Home Blog Page 147

विवाहित महिलांप्रमाणेच अविवाहित मुलींनाही गर्भपाताचा अधिकार! सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निकाल दिला आहे. आता विवाहित महिलांप्रमाणेच अविवाहित मुलींनाही गर्भपाताचा समान अधिकार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत महिला विवाहित आणि अविवाहित असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. न्यायालयाने अविवाहित महिलांना वैद्यकीय प्रक्रियेद्वारे गर्भपात करण्याची वेळ वाढवून दिली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयात २४ आठवड्यांची म्हणजेच ६ महिन्यांची गर्भवती असलेल्या अविवाहित महिलेला गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने ‘एम्सचे मेडिकल बोर्ड’ गठित करण्याचे आदेश दिले आहेत, जे गर्भपातामुळे जीवाला धोका आहे की नाही हे पाहणार आहे. वैद्यकीय मंडळाच्या निष्कर्षात धोका नसल्याचे आढळून आल्यास गर्भपात करण्यात येईल.

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) ऍक्ट २०२१ नुसार अविवाहित महिलाही कायद्याच्या कक्षेत !

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपल्या निकालात असे निरीक्षण नोंदवले की, दिल्ली उच्च न्यायालयाने गर्भधारणा कायद्यातील वैद्यकीय समाप्ती कायद्यातील तरतूद अनावश्यकपणे प्रतिबंधात्मक असल्याचे मत नोंदवले आणि महिलेला गर्भपात करण्यास परवानगी नाकारली. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट २०२१ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार या कायद्यामध्ये ‘स्त्री आणि तिचा जोडीदार’ हा शब्द वापरण्यात आला आहे. तिथे ‘पती’ हा शब्द नसून ‘जोडीदार’ हा शब्द वापरला आहे. अशा परिस्थितीत अविवाहित महिलाही कायद्याच्या कक्षेत येतात. याचिका कर्त्या महिलेला या कायद्याचा लाभ नाकारता येणार नाही कारण ती अविवाहित आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, विधिमंडळाने बनवलेल्या कायद्याचा उद्देश केवळ वैवाहिक संबंधातून अनपेक्षित गर्भधारणा होण्यापुरता मर्यादित नाही. याचिकाकर्त्या महिला अवांछित गर्भधारणेसह प्रवास करत असून हे कायद्याच्या विरोधात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने एक निर्देश जारी केला आहे की एम्सच्या संचालकांनी एक वैद्यकीय मंडळ स्थापन करावे जे २२ जुलै रोजी महिलेची वैद्यकीय तपासणी करेल आणि महिलेच्या गर्भपातामुळे तिच्या जीवाला धोका आहे की नाही हे पाहेल. जर वैद्यकीय मंडळ या निष्कर्षापर्यंत पोहोचले की २४ आठवड्यात गर्भधारणा संपुष्टात येण्याचा धोका नाही, तर स्त्रीची गर्भधारणा संपुष्टात आणली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे, जेणेकरून कायद्याचे तपशीलवार स्पष्टीकरण करता येईल.

 

मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आता एपिलेप्सी आणि पार्किन्सन रोगावरही उपचार घेता येणार!

रूग्णालयाची अनोखी इन-हाउस ब्रेन जिम देखील देखील सेवेसाठी सज्ज

मिरारोड: मेंदूच्या आरोग्याकडे बहुसंख्य लोकांचे दुर्लक्ष होते. जागतिक मेंदू दिनानिमित्त, मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सने रुग्णांचे एपिलेप्सी आणि पार्किन्सन्स रोगाचे क्लिनिक सेवेत आणले आहे. एपिलेप्सी आणि पार्किन्सन रोगाचे व्यवस्थापन प्रशिक्षित तज्ञ याठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. जे उपचारपूर्व आणि उपचारानंतरच्या सर्व गरजा पुर्ण करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे या क्लिनिकचे उद्घाटन एपिलेप्सी आणि पार्किन्सन रोगावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या रुग्णांच्या हस्ते करण्यात आले.

शुक्रवारी २२ जुलै रोजी मिरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल येथे आयोजित क्लिनीकच्या उदघाटन प्रसंगी डॉ.पवन पै कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, डॉ.अश्विन बोरकर कन्सल्टंट न्यूरो सर्जन, डॉ. दिपेश पिंपळे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, डॉ. विनोद रंबल कन्सल्टंट न्यूरो सर्जन, डॉ. सिद्धार्थ वॉरियर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, डॉ. राहिल अन्सारी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, डॉ. बिपीन जिभकाटे सल्लागार न्यूरो इंटेन्सिव्ह केअर, डॉ. इम्रान खान सल्लागार न्यूरो रिहॅबिलिटेशन, डॉ. पंकज धमीजा सेंटर हेड वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरारोड आदी तज्ञ तसेच कर्मचारी उपस्थित होते. एपिलेप्सी रुग्ण अमित मिरानी (३६) आणि पार्किन्सन रुग्ण अरुणा मोदी (८३) यांनी त्यांच्या आजारावर केलेली मात आणि त्यादरम्यानचा प्रवास याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

भारतामध्ये एपिलेप्सी आणि पार्किन्सन्स आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णांना एपिलेप्सी आणि पार्किन्सन्ससाठी योग्य उपचार मिळु शकत नाहीत. वैद्यकीय प्रगतीमुळे, या दोन दुर्बल समस्या आणि त्यांच्याशी निगडीत कॉमोरबिडीटीचे व्यवस्थापन करणे आता शक्य झाले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरारोडने एपिलेप्सी आणि पार्किन्सन्सच्या रूग्णांसाठी सर्वसमावेशक क्लिनीक सुरू करून एक मोठे पाऊल उचलले आहे जे नक्कीच रुग्णांकरिता फायदेशीर ठरत आहे.

डॉ. पवन पै म्हणाले, पार्किन्सन्स रोग ही एक न्यूरोडीजनरेटिव्ह स्थिती आहे ज्यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये डोपामाइनची कमतरता उद्भवते. देशात पार्किन्सन्स आजाराचे प्रमाण वाढत आहे. अपस्माराच्या रूग्णांप्रमाणे, पार्किन्सन रोग असलेल्यांना देखील पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. सुरुवातीला पार्किन्सन्सच्या रुग्णांना औषधोपचाराने बरे वाटते.

या क्लिनिकमध्ये बोटॉक्स थेरपी देखील उपलब्ध केली जाणार आहे. जागतिक मेंदू दिनानिमित्त रूग्ण आणि सामान्य लोकांसाठी मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी, अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यासाठी हॉस्पिटलने इन-हाउस ब्रेन जिम आणली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि उच्च प्रशिक्षित तंत्रज्ञांसह या क्लिनिकची सुरूवात पार्किन्सन्स आणि एपिलेप्सी असलेल्या रुग्णांना उत्तम दर्जाच्या उपचारांची हमी देते.

डॉ. दिपेश पिंपळे सांगतात अपस्मार हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि ती एक मानसिक समस्या म्हणून ओळखली जाते. या स्थितीशी एक सामाजिक कलंक जोडलेला आहे ज्यामुळे त्वरित वैद्यकीय लक्ष मिळणे कठीण होऊ शकते. या क्लिनिकद्वारे एपिलेप्सी आणि पार्किन्सन्स रोगाविषयी अधिक जागरूकता पसरवणे हे आमचे ध्येय आहे कारण हे रुग्ण अधिक चांगल्या जीवनासाठी पात्र आहेत.

अपस्मार कोणालाही आणि कधीही होऊ शकतो. एपिलेप्सी असलेल्यांसाठी वेळेवर निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत. आमच्या क्लिनिकमध्ये न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, न्यूरो रिहॅब तज्ञ, न्यूरो-टेक्निशियन आणि स्टाफ नर्स यांची टीम सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सुकी नदी पात्रात अडकलेल्या ९ पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुखी (गारबर्डी) धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याची माहिती सायंकाळी ६.३० वाजता स्थानिकांनी प्रशासनाला दिली. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह वाढतच असल्याने हे सर्व जण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बेहरे, सावदा येथील उपविभागीय अभियंता यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला देऊन बचाव कार्य तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मिळताच त्यांनी फैजपूर चे प्रांत अधिकारी कैलास कडलग आणि रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना बचाव साहित्यासह घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर सतत सुरू असलेला पाऊस तसेच नदीपात्रात वाढत जाणारे पाणी ही बाब लक्षात घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मिळण्यासाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षास संपर्क साधण्यात आला. त्यानुसार धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडीही घटनास्थळाकडे रवाना झाली.

प्रांत अधिकारी कडलग आणि तहसिलदार श्रीमती देवगुणे यांनी स्थानिक नागरिक तसेच पोहणारे १. इम्रान शहा रतन शहा रा.पाल
२. संतोष दरबार राठोड रा.पाल
३. रतन भंगी पावरा रा.गारखेडा
४. तारासिंग रेवलसिंग पावरा रा.गारबर्डी
५. सिद्धार्थ गुलजार भिल
यांच्या मदतीने मुक्ताईनगर येथील या नऊ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. यासाठी त्यांना स्थानिक आमदार शिरीष चौधरी, रावेर तहसील कार्यालय, सावदा पोलीस स्टेशन, प्रांत कार्यालय फैजपूर, वन्यजीव अधिकारी व कर्मचारी आदीचे सहकार्य लाभले.

सुकी नदी पात्रात अडकलेल्या व सुटका झालेल्या व्यक्ती
१. अतुल प्रकाश कोळी (२० वर्षे)
२. विष्णू दिलीप कोलते (१७ वर्षे)
३. आकाश रमेश धांडे (२५ वर्षे)
४. जितेंद्र शत्रुघ्न कूंडक (३० वर्षे
५. मुकेश श्रीराम धांडे (१९ वर्षे
६. मनोज रमेश सोनावणे (२८वर्षे)
७. लखन प्रकाश सोनावणे (२५ वर्षे)
८. पियूष मिलिंद भालेराव (२२ वर्षे)
९. गणेशसिंग पोपट मोरे (२८ वर्षे)
सर्व रा. मुक्ताईनगर या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून नदीपात्रात पाण्याची अचानक वाढ होत असल्याने नागरिकांनी नदीपात्रात तसेच धरण परिसरात जावू नये असा इशारा देत परिसरातील सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आवाहन केले आहे.

 

बँक कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाला आळा बसवण्यासाठी बँक ग्राहकांना आरबीआयचे कवच..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशातील प्रमुख व केंद्रस्थानी असणारी रिझर्व बँक (आरबीआय) सर्व बँकांचे नियमन व नियंत्रण करते. आर्थिक व्यवहार करताना सर्व बँकांना आरबीआयच्या दिशानिर्देशानुसार कार्य करणे आवश्यक व बंधनकारक असते. त्यामुळे बँकिंग प्रणाली सुरळीत ठेवण्यासोबत ग्राहकांच्या (खातेधारकांच्या) हितांना देखील आरबीआय मार्फत प्राधान्य दिले जाते. अनेकदा असे होते की, आपण बँकेमध्ये गेले असता संबंधित बँक कर्मचारी कामाची टाळाटाळ करताना दिसतात अथवा गैरवर्तन करतात. यामुळे ग्राहकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो.

बँक कर्मचाऱ्यांद्वारे कामात केली जाणारी दिरंगाई, टाळाटाळीची उत्तरे देणे, जेवणाची वेळ आहे सांगून ग्राहकांना ताटकळत ठेवणे, गैरवर्तन इत्यादी बाबी रोखण्याकरिता आरबीआयने ग्राहकांना काही अधिकार दिले आहेत. कुठल्याही ग्राहकांसोबत संबंधित बँकेत गैरव्यवहार झाल्यास या अधिकाराचा वापर करत बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते.

जर आपल्यासोबत बँक कर्मचाऱ्याने असभ्य वर्तन केले असल्यास थेट आपण आरबीआयकडे तक्रार नोंदवित समस्येचे निवारण करू शकता, याकरिता आपणाला बँकिंग लोकपालकडे संपूर्ण घडलेल्या प्रकरणाची माहिती सादर करावी लागेल. अशा बँक कर्मचाऱ्यांवर आरबीआय तातडीने कारवाईची हमी ग्राहकांना देते.

जर बँक कर्मचारी हलगर्जीपणामुळे आपणाला नाहक त्रास देत असेल तर सर्वप्रथम आपण बँकेच्या नोडल अधिकाऱ्याजवळ तक्रार नोंदविली पाहिजे किंवा संबंधित बँकेच्या तक्रार मंचकडे सुद्धा याची माहिती सादर केल्यास समस्येचे निवारण केल्या जाते. संबंधित बँकेच्या तक्रार निवारणाच्या टोल फ्री क्रमांकावर देखील ग्राहक त्यांची तक्रार नोंदवू शकतात.

जर आपणाला बँकिंग लोकपालकडे तक्रार द्यावयाची असेल तर आपण फोनद्वारे अथवा ऑनलाईनच्या माध्यमाने तक्रारीची नोंद करू शकता. बँकिंगसंबंधी तक्रार निवारणाकरिता टोल फ्री क्रमांक १४४४८ हा आहे. जर आपण ऑनलाईन तक्रार नोंदवण्यास इच्छुक असाल तर <https://cms.rbi.org.in> या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करून आपली समस्या नोंदवू शकता.

 

इकडे सरकार कोसळले आणि आदित्य ठाकरेंचा काही महिन्यांपूर्वी बांधलेला पूल गेला पुरात वाहून तिकडे..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शेंद्री पाडा येथे काही महिन्यांपूर्वीच लोखंडी पूल उभारला होता त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरु असल्याने नद्या, नाले,ओहोळ, अगदी गटारीसुद्धा दुथडीभरून वाहत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आणि याच पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला आहे यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा लाकडी बल्ल्यांवरून पाण्याची हंडे घेऊन जाण्याची कसरत करावी लागत आहे.

पंचक्रोशितील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार येथे लोखंडी पूल देखील उभारण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुलचे उदघाटनही झाले होते मात्र पहिल्याच पावसात पुलाने अखेरचा श्वास घेतला हे दुर्दैव.

हा पुलचं वाहून गेल्याने महिलांना पुन्हा लाकडी बल्ल्यावरून प्रवास करावा लागत आहे.म्हणून तिकडे सरकार कोसळले आणि इकडे आदित्य ठाकरेंनी उभारलेला पूल पुरात वाहून गेल्याची चर्चा त्र्यंबकवासीयांमध्ये आहे हे खरं.