Home Blog Page 144

सीबीएसई बोर्डात ९९.६०℅ गुण पटकावून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवत टॉपर बनलेली ‘होली एंजेल्स’ शाळेची विध्यार्थीनी कु.दीक्षा सुवर्णा चा कल्याण-डोंबिवली महापालिकेचे मा.आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे हस्ते जाहीर सत्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक २२ जुलै रोजी लागलेल्या यंदाच्या सीबीएसई बोर्ड २०२१-२२ इयत्ता १०वी च्या परीक्षेच्या निकालात डोंबिवली पूर्वेकडील तुकाराम नगर आयरे रोड येथील ओम मातृछाया गृहनिर्माण सोसायटीत राहणाऱ्या व पीएनटी येथील ‘होली एंजेल्स’ शाळेत शिकत असणाऱ्या ह्या गुणवंत विद्यार्थिनी कु.दीक्षा सुरेंद्र सुवर्णा हिने ५०० गुणांपैकी ४९८ गुण (९९.६०℅) पटकावत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला म्हणून आज डोंबिवली-कल्याण महापालिकेचे आयएएस दर्जा लाभलेले आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते तिला पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक देऊन कौतुक करत “महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनीने सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे” असे उद्गार काढून तिचा सत्कार करण्यात आला.

सोबत कु.दीक्षा सुरेंद्र सुवर्णा या गुणवंत विद्यार्थिनीचे पालक श्री व सौ सुरेंद्र सुवर्णा व ‘होली एंजेल्स’ संस्थेचे अध्यक्ष डॉ.ओमेन डेव्हिड सर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.बिजॉय ओमेन, श्रीमती रफत शेख यांचा देखील यावेळी कडोंपा चे मा.आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या कल्याण-डोंबिवली करांसाठी सदर बाब सुवर्ण अक्षरात नोंद करण्यासारखी आहे व भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात किंवा भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश घेवून नागरिकांची सेवा करण्याचा मनोदय कु.दीक्षा सुवर्णा हिने यावेळी बोलताना व्यक्त केला.

या सत्कार सोहळया समयी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिमंडळ-१ चे उप-आयुक्त श्री.धैर्यशील जाधव, शिक्षण विभागाच्या उप-आयुक्त वंदना गुळवे, शिक्षणाधिकारी श्री. विजय सरकटे, श्री. श्याम भोईर, शिक्षण विभागातील कर्मचारी व पत्रकार बंधू उपस्थित होते.

 

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ६२व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे यांचा ६२ वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या अधिकृत सोशल मीडियावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर व फेसबुक अकाउंटवरुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांनी आपल्या ट्विट व फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे की, “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना”.

डोंबिवलीतील भोपर येथे ‘भाजपा बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत बिन्दूरा फाउंडेशन व जे.के.पाटील स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सेल्फ डिफेन्स या वर्गाचे आयोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज डोंबिवलीतील भोपर येथे ‘भाजपा बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत बिन्दूरा फाउंडेशन व जे.के.पाटील स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सेल्फ डिफेन्स या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे नेते शिवाजी आव्हाड यांच्या हस्ते झाले. या वेळेस त्यांनी आपल्या भाषणात मुलीने व महिलेने सेल्फ डिफेन्स च्या पोस्टमधून आपणा स्वतःला स्वयंपूर्ण करणे आवश्यक आहे हे सांगितले. कुठल्याही संकटाचा सामना करत असताना आपल्याला त्याचा प्रतिकार करता आला पाहिजे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींना व शिक्षकांना याची ट्रेनिंग दिली जाईल जेणेकरून भविष्यात त्याचा आपल्याला फायदा होईल.

या कार्यक्रमाचे वेळेस भाजपच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सदस्याच्या पदाधिकारी ऍडव्होकेट बिंदू दुबे यांनी आपल्या भाषणात सेल्फ डिफेन्सचे महत्त्व सांगितले. यावेळेस सामाजिक कार्यकर्ते जे.के.पाटील स्कूल चे चेअरमन श्री गजानन पाटील, मुख्याध्यापिका मंजूषा पाटील, उपमुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

तीन दिवस चाललेल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना किक बॉक्सिंग व सेल्फ डिफेन्सच्या अनेक प्रकारांची ट्रेनिंग दिली जाणार आहे. यावेळी शिक्षक या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सेल्फ डिफेन्स चे सर्व ट्रेनिंग स्वतः घेऊन नंतर भविष्यात सुद्धा विद्यार्थ्यांना दर महिना याची ट्रेनिंग देणार आहेत.

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असून राज्यात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र हे सिंगल युज प्लास्टिक बंदी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

राज्यात प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक शक्तिप्रदत्त समिती नेमण्यात आली होती. या समितीने ७ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीत महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर देखील बंदी घातली आहे. या सुधारणेनंतर राज्यात प्लास्टिक लेपीत (कोटेड) तसेच प्लॅस्टिक थर (लॅमीनेटिड) असणाऱ्या पेपर किंवा अॅल्युमिनियम इत्यादी पासून बनवलेले डीस्पोजेबल डीश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादी एकल वापरावर, वापर उत्पादनावर आता बंदी असणार आहे.

दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा बंदीमागचा मुख्य उद्देश आहे.
राज्यातील शहरे, ग्रामीण भागात दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय असून, यातील कचऱ्याचे विघटन व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. हा कचरा जलाशयांमध्ये व कचरा डेपोत फेकला जातो किंवा पुनरप्रक्रिया शक्य नसल्याने रात्रीच्या वेळी हा कचरा थेट जाळला जातो. सध्या राज्यात सिंगल युज प्लास्टिक मध्ये कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनर इत्यादींच्या वापरावर बंदी आहे. परंतु सध्या बाजारामध्ये डीश, कंटेनर, ग्लास, कप इत्यादी पेपरच्या नावाखाली प्लास्टिक लेप असलेले किंवा प्लास्टिक लॅमिनेशन केलेले मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. या सर्व वस्तुंमध्ये सुद्धा प्लास्टिक आहे. विघटनास घातक ठरणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचे आक्रमण रोखण्यासाठी हे बंदीचे पाऊल उचलण्यात आले आहे.

 

 

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवितांना त्यांच्या प्रति सकारात्मकता ठेवा; कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सचिवांना भेटले पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा. राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा असे निर्देश दिले. मुख्यमंत्री आज मंत्रालयात सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रशासन संवेदनशील, सचोटीचे, प्रामाणिक हवे अशी जनतेची अपेक्षा आहे. महाराष्ट्राची देशात एक चांगली प्रतिमा आहे. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच इतर केंद्रीय मंत्री देखील राज्याला सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी नावीन्यपूर्ण योजना देखील आपण मांडल्या पाहिजेत. नवनवीन उपक्रमांचे स्वागत आहे. केंद्राचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हे पाहून तात्काळ असे प्रस्ताव सादर करावेत. विशेषत: रेल्वे, महामार्ग याबाबतीत केंद्राकडील पाठपुरावा वाढवावा. राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना गतीमान व गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शासन आणि प्रशासन ही राज्य कारभाराच्या रथाची दोन चाके आहेत. दोघांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. लोकाभिमुख योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. राज्यातील नवीन सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. शेतकरी, कामगार, शेतमजूर, यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. सरकारची प्रतिमा ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. यासाठी सर्वांनी राज्याच्या हिताची कामे प्रभावीपणे करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील शेतकरी हा महत्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांसाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करावी. अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यासाठी गती द्यावी. राज्यातील रस्त्यांची सुधारणा करताना नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कोणत्याही कामामध्ये गुणवत्तेत तडजोड करु नका, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आवश्यक कामांना स्थगिती नाही
मागील सरकारने शेवटी शेवटी घाईघाईत, घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. जनतेशी संबंधित आवश्यक अशा कामांना स्थगिती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

लवकरच १०० दिवसांचा कार्यक्रम शिंदे म्हणाले
लवकरच १०० दिवसांचा कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. पूर्वी सुरु असलेल्या लोकहिताचे कामे सुरु ठेवणार आहोत. प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी रिक्त पदांची भरती होणे पण गरजेचे आहे त्यादृष्टीने विभागांनी नियोजन तयार ठेवावे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.