Home Blog Page 112

पोलीस चौकीतच २० हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पोलीस नाईकाला पकडले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस चौकीतच रंगेहात लाच घेताना एका पोलीस नाईकाला पकडले आहे. ही घटना मुंबई-नाशिक महार्गावरील भिवंडी तालुक्यातील तळवली नाका पोलीस चौकी जवळच घडली आहे. भरत शरद जगदाळे असे अटक केलेल्या लाचखोर पोलीस नाईकाचे नाव आहे. २० हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस चौकीतच रंगेहात या लाचखोर पोलीस नाईकाला पकडण्याची कारवाई केली. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून लाचखोर पोलीसाला बेड्या ठोकल्या गेल्या आहेत. पोलीस नाईक भरत शरद जगदाळे असे अटक केलेल्या लाचखोर पोलीस नाईकाचे नाव आहे.

लाचखोर भरत शरद जगदाळे हा पडघा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे. तो मुंबई-नाशिक महामार्गवरील तळवली नाका पोलीस चौकीत ड्युटीवर कार्यरत होता. त्याने २१ सप्टेंबर रोजी तक्रारदार यांना त्यांच्या ताब्यातील वाहनावर कारवाई न करण्यासाठी व त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी ३० हजार रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले होते. या संदर्भात तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाच्या पथकाने २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस चौकी नजीक सापळा रचला होता.

पहाटे अडीचच्या सुमारास तक्रारदार यांच्याकडून तळवली नाका पोलीस चौकीजवळ पंचांसमक्ष लाचखोर भरत जगदाळे याने २० हजार रुपयांची लाच घेताना त्याला पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. याप्रकरणी तो कार्यरत असलेल्या पडघा पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करून त्याला कोठडीत ठेवले आहे व पुढील तपास सुरू आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

प्रख्यात कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी आज वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांचे आज सकाळी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांचं निधन झालं. गेल्या ४० दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. जिममध्ये वर्कआउट करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांची मोठी टीम त्यांच्यावर उपचार करत होती पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि अखेर आज राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालवली.

राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या राजू श्रीवास्तव याला प्रथम आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. हिंदी सिनेसृष्टीत अनेक वर्षे प्रेक्षकांना ‘गजोदर भैय्या’ बनून हसवणाऱ्या या अभिनेत्याचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर राजू श्रीवास्तव यांना वाचवू शकले नाहीत, अखेर त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. राजू श्रीवास्तव यांनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. आता त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

 

शिंदे गट-शिवसेनेचा कलगीतुरा रंगणार; दसरा मेळाव्यावरून ‘महाभारत’ सुरु..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे विरुद्ध दंड थोपटले असून दोन्ही नेते दसरा मेळावा मुद्द्यावरून माघार घ्यायला तयार नाहीत. सध्या दसरा मेळावा कुणी घ्यायचा? नेमका हा वाद उच्चन्यायालयाच्या दरबारी पोहचला असून उद्या यावर सुनावणी होणार आहे. यावरच अधूनमधून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर शरसंधान सोडताना दिसत आहे त्यामुळे वातावरण कमालीचे तापलेले आहे. युवासेनेचे शरद कोळी यांनी येत्या दसऱ्याला शिवसेनेला शिवतीर्थ न मिळाल्यास रामायण महाभारत घडून येईल, असे भाष्य केले आहे. त्यामुळे नेमका हा मुद्दा कुठल्या वळणावर जात आहे, याचा अंदाज लावता येतो.

सध्या शिंदे गटाला बीकेसी मध्ये असलेले एमएमआरडीएचे मैदान मिळाले असून, उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याला एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावरच घेण्यात येईल जर इथे सील लावले गेले तर ते तोडून टाकण्यात येईल अशी धमकीवजा सूचनाच दिली आहे. दरवर्षी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून शिवसेनाप्रेमी व कार्यकर्ते दसरा मेळाव्याकरिता शिवाजी पार्कवर लाखोंच्या संख्येत एकत्र येत असतात त्यामुळे यंदा दसरा मेळावा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसत आहे.

चंद्रकांत खैरे यांच्या प्रतिक्रियेवर शिंदे गटाचे नेते व राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्रमक पवित्रा घेत त्याच शैलीत उत्तर दिले आहे, यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की तोडफोड व घुसखोरी करत सभा घेतल्या जात नसतात त्यामुळे जर कोणी असा प्रयत्न करेल तर राज्यातील सुरक्षा यंत्रणा त्यांना रोखण्याकरिता सज्ज असेल. दरम्यान दसरा मेळावा मुद्द्यावरून रामायण महाभारताची भाषा करणारे शरद कोळी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. सध्याचे चित्र बघता दोन्ही गट आक्रमक असल्याने राडा सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर राज्याच्या शांतता व सुव्यवस्थेची प्रमुख जबाबदारी असल्याने ते शेवटी नरमाईचे धोरण अवलंबतील हे देखील सत्य आहे.

पत्राचाळ घोटाळा आरोपांवर शरद पवारांचं सरकारला आव्हान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा. पण, जर आरोप खोटे ठरले तर काय कराल हे ही सरकारने स्पष्ट करावं असं म्हणत पत्राचाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला आव्हान देत प्रतिक्रिया दिली. पत्राचाळ घोटाळा नवीन खुलासे होत असतानाच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे नसून पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांच नाव अतुल भातखळकर यांनी घेतलं होतं. तसेच यासंबधी एका ट्वीटमध्ये पत्राचाळ प्रकरणी ‘राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी व्हावी, ईडी च्या आरोपपत्रात हे नाव आहे. वन अँड ओंली वन शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी,’ असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं होतं.

मुंबई, पाटणा आणि दिल्ली येथे ६५.४६ किलो सोने जप्त करत महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्तीच्या कारवाईतील सातत्य कायम ठेवत सुमारे ६५.४६ किलो वजनाची आणि अंदाजे ३३.४० कोटी रुपये किमतीची, मूळ परदेशी सोन्याची ३९४ बिस्किटे जप्त केली आहेत. ईशान्येकडून त्याची तस्करी होत होती.

मिझोराममधून विदेशी मूळ सोन्याची तस्करी करण्याचा आणि त्यासाठी देशांतर्गत कुरिअर पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक कंपनीचा वापर करण्याची योजना एक टोळी आखत आहे, अशी खबर डीआरआयला मिळाली होती.

तस्करी रोखण्यासाठी डीआरआयद्वारे ‘ऑपरेशन गोल्ड रश’ ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मुंबईला नेल्या जाणारा, ‘वैयक्तिक वस्तू’ घोषित केलेल्या विशिष्ट माल अडवण्यात आला. १९.०९.२०२२ रोजी भिवंडी (महाराष्ट्र) येथे तपासणी केली असता सुमारे १९.९३ किलो वजनाच्या आणि सुमारे १०.१८ कोटी रुपये मूल्याच्या विदेशी मूळ सोन्याच्या बिस्किटांचे १२० नग जप्त करण्यात आले.

पुढील विश्लेषण आणि तपासणीत असे दिसून आले की इतर २ वेळा त्याच एका व्यक्तीने त्याच लॉजिस्टिक कंपनीद्वारे त्याच ठिकाणाहून माल मुंबईला पाठवला आहे. पण यावेळी लोकेशन ट्रेस करण्यात आले.

मालाची दुसरी खेप बिहारमध्ये अडवली गेली. लॉजिस्टिक कंपनीच्या गोदमामध्ये तपासणी केल्यावर, सुमारे २८.५७ किलो वजनाची आणि सुमारे १४.५० कोटी रुपयांची, १७२ विदेशी मूळ सोन्याची बिस्किटे सापडली. त्याचप्रमाणे, तिसऱ्यांदा लॉजिस्टिक कंपनीच्या दिल्ली हबमध्ये माल अडवण्यात आला आणि त्याची तपासणी करण्यात आली असता सुमारे १६.९६ किलो वजनाचे आणि ८.६९ कोटी रुपये किमतीचे विदेशी मूळ सोन्याच्या बिस्किटाचे १०२ नग जप्त करण्यात आले.

तपासांच्या या मालिकेमुळे ईशान्येकडील भागातून आणि लॉजिस्टिक कंपनीच्या देशांतर्गत कुरिअर मार्गाने परदेशी मूळ सोन्याची भारतात तस्करी करण्याची विशेष नवीन पद्धत शोधण्यात मदत झाली आहे. तस्करीच्या वेगळ्या आणि अत्याधुनिक पद्धती शोधण्याची आणि त्यांचा सामना करण्याची डीआरआयची क्षमता अशा मोहिमांमुळे वृद्धिंगत होते. सुमारे ६५.४६ किलो वजनाचे आणि अंदाजे ३३.४० कोटी रुपये किमतीचे एकूण ३९४ विदेशी मूळ सोन्याची बिस्किटे या अनेक शहरांत राबवलेल्या मोहिमे अंतर्गत जप्त करण्यात आले व डीआरआयचा पुढील तपास सुरू आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले गेले.