Home Blog Page 120

महानगरपालिकेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळा शांततेत संपन्न!

एकूण 2063 गणेश मूर्तींचे विसर्जन तर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी विसर्जन स्थळांना भेट देऊन जातीने लक्ष देऊन केली पाहणी!

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक विसर्जन स्थळांसोबतच शहरात विविध ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या 3 कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच नैसर्गिक तलाव/समुद्रात आणि मुर्ती स्वीकृती केंद्रांवर एकूण 2063 गणेश मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या व शांततेत पार पडले.

महानगरपालिकेच्या वतीने मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या नियोजनबद्ध विसर्जन व्यवस्थेत अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळा शांतरितीने पार पडला.

अनंत चतुर्दशी विसर्जन प्रसंगी एकूण 2063 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. प्रभाग क्रमांक १ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात व कृत्रिम तलावात एकूण 100 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

 

प्रभाग क्रमांक २ मध्ये नैसर्गिक तलावात/समुद्रात एकूण 265 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात एकूण 542 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात व कृत्रिम तलावात एकूण 573 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये कृत्रिम तलावात एकूण 09 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये नैसर्गिक तलावात एकूण 574 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

अशाप्रकारे अनंत चतुर्दशी निमित्त एकूण 2063 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी जातीने लक्ष देऊन शहरातील जरीमरी तलाव काशीमिरा, शिवार गार्डन, जेसल पार्क चौपाटी, भाईंदर पश्चिम चौपाटी याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विसर्जन स्थळांची पाहणी केली.

सदर पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (वैद्यकीय) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, जनसंपर्क अधिकारी तथा सिस्टम मॅनेजर राजकुमार घरत, अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे, सहाय्यक आयुक्त प्रभाकर म्हात्रे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत बोरसे, सहाय्यक आयुक्त जितेंद्र कांबळे, सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव, सहाय्यक आयुक्त प्रियंका भोसले, इतर कनिष्ठ अभियंता, अग्निशमन कर्मचारी व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त ढोले यांनी जेसल पार्क चौपाटीवर विसर्जन स्थळी भव्य अश्या श्रीगणेशाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करत श्रीगणरायाला वंदन केले.

गणेश विसर्जना मुळे शहरात वाहतूक कोंडी असल्याने आयुक्त व अधिकारी वर्ग यांनी भाईंदर पूर्व, जेसल पार्क चौपाटी ते भाईंदर पश्चिम चौपाटी असा बोटीमध्ये बसून प्रवास केला.

त्याच प्रमाणे शहरातील सर्व प्रमुख विसर्जन स्थळांवर आयुक्त यांच्या निर्देशानुसार नागरिकांसाठी कोव्हिड बूस्टर डोसचे देखील नियोजन करण्यात आले होते.

तसेच जेसल पार्क चौपाटी विसर्जन स्थळावर आमदार गीता जैन व मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते व पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी देखील प्रत्यक्ष भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली.

सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. अग्निशमन सेवक, महानगरपालिका स्वयंसेवक यांच्यासह वैद्यकीय आरोग्य व सार्वजनिक आरोग्य सेवाही कार्यरत होते.

सर्व विसर्जन स्थळांवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा तसेच सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती. अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी १ ते ६ प्रभाग समिती कार्यालय क्षेत्रात सर्व यंत्रणा सुसज्ज होत्या.

सहाय्यक आयुक्त व महानगरपालिका अधिकारी तसेच कर्मचारी यांनी अनंत चतुर्दशी व इतर विसर्जन सोहळ्यानिमित्त केलेल्या नियोजनाचे मा. आयुक्त यांनी समाधान व्यक्त करत सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांचे आभार व्यक्त केले.

तसेच शहरातील सर्व नागरिकांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनास अनंत चतुर्दशी दिवशी व इतर विसर्जन सोहळ्यात उत्कृष्ट सहकार्य केल्याने आयुक्त दिलीप ढोले यांनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.

मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत नोकर भरतीला अटकाव घाला; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अनेक वर्षांपासून राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबित असून यावर सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा या मुद्द्यावर तोडगा निघण्याचा कुठलाही मार्ग सध्यातरी दिसत नाही आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये याबाबत कुठलेही ठोस पाऊले उचलण्यात आले नाही, त्यामुळे हल्लीच्या सरकारकडून क्रांती मोर्चाला आशा लागून आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत नोकरभरती थांबवा, असे साकडेच सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुका क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. यावर महिनाभऱ्यात काहीतरी तोडगा निघावा अशी मागणी क्रांती मोर्चाने केली आहे, अन्यथा नाईलाजाने १० ऑक्टोबर पासून आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना नुकतेच देण्यात आले आहे.

मराठा समाजाचे आरक्षण रखडल्याने समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली. यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी नोकरीपासून वंचित होत आहे, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत नोकरभरती थांबवा, अन्यथा आम्ही बेमुदत आमरण उपोषणाचा पर्याय निवडू, असा विनंतीवजा सूचक इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिला आहे.

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा नव्या विक्रमाची नोंद त्याच्या नावे करणारा पहिला भारतीय ठरला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारताचा स्टार खेळाडू व ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने पुन्हा एकदा उत्तुंग कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकतीच स्वित्झरलँडच्या ज्युरिख येथे ‘डायमंड लीग’ स्पर्धा पार पडली, यामध्ये भालाफेक खेळात नीरजने स्वतःच्या तसेच देशाच्या नावे एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. ‘डायमंड लीग ट्रॉफी’ जिंकणारा नीरज हा पहला भारतीय ठरला आहे, यामुळे त्याची ही कामगिरी ऐतेहासिक ठरली आहे. या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करत नीरजने अन्य दोन खेळाडूंचा पराभव करून अंतिम विजेतेपद आपल्या नावे केले.

नीरजने ८८.४४ मीटरचा सर्वोत्तम भालाफेक करत झेक प्रजासत्ताकच्या याकूब वाडलेज व जर्मनीच्या जुलियन वेबर या दोन प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. स्पर्धेत वाईट सुरुवात झाली असताना देखील अखेर नीरजने दमदार प्रदर्शन करत देशासाठी गौरवाची कामगिरी केली. या अगोदर ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने देशाचा अभिमान उंचावणारा विक्रम केला होता. आता ‘डायमंड लीग ट्रॉफी’ मिळवत नीरजने पुन्हा एकदा विदेशाच्या भूमीवर देशाचे नाव मोठे करणारा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे, त्यामुळे नक्कीच त्याची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.

 

कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घट तर भारतात मात्र दर स्थिर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाली असली तरी देशातील महाराष्ट्र आणि मेघालय वगळता इतर राज्यांत तब्बल साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले मात्र किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजापेठेत कच्च्या तेलाच्या दरांत कमालीची घसरण झाली असली तरी भारतात मात्र दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. ८ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ९० डॉलर प्रति बॅरल उतरल्या असून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट दिसून येत आहे. ५ सप्टेंबर रोजी ‘ओपेक’ कडून मागणीतील घट आणि मंदीच्या भीतीनं ऑक्टोबरपासून १ लाख बॅरल प्रति दिवस उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलाचे भाव स्थिर करण्याचा ‘ओपेक’चा प्रयत्न सुरु असला तरी कच्च्या तेलाच्या दरांत मोठी अस्थिरता आहे. ‘ओपेक’च्या निर्णयानंतर तेलाच्या किंमतीने उच्चांक गाठला. मात्र मागणीतच घट झाल्याने पुन्हा किंमती अस्थिर झाल्या. दरम्यान, ‘ओपेक’ कडून तेलाच्या दरांत मोठी वाढ झाल्यास त्याचा परिणाम थेट भारतावर होणार आहे.

महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न भारताकडून सुरु असून अशातच तेलाच्या दरांत मोठी वाढ झाली तर संपूर्ण प्रयत्न वाया जाणार आहेत. संपूर्ण जगात सध्या महागाईनं डोके वर काढले असून गॅसच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. अमेरिकेतही गॅसचे दर १३० टक्क्यांनी वाढले आहेत. तर युरोपात १२० टक्क्यांनी उंचावले आहेत. रशियाच्या ऊर्जा साठवणुकीस कॅप लावण्याचा विचार आहे. ज्यामुळे जागतिक स्तरावरील ऊर्जेचे दर वाढू शकतात. याचाही ज्याचा थेट परिणाम भारतावर होणार आहे.

देशातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अधिकृत रित्या जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर तर दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

संजय राऊत, अनिल परब यांच्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ नेता भाजपच्या रडारवर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

याकुब मेमनच्या समाधीच्या सजावटीवरून सध्या राज्यात राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेमनचा उदात्तीकरण झाले म्हणून मेमनने माफी मागावी, असे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे मत आहे, तर विरोधी पक्षनेत्यांनी भाजपला विचारले आहे की, मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे का सोपवला? याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

याकुबला शहीद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालिका अभियंता आणि विश्वस्तांवर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणाले. त्याचवेळी शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर हे महापालिकेतील माफिया कंत्राटदार असल्याचा आरोप त्यांनी केला. “जोगेश्वरीतील महाकाली लेणीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी वायकर यांनी अविनाश भोसले या बिल्डरला ५०० कोटी रुपये दिले. हा घोटाळा २०२० मध्ये झाला आणि या घोटाळ्यातील आरोपी अविनाश भोसलेही तुरुंगात आहेत.” असा आरोप सोमय्या यांनी केला.

शिवसेनाप्रमुखांचे उजवे हात असलेले संजय राऊत हेही पत्रव्यवहार प्रकरणात अटकेत आहेत. त्यांचा दुसरा हात अनिल परब हे सुद्धा त्याच मार्गावर आहे. त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल असून ते लवकरच तुरुंगातही जाणार आहेत. रवींद्र वायकर उद्धव ठाकरे यांचा तिसरा हात आहे. जोगेश्वरी येथे महाकाली गुफा रस्त्याच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून त्याचाही लवकरच नंबर येईल, असंही सोमय्या म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यानंतर शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यावर भाजपकडून निशाणा साधला जात आहे. त्याचवेळी अनिल परभी लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांवर कारवाई झाल्यानंतर आता रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.