Home Blog Page 105

खासगी शाळांकडून अनुदान पुनर्विचारासाठी प्रस्ताव मागविल्यामुळे राज्य सरकारवर खर्चाचा अतिरिक्त बोजा वाढणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार विविध मुद्द्यांना बारकाईने हाताळत असून सध्यस्थितीत राज्यातील अनेक शाळांमध्ये तोकडी पटसंख्या असताना सुद्धा त्यांना अनुदान देण्याबाबत सरकार फेरविचार करत आहे. या प्रक्रियेसाठी राज्यातील एकूण ११९ शाळांकडून अनुदान प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सदर शाळा राज्यातील विविध विभागातील असून एकूण ८ जिल्ह्यातील शाळांना सध्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. अशा सर्व शाळांना येत्या १५ दिवसांत असलेल्या तुटींची पूर्तता करून प्रस्तावाचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शालेय शिक्षण विभागाने दिले आहे.

नव्याने फेरविचार करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक खासगी शाळांसोबतच कनिष्ठ महाविद्यालयांचा देखील समावेश आहे. जिथे राज्य सरकारचे वार्षिक एकूण उत्पन्न सव्वा तीन लाख कोटी आहे त्याच सरकारवर वार्षिक ४ लाख कोटी खर्चाचा बोजा असताना नव्याने अनुदानाचा प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी राज्य सरकार दाखवत आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर खर्चाचा भार आणखी वाढणार आहे. याचाच परिणाम म्हणजे दरवर्षी सरकार खर्चापोटी जवळपास ४५ हजार कोटींचे कर्ज घेते.

सदर प्रस्ताव बघता काही अशा देखील संस्था अनुदानासाठी पुढे सरसावल्या आहे ज्यांची पटसंख्या समाधानकारक आहे व अनुदान मागणी २० ते ४० टक्के इतकी आहे. त्यामुळे सरकारचा हा निर्णय कितपत योग्य ठरेल हे सांगणे एक कोडेच आहे. सध्या खासगी शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे त्यामुळे त्यांना जर पात्रता निकष पूर्ण करण्यात यश आले तर भविष्यात सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच होईल. इथे महत्वाची बाब म्हणजे तपासणीतून अनेक शाळांची पटसंख्या अतिशय कमी होती परंतु ते २० टक्के इतक्या अनुदानावर कार्य करत होती त्यामुळे त्यांना पटसंख्या निकष पूर्ण करावे लागतील तरच अनुदानावर येत्या काळात फेरविचार होईल. याकामी सरकारला वार्षिक दीडशे ते दोनशे करोड रुपये खर्च करावा लागेल.

 

एकनाथ खडसेंची भाजपात घरवापसीची चर्चा; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कानात ‘एकदा भेटून मिटवून टाकू’ म्हटल्याचा खुलासा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.

राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. आता नाशिकमध्ये एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीबाबत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत गौप्यस्फोट केला.

एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि माझी नाशिक येथे एका कार्यक्रमात भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या कानात ‘एकदा भेटून मिटवून टाकू’ असा खुलासा महाजनांनी केला आहे. महाजनांच्या या खुलासानंतर खडसेंना नेमका काय तोडगा काढायचा ? खडसे भाजपमध्ये जाण्याच्या विचारात आहेत का ? अशा अनेक चर्चांना आता उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह एकनाथ खडसे दिल्लीत अमित शहांना भेटायला गेले होते. मात्र, अमित शहा यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही बैठक होऊ शकली नाही. मात्र, खडसे यांची अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती खुद्द रक्षा खडसे यांनी दिली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या भेटीमुळे घरवापसीची चर्चा जोरात रंगली आहे.

 

पत्नीबरोबर संबंध ठेवायची इच्छा बोलल्याने मित्राचा खून; पोलीसांनी आरोपीला केली अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

टिटवाळ्यातील सावकरनगर परिसरात एका बंद घरात टिटवाळा पोलीसांना एक मृतदेह आढळून आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. परिसरात दुर्गंधी पसरली होती. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रिया सुरु केली. कल्याण तालुक्यातील टिटवाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक दिलीप देशमुख पोना. दर्शन सावळे,पोना. नितिन विशे, पोकॅा. योगेश वाघेरे या पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलीसांच्या तपासानंतर जी बाब समोर आली ती धक्कादायक होती. ज्या प्लॅटमध्ये महेश साबळे याचा मृतदेह आढळून आला होता. त्या फ्लॅटमध्ये खरात कुटुंबियातील एका तरुणाने आत्महत्या केली होती. त्या फ्लॅटला कुलूप लावून कुटुंबीय नाशिकला निघून गेले होते.

२२ सप्टेंबर रोजी आरोपी सागर खरात आणि त्याची पत्नी आणि मुलांसोबत टिटवाळा येथील सावकरनगरला परतला. या दरम्यान एके दिवशी रात्री त्याच्या घराखाली त्याचा जुना मित्र महेश साबळे त्याला भेटला. दोघांनी दारु पार्टी केली. हॉलमध्ये दारु पार्टी सुरु असताना महेश साबळे याने सागरला सांगितले की मला तुझ्या पत्नीसोबत संबंध ठेवायचे आहे. हे ऐकताच सागरने सोबत आणलेल्या दारूच्या बाटल्या महेशच्या डोक्यात फोडून मानेवर धारदार शास्त्राने वार करून त्याचा खून केला. अखेर पोलीसांनी सागर खरातला बेडय़ा ठोकल्या आहेत. सागर खरात या आधीही वांगणीतील एक हत्ये प्रकरणात जेल भोगून आला आहे. तो सराईत गुन्हेगार आहे.

सीसीटीव्हीच्या सहाय्याने टिटवाळा पोलीसांनी हा गुन्हा उघडकीस आणत आरोपी सागर खरात याला नाशिकहून अटक केली आहे. मयत तरुणाचे नाव महेश साबळे असे होते.

 

महाराष्ट्राच्या महिला व पुरुष गटातील खो-खो संघ उपांत्य फेरीत दाखल होत सुवर्णपदकाकडे वाटचाल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो-खो संघांनी उपांत्य फेरीत धडक मारून सुवर्णपदकाकडे आगेकूच केली आहे. उपांत्य सामने सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून रंगणार आहेत.

साखळी फेरीत अखेरच्या लढतीत महिला गटात महाराष्ट्राने पंजाबचा २४-१८ असा एक डाव आणि सहा गुणांनी पराभव करुन उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. महाराष्ट्राने गटात निविर्वाद वर्चस्व गाजवले. सलग तीन विजयासह महाराष्ट्र संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. संपदा मोरेने २:२० मि. पळतीचा सुरेख खेळ केला. प्रियांका इंगळेची कामगिरी अष्टपैलू ठरली. प्रियांकाने १:३० मि. नाबाद पळतीचा खेळ केला आणि आठ गुण देखील संपादन केले. रुपाली बडेने ३ मिनीटे संरक्षण करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दीपाली राठोडने २:२० मि. पळतीचा खेळ केला आणि आक्रमणात चार गुण देखील संघाला मिळवून दिले. शीतल भोरने सहा गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पंजाब संघाकडून सावेन व रमणदीप कौर यांनी झुंज दिली.

पुरुष गटात महाराष्ट्राने पश्चिम बंगालवर २२-८ एक डाव १४ गुणांनी विजय नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. साखळी सामन्यात महाराष्ट्राचा हा सलग तिसरा विजय ठरला. या दणदणीत विजयासह महाराष्ट्राने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची कामगिरी लक्षवेधक ठरली. त्यात प्रामुख्याने ऋषिकेश मुर्चवडेने १:३० मि. संरक्षण केले. रामजी कश्यपने २:३० मि. पळतीचा खेळ केला व आक्रमणात दोन गुण मिळवून दिले. सुयश गरगटेने चार गुण घेत संघाची स्थिती अधिक भक्कम केली. अक्षय भांगरेने २ मि. संरक्षणाचा खेळ केला. मिलिंद कुरपेने आठ गुण घेऊन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रतिक वाईकरने १:३० मि. संरक्षण व चार गुण मिळवत अष्टपैलू कामगिरी केली. लक्ष्मण गवसने १:३० मि. पळतीचा खेळ केला व २ गुण देखील मिळवले. एकूणच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सामन्यावर आपले वर्चस्व कायम ठेवत बंगालला पराभूत करुन सुवर्णपदकाकडे आगेकूच केली आहे. बंगालकडून सुभाष (२ गुण) व मुर्तजा (१:२० मि. संरक्षण व २ गुण) यांचा अपवाद वगळता अन्य खेळाडू छाप पाडू शकले नाहीत.

महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खो-खो संघांनी उपांत्य फेरी गाठल्याने प्रशिक्षक, संघ व्यवस्थापकांनी आनंद व्यक्त केला आहे. संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, कमलाकर कोळी, प्रवीण बागल आणि महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी संघाच्या दणदणीत विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना सुवर्ण पदक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. उद्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राचा संघ पुरुषांमध्ये कर्नाटक विरुध्द तर महिलांमध्ये दिल्ली विरुध्द लढत देणार आहे. तर पुरुषांचा दुसरा सामना केरळ वि. पश्चिम बंगाल व महिलांमध्ये कर्नाटक वि. ओडिशा असा रंगणार आहे.

आज झालेल्या इतर सामन्यात महिलांच्या सामन्यात कर्नाटकने हरियाणाचा २२-२० (१२-०८) असा २:३० मि. राखून २ गुणांनी पराभव केला. पुरुषांमध्ये आंध्र प्रदेश व तामिळनाडू हा सामना २८-२८ असा बरोबरीत सुटला.

 

शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश करत आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील हजारो शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

कोस्टल रोडसंदर्भात अदित्य ठाकरेंनी लक्ष न दिल्यानं शिंदे गटात सामील होत असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसाठी खास धनुष्यबाणाचा पुष्पगुच्छ कार्यकर्त्यांनी आणला होता. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं.

“हे सरकार तुमचं सर्वांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. तुम्हाला सर्वांनाही हे सरकार आपलं वाटतंय, त्यामुळे तुम्ही हक्कानं तुमच्या मागण्या मांडत असता. तुमचे सर्व प्रश्न आपण सोडवू. न होणारी कामं आपण पूर्ण करु. तुमचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. असा आपला प्रयत्न असणार आहे. आता मुख्यमंत्री म्हणजे, मी स्वतः सर्वसामान्य माणूस समजतो. हे सरकार तुमच्यासाठीच आहे. तुमचे प्रश्न ते आमचे प्रश्न, तुमच्या समस्या त्या आमच्या समस्या” असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.