Home Blog Page 101

नाशिकला अग्नितांडव; बसमधील १८ प्रवाशी होरपळून ठार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शनिवारी सकाळी खासगी ट्रॅव्हल बस आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे, अपघटनांतर बसने लगेच पेट घेतला. यामध्ये १८ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

कसा झाला अपघात


चिंतामणी ट्रॅव्हल्सची खासगी बस शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास औरंगाबादहून मुंबईकड़े जात होती. अमृतधाम चौफुलीजवळ टाकळीकडून कोळसा भरून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रकने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बस ने आयशर ट्रकला सुमारे ५०० ते ६०० मीटर फरफटत नेलं. यावेळी आयशर ट्रकचा डिझेल टॅंक फुटल्याने काही क्षणातच बसने पेट घेतला.

बसमधून उड्या घेत प्रवाश्यांनी जीव वाचवला

पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने बसमधील बरेच प्रवासी गाढ झोपेत होते. बसला आग लागताच, अनेक प्रवाशांनी बसच्या खिडकीतून रस्त्यावर उड्या घेतल्या, तर काही प्रवासी हे आगीत होरपळून बाहेर पडले. मात्र त्यांना मदत न मिळाल्याने जागीच गतप्राण झाले.

मदत वेळेवर पोहोचली नाही

अपघातस्थळी हजर असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने १००, नंबर ११२, रुग्णवाहिका १०८, अग्निशमन दल आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी संपर्क साधला. परंतू पहाटे ६ वाजेपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर जखमींना आणि मृतांनाही शहर बस मधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

बस दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन दुर्घटना बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे. नाशिक दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाखांची मदत दिली जाणार असून जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री नाशिकला रवाना

नाशिक बस अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करण्यासाठी नाशिकला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, मी सर्व अधिकारी, प्रशासकीय वर्गाच्या संपर्कात आहे. जखमींचा जीव वाचवण्याचा प्राधान्य दिलं जाईल. काही जणांना खासगी रुग्णालयात दाखल केलंय त्यांच्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करू असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

भविष्यातील आर्थिक संकटांविरुद्ध धोरण तयार करण्याचे आवाहन करत ‘आयएमएफ’ ने दिला जगाला धोक्याचा इशारा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था’ ही जागतिक स्तरावर आर्थिक बाबींचा अभ्यास तसेच आर्थिक स्थैर्य व वाढीकरिता नियोजन करणारी प्रमुख संस्था असून याआधी संस्थेने आर्थिक मंदीचा इशारा जगातील प्रमुख देशांना दिला होता. नुकतीच आर्थिक दरवाढीची वर्ष २०२२-२३ करिता आकडेवारी कमी करताना संस्थेने ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा पुन्हा एकदा जगाला दिला आहे. ‘आयएमएफ’ च्या ताज्या आकडेवारीनुसार वर्ष २०२६ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसणार असून ती ४ लक्ष कोटी डॉलरने कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेने मोठे आर्थिक संकट जगासमोर उभे राहणार असल्याने जगातील सर्व देशांनी आर्थिक धोरण तयार करण्याचे आवाहन आयएमएफ द्वारे करण्यात आले आहे.

जॉर्जटाऊन विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित करताना ‘आयएमएफ’ च्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली लवकरच जाण्याकडे वाटचाल करत असून यामुळे जगाची आर्थिक स्थिती बिकट होऊ शकते. यामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण होऊन आर्थिक संतुलन बिघडू शकते. याचा परिणाम म्हणजे मोठे आर्थिक आव्हाने उभे राहणार असल्याने आतापासून प्रमुख देशांनी आर्थिक धोरण राबविणे गरजेचे आहे. हा इशारा जगातील प्रत्येक छोट्या-मोठ्या देशांकरिता असून, मंदीतून सावरण्यासाठी आतापासून प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना जॉर्जिव्हा म्हणाल्या की, सर्व आर्थिक बाबी बिघाडीतलच व सर्व कोलमडेल असे नाही काही गोष्टी या चांगल्या देखील होतील परंतु गंभीर आर्थिक संकटांसोबत लढण्याची स्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी नियोजन व आर्थिक धोरण आवश्यक असल्याने या बाबीवर भर देणे गरजेचे आहे. ‘आयएमएफ’ ने यापूर्वी वर्ष २०२२ करिता आर्थिक वाढीचा दर ३.२ टक्के इतका असेल असे म्हटले होते परंतु तो कमी होऊन वर्षाअखेर २.९ टक्क्यांवर येण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे.

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतरच ७५ हजार पदे शिक्षक भरती; राज्य शालेय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य सरकारने विविध शासकीय विभागाच्या भरतीचा निर्णय घेतला असून या अंतर्गत आधीच एमपीएससी अंतर्गत भरावयाच्या पदांसाठीची महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयामधील त्रुटी दूर करण्यात आली. लवकरच राज्य सरकार शिक्षण विभागाच्या देखील भरती करणार असून याअंतर्गत ७५ हजार पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. शिक्षण विभागाच्या भरतीमध्ये शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. सध्या राज्यात अतिरिक्त शिक्षक आहेत, त्यामुळे नव्याने भरती करायची झाल्यास या अतिरिक्त शिक्षकांचे भविष्य काय ? असा सवाल देखील उपस्थित होतो. नेमके यावर स्पष्टीकरण देताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन दिले की, शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना अगोदर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे.

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्याने या शिक्षकांना न्याय तर मिळेलच शिवाय होणाऱ्या आर्थिक बचतीमुळे हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यास मदत होईल. याचा एकंदरीत परिणाम बघता विद्यार्थ्यांवर अधिक खर्चास प्राधान्य देण्याचा मानस शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात राज्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मुलांना जवळच्या शाळांमध्ये समाविष्ट करण्यात येईल, यासाठी क्लस्टर शाळांची निर्मिती होईल तसेच अशा विद्यार्थ्यांकरिता स्कुल बसची सुद्धा व्यवस्था करण्यात येईल, असे केसरकर म्हणाले.

याप्रसंगी बोलताना राज्य शालेय शिक्षण मंत्री म्हणाले की पवित्र पोर्टल बंद केले जाणार नाही. शिक्षण संस्था चालक जरी शाळा चालवत असले तरी सुद्धा शिक्षकांना पगार सरकार देते त्यामुळे आम्ही म्हणू तोच निर्णय योग्य असे धोरण संस्थांचे नसावे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत मंत्री महोदयांनी व्यक्त केले.

 

संपकाळात बडतर्फ केलेले ११८ कर्मचारी पुन्हा कामावर रुजू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यामध्ये एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे, त्यामाध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महामंडळाला दिले.

परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन आयुक्तायालयाची आढावा बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांचेसह राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार या बैठकीस उपस्थित होते.

११८ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याच्या सूचना

संपकाळात सुमारे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचारी बडतर्फ झाले होते, त्यानंतर न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत पाळू न शकलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्याची कार्यवाही प्रलंबित होती, या कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू करून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत.

इलेक्ट्रिक, सीएनजीवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार

लोकसंख्येचा भार वाढला त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी असून ही संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दीडशे इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेतली जाणार असून ५०० नवीन डिझेल बसेसची खरेदी प्रक्रिया सुरु आहे. सुमारे एक हजार बसगाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतरण करण्यात येत असून जून २०२३ पर्यंत सुमारे दोन हजार इलेक्ट्रिकवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होतील त्यातून प्रवाशांना आरामदायी, पर्यावरणपूरक प्रवासाचा आनंद घेता येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ५४ लाख ज्येष्ठांचा मोफत प्रवास

सामाजिक बांधिलकी म्हणून विविध घटकांना एसटीच्या २१ सवलती दिल्या जातात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत देणारा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे, सरकारच्या या निर्णयामुळे आतापर्यंत ५४ लाख ज्येष्ठ प्रवाशांनी लाभ घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाचे कौतुक केले.

मालवाहतूक सेवेतून १०७.८० कोटींचे उत्पन्न

एसटीचे महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरु केलेल्या मालवाहतूक सेवेतून आजपर्यंत सुमारे १०७.८० कोटींचे उत्पन्न मिळाले असून या सेवेद्वारे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्न धान्याची वाहतूक करण्या संदर्भातील प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

‘डीबीओएलटी’ तत्वावर बसपोर्टचा होणार विकास

एस.टी. महामंडळाच्या सुमारे ८१२ ठिकाणी १४२३.९० हेक्टरच्या जागा असून त्यातील ५ शहरातील १८ मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा डीबीओएलटी (डिझाईन-बिल्ड- ऑपरेट-लीज-ट्रान्सफर) तत्वावर विकसित करण्यात येणार आहेत. त्यातून सुमारे ३ हजार ८०० कोटीपेक्षा अधिक महसूल मिळणार आहे. हे करताना त्या जागा केवळ व्यावसायिक वापरासाठी विकसित न करता निवासी-वाणिज्य या संमिश्र वापरासाठी करा आणि तसा आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करा

महाराष्ट्रात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी परिवहन विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. वाहनचालकांचे प्रशिक्षण, वाहनांची स्थिती, वाहतूक नियमांचे पालन आदी गोष्टींवर भर देऊन व्यापक उपाययोजना करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी बैठकीत दिले.

धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? उद्यापर्यंत म्हणणे सादर करा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्य बाण हे आपल्यालाच मिळावे यासाठी शिंदे गटाने आज निवडणूक आयोगाकडे रीतसर दावा केला आहे, त्यावर उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत ठाकरे गटाने आपले म्हणणे यावर सादर करावे अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

आज सायंकाळ पर्यंत निवडणूक आयोगाने दोन्ही गटांनी आपापले दावे आणि कागदपत्रे सादर करावीत अशी मुदत याआधीच निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना दिली होती, त्यानुसार शिंदे गटाने आपले म्हणणे सादर केले, त्याच्या समर्थनार्थ कागदपत्रांचे गठ्ठेही सादर करण्यात आले आहेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने मात्र आपले प्राथमिक म्हणणे सादर केले आहे, दरम्यान चिन्हावर शिंदे गटाने दावा केल्यावर आयोगाने यावर आपले म्हणणे मांडण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला नोटीस बजावून उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.

दोन्ही बाजूने पक्षावर आणि निवडणूक चिन्हावर दावा करण्यात आल्याने आयोग त्यावर निर्णय घेण्यासाठी किती वेळ घेतो आणि तोवर चिन्ह गोठवेल का हे लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.