षावास सहभागी संस्था सम्यक धम्म सामाजिक संस्था गांधीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र एम.आय.डी.सी., यशोधरा महिला मंडळ गणेश नगर, बौद्ध सेवा संघ डोंबिवली, सम्राट अशोक बुद्ध विहार संजय नगर, धम्मदीप बुद्ध विहार लोढा हेरीटेज, लुंबिनी बुद्ध विहार कोपर, भीमगर्जना महिला मंडळ त्रिमूर्तीनगर, देसलेपाडा – भोपर बौद्ध समाज, सिद्धार्थनगर रहिवासी, सहभागी राजकीय सामाजिक संस्थेचे प्रल्हाद जाधव (अध्यक्ष रिपब्लिकन पक्ष कल्याण जिल्हा), अंकुश गायकवाड (अध्यक्ष डोंबिवली शहर रिपब्लिकन पक्ष), माणिक उघडे (अध्यक्ष झोपडपट्टी महासंघ), लक्ष्मण अंभोरे (अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष), आनंद नवसागरे (रिपब्लिकन सेना), सुरेंद्र ठोके (अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी डोंबिवली – पूर्व), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्था, भारतीय बौद्ध महासभा, भारती फौंडेशन यांच्या उपस्थितीत विशेष सहकार्य अंबादास खंडागळे, रविकिरण मस्के, अशोक कापडणे, प्रा.धनंजय पगारे, महेंद्र जाधव, सुहास रोकडे, कल्पना चौधरी, रवींद्र गुरचळ, निलेश कांबळे, विजय इंगोले, बाजीराव माने, रवी इंगोले, अर्जुन केदार, संजय गौतम, गुलाब खंदारे, सचिन साळवी, सूर्यकांत पारधे, आशिष कांबळे, विलास खंडिझोड, श्रीकांत माने, राष्ट्रपाल ढोबळे, मनीष सरकटे यांच्या उपस्थितीत पार पडला.