Home Blog Page 106

दसरा मेळाव्या सारख्या टोमणे सभांनी महाराष्ट्राचं कधीच भलं होणार नाही; बावनकुळेंची शिवसेनेवर टीका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दसरा मेळाव्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवरच होणार तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांची दसरा सभा होणार आहे. या दसरा मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यांमध्ये विरोधी गटांवर कोणते आणि कसे आरोप केले जातील, याची सर्वच चर्चा करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

“उद्धव ठाकरे यांची जी सभा होणार आहे किंवा यापूर्वी ज्या सभा झाल्या त्या टोमणे सभा झाल्या. महाराष्ट्राच्या हिताबद्दल ते कधीच काही बोलले नाहीत. पुन्हा एकदा टिंगलटवाळी सभा होणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे असे कार्यकर्ते आहेत जे दिवसाचे १८ तास समर्पित आहेत. हे दोघेही नेहमीच विकासाचा विचार करतात. दसरा मेळाव्यात काय अपेक्षित आहे तर, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल ? महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर कसा पोहोचेल ? हेच अपेक्षित आहे. पण सेनेकडून आजपर्यंत दसरा मेळाव्यात फक्त टोमणे मारले गेले, टोमणे सभांनी महाराष्ट्राचं भलं होणार नाही.” असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. विकासासाठी काम करणारं हे नव सरकार आलं आहे. ट्वेंटीट्वेंटी मॅच खेळणारं हे सरकार आहे. हे दोघेही सुपरमॅन आहेत, बुलेट ट्रेन सुसाट सुरू आहे. मी कधीही एकनाथ शिंदेंना पाहतो तर ते विकासाबाबतच बोलत असतात, महाराष्ट्राला क्रमांक एकवर कसं नेता येईल याबाबत बोलत असतात. उद्धव ठाकरेंची सभा ही टोमणे सभाच असणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

 

पुण्यातील चांदणी चौकातील पूल अखेरजमीनदोस्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल स्फोटकांचा वापर करून पाडण्यात आला. पण स्फोटांमुळे पूल पूर्णपणे कोसळला नाही, तर खिळखिळा झाला. त्यानंतर पोकलेन मशीनच्या साह्याने पूलाचा उर्वरित भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. मध्यरात्रीनंतर मोजणी सुरू असताना १ वाजता स्फोट करण्यात आला.

या पुलाचे दगडी आणि सिमेंटचे बांधकाम स्फोटकांमुळे कोसळले असले तरी या पुलाच्या बांधकामात वापरलेले स्टीलचे बांधकाम अबाधित आहे. तसेच ज्या ठिकाणी स्फोटके पेरण्यात आली होती, त्या ठिकाणी सर्व स्फोटकांचा स्फोट झाला नसावा, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, हा पूल ३० वर्षे जुना होता. मध्यरात्री ठीक १ वाजता पुलाचा स्फोट झाल्यानंतर धुराचे लोट निघाले. मात्र, त्यानंतर १५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. कुठल्या स्फोटकाचा स्फोट होणार होता का ? याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली.

 

गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर केले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या दरानुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३२.५० रुपयांची कपात करण्यात आली असली तरी १४.२ किलोचा घरगुती सिलेंडर स्वस्त किंवा महागही झाला नसल्याने घरगुती सिलेंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. नैसर्गिक वायूच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली असून मुंबईमध्ये ३२.५० रुपये, दिल्लीमध्ये २५.५० रुपये, कोलकातामध्ये ३६.५ रुपये तर चेन्नईमध्ये ३५.५ रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर १८११.५० रुपये किमतीला मिळेल.

दरम्यान, महिन्याच्या सुरूवातीलाच नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली जागतिक बाजारात शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि वाहने चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस महाग होण्याची शक्यता आहे. वायू क्षेत्रातून तयार होणाऱ्या गॅससाठी द्यावा लागणारा दर ८.५७ प्रति दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा दर आधी ६.१ प्रति दशलक्ष डॉलर ब्रिटिश थर्मल युनिट इतका होता.

 

दोन तरूणांनी दुचाकीवरुन येत केला कांदिवलीत बेछूट गोळीबार !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कांदिवलीमध्ये गोळीबार झाला आहे. येथे दुचाकीवरुन आलेल्या २ जणांनी ४ राऊंड फायरिंग केली आहे. या फायरिंगमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे उघड झाले असून दहीहंडीच्या वेळी वाद झाला होता, त्यातूनच हा गोळीबार करण्यात आला. रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती मिळाली असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडले ?

शुक्रवारी रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी ही घटना घडली. यावेळी दोन तरुण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अंकित यादव असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. अंदर्गत वादातून हा प्रकार घडला आहे. दहीहंडीच्या वेळी या दोन गटांमध्ये वाद झाला होता. याच वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या फायरिंग दरम्यान तरुणाने चार गोळ्या झाडल्या आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार फायरिंग केल्यानंतर आरोपी हे तिथून फरार झाले आहेत. गोळीबार करणारे आणि जखमी हे एकमेकांना ओळखत होते. या फायरिंगमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. अंकित यादव असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अवीनाश दाभोळकर, मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण अशी इतर जखमींची नावे आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. फरार झालेल्या आरोपीचा पोलीसांकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत.

 

हैद्राबादच्या भामट्याने उल्हासनगरातील पप्पू कलानीच्या भावाला घातला ४० लाखांना गंडा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर शहरातील माजी आमदार पप्पू कलानी यांच्या भावाला हैद्राबादच्या एका भामट्याने ४० लाखांना गंडा घाटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गंडा घालणाऱ्या भामट्या विरोधात उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. क्रीष्णाकांत फुलपाथरी (रा. श्रीपूरम कॉलनी, हैद्राबाद ) असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव आहे.

असा घडला प्रकार

माजी आमदार पप्पू कलानी यांचे बंधू नारायण बुधममल कालानी (वय: ७९ वर्षे) यांचे उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर तीन भागातील फर्निचर बाजारमध्ये प्रसिद्ध हॉटेल आहे. तर आरोपी क्रीष्णाकांत फुलपाथरी हा हॉटेल मालक नारायण कलानी यांच्या बँकेचे आर्थिक व्यवहार गेल्या अनेक वर्षापासून विश्वासाने सांभाळत होता. त्यातच हॉटेलचा टॅक्स व जीएसटीचा भरणा करण्यासाठी आरोपी क्रीष्णाकांत याला हॉटेल मालक नारायण यांनी उल्हासनगर मधील २ बँकेत खात्यामधून ४० लाख ९७ हजार ३७५ हजराचे दोन धनादेश ३ ऑक्टोंबर २०२० ते १८ ऑगस्ट २०२२ या दरम्यान देऊन हॉटेलचा टॅक्स व जीएसटीचा भरणा करण्यासाठी दिले.

मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव

मात्र आरोपी नोकराने हॉटेलचा टॅक्स व जीएसटीचा भरणा न करता सदरचे धनादेश आपल्या व मित्राच्या खात्यात वळते करून मालकांची आर्थिक फसवणूक केली. दुसरीकडे नोकरानेच विश्वासघात करून आपली फसवणूक केल्याचे समजताच हॉटेल मालक नारायण कलानी यांनी २९ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन हैद्राबादला राहणाऱ्या क्रीष्णाकांत फुलपाथरी यांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे ४० वर्ष कलानी परिवाराचे शहरात राजकीय व अनेक व्यवसायात वर्चस्व आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच त्यांच्या कुटूंबातील एका सदस्यांची आर्थिक फसवणूक झाल्याने शहरात हा विषय चर्चेचा ठरला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहे.