Home Blog Page 138

डोंबिवलीकरांकडून कॅबिनेटमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांचे गुलाल उधळत नागरिकांच्या जल्लोषात जोरदार स्वागत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारचा ४० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर डोंबिवलीत जल्लोष करण्यात आला. ढोल-ताश्यांच्या गजरात कार्यकर्त्यांनी वाजत गाजत रवींद्र चव्हाण यांची मिरवणूक काढली.

आमदार रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वामुळे राजकीय यश मिळाले आहे. कार्यकर्ता, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री अशा क्रमवारीत भाजपाला नेहमीच चढत्या क्रमवारीत सिध्द केले आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री पद मिळवुन रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली शहराच्या शिरपेचात आणखी एक नवा मानाचा तुरा खोवला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार होताना डोंबिवलीतील भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांना नक्की कॅबिनेटमंत्रीपद मिळेल अशी खात्री डोंबिवलीकरांना होती आणि झालेही तसेच. चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि डोंबिवलीकरांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. संध्याकाळी साधा कार्यकर्ता आणि अनेकांचे लाडके दादा रवींद्र चव्हाण आपल्या दृष्टीपथास कधी मिळेल या प्रश्नांनी अनेकांचे फोन वाजत होते. आणि पाच वाजताच डोंबिवलीच्या सीमेवर कॅबिनेट मंत्रीपद मिळालेला दादा रवींद्र चव्हाण सर्वांना पहावयास मिळताच गुलालाची उधळण आणि पुष्पहार, गुच्छ देणं सुरू झाले. हजारो डोंबिवलीकर घरडा सर्कल ते श्री गणपती मंदिर रॅलीत सामील होत ढोल-ताशा, बँड वाजंत्री रॅलीत नाचगाण्यात दंग झाले होते.

दरम्यान टिळकांचा पुतळ्याला पुष्पहार घालून रवींद्र चव्हाणांनी अभिवादन केले. नंतर श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि दरम्यान गणेश मंदिर संस्थान तर्फे चव्हाणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक नेते तथा पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिकांनी चव्हाणांचे स्वागत व अभिनंदन केले. यावेळी चव्हाण म्हणाले, विकासाची कामे झाली पाहिजेत यासाठी कार्यरत राहीन, नागरिकांच्या हिताचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवेन. यावेळी रिपाई डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, समाधान तायडे यांसह कार्यकर्त्यानी मंत्री चव्हाण यांचे अभिनंदन केले. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नंदू परब, पूनम पाटील, सुहासिनी राणे, दिनेश जाधव, मनोज पाटील, मुकुंद पेडणेकर, मंदार टावरे, सुजित महाजन, वर्षा परमार, मनीषा छल्लारे, मयुरेश शिर्के, मितेश पेणकार, मिहीर देसाई, हरीश जावकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाने रक्षाबंधना निमित्त गडचिरोली पोलिस बांधवां प्रती ऋणानुबंध केले व्यक्त!

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी

मुंबई: देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती प्रत्येक जण सन्मान, आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करीत असतात परंतु देशांतर्गत गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरात जे पोलीस दलाचे जवान आपले प्राण पणाला लावून देशाची सुरक्षा करीत असतात त्यांच्याकडे मात्र फारसे कुणी लक्ष देत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ह्या रक्षा बांधनाच्या सणाला एक वेगळे रूप देऊन साजरे करण्याचा निर्णय एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाने घेतला असून गडचिरोली सारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील पोलीस बांधवांकरिता विद्यापीठा तर्फे 4000 राख्या पाठविण्यात आल्या आहेत.

ऋणानुबंध उपक्रमांतर्गत गडचिरोली पोलिस बांधवांसाठी एस.एन.डी. टी महिला विद्यापीठाच्या मा.कुलगुरू, प्रा.डॉ.उज्वला चक्रदेव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व एस.एन. डी. टी महिला विद्यापीठाच्या परिवारातर्फे 4000 राख्या आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस बांधवांसाठी पाठविण्यात आल्या आहेत. ऋणानुबंध ह्या उपक्रमास एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ह्या सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला.

गडचिरोली पोलिसांसोबत रक्षा बंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा करून त्यांच्याप्रती एक कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणे हा ऋणानुबंध उपक्रमाचा मुख्य हेतू आहे असं मत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तसेच समाजकार्य विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी व्यक्त केले.

मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठी रंगभूमी वरील आघाडीचे अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराने आज पहाटे त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी ( झावबावाडी, चर्नी रोड ) येथे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.

मराठी रंगभूमीवर ‘मोरूची मावशी’, ‘बायको असून शेजारी’, ‘लग्नाची बेडी’ यासह असंख्य मराठी नाटकात तसेच मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटात आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून एक गुणी, निगर्वी स्वभावाचा सहजसुंदर अभिनय करणारा अभिनेता आपण गमावला असे म्हटले आहे

 

संजय राऊतांच्या “रोखठोक” प्रश्नी ईडी सतर्क..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

संजय राऊतांनी शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून रोखठोक सदर लिहिलं आणि ईडी आणखी सतर्क झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राऊत हे तुरुंगातून लेख लिहायला स्वातंत्र्यसेनानाही आहेत का? असा प्रश्न मनसेचे संदीप देशपांडेंनी विचारला होता. ‘ईडी’च्या कोठडीत असताना राऊतांनी लिखाण कसं काय केलं, या प्रकरणी ‘ईडी’ तपास करणार असल्याच बोलले जात आहे. तुरुंगात असताना कोणतीही व्यक्ती अशा प्रकारे लेख लिहू शकत नाही. लेख लिहायचा असेल, तर न्यायालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता असते. त्याशिवाय लेख लिहिता येत नाही. म्हणूनच आता या प्रकरणात ‘ईडी’कडून संजय राऊतांची चौकशी होणार असल्याचं वृत्त आहे. रविवारी सामनामध्ये प्रकाशित झालेल्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कठोर टीका केली होती.

मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती गेले तर मुंबईत पैसा शिल्लक राहणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. जेव्हा मराठी उद्योजक साखर कारखाने, गिरण्या आणि इतर उद्योग चालवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ‘ईडी’ त्यांच्यावर कारवाई करते. त्याबद्दलही राज्यपाल कोश्यारींनी काहीतरी बोलायला हवं. असे राऊतांनी आपल्या लेखात नमूद केले होते, या रोखठोकबद्दल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका करत शंका उपस्थित केली होती. आता या प्रकरणाची ‘ईडी’कडून चौकशी केली जाणार आहे.

“घरोघरी तिरंगा” या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी गुरुवार दि. १२ ऑगस्ट रोजी शाळा, विद्यालयीन विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी, स्काऊट-गाईड विद्यार्थी यांच्या भारतीय सांस्कृतिक पोशाखातील प्रभाग फेरीचा आयोजन !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

विध्यार्थी, पालक, बालक आणि बालकांचे शिक्षक यांचे राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असते, त्यामुळे आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उचित साधून “घरोघरी तिरंगा” या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने देखील कंबर कसली असून महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांचे मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये तसेच महापालिका परिक्षेत्रातील इतर शाळांमध्ये देखील “घरोघरी तिरंगा” या उपक्रमासाठी दिनांक ०१ ऑगस्ट पासून शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या घेण्यात येत आहेत, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने हा उपक्रम घरोघरी पोहोचविण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रत्येक शाळेत पालक सभा ही आयोजित करण्यात येत आहे आणि आता “घरोघरी तिरंगा” या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी कल्याण व डोंबिवली विभागांतर्गत शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी, स्काऊट गाईड चे विद्यार्थी त्यांच्या भारतीय संस्कृती पोशाखातील प्रभाग फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

कल्याण मध्ये या प्रभाग फेरीचा प्रारंभ १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० वाजता बिर्ला महाविद्यालयातून होणार असून बिर्ला महाविद्यालय- आरटीओ कार्यालय – वाणी विद्यालय – साई चौक – राधानगर – वायले नगर – त्रिवेणी गार्डन – शासकीय गोडाऊन – लालचौकी – पारनाका – गांधी चौक – सुभाष मैदान येथे पोहोचून सामूहिक राष्ट्रगीता नंतर या प्रभाग फेरीची सांगता होईल तर डोंबिवली मध्ये गुरुवारी सकाळी ८.०० वाजता सावळाराम क्रीडा संकुल घरडा सर्कल येथून प्रभाग फेरीचा प्रारंभ होणार असून सावळाराम क्रीडा संकुल – घरडा सर्कल – शेलार नाका, शाळेकडून, गोग्रासवाडी रोड – गोपाल नगर मार्ग – टायटन शोरूम जवळून टिळक पुतळा चौक मार्गे फते अली शाळा येथे पोहचून सामूहिक राष्ट्रगीतानंतर या प्रभाग फेरीची सांगता होईल असे या प्रभात फेरीचे नियोजन असल्याचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे व वंदना गुळवे उपायुक्त (शिक्षण संस्था) यांच्या कडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे.