Home Blog Page 104

विजयादशमीनिमित्त खो-खो स्पर्धेत महिला व पुरुष संघांनी लुटले सुवर्ण ! महाराष्ट्राचा गोल्डन धमाका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दसऱ्याच्या पू्र्वसंध्येला सुवर्णपदक जिंकून विजयादशमीचे सोने लुटले. दोन्ही गटात निविर्वाद वर्चस्व गाजवत महाराष्ट्राच्या खो-खो खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदकाची भेट देऊन विजयादशमीचा आनंद द्विगुणित केला.

‘संस्कारधाम इनडोअर स्टेडियम’मध्ये मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत महिला गटात महाराष्ट्राने ओडिशावर डावाने विजय साकारत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने १८-८ असा एक डाव व १० गुणांनी ओडिशाचा पराभव केला. महाराष्ट्राकडून रुपाली बडेने ३ मि. संरक्षण करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रियांका भोपीने २:५० आणि ३:५० मि. पळतीचा खेळ केला आणि २ गुण मिळवत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. प्रियांका इंगळेने १:५० मि. संरक्षणाचा उत्कृष्ट खेळ केला. तसेच तिने ८ गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रेश्मा राठोडने २:५० मि. संरक्षण केले. रुपाली बडेने ३ मि. पळतीचा खेळ करुन सर्वांचीच वाहवा मिळवली. अपेक्षा सुतारने १:४० मि. संरक्षण केले व दोन गुण देखील मिळवले. संपदा मोरे हिने १:२० मि. नाबाद संरक्षण केले. ऋतुजा खरे हिने दोन गुण मिळवले. ओडिशाकडून निकिता साहू, शुभाश्री व मागी माझी यांनी अष्टपैलू कामगिरी बजावली.

पुरुष गटात महाराष्ट्राने केरळ विरुद्ध आक्रमक खेळ करत सुवर्णपदक जिंकले. महिला गटाप्रमाणेच महाराष्ट्राचा पुरुष संघ डावाने जिंकतो की काय याची मोठी उत्सुकता होती. मात्र, महाराष्ट्राने केरळचा चुरशीच्या लढतीत सात मि. राखून व ४ गुणांनी (३०-२६) विजय साकारत सुवर्ण पदक पटकावले.

महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी ठरली. अक्षय भांगरेने २ मि. व १:१० मि. संरक्षण केले. रामजी कश्यप याने १:३० मि. व २ मि. पळतीचा सुरेख खेळ केला. ह्रषिकेश मुर्चावडेने अष्टपैलू कामगिरी बजावली. त्याने १:४० व १:३० मि. पळतीचा सुरेख खेळ केला व ६ गुण मिळवून संघाच्या सोनेरी यशात मोलाचा वाचा उचलला. सुरेश गरगटे याने १:२० मि. संरक्षण केले व १४ गुण घेऊन संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. प्रतिका वाईकरने १:२० मि. पळतीचा खेळ केला. लक्ष्मण गवसने ४ गुण मिळवले. केरळकडून निहाल, श्रीजेश व अभिराम यांनी झुंज दिली.

सुवर्ण भेट : शीतल भोर

महाराष्ट्रातील तमाम खो-खो आणि क्रीडा प्रेमींना विजयादशमी निमित्त सुवर्ण पदकाची भेट देता आली यापेक्षा दुसरा आनंद नाही. अंतिम सामन्यात ओडिशा संघाला डावाने हरवून सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास होताच आणि प्रत्यक्षात सामना डावाने जिंकून आम्ही सुवर्ण जिंकले याचा मोठा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया महिला खोखो संघाची कर्णधार शीतल भोर हिने व्यक्त केली. शीतल भोर म्हणाली की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपूर्वी खो-खो संघाचा १५ दिवसांचे सराव शिबिर घेण्यात आले. या सराव शिबिरात अधिक प्रभावी पद्धतीने सराव करुन घेण्यात आला. तसेच आम्हाला अतिशय चांगल्या सुविधा देण्यात आल्या. संघात दर्जेदार व अनुभवी खेळाडू असल्याने आमचा संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार होताच. संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, पदाधिकारी यांनी आमचे मनोबल वाढवले. या सर्वांचा परिपाक म्हणजेच आम्ही मिळवलेले हे सुवर्णपदक आहे, असे शीतल भोर हिने सांगितले.

सुवर्ण जिंकण्याचेच ध्येय होते : ह्रषिकेश मुर्चावडे

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आम्ही सुवर्ण पदक जिंकण्याचेच ध्येय घेऊन आलो होतो. सराव शिबिरात आणि या स्पर्धेत आम्ही जे डावपेच आखले होते. त्यानुसार खेळ केला आणि अपेक्षेप्रमाणे गोल्ड जिंकले. संघातील सर्व १५ खेळाडूंचा समन्वय व ताळमेळ अतिशय सुरेख होता. संघात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू असल्याने आमचा संघ विजेतेपदाचा दावेदार होता आणि आम्ही सर्वांचा विश्वास सार्थ ठरवत गोल्ड जिंकले याचा मनस्वी आनंद होत आहे. प्रशिक्षक शिरीन गोडबोले सरांनी कश्या पद्धतीने खेळ करावयाचा हे सांगितले होते. त्यानुसार आमचा स्पर्धेतील खेळ झाला आणि सुवर्ण पदकावर आम्ही शिक्कामोर्तब केले. विजयादशमीची खो-खो आणि महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना आम्ही सुवर्णपदकाची भेट देऊ शकलो यापेक्षा दुसरा आनंद नाही असे ह्रषिकेश मुर्चावडे याने सांगितले.

दोन सुवर्णाची खात्री होती : गोविंद शर्मा

महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांची स्पर्धेपूर्वीची तयारी आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रत्येक सामन्यात त्यांनी गाजवलेले वर्चस्व पाहता दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील याची मला खात्री होती. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करुन गोल्डन धमाका केला याचा मोठा आनंद आहे. सर्व खेळाडू याचे हकदार आहेत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी व्यक्त केली.

गोल्डचा डबल धमाका : चंद्रजीत जाधव

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत दोन्ही संघ अप्रतिम खेळले आहेत. जवळपास प्रत्येक सामने त्यांनी डावाने वा अधिक फरकांनी जिंकले आहेत. साहजिकच अंतिम सामन्यात दोन्ही संघ सुवर्ण पदक जिंकतील याची खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघ अंतिम सामन्यात जबरदस्त खेळले आणि सुवर्ण पदक जिंकले अशी प्रतिक्रिया भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे गोल्डन यश : नामदेव शिरगावकर

खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघांनी शानदार कामगिरी नोंदवत दुहेरी सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्रात खो-खो खेळाची मोठी परंपरा आहे. या परंपरेला साजेशी अशी कामगिरी आज नोंदवत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला दुहेरी सोनेरी यश खूपच आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचा महिला खोखो संघ :

प्रियांका भोपी, प्रियांका इंगळे, ऋतुजा खरे, शीतल भोर, श्वेता वाघ, अपेक्षा सुतार, रेश्मा राठोड, रुपाली बडे, आरती कांबळे, गौरी शिंदे, पूर्वा मडके, जान्हवी पेठे, मयुरी पवार, दीपाली राठोड, संपदा मोरे. कोच – प्रवीण बागल, व्यवस्थापक रत्नराणी कोळी, कोच प्राची वाईकर.

महाराष्ट्राचा पुरुष खोखो संघ :

राहुल मंडल, सागर पोतदार, अविनाश देसाई, मिलिंद कुरपे, अक्षय भांगरे, रामजी कश्यप, ह्रषिकेश मुर्चावडे, सुयश गरगटे, सुरज लांडे, अक्षय मिसाळ, प्रतिक वाईकर, लक्ष्मण गावस, धीरज सेनगर, निहार दुबळे, विजय शिंदे. कोच – शिरीन गोडबोले, संघ व्यवस्थापक कमलाकर कोळी, डॉ. अमित रावटे.

 

केबल व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी डोंबिवलीत महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील इंदिरा चौकात आज प्रचंड मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतर्फे केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील यांच्या आत्महत्ये प्रकर्णी भाजपा पक्ष आरोपीला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करत असल्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले.

 

या धरणे आंदोलनात महाविकास आघाडीतर्फे भाजपा डोंबिवली ग्रामीण चे उपाध्यक्ष संदिप माळी यांना आठ दिवसात अटक करून कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे आणि आठ दिवसात अटक न झाल्यास महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांतर्फे मोठ्या प्रमाणात जेलभरो आंदोलन व मंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

सदर आंदोलनात प्रमुख वक्ते माजीमंत्री जितेंद्र आव्हाड होते तसेच सदर आंदोलनात राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, वंडार पाटील, राष्ट्रवादी चे प्रवक्ते महेश तपासे, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, नंदू धुळे , ऍड.ब्रम्हा माळी इत्यादी तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख विवेक खामकर, महिला आघाडीच्या वैशाली दरेकर, मंगला सुळे, ग्रामीण महिला संघटक कविता गांवड, काँग्रेस चे प्रदेश सचीव संतोष केणे आदि प्रमुख नेते सह आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विषेश म्हणजे आत्महयेपूर्वी मयत केबल चालक प्रल्हाद पाटील यांनी व्हिडिओ काढून आत्महत्या केली होती. तो व्हिडिओ भरपूर व्हायरलही झाला होता. त्यात त्यांनी मुख्यतः भाजपा ग्रामीण शहराचे उपाध्यक्ष संदिप माळी व इतरांची नावे घेतली आहेत, या धरणे आंदोलन मध्ये प्रल्हाद पाटील च्या पत्नी न्याय मागण्यासाठी उपस्थित राहून संदिप माळी व त्यांच्या साथीदारांना अटक करून कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

 

धनुष्यबाणाचे काय होणार ? सुप्रिया सुळे म्हणाल्या, की महिनाभरात राष्ट्रवादीचे चिन्ह घराघरात पोहचते तर ये क्या चीज है ?


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सर्वोच्च न्यायालयाने खरी शिवसेना कुणाची, यासंदर्भातील निर्णयाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊ शकते, या चर्चेच्या अनुषंगाने बोलत सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेचा दाखला देत महिनाभरात आम्ही चिन्ह लोकांमध्ये पोहोचवले, निवडून आलो आणि सत्तेतही बसलो, अशी प्रतिक्रिया कराडमधील पत्रकार परिषदेत दिली.

धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार की गोठवले जाणार ?

धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार की गोठवले जाणार, यासंदर्भातील चर्चेच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत दहा दिवसांत निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचते. मग ये क्या चीज है, असे एक कार्यकर्ता म्हणाल्याचा किस्सा सांगून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोक सूज्ञ असतात. पण, आम्हीच ते अवघड मानतो. आता तर सोशल मीडिया फास्ट आहे. त्यामुळे नवीन चिन्ह मिळाले तरी लोकांपर्यंत पोहचेल. बंदूक काढणे, थप्पड मारणे ही आपली संस्कृती नाही.

सध्या महाराष्ट्राचे नाव खराब होत आहे

सत्ता गेल्याचे आम्हाला दु:ख नाही. सत्ता येते आणि जाते. परंतु, कोण बंदूक काढतेय, कोण एक थप्पड मारली तर चार थप्पड मारीन म्हणतेय. पन्नास खोके म्हटले तर समोरचा म्हणतो पाहिजेत का तुम्हाला, हे दुर्दैवी आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ज्या पद्धतीने आता महाराष्ट्राचे राजकारण चाललंय त्यामुळे महाराष्ट्राचे नाव खराब होत आहे. देशभरात यापूर्वी कधी महाराष्ट्राची चेष्टा झाली नाही ती आता होतेय, असे सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.

 

वाहनांच्या सीएनजी सह घरगुती स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचे दर पुन्हा वाढले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महानगर गॅससाठीच्या वायू पुरवठा हिश्श्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. परिणामी कंपनीला महागड्या दरात बाहेरून वायू घ्यावा लागत आहे. देशभरात सध्या वाढत्या महागाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. अशातच आता पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ सहन करावी लागणार आहे. कारण वाहनांमध्ये लागणारा सीएनजी व घरगुती स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पाईप नैसर्गिक वायूच्या दरात (पीएनजी) पुन्हा वाढ झाली आहे.

सीएनजीचे दर वाढले

महानगर गॅस लिमिटेडने सोमवारी सीएनजी आणि पीएनजीच्या दरात अनुक्रमे ६ रुपये व ४ रुपयांच्या दरवाढीची घोषणा केली. याद्वारे दीड महिन्यांपूर्वी झालेली कपात पूर्ववत झाली आहे.

कशामुळे वाढले दर ?

महानगर गॅसच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने वायूच्या दरात १ ऑक्टोबरपासून ४० टक्के वाढ केली आहे. त्याचवेळी महानगर गॅससाठीच्या वायू पुरवठा हिश्श्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. परिणामी कंपनीला महागड्या दराने बाहेरून वायू घ्यावा लागत आहे. त्यामुळेच ही दरवाढ करावी लागली आहे. त्यानुसार आता मुंबई शहर व परिसरात आता सीएनजी ८६ रुपये प्रति किलो व पीएनजी ५२.५० रुपये प्रति एससीएम असेल.

दरम्यान, जवळपास ३७ रुपयांच्या दरवाढीनंतर महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी वाहनधारकांना ऑगस्ट महिन्यात दिलासा देत दरात ६ रुपये प्रति किलो कपातीची घोषणा करण्यात आली होती. तसंच घरगुती स्वयंपाकासाठीच्या पाईप नैसर्गिक वायू (पीएनजी) दरातदेखील ४ रुपये प्रति एससीएमची कपात करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.

“कबड्डी माझा आत्मा तर शरीरसौष्ठव श्वास” – विजू पेणकर


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

“आज मी जे काही आहे ते कबड्डी आणि शरीरसौष्ठव खेळामुळे. हे दोन्ही खेळ माझे सर्वस्व आहेत. याच खेळांनी मला नाव आणि लौकिक मिळवून दिलं. म्हणूनच माझ्यासाठी कोणताही एक खेळ मोठा नाही. कबड्डी माझा आत्मा आहे तर शरीरसौष्ष्ठव माझा श्वास आहे. या खेळांनी मला खूप काही दिलंय. आता उर्वरित आयुष्यात मला या खेळासाठी आणि समाजासाठी द्यायचंय”, अशी भावना व्यक्त केली आपल्या ‘भारत श्री’ किताबाची पन्नाशी पूर्ण करणाऱ्या राष्ट्रीय कबड्डीपटू आणि शरीरसौष्ठवपटू विजू पेणकर यांनी.

महाराष्ट्राला पहिलावहिला ‘भारत श्री’ हे राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद पटकावून देणाऱ्या विजू पेणकर यांच्या या सोनेरी कामगिरीचा सुवर्णोत्सव साजरा करण्यासाठी मराठी क्रीडा पत्रकार संघांने विशेष कार्यक्रमाचे माझगाव येथील सर एली कदुरी हायस्कूलमध्ये आयोजन केले होते. या कार्यक्रमात जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांच्या हस्ते विजू पेणकर यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. तत्प्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत, मराठी क्रीडा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष हरचेकर, कार्याध्यक्ष सुहास जोशी, सचिव संदीप चव्हाण, कोषाध्यक्ष मंगेश वरवडेकर उपस्थित होते.

मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एकाच वेळी दोन खेळांमध्ये खेळणाऱ्या धडाकेबाज आणि जिगरबाज विजू पेणकर यांनी कबड्डीत आपले नाव गाजवल्यानंतर १ ऑक्टोबर १९७२ साली ‘भारत श्री’ या प्रतिष्ठेच्या किताबावर आपले नाव कोरले होते. ही त्यांची पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा होती आणि त्याच जेतेपदाची पन्नाशी साजरी व्हावी आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाची आठवण ताजी व्हावी म्हणून मराठी क्रीडा पत्रकार संघाने सोनेरी कामगिरीचा सुवर्णोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पेणकरांची ज्येष्ठ पत्रकार अश्विन बापट यांनी जबरदस्त मुलाखत घेतली. या मुलाखतीत बापट यांनी विजू पेणकरांना बोलते केले आणि तेही भरभरून बोलले. माझा सुरूवातीचा काळ खूप गरीबीचा आणि हलाखीचा होता. पण माझ्या आईने आम्हाला संघर्ष करायची जिद्द दिली आणि गरीबीला आपली ताकद करण्याची प्रेरणा दिली. आईने दिलेल्या शिकवणीमुळेच दहा बाय दहाच्या घरातून आज मी चार हजार चौरस फूटाच्या घरात पोहोचलोय. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून पेणकरांनी एकापेक्षा एक स्फूर्तीदायक शायरी पेश करून उपस्थितांची मनमुराद दाद मिळविली.