Home Blog Page 107

उपायुक्तांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला दिली धमकी; ‘शिंदे गटात न आल्यास एन्काउंटर करेन’..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी न झाल्यास एन्काउंटर करण्याची धमकी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के.मढवी यांनी केला आहे. नवी मुंबई – परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत असून, १० लाखाची खंडणी मागत असल्याचा तसेच एन्काउंटर करण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप माजी शिवसेना नगरसेवक एम.के.मढवी यांनी केला आहे.

मढवी यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. मढवी यांच्या या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, शहर प्रमुख विजय माने, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे आणि एम.के.मढवी यांच्या पत्नी विनया मढवी यांच्यासह नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, माझ्यावर वेगवेगळे गुन्हे नोंदवले जात असून, माझ्या विरोधात महिलांना पुढे करत विनयभंगाच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत. २० जूनपासून हा सगळा त्रास मला व माझ्या कुटुंबाला दिला जात आहे. झोन-१ चे उपायुक्त विवेक पानसरे मला विजय चौगुलेंच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव टाकत असून, हे सगळे सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. मात्र मी उद्धव साहेबांची शिवसेना सोडणार नाही. हा सगळा त्रास असाच सुरू राहिला तर उपायुक्त विवेक पानसरेंच्या कार्यालयासमोर मी व माझे कुटुंब सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा मढवी यांनी बोलताना दिला आहे. आपल्या तसेच आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार झोन-१ चे उपायुक्त विवेक पानसरे, संदीप नाईक, विजय चौगुले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा असतील असे मढवी यांनी म्हटले आहे. उपायुक्त विवेक पानसरेंविरोधात आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे देखील मढवी म्हणाले.

उपायुक्त पानसरे म्हणाले, आरोप खोटे :

उपायुक्त विवेक पानसरे यांनी मात्र मढवी यांचे आरोप फेटाळले असून, हद्दपारीच्या भीतीपोटी मढवी बेछूट आरोप करत असल्याचे म्हटले आहे. मढवी यांच्यावर दखल आणि अदखलपात्र असे मिळून १३ गुन्हे दाखल असून त्यांच्या तडीपारीची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली :

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी एम.के.मढवी धमकी प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. राज्यात सध्या बीन पैशाचा तमाशा सुरू आहे. राज्यासमोर महागाई, बेरोजगारी सारखे अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय आकसापोटी शिवसैनिकांना धमक्या देण्यात, त्यांची झुणका भाकर केंद्र, पोळी भाजी केंद्र बंद पाडण्यात व्यस्त असून, शिंदे गटाच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे खासदार म्हणाले. मढवी कुटुंब लोकांची कामे करतात म्हणून त्यांना नगरसेवकपदाच्या दोन तीन टर्म मिळाल्या असल्याचे सांगत, शिवसेना मढवी कुटुंबियांच्या पाठीमागे असल्याचे खासदार राजन विचारे म्हणाले. मढवी धमकी प्रकरण हे गंभीर असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते बदनाम होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी, असे देखील खासदार विचारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

 

सहा महिन्यात मध्य रेल्वेच्या २३ लाख फुकट्या प्रवाश्यांकडून १५४ कोटींचा दंड वसूल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मध्य रेल्वेकडून राबवण्यात आलेल्या तिकीट तपासणी विशेष मोहिमेअंतर्गत सहा महिन्यात तब्बल २३ लाख २० फुकट्या प्रवाश्यांकडून दीडशे कोटी रूपायांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या सहा झोन मध्ये ही मोहीम राबवण्यात आली, त्यापैकी सर्वाधिक फुटके प्रवासी मुंबई विभागात आढळून आले आहेत तर सर्वात कमी पुणे विभागात फुकटे प्रवासी तिकीट तपासनीसांना मिळाले आहेत. सहा विभागाच्या यादीत नागपूर विभाग तिसऱ्या स्थानी आहे.

नागपूर विभागातही ३ लाख ३४ हजार फुकटे प्रवासी आढळून आले असून त्यांच्याकडून २२ कोटी ३६ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. मुंबई विभागात ९ लाख फुकट्या प्रवाश्यांकडून ५१ कोटीचा दंड वसूल करण्यात आला आहे तर भुसावळ विभागात ४ लाख ८९ हजार अवैध प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून ३८ कोटी ५८ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे असे मध्य रेल्वेकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले आहे.

 

लोखंडवाला मध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय मॉडेलची पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईतील अंधेरी भागातील एका हॉटेलच्या खोलीत ३० वर्षीय मॉडेलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. आकांक्षा मोहन असे या मॉडेलचे नाव असून ती लोखंडवाला येथील यमुना नगर सोसायटीत राहत होती. या प्रकरणी वर्सोवा पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अंधेरीच्या सी ब्रीजमध्ये बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मॉडेल आकांक्षा मोहनने हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी हॉटेलच्या वेटरने रुमची बेल वाजवली. अनेकवेळा बेल वाजवूनही रुमचा दरवाचा उघडला नाही. वेटरने ही माहिती हॉटेलच्या मॅनेजरला दिली. मॅनेजरने तात्काळ पोलीसांना फोन करुन कळवलं.

हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पोलीसांनी मास्टर किच्या आधारे खोलीचा दरवाजा उघडला. आत पाहिलं असता, मॉडेल आकांक्षा मोहनने पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर तात्काळ तिला रुग्णालयात पोहोचवण्यात आलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

पोलीसांनी घटनांवरून सुसाईड नोट जप्त केली आहे. त्यात असं लिहिलं आहे की, ‘माफ करा, याला कोणीही जबाबदार नाही, कोणाला डिस्टर्ब करु नका, मी खुश नाही, फक्त शांतता हवी होती’, असं त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटसृष्टीत काम न मिळाल्याने मृत मॉडेल नैराश्यात होती असा संशय व्यक्त केला जात आहे. अधिक तपास वर्सोवा पोलीस करत आहे.

 

गांधी जयंती दिनी ७५ नद्यांची परिक्रमा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा समारोप, हॅलो ऐवजी वंदे मातरम् अभियानाचा शुभारंभ, वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियोजन भवनाचे उद्घाटन याबरोबरच ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे.

या सर्व उपक्रमांचा आणि नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ कार्यक्रम वर्ध्यातील जिल्हा क्रिडा संकुल येथे होणार असून या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याच बरोबर “हॅलो ऐवजी वंदे मातरम्” या अभियानाचे संकल्पक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मॅगासेसे पुरस्कार विजेते आणि जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

महाराष्ट्रातील नद्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच आपले आरोग्य चांगले राहणार आहे आणि हेच ओळखून महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील एकूण ७५ नद्यांचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वर्धा येथील सेवाग्राममध्ये “चला जाणूया नदीला” या महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील ७५ नद्यांचे संवर्धन करीत असातना राज्यातील नद्यांची सद्यस्थिती नेमकी काय आहे. तसेच नदी संवर्धन करताना काय करणे आवश्यक आहे याची दिशा मिळण्यास या महोत्सवाच्या माध्यामातून मदत होणार आहे. या राज्य शासनाच्या उपक्रमात लोकसहभाग मिळाला तरच हा महोत्सव यशस्वी होईल, त्यामुळे नागरिकांनी या महोत्सवात मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

शिल्लक उरलेली सेना बुडत्या काँग्रेसच्या आधाराने वाचविण्याची धडपड सुरू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक उरलेल्या सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार आहे, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यास गर्दी जमविण्यासाठी काँग्रेसने कार्यकर्ते पुरविण्याच्या मोबदल्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातील शिल्लक सेनेची कुमक पुरविण्याची ठाकरे यांची धडपड केविलवाणी असून आता ‘पेंग्विन’ सेनेने हिंदुत्वाशी कायमची फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला. दसरा मेळाव्याकरिता गर्दी जमविण्याचे अभूतपूर्व आव्हान ठाकरे यांच्यासमोर उभे असल्याने उरल्यासुरल्या ‘पेंग्विन’ सेनेच्या आवाक्याबाहेरच्या या आव्हानास सामोरे जाऊन लाज वाचविण्यासाठी ठाकरे यांची जोरदार धडपड सुरू आहे. त्यासाठी त्यांनी शिल्लक सेनादेखील काँग्रेसच्या दावणीला बांधून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसपुढे गुडघे टेकल्याने ठाकरे यांचे नेतृत्व संपले, आता काँग्रेसच्या वळचणीस जाऊन उरलीसुरली सेना पण संपविण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला आहे. विश्वासघाताने, जनादेश धुडकावून मिळविलेले मुख्यमंत्रीपद टिकविण्याच्या धडपडीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पक्ष गहाण टाकून त्यांनी अगोदर शिवसेनेची चक्क विल्हेवाट लावली. आता शिवाजी पार्कवरील मेळाव्याचा फज्जा उडण्याच्या भीतीने त्यांनी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात फज्जा उडणार याची जाणीव असल्याने काँग्रेसने ‘गांधी यात्रे’ची लाज वाचविण्यासाठी सैनिकांची कुमक देण्याच्या अटीवर ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी गर्दी पुरविण्याची ग्वाही दिली आहे, असा गौप्यस्फोट प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

मुख्यमंत्रीपदाची हाव आणि पुत्रप्रेमाच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण शिवसेना पणाला लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे भवितव्यच या मेळाव्यातील शक्तिप्रदर्शनावरच अवलंबून असल्याने काँग्रेसने त्यांना कोंडीत पकडले आहे. बाळासाहेबांच्या पक्षाची त्यांच्या कौटुंबिक वारसाने केलेली केविलवाणी अवस्था पाहून कीव येते, असेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये जनतेने कौल दिलेल्या जनादेशाचे पालन केले असते, तर आपल्या हाताने पक्षाच्या विसर्जनाची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला.

ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याची हवा अगोदरच निघून गेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईचा वापर करून गर्दीसमोर वल्गना करण्यापलीकडे राज्याचे नेतृत्व करण्याची ठाकरे यांची क्षमता नाही, हे त्यांनी स्वतःच अडीच वर्षांच्या सत्ता कार्यकाळात दाखवून दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्यांखेरीज पक्षाचे अस्तित्व टिकविणे शक्य नाही याची जाणीव झाल्यामुळेच उरतणीला लागलेल्या या पक्षांच्या आधाराने उरलासुरला गट टिकविण्याची धडपड संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे, असेही ते म्हणाले.