Home Blog Page 121

बँकांमध्ये मुदत ठेवीकरिता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी चढाओढ करत व्याजदरात घसघशीत वाढ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महागाईचा जोर कमी होत नसल्याने देशातील मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने विविध उपाययोजना केल्या आहे, यानुसार व्याजदरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. सध्याही महागाई सतत डोके वर काढत असल्याने लवकरच आरबीआय व्याजदरात अजून वाढ करणार असल्याचे वृत्त आहे. परंतु इथे कर्ज मागणाऱ्यांमध्ये देखील वाढ झाल्याने मुदत ठेवींची संख्या वाढविण्यासाठी विविध बँकांमध्ये चढाओढ लागल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

दीर्घ काळाच्या मुदत ठेवींकरिता सहसा ग्राहक पुढे धजावत नाही याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक परिस्थितीच्या बदलांचा विपरीत परिणाम बँकांच्या व्याजदरांवर होणार अशी भीती ग्राहकांच्या मनात आहे. सध्याचे कर्जाचे व्याजदर बघता कर्ज घेण्यापेक्षा मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार आहे. याकरिता अनेक बँकांनी कंबर कसली असून ‘फ्लोटिंग एफडी’चा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये आरबीआयच्या रेपो दराप्रमाणे ठेवींवर व्याजदर देण्याची शाश्वती ग्राहकांना दिली जाते. सोबतच काही बँक एफडीवर १.६ टक्के व्याजदर जोडून देत आहे.

ग्राहकांना बचत करण्यास प्रवृत्त करणे तसेच आकर्षक परतावा देण्याचा विचार देखील यामागे असून आर्थिक तज्ज्ञ गुंतवणूक करण्यावर विशेष भर देण्याचा सल्ला देत आहे. सध्या ‘फ्लोटिंग एफडी’चा मध्यम मार्ग सुलभ आहे ज्यामध्ये कुठल्याही कागदपत्रांशिवाय गुंतवणुकीचा पर्याय मिळतो, परंतु याची दुसरी बाजू बघता रेपो रेट कमी झाल्यास ग्राहकांना परतावा देखील कमी मिळणार आहे. यामुळे मुदत ठेवींबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.

आयुक्त दिलीप ढोलेंच्या अध्यक्षतेखाली मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मलनि:सारण विभागाची आढावा बैठक संपन्न!

मिरा भाईंदर: दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली मलनि:सारण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस मलनि:सारण विभागाचे उप-अभियंता अरविंद पाटील, दिपक जाधव, प्रफुल्ल वानखेडे आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते.

शहरातील सर्व मलनि:सारण केंद्राची माहिती, सद्यस्थितीतील परिस्थिती आणि पावसाळ्यानंतर सुरु करावयाची कामे याबाबतचा आढावा घेण्यासोबतच मलनि:सारण केंद्रातील भविष्यात करावयाच्या कामाची माहिती कार्यकारी अभियंता यांनी घेतली.

सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज मधील असणाऱ्या विविध संकल्पना, विविध उपक्रम आणि त्या अनुषंगाने मलनि:सारण केंद्रामध्ये करावयाची कामांच्या दृष्टीने संबंधितांना तात्काळ सुचना देऊन पुढील आठवड्यात सर्व मलनि:सारण केंद्राचा पाहणी दौरा आयोजित करणार असून त्यावेळी सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.

महानगरपालिकेचे सद्यस्थितीतील सफाईमित्र सुरक्षा स्पर्धेत स्थान उंचावण्यासाठी मलनि:सारण विभाग, आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य यशस्वी पुर्ण करेल असे कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर यांनी सांगितले.

मालकही भाड्याने दिलेल्या घरात घडणाऱ्या गुन्ह्यासाठी तितकाच जबाबदार – उच्च न्यायालय


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात एखाद्या व्यक्तिला घरं भाड्याने दिल्यानंतर तिथे घडणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांची जबाबदारी मालक झटकू शकत नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील घरमालकाला दिलासा देण्यास नकार दिला आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये पुण्यातील वाकड परिसरात एका घरावर पोलीसांनी धाड टाकली होती. या घरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार नकली गिऱ्हाईक बनून पोलीसांनी छापेमारी केली होती. या धाडीत सापडलेल्यांना अटक करण्यात आली होती आणि तिथे आढळलेली रोख रक्कमही जप्त करण्यात आली होती.

या प्रकरणी मूळ घरमालक याच्या विरोधातही पोलीसांनी कारवाई केली होती. ही कारवाई चुकीची असून आपल्या विरोधातील कारवाई थांबवण्यात यावी यासाठी घरमालकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याने केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

या सुनावणीवेळी याचिका कर्त्या घरमालकाकडून आपण निर्दोष असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. आपल्या अशिलाने ते घर भाड्याने दिलं होतं. त्या घरात सुरू असलेल्या कोणत्याही गैरकृत्याबाबत त्याला माहिती नव्हती. तसेच, या कारवाईनंतर त्याने ‘लिव्ह अँड लायसन्स’ करार रद्द करून त्या जागेचा ताबा घेतला असून घरमालक यातील कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी नव्हता. त्यामुळे त्याच्या विरोधातील कारवाई थांबवण्यात यावी अशी विनंती घरमालकाच्या वकिलाने युक्तिवादात केली.

हा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. याचिकाकर्ती व्यक्ती ही त्या घराची मालक आहे, जिथे अशी बेकायदेशीर कृत्यं सुरू होती. एखाद्याला ‘लिव्ह अँड लायसन्स’ करारावर घर भाड्याने देण्याचा अर्थ त्या जागेचा संपूर्ण ताबा देणं असा नसतो. आपल्या घरात हे प्रकार सुरू असल्याची जराही कल्पना घरमालकाला नव्हती, या मुद्द्यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. फक्त त्या जागेचा थेट ताबा त्यावेळी मालकाकडे नव्हता, म्हणून तो निर्दोष आहे, असं म्हणता येणार नाही, असं न्यायालयाने यावेळी स्पष्ट करत घरमालकाला दिलासा देण्यास नकार दिला आणि त्याची याचिका फेटाळून लावली आहे.

 

महाकाली गुफेमध्ये ५०० कोटींचा घोटाळा; सोमय्यांचा वायकरांवर घणाघाती आरोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर नेत्यांवर आरोपसत्र सुरू झालं. मुंबईतील महाकाली गुंफेमध्ये शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे.

महाकाली गुंफेसाठी ५०० कोटी रुपये अविनाश भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका या बिल्डरला दिले. उद्धव ठाकरेंचा उजवा हात संजय राऊत जेलमध्ये डावा हात अनिल परब यांचे रिसॉर्ट तुटणार आहे, तर तिसरा हात वायकर यांनी ५०० कोटींचा घोटाळा केला आहे. अशी टीका सोमय्यांनी केली. १९९३ च्या ब्लास्टमधील अतिरेक्याचे स्मारक करण्यात हे व्यस्त आहेत. एकाबाजूला स्वतःच्या भ्रष्टाचाराचे स्मारक करायचे आहे, तर दुसऱ्या बाजूला याकूबचे स्मारक देखील करत आहे.

ईश्वर साकडे आणि नरेश सराफ हे १९९३ चे पीडित आहेत. नरेश सराफ यांचा उजवा पाय गेला. आज ३० वर्ष झालेत. हे याकूबचे स्मारक बांधायला निघालेत. तर ईश्वर साकडे यांना गोळी लागली. उद्धव ठाकरे हे बघणार का ? पालिका हे बघणार का ? असा सवालही सोमय्यांनी यावेळी बोलताना केला आहे.

खाण्यास गुटखा दिला नाही म्हणून शेजाऱ्यावर चाकूने वार करून हल्लेखोर पसार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेकडील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्रिमूर्तीनगरमध्ये एक घटना घडली आहे. शेजारच्या तरुणाने गुटखा खाण्यास मागितला. मात्र आपण गुटखा खात नाही, आपल्याजवळ गुटखा नाही, असे बोलताच संतप्त झालेल्या तरुणाने त्या शेजाऱ्यावर धारदार चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी करून पसार झाला आहे.

ही घटना डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर तरुणावर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. अजय बलवीर बोथ (वय: २२ वर्षे) राहणार त्रिमूर्तीनगर असे फरार हल्लेखोराचे नाव आहे. तर स्वतंत्रसिंग अवदलाल सिंग (वय: ३० वर्षे) राहणार सिताबाई चाळ, त्रिमूर्तीनगर असे जखमी तक्रारदाराचे नाव आहे. जखमी स्वतंत्रसिंग त्रिमूर्तीनगर मध्ये कुटूंबासह राहून तो सुतारकाम करतो. त्यातच सोमवारी रात्री नऊ वाजता जेवण झाल्यानंतर स्वतंत्रसिंग हा आपल्या घराबाहेर फेऱ्या मारत होता. यावेळी तेथे त्याच्या शेजारीच राहणारा आरोपी अजय बोथ त्याच्यासमोर येऊन त्याने स्वतंत्रसिंग याला थांबवून तुझ्याजवळ गुटखा आहे ना, तो मला खाण्यासाठी दे, अशी मागणी केली. मात्र सिंग याने आपण गुटका खात नाही, आपल्याजवळ गुटखा नाही. गुटक्यावर राज्य शासनाची बंदी असल्याने तो कोठे मिळत नाही, असे अजयला सांगितले त्यामुळे सिंगच्या या बोलण्याचा अजयला राग आला. सिंग हा आपल्याशी खोटे बोलत आहे. त्याच्याजवळ गुटखा असूनही तो आपल्याला मुद्दाम देत नाहीत, असा गैरसमज करत अजयने स्वतः जवळील धारधार चाकूने रागाच्या भरात सिंग याला काही कळण्याच्या आतच त्याच्यावर वार केले व पसार झाला.

पोलिसांकडून फरार आरोपीचा कसून शोध सुरू

चाकू हल्ल्यात सिंग गंभीर रित्या जखमी झाला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. तोपर्यंत आरोपी अजय घटनास्थळावरुन पळून गेला होता. जखमी अवस्थेत सिंग यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी विविध कलमानुसार अजयवर गुन्हा दाखल करुन फरार आरोपी अजयचा कसोशीने शोध सुरू केला आहे.