Home Blog Page 108

केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील आत्महत्या प्रकरणात बदनाम करण्याचा राष्ट्रवादीचा डाव असा भाजपचा आरोप..

_
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा-पनवेल मार्गावरील दातिवली आणि निळजे रेल्वे स्थानकादरम्यान संदप गावातील केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांतील अंतर्गत कलह कारणीभूत असून यात भाजपच्या कार्यकर्त्याला नाहक गोवण्याचा प्रयत्न होत असून भाजपला बदनाम करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. डोंबिवली भाजपा ग्रामीण चे अध्यक्ष नंदू परब, पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, माजी नगरसेविका रवीना माळी, अमर माळी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

डोंबिवली जवळील संदप गावातील केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील यांनी १० सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी प्रल्हाद पाटील यांनी एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओत सदर आत्महत्या ही भोपर गाव येथील राहणारे संदीप माळी मारहाण आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला होता तसेच काही लोकांची नाव जाहीर करत आत्महत्या केली होती. याबाबतची तक्रार मयत प्रल्हाद पाटील यांचे मोठे बंधू चंद्रकांत नारायण पाटील यांनी ठाणे रेल्वे पोलीसांकडे केली असून ठाणे जीआरपीमध्ये गुन्हा दाखल झाला होता._

भोपर आणि परिसरात संदीप माळी, रवीना माळी, अमर माळी यांनी मूलभूत सुविधा, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवली आहे. भाजपचे संघटन विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करीत असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात दुखु लागले आहे म्हणूनच राष्टवादीचे प्रवक्ते महेश तपासे हे आत्महत्या प्रकरणात भाजपच्या कार्यकर्त्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या आत्महत्या प्रकरणात भाजपाच्या संदीप माळी यांना नाहक गुंतवलं जात असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे केबल व्यवसायिकाच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने उभे ठाकले आहेत.

भाजपचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

यावरून भाजपाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ठाणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्ष संपत चालला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पक्षावर लक्ष नाही दिलं तर जे दोन पाच लोक निवडून येतात ते देखील येणार नाहीत असा टोला कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांसमोर लगावलाय. केबल व्यावसायिक प्रल्हाद पाटील याच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाच्या संदीप माळी यांना नाहक गुंतवलं जात असल्याचं भाजपाकडून आरोप करण्यात आलाय. त्यामुळे पक्षनिष्ठा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे भाजपा ठामपणे उभा राहिल. या प्रकरणाबाबत ठाणे रेल्वे पोलीस तपास करीत असून, त्यांनी निःपक्षपातीपणे तपास करावा असे शशिकांत कांबळे यावेळी बोलताना म्हणाले तसेच यापुढे बोलताना भान ठेवून बोला, असा इशाराही देत केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत.

व्यावसायिकाने मानसिक त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या

सदर आत्महत्या ही झालेल्या मानसिक त्रासातून आणि अंतर्गत कौटुंबिक कलहातून झाली आहे. संदीप माळी यांच्या वर या प्रकरणी कोणत्याही प्रकारचे आरोप नसल्याचे पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांनी सांगितले. तर केबल व्यावसायिकांच्या बैठकीत कोणताही वाद नव्हता. सर्व काही बोलणी सामंजस्याने झाली होती. असे भाजपा ग्रामीण अध्यक्ष नंदू परब म्हणाले. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने उभे ठाकले आहे आहेत व या प्रकरणाचा तपास पुढे नेमका कोणत्या दिशेला जातो ते आता पहावं लागेल.

 

गडकरींची मोठी घोषणा ! पुढील वर्षापासून कारमध्ये ‘सहा’ एअरबॅगची अंमलबजावणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला आहे. पुढील वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे वाहन उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठ आसनी कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय लागू करण्यात आला. हा निर्णय १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार होता. पण आता या निर्णयाची अंमलबजावणी एक वर्ष लांबणीवर गेली आहे. आता १ ऑक्टोबर २०२३ पासून कारमध्ये सहा एअरबॅग्ज बसवण्यात येणार आहेत.

निर्णय लांबणीवर ?
नितीन गडकरी यांनी ट्विट करून आपल्या निर्णयाची माहिती दिली. वाहन उद्योग सध्या मागणी-पुरवठा साखळीतील आव्हानांना तोंड देत आहे. या समस्यांचा परिणाम वाहन उद्योगावर होत आहे. हे लक्षात घेऊन पुढील वर्षापासून वाहनांच्या एम-१ श्रेणीत सहा एअरबॅग्ज लागू करण्यात येणार आहेत.

किंमतीत वाढ ?
कारमधील एअरबॅगची संख्या वाढल्याने कारच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जर कार सहा एअरबॅगसह आली तर कारची किंमत ३० हजार ते ४० हजारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

एअरबॅगची गरज काय ?
भारतात कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य केल्या असत्या तर सध्या १८ दशलक्षाहून अधिक एअरबॅगची गरज पडली असती. सध्या देशात ६ दशलक्ष एअरबॅग तयार होतात. याचा अर्थ देशात जवळपास १२ दशलक्ष एअरबॅगचा तुटवडा आहे.

आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी ‘नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’ येणार आणि ‘जीपीएस’ होईल लवकरच हद्दपार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जगातील कुठलेही स्थान शोधायचे झाल्यास किंवा एखाद्या ठिकाणाची अचूक माहिती देणे, माहिती असलेले स्थान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोधण्यासाठी ‘नॅव्हिगेशन प्रणाली’चा वापर करण्यात येते. या अंतर्गत सॅटेलाईटच्या मदतीने नॅव्हिगेशन सिस्टमद्वारे अचूक स्थान शोधण्याकरिता सहाय्य मिळते. सध्या भारतात ही सेवा ‘जीपीएस’ सिस्टमद्वारे देण्यात येते, ज्याला लवकरच हद्दपार करण्यात येणार आहे. या ऐवजी, पुढील वर्षी जानेवारी २०२३ मध्ये स्वदेशी बनावटीचे ‘नॅव्हिक’ म्हणजेच ‘नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन सिस्टम’ भारतभर लागू करण्यात येणार आहे. सदर बाबतीत केंद्र सरकारने सर्व मोबाईल कंपन्यांना सूचना दिल्या आहे, यामुळे जीपीएस सेवा हटविण्यात येणार आहे.

‘नॅव्हिक’ बद्दल सांगायचे झाल्यास हे एक संपूर्णतः स्वदेशी ‘नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’ असून भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने याची निर्मिंती केली आहे. एकूण १७४ कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला होता. वर्ष २००६ पासून प्रस्तावित असलेले या सिस्टम निर्मितीचे कार्य २०१८ साली सुरु करण्यात आले होते. सध्या हे स्वदेशी ‘नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’ वापराकरिता सुसज्ज असून वर्ष २०२३ पासून सर्व मोबाईल कंपन्यांना ते लागू करण्याचा आदेश भारत सरकारने दिला आहे. या उपक्रमाकडे आत्मनिर्भर भारत मोहिमेचा भाग म्हणून देखील बघण्यात येत आहे.

सध्या भारत सरकारकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर सर्वात मोठी अडचण झाली आहे ती मोबाईल कंपन्यांची, कारण ‘जीपीएस’ ला वगळून ‘नॅव्हिक’ ला लागू करायचे झाल्यास अतिरिक्त भांडवल व त्यावरील खर्च लागणार, सोबतच देण्यात आलेला कमी वेळ ही सुद्धा मोठी समस्या आहे. ‘जीपीएस’ च्या तुलनेत ‘नॅव्हिक’ सॅटेलाईटची क्षमता सध्या तरी कमी असल्याने यामुळे वापरकर्त्यांना ही प्रणाली कितपत आवडणार, हा देखील महत्वपूर्ण प्रश्न निर्माण होत आहे. कारण ‘जीपीएस’ संपूर्ण पृथ्वीला अनुसरून कार्य करतो तसेच त्याचा उपग्रह पृथ्वीची दिवसातून दोन वेळा प्रदक्षिणा करतो. या तुलनेत ‘नॅव्हिक’ चा सॅटेलाईट फक्त भारत व भोवतालच्या प्रदेशाचे भ्रमण करतो.

सध्या सरकार स्वदेशी बनावटीच्या नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टमला उपयोगात आणून इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच भारतात आर्थिक स्त्रोतांचे साधन निर्मित करण्यावर भर देत आहे, त्यामुळे आत्मनिर्भर भारत चा भाग म्हणून स्वदेशी सॅटेलाईट आधारित सेवा देण्याचा भारत सरकारचा मानस आहे. परंतु सरकारच्या निर्णयाचा मोबाईल कंपन्यांनी चांगलाच धसका घेतला असून त्यांना भविष्यात होणाऱ्या आर्थिक नुकसानाची चिंता लागली आहे, त्यामुळे ‘नॅव्हिक’ ला लागू करण्याकरिता त्यांनी सरकारला दोन वर्षांची मुदत मागितली आहे.

सरकार लागू करण्याचा विचार करत असलेली स्वदेशी बनावटीची नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम किती यशस्वी होईल हे लवकरच कळेल, परंतु यामुळे येत्या काळात भारत देखील आपल्या देशवासियांना स्वदेशी निर्मित तंत्रज्ञान सेवा देणारा प्रमुख देश म्हणून ओळखला जाईल, हे मात्र नक्की.

आमदार विश्वनाथ भोईर यांनी पोलीसांना दिलेल्या निवेदनात साळवी यांना तडीपार नोटिस प्रकरणी बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्यावी असे म्हटले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे कल्याण येथील पदाधिकारी विजय साळवी यांना पोलीसांकडून तडीपारीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र याप्रकरणी साळवी यांना बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्या, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. आमदार भोईर यांनी आज विविध पदाधिकारी आणि नगरसेवकांसह कल्याणचे झोन-३ चे उपयुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेत यासंदर्भात निवेदन सादर केले.

शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे कल्याण येथील पदाधिकारी विजय साळवी यांना काही दिवसांपूर्वीच तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीबाबत विजय साळवी यांनी आपल्याला संपर्क साधल्याची माहिती यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी झोन-३ चे उपयुक्त सचिन गुंजाळ यांना दिली. विजय साळवी यांच्यावरील प्रमूख गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे असून त्यासाठी त्यांना तडीपार करणे न्यायोचित होणार नसल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी उपयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर विजय साळवी यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्यावी आणि सर्व कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तर विजय साळवी यांच्यावर कारवाई करण्यामध्ये शासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही की कोणताही आकस नाही. तसेच अशा कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजिबात वेळ नसल्याचेही आमदार भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक रवी पाटील, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, सुनिल वायले, श्रेयस समेळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ तर्फे जागतिक श्वानदंश दिनानिमित्त जनजागृती रॅली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ तर्फे दर वर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी देखील दि.२८ सप्टेंबर रोजी रॅबीज दिनानिमित्त एक आठवड्याचा भटक्या श्वानांसाठी रॅबीज लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आठवड्यात दिनांक १७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत १५८४ भटके कुत्रे व भटक्या मांजरींना रॅबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली. तसेच २८ सप्टेंबर रोजी गणेश मंदिर डोंबिवली येथून एक रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये प्रकाश विद्यालय, महात्मा गांधी विद्यामंदिर, प्रगती कॉलेज व एमकेएम पटेल कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच अनेक श्वानप्रेमी व प्राणी प्रेमी व व्हिपीडब्ल्यूए चे सदस्य या रॅलीत सहभागी झाले होते.

या रॅली नंतर एका चर्चासत्राचे आयोजन गणेश मंदिर हॉल येथे करण्यात आले होते. या चर्चासत्रास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’चे माजी अध्यक्ष डॉक्टर मनोहर अकोले व अध्यक्ष अजय कुलकर्णी यांची भाषणे झाली. रोटरी क्लबतर्फे भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात एक मागण्यांचे निवेदन महापालिकेस देण्यात आले. या चर्चासत्रात बोलताना डॉ.अश्विनी पाटील यांनी नागरिकांनी त्यांच्या जबाबदारीचे पालन करावे व महापालिका या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न व सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. डॉ. मकरंद गणपुले यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. या चर्चासत्रात व्हींपीडब्लूए चे सदस्य, रोटरी सदस्य, श्वान प्रेमी, प्राणी प्रेमी, शालेय व कॉलेज विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.