Home Blog Page 116

भारतीय वाहन बाजार रूळावर येत ऑटोमोबाईल मार्केटचे ‘अच्छे दिन’ सुरु..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय वाहन बाजार आता मंदीतून बाहेर आला आहे. तसेच जगभरात पसरलेला कोरोना आता आटोक्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत वाहन बाजारात मोठा तोटा पाहायला मिळाला होता. पण आता ऑटोमोबाईल मार्केट रुळावर आले आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (एसआयएएम) ऑगस्ट २०२२ महिन्याचा वाहन विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (एसआयएएम) ने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२२ मध्ये भारतीय बाजारपेठेत २ लाख ८१ हजार २१० प्रवासी वाहने विकली गेली आहेत. तर, ऑगस्ट २०२१ मध्ये, २ लाख ३२ हजार २२४ प्रवासी वाहने भारतीय बाजारपेठेत विकली गेली. म्हणजेच ऑगस्ट २०२१ च्या तुलनेत ऑगस्ट २०२२ मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत २१.१ टक्के वाढ झाली आहे.

ऑगस्ट २०२२ मधील विक्री १५,५७,४२९ युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री १३,३८,७४० युनिट्स
विक्रीतला फरक
विक्रीत १६.३३ टक्के वाढ
दुचाकी वाहनांची विक्री १६.३३ टक्क्यांनी वाढली.

ऑगस्ट २०२२ मधील विक्री ५,०४,१४६ युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री ४,६०,२८४ युनिट्स
विक्रीतला फरक
विक्रीत ९.५ टक्के वाढ
स्कूटर्सची विक्री ९.५ टक्क्यांनी वाढली.

ऑगस्ट २०२२ मधील विक्री १०,१६,७९४ युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री ८,२५,८४९ युनिट्स
विक्रीतला फरक
विक्रीत २३.१ टक्के वाढ
मोटरसायकल्सची विक्री २३.१ टक्क्यांनी वाढली.

ऑगस्ट २०२२ मधील विक्री १,३३,४७७ युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री १,०८,५०८ युनिट्स
विक्रीतला फरक
कार्सच्या विक्रीत २३ टक्के वाढ

ऑगस्ट २०२२ मधील विक्री १,३५,४९७ युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री १,१२,८६३ युनिट्स
विक्रीतला फरक
विक्रीत २० टक्के वाढ
‘एसयूव्हीं’च्या विक्रीत २० टक्के वाढ

ऑगस्ट २०२२ मधील विक्री १२,२३६ युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री १०,८५३ युनिट्स
विक्रीतला फरक
विक्रीत १२.७ टक्के वाढ
व्हॅन्सच्या विक्री १२.७ टक्के वाढ

ऑगस्ट २०२२ मधील विक्री १०,३०० युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री ९,३९७ युनिट्स
विक्रीतला फरक
विक्रीत ८.७ टक्के वाढ
तीनचाकी वाहनांच्या विक्रीत ८.७ टक्के वाढ.

 

 

 

‘सैराट’ मधील आर्चीचा भाऊ प्रिन्सदादाला होणार अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सैराट फेम प्रिन्सवर आहे. याप्रकरणी संशियतांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात सुरज पवार याचाही समावेश आहे. सैराट चित्रपटातील आर्चीचा भाऊ प्रिन्सदादा अर्थात अभिनेता सुरज पवार याला अटक होण्याची शक्यता आहे.

मंत्रालयात नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून तरुणाला पाच लाख रुपयांना गंडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावातील महेश वाघडकर या तरुणाची फसवणूक करण्यात आली असून फसवणूकीसाठी चक्क भारतीय राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला होता. संशयित आरोपींनी सामाजिक न्याय विभागात कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात नोकरीला असल्याचं महेश वाघडकर या तरुणाला सांगितलं होतं. यासाठी सुरज पवार याने संगमनेरमधून बनावट शिक्के बनवले होते. याप्रकरणी पोलीसांनी तिघांना अटक केल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणात अभिनेता सुरज पवारचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सुरज पवारला अटक होण्याची शक्यता आहे.

कोकण रेल्वेमार्गावरील ‘तेजस’ एक्सप्रेस धावणार अत्याधुनिक ‘विस्टाडोम’ कोचसह..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १५.०९.२०२२ पासून मुंबई ते करमाळी दरम्यान चालविण्यात येणारी ‘तेजस एक्सप्रेस’ आता एका विस्टाडोम कोचसह धावणार आहे. या कोच सोबत धावणारी कोकण रेल्वे मार्गावरील ही दुसरी गाडी ठरली आहे. ह्या आधी मुंबई ते मडगाव दरम्यान रोज चालविण्यात येणारी ‘जनशताब्दी एक्‍स्प्रेस’ या विस्टाडोम कोच सह चालविण्यात येत होती. विस्टाडोम कोच साठी प्रवाशांच्या प्रतिसादामुळे हा डबा ‘तेजस एक्सप्रेस’ला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्या गाडीतील विस्टाडोममध्ये एका डब्यात ४० प्रवासी असणार आहेत.

गाडीचा मडगाव जंक्शन पर्यंत विस्तार

तसेच ही गाडी मडगाव जंक्शन पर्यंत विस्तारित करण्यात आलेली आहे. १ नोव्हेंबर २०२२ पासून करमाळी ऐवजी मडगाव पर्यंत धावणार आहे. तर ही ट्रेन दर मंगळावार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार धावणार आहे. मडगावहून मुंबईला देखील ही ट्रेन याच दिवशी परत येणार आहे.

कसा असतो विस्टाडोम कोच ?

विस्टाडोम हा प्रशस्त आणि खास डब्बा असतो. वातानुकुलित असणार्‍या या डब्यामध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे. काचेच्या प्रशस्त खिडक्या आणि छत आहे ज्यामुळे डोंगर-दर्‍यांचे विहंगम दृश्य या कोचमध्ये बसून आरामात टिपता येते.

 

राज्यात यंदा दिवाळीही धुमधडाक्यात साजरी होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या महाभयंकर कालावधी नंतरच्या दहीहंडी आणि गणेशोत्सवानंतर आता राज्यात दिवाळी सुद्धा तश्याच धुमधडाक्यात साजरी होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. दिवाळीत संपूर्ण मुंबई उजळून निघणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. गणेशोत्सवात अनेक सेलिब्रिटी आले, ते माझ्याशी बोलले, सरकारबद्दल चांगले किंवा वाईट मत बनवणे हे अधिकार्‍यांवर अवलंबून असते. मुंबईत आमूलाग्र बदल होणार आहेत. रस्त्यांच्या दर्जाकडे लक्ष द्या, तुम्ही खर्च केलेला पैसा वाया घालवू नका. यामुळे ‘काहींना टीका करण्याची संधी मिळते, जी त्यांना मिळणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी अभियंत्यांना संबोधित करताना सांगितले.

‘पूर्वी माझ्याकडे कमी अधिकार होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आयुक्त चहल यांना फोन केला. साडेपाच हजार कोटींच्या रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होणार. ठाणे-नवी मुंबईत जे सुशोभीकरण केले आहे तेच आपणही करू’, असे एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांना सांगितले.

‘लोकांना हा आपला मुख्यमंत्री वाटतो, म्हणून ते फोटो काढायला येतात. मी अधिवेशनात विरोधकांना चोख उत्तर देतो. मी सर्व काही साठवले आहे. ‘वेदांता कंपनी’चा विषय खूप गाजतोय, त्यांनी अडीच वर्षात काहीच केले नाही. आम्ही दोन महिन्यांत प्रयत्न केला पण कंपनीने आधीच गुजरात येथे जाण्याचा निर्णय घेतला होता. आता मी माझ्या कामावरून उत्तर देईन. याबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यांनी राज्यात मोठे प्रकल्प आणण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

वेदांता प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात परत आणा – सुप्रिया सुळे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राजकारण तर आता चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी गंभीर व्हावं. राज्य आणि देशासमोर बेरोजगारीचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. राज्याच्या हितासाठी एकत्र यावं. सर्व पक्षीय प्रतिनिधींचं शिष्टमंडळ दिल्लीत न्यावं. पंतप्रधानांना भेटून आपला प्रकल्प परत आणावा असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

तसेच राज्यातील अडीच ते तीन लाख रोजगाराचा प्रश्न आहे. त्यावर गांभीर्य व्हायला हवं. तळेगावला साईट पाहिली होती. सर्व तयारी झाली होती. मग अचानक काय झालं ? प्रकल्प गुजरातला का गेला त्याची जबाबदारी घ्या. सत्तेत बसणं म्हणजे नुसतच सत्कार घेणं. लाल दिवा बंद करून लोकांची गैरसोय करणं आणि गाड्यांचा सुसाट धावणारा ताफा नसतो. सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी यालाच सत्ता म्हणतात असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

यावर ‘वेदांता ग्रुप’चे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याचा आरोप होत असतानाच कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. रात्री सव्वा दहाच्या आसपास अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली. हा प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय आधीच घेतला गेला असल्याचं अग्रवाल म्हणाले आहेत. अनिल अग्रवाल यांनी सोशल मिडियावरुन माहिती दिली आहे की, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्याकडून मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. ते डील गुजरात सरकारकडून मिळाल्याचे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.