Home Blog Page 113

जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार- २०२२ सोहळा लातूर येथे संपन्न!

लातूर, प्रतिनिधी: जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता, सर्व अभियांत्रिकी विभाग (जिल्हा लातुर) पुरस्कार- २०२२ सोहळा कार्निव्हल रिसॉर्ट, लातूर येथे मोठया थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक अभियंत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. (भा.प्र.से.), पोलीस अधीक्षक निखील पिंगळे (भा.पो.से.), लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल (भा.प्र.से.), लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल (भा.प्र.से.) उपस्थित होते.

तर याच कार्यक्रमात महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सलिम शेख, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, लातुरचे अधिक्षक अभियंता व प्रशासक अभिजीत म्हेत्रे, बीड पाटबंधारे प्रकल्प, मंडळ परळी(वै.)चे अधिक्षक अभियंता ईलियास चिस्ती आणि लातूर जिल्ह्यातील सर्व विभागाचे कार्यकारी अभियंता यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्निव्हल रिसाॅर्ट, लातुर येथे आयोजित या भव्य कार्यक्रमात लातूरचे सुपुत्र व पंचायत समिती, निलंगाचे शाखा अभियंता ए. आर. मौजन यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार- २०२२ प्रदान करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.

निलंगा विभागाचे शाखा अभियंता ए. आर. मौजन यांना 2022 वर्षाचे ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

३ मोटरसायकल व १ रिक्षा चोरणाऱ्या चोरट्याला शिताफीने अटक करत बाजारपेठ पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १९.०९.२०२३ रोजी एपीएमसी मार्केट गोविंदवाडी रोड, कल्याण येथे एक जण चोरीची मोटार सायकल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त बातमी बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली. सदरची माहिती ताबडतोब वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.नरेंद्र पाटील यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी मार्केट कल्याण येथे डिटेक्शन इन्चार्ज सपोनि श्री. घोलप यांनी डीबी पथकासह त्या ठिकाणी सापळा रचला.

बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आलम अनिस शेख नामक संशयित आरोपी इसमास त्याच्याकडे असलेल्या चोरीची जुपिटर मोटरसायकलसह त्याला पळून जाण्याचा वाव न देता डिटेक्शन पथकाने मोठे शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखवत त्याच्याकडे कसून तपास केल्यानंतर तपासात त्याच्याकडून खालील चोरीच्या गाड्या मिळून आल्या

१) बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १९८/२२ भादंवि कलम ३७९, ३४ मधील चोरीस गेलेली ज्युपिटर मोटर सायकल
२) महात्मा फुले पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४५०/२२ भादंवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली पॅशन-प्रो मोटर सायकल
३) खडकपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २५७/२२ भादंवी ३७९ या गुन्ह्यातील चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल
४) एक रिक्षा क्र. एमएच ०५ सीपी १३२४

अशा एकूण ३ मोटर सायकल व १ रिक्षा ज्याची अंदाजे किंमत ९२,०००/- रुपये चा मुद्देमाल सदर चोरट्या कडून हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पावशे करीत आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकरी भूमीपुत्रांचे बेमुदत धरणे आंदोलन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

भिवंडी-कल्याण-शीळफाटा राज्य महामार्ग क्रमांक – ४० या रस्त्याच्या सहापदरी रोड रुंदीकरणात बाधित शेतकरी भूमिपुत्र जागा मालकांना योग्य तो रोख स्वरूपातील मोबदला मिळावा आणि महाराष्ट्र शासनाला जागृत करण्यासाठी ‘सर्व पक्षीय युवा मोर्चा’चा बेमुदत धरणे आंदोलन लढा मंगळवारपासून सुरू झाला आहे. रस्ता बाधित शेतकरी भूमीपुत्रांच्या या आंदोलनाची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावी अशी मागणी यावेळी उपस्थित पत्रकारांसमोर करण्यात आली.

डोंबिवलीतील ग्रामीण विभागातील ग्रामस्थ गजानन पाटील आणि गणेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा बेमुदत धरणे आंदोलन लढा सुरू झाला आहे. गावागावातील रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांनी या बेमुदत धरणे आंदोलन लढ्याला उस्फुर्तपणे समर्थन देत या बेमुदत साखळी धरणे आंदोलनात सहभागी होऊन ग्रामस्थांना अद्याप रोख स्वरूपातील मोबदला न मिळाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.

यावेळी सरकारच्या विरोधात आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर आणि दुर्लक्षित कारभारावर सडकून टीका आंदोलनकर्ते करत आहेत. प्रशासनाच्या दंडेलशाही विरोधात घोषणा व नारे देत या प्रकल्पातील बाधित शेतकरी भूमिपुत्रांना न्याय हा मिळालाच पाहिजे व यासाठी कितीही वेळकाळ लागला तरी मागे हटणार नाही असा पावित्रा घेत मंगळवारपासून बाधित शेतकरी भूमिपुत्र ग्रामस्थांनी कल्याण-शीळ रोडवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

मंगळवारी सकाळपासून सुमारे ४०० बाधित भूमिपुत्र या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाले असून काटई गाव, कल्याण शीळ रोडवर काटई जकात नाक्याजवळील मोकळ्या जागेत मोठा मंडप टाकून आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीसाठी ठिय्या मांडला आहे. या साखळी बेमुदत धरणे आंदोलनात शासनाच्या नियमानुसार रस्त्यातील बाधित शेतकरी भूमिपुत्रांना रोख स्वरूपातील मोबदला मिळाला नाही तर कुटुंबासह रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ करत उग्र आंदोलन करून सर्व कुटुंबासह जेल भरून गेले तरी चालेल यासाठी आम्ही जामीन घेणार नाही आणि सरकारी जेलमध्येच राहू अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतल्याचा इशारा या वेळी बाधित शेतकरी भूमिपुत्र ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनकर्ते गजानन पाटील आणि गणेश म्हात्रे यांच्या वतीने सरकारला देण्यात आला.

कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कल्याण ग्रामीणच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन..

_
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कल्याण ग्रामीण आणि इतर संस्थांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन एमआयडीसी येथील गणपती मंदिर शेजारील पक्ष कार्यालयात करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केले.

यावेळी भाजप डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष आणि विधानसभा संपर्क प्रमुख नंदू परब, गौतम पाठक, राकेश जैन, रवींद्र रंगा, माजी नगरसेवक जालिंदर पाटील, महिला ग्रामीण अध्यक्षा मनीषा राणे, माधुरी जोशी, रसिका पाटील, पंढरीनाथ म्हात्रे, भाजप प्रणित रिक्षाचालक संघटनेचे कार्याध्यक्ष संजय देसले, दत्ता मळेकर, रवी सिंग इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऍंजियोग्राफी, ऍंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, टुडी एकॉकारडीयोग्राफी, मधुमेह, रक्तदाब, ईएनटी, दंतचिकित्सा, नेत्रतपासणी, मोतीबिंदू, इत्यादीची मोफत तपासणी तर आयुर्वेद उपचार, मोफत कानाचे मशीन, भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन बाबत नंदू परब म्हणाले कि, ना.रवींद्र चव्हाण यांचा तळागाळातील जनतेसोबत सातत्याने संपर्क असतो. या जनतेचे आरोग्यासाठी सुविधा मिळणे गरजेचे आहे. कोवीड काळानंतर बेरोजगारी आणि ताणतणावात वाढ झाली असून अश्या परिस्थितीत प्रथम गरिबांना प्राथमिक आरोग्य सुविधा मिळायला हव्यात.

ना. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराच्या माध्यमातून या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एका छत्राखाली अश्या शिबिरामुळे गरजुंना विविध शारीरिक तपासण्यासाठी आर्थिक रित्या लाभ होतो असे शशिकांत कांबळे यांनी सांगितले. दुपारी ना. रवींद्र चव्हाण यांनी शिबिराची पाहणी करुन शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले. कच्छ युवा संघटनेच्या वतीने सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजनासाठी त्यांचे कौतुक केले.

युवक प्रतिष्ठान, कच्छ युवक संघटना, सत्य साई प्लॅटीनम हाॅस्पीटल, सिध्दीविनायक हाॅस्पीटल, सिध्दीविनायक नेत्रालय, युवा आशापुरा मित्र मंडळ, डाॅ.अविनाश देशपांडे, डॉ.राजीव आढाव यांनी शिबिरास सहकार्य केले.

जागतिक स्वच्छता दिनानिमित्त ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेने राबविली भव्य स्वच्छता मोहीम

भाईंदर प्रतिनिधी: शनिवार १७ सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक स्वच्छता दिवस साजरा केला जातो, या निमित्ताने ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थे तर्फे मुंबई येथील गोराई समुद्रकिनारी तर मिरा-भाईंदर शहरातील उत्तन व वेलंकनी समुद्रकिनारी तसेच जंजिरे धारावी व गोडबंदर किल्यांवर स्वच्छता मोहित राबविण्यात आली.

या भव्य स्वच्छता अभियानात मुंबई महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, मॅन्ग्रोव्हस फौंडेशन, जंजिरे धारावी जतन समिती, राष्ट्रीय सेवा योजना, जागतिक स्वच्छता दिन फौंडेशन, माझी वसुंदर व स्वच्छ सर्वेक्षण यांचे विशेष सहकार्य होते.

मुंबई येथील गोराई समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात ८५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेत १५ टन हुन अधिक इतका कचरा काढला. यावेळी स्थानिक आमदार सुनील राणे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मा. उपायुक्त (परिमंडळ-7) भाग्यश्री कापसे मॅडम, सहायक आयुक्त निवृत्ती गोंधळी, कार्यकारी अभियंता ललित तेलेकर, सहायक अभियंता संदीप म्हाळुणकर यांची उपस्थिती होती.

तर मिरा-भाईंदर येथे उत्तन व वेलंकनी समुद्रकिनारी १९५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेत ४० टन पेक्षा अधिक कचरा काढला. तसेच यंदा जंजिरे धारावी जतन समितीच्या मदतीने शहरातील जंजिरे धारावी व गोडबंदर किल्यांवर सुद्धा स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानात सुद्धा ५५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेत ६५० किलोहून अधिक कचरा काढला.

यावेळी अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव, स्थानिक आमदार श्रीमती गीता जैन, मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (पर्यावरण) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, वरिष्ठ पत्रकार व पर्यावरणप्रेमी धीरज परब यांची उपस्थिती होती.

फ़ॉर फ़्यूचर इंडियाचे संस्थापक व अध्यक्ष आणि मिरा भाईंदर “इंडियन स्वच्छता लीग” स्टार कॅम्पेनर हर्षद ढगे, जंजिरे धारावी जतन समितीचे श्रेयस सावंत, गोडबंदर येथील स्थानिक अनिकेत किनी तर संस्थेचे स्वयंसेवक ध्रुव कडारा, धैर्या होनराव, कुंदन सोळंकी, प्रज्ञा चिकणे, करण पवार, ललित सोळंकी, विशाल पांड्ये, जितेश खाटीक, अब्राहम मुरुगन, शॉन नूनस, अदिती शेजवाल, सौरभ कौशवाह, मानसी जाधव यांनी वेगवेगळ्या ५ ठिकाणी स्वच्छता अभियानाचे व्यवस्थापन करत २५ हुन अधिक शाळा, महाविद्यालय व स्वयंसेवी संस्थांच्या एकूण ३३५० हुन अधिक स्वयंसेवकांचा सहभाग घेत ५५ टन हुन अधिक कचरा काढला आणि या भव्य अभियानास यशस्वी केले.

अधिक माहितीसाठी संपर्क: फ़ॉर फ़्यूचर इंडिया / For Future India
www.forfuture.india
9820952079