Home Blog Page 119

शिंदे-ठाकरे समर्थक गणपती विसर्जन मिरवणुकीत आपापसात भिडल्याने तणावपूर्ण झालेले वातावरण पोलीसांच्या मध्यस्तीने निवळले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे यांचे समर्थक इतर वेळी एकमेकांवर टीका करत असतात परंतु अनंतचतुर्दशी दिनी थेट गणेश विसर्जन मिरवणुकीत देखील परस्पर विरोधाचे बोलके चित्र बघायला मिळाले. मुंबईतील प्रभादेवी परिसरात गणरायाचे विसर्जन करत असताना दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या मिरवणुकी आमनेसामने आल्याने घोषणाबाजी, कल्लोळ यासह काही काळ तणावपूर्ण वातावरणाची निर्मिती झाली होती. यावेळी समाधान सरवणकर व संजय भगत हे प्रमुख कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने जोरदार घोषणाबाजी होऊन राडा सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.

यावेळी पोलीसांनी प्रसंगावधान दाखवत मध्यस्थी केल्याने दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्यात आले व कुठलाही अनुचित प्रकार रोखण्यास पोलीसांना यश प्राप्त झाले. प्रभादेवी भागात यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले होते तसेच शिंदे गटाच्या प्रियाताई सरवणकर यांनी मध्यस्थी केल्याने विसर्जनाला गालबोट लागण्याचा प्रकार टाळला गेला. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली व पोलीसांना योग्य ते उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

पोलीसांच्या हस्तक्षेपाने लवकरच वातावरण निवळले व विसर्जन शांततेत पार पडले. एकंदरतीच राजकीय विरोध हा सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात देखील दिसून येत असल्याने लाडक्या बाप्पाच्या विसर्जनावेळी तरी शांतता राखणे गरजेचे होते. येत्या काळात नवरात्र उत्सव आहे त्यामुळे सामंजस्याने वागत विरोध बाजूला ठेवत सण उत्सव साजरे व्हावे अशा प्रतिक्रिया सामान्य लोकांतून येत आहे.

कोरोना रुग्णांचा आलेख उतरणीला लागल्याने नागरिकांमध्ये समाधान


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख उतरणीला लागल्याने नागरिकांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात ९५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासात राज्यात ९७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गुरुवारी राज्यात १०७६ कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली होती. तर सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत ९७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ७९,५४,०५२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ९५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज चार करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे आणि सध्या कोरोना संक्रमित सक्रिय रुग्ण ७,०६७ आहे.

मुंबईमध्ये सक्रिय रुग्णांची सर्वाधिक संख्या २०८५ असून राज्यात सध्या ७,०६७ सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात १,५३२ सक्रिय रुग्ण आहेत. पुणे- १,७२१, पालघर १५८ , रायगड २८१ , नाशिक १८६ , नागपूर १३८ आणि चंद्रपूरमध्ये १६१ सक्रिय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी आहे. राज्यात सर्वात कमी सक्रिय रुग्ण यवतमाळमध्ये आहेत. यवतमाळमध्ये सध्या फक्त चार सक्रिय रुग्ण आहेत. हिंगोलीमध्ये पाच तर परभणीमध्ये सहा सक्रिय रुग्ण आहेत. बीड आणि गोंदिया जिल्ह्यात सात सक्रिय रुग्ण आहेत अशी माहिती मिळाली आहे.

५० खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के : रामदास आठवले


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

५० खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के, अशा कवितेच्या चारओळी ऐकवत आठवले यांनी उपस्थितांना खळखळून हसवलं. बालगंधर्व रंगमंदिरात रिपाइंच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. विरोधक रोजच आमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काहीही झालं तरी आमचं सरकार पडणार नाही. सुरुवातीपासूनच शिवसेना-भाजप आणि आरपीआय बरोबर एकत्र होती.

शिवसेनेनं आमची साथ सोडून महाविकास आघाडीचा रस्ता स्वीकारला आणि आमच्यापासून फारकत घेऊन दूर गेली. आता एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यामुळे विरोधक आमचं सरकार पाडण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असं रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

यंदाच्या डिसेंबरपर्यंत महापालिकेच्या निवडणूका होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. प्रभाग रचना आणि काही अन्य कारणामुळे निवडणूका रखडल्या असल्या तरी राज्यातील प्रत्येक शहरात या निवडणुकीची तयारी जोरदार सुरु आहे. पुण्यात देखील सर्व पक्षाने निवडणूकीसाठीची तयारी सुरु केली आहे. विविध आंदोलनं, विकास कामं करण्यासाठी सरसावले आहेत.

मात्र ठाकरे सरकारने प्रभागरचनेचा निर्णय बदलल्यामुळे निवडणुकीचा गोंधळ झाला. आता निवडणुक आयोगानेही सध्या निवडणूका घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सगळ्या गोष्टी नीट करत आहेत. विरोधकांनी उगाच विरोध करु नये, असंही ते म्हणाले.

ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आठवलेंची भेट घेत त्यांच्या आरक्षणाबद्दल चर्चा झाली. मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं तर ब्राह्मण समाजालाही आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी पुर्वीच केली असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळायला हवं. अमृत योजनेसाठी पाठपुरावा करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी ब्राह्मण महासंघाने केल्या.

 

डोंबिवलीत बुधवारी ‘इंजिनिअर्स डे’ दिवशी भरवल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय उद्योजक परिषदेनिमित्त राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत डोंबिवलीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या दोन महिन्याचा एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन कालावधी उलटल्यानंतर प्रथमच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे डोंबिवलीत बुधवारी ‘इंजिनिअर्स डे’ दिवशी राज्यस्तरीय उद्योजक परिषदेसाठी येणार आहेत. भारताचे सुपुत्र आणि थोर इंजिनिअर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती म्हणून हा दिवस संपूर्ण भारतामध्ये “इंजिनिअर्स डे” म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ कल्याण चॅपटर’ यांच्या वतीने दिनांक १४ सप्टेंबर २०२२, बुधवार राजी दुपारी तीन वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली येथे “इंजिनिअर्स डे” च्या पूर्व संध्येला राज्यस्तरीय उद्योजक परिषद भरवली जाणार आहे.

‘एकमेका साहाय्य करू ! अवघे होऊ श्रीमंत’ हे या ट्रस्ट चे घोषवाक्य असून “प्रत्येक उद्योजक हा त्याच्या व तिच्या व्यवसायातील एक इंजिनिअर असून प्रत्येक इंजिनिअर ने व्यावसायिक बनले पाहिजे” अशी या परिषदेची थीम असून कल्याण-डोंबिवली तसेच आसनगाव – शहापूर – अंबरनाथ – बदलापूर या परिसरातील सुमारे १००० विविध उद्योजक, फॅक्टरी ओनर्स विविध असोसिएशन या परिषदेमध्ये सहभागी होणार असून उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर इथे चर्चा होऊन उद्योजकांच्या मागण्या परिषदेचे उदघाटक महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे देणार आहेत.

यासंदर्भात ट्रस्टचे पदाधिकारी राकेश चौधरी, संतोष पाटील, विनीत बनसोडे, सुमित पाटील, नितीन बोरसे यांनी डोंबिवली जिमखाना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे उद्योजक बना हा उद्देश समोर ठेवून मराठी उद्योजकांना मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज्यस्तरीय उद्योजक परिषदेचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. परिषदेला उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, एमआयडीसी चे सीईओ डॉ. पी.अनबलगन (भाप्रसे), एमएसएमई महाराष्ट्र राज्याचे संचालक पार्लेवार, महाराष्ट्र राज्य इनोवेटिव्ह सोसायटीचे सीईओ डॉ. नामदेवराव भोसले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. “इंजिनीयर डे” अनुषंगाने एका उद्योजकीय प्रदर्शनाचही आयोजनही करण्यात आलेले आहे असे या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले .

 

अनंत चतुर्दशी दिनी डोंबिवलीत झाले ३ हजार ९५१ गणपतींचे विसर्जन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीत काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील ६६ सार्वजनिक मंडळांचे आणि ३ हजार ८८५ घरगुती अशा एकूण ३ हजार ९५१ गणपती बाप्पांचे विसर्जन “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात मोठ्या दिमाखात करण्यात आले.

शहरातील खाडी किनारी भोपर, कोपर, जुनी डोंबिवली, मोठागाव, देवीचापाडा, कुंभारखानपाडा तसेच काही कृत्रिम तलावाच्या माध्यमातून गणपती विसर्जन करण्यात आले. संध्याकाळी पावसाने गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण जरी घातले असले तरीही विसर्जन सोहळा कोणत्याही व्यत्ययाशिवाय शांततेत आणि उत्साहात पार पडला. दरम्यान मोठागाव येथे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक राजेश मोरे, प्रकाश भोईर, यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी उपस्थित होते. तर कोपर येथे माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक संजय पावशे, तर जुनी येथे जुनी डोंबिवली ग्रामस्थ मंडळ पदाधिकारी, भाजपाचे कृष्णा पाटील आदींनी यावेळी आपली उपस्थिती दर्शावत विशेष सहकार्य केले.

विसर्जनाच्या वेळी वाहतूककोंडी होवून वाहतुकीला अडथळा होऊ नये व विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी या दृष्टीकोनातून महापालिका प्रशासन, वाहतूक यंत्रणा आणि शहर पोलीस यंत्रणा तत्परतेने सज्ज होती. शहरातील गणेशघाट विसर्जनासाठी सुसज्ज असले तरी देखील ऑन कॉल विसर्जन, कृत्रिम तलाव आणि विसर्जन आपल्या दारी आदि उपक्रमांना यावेळी चांगलाच प्रतिसाद लाभला होता.

डोंबिवलीत जुनी डोंबिवली, कुंभारखाणपाडा, मोठा गाव ठाकुर्ली यासह अन्य गणेशघाट विसर्जनस्थळांसह शहर आणि ग्रामीण भागातील तलाव अशा एकूण २३ ठिकाणी पालिका प्रशासन आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली होती. कुंभारखाणपाडा, मोठा गाव ठाकुर्ली, जुनी डोंबिवली गणेशघाट अशा मोठ्या विसर्जन ठिकाणी इंजिन रबर बोट व्यवस्था होती. विसर्जन स्थळांच्या ठिकाणी जनरेटर, हॅलोजन्स टॉवर आणि सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे देखील लावले गेले होते.

विसर्जन स्थळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून वाहतूक आणि पोलिस यंत्रणा सुसज्ज होती. पोलीस अधिकारी, होमगार्ड, एसआरपीच्या तुकडया विसर्जना दरम्यान ठिकठिकाणी तैनात केल्या गेल्या होत्या. यावेळी अवजड वाहनांना विसर्जन परिसरात बंदी घालण्यात आली होती.

डोंबिवली शहरात काही ठीकाणी वाहतूकीत बदल करण्यात आला होता. दरम्यान यावेळी वाहनचालक व गणेशभक्तांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस
सातत्याने करीत होते. डोंबिवली पश्चिम मधील मोठागाव येथील गणेश घाटावर विसर्जन दरम्यान माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे फाउंडेशन आणि स्वामी नारायण गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीत थकलेल्या गणेशभक्तांना मोफत दहा हजार वडा-पाव व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

‘निर्मल युथ फाउंडेशन’ तर्फे निर्माल्य पुनर्वापर प्रकल्प राबवण्याकरिता फाउंडेशन चे युवा स्वयंसेवक सर्व गणेश भक्तांना हार व फुले त्यांच्याकडे जमा करण्यासाठी सतत आवाहन करीत होते.