Home Blog Page 151

राज्यातल्या ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आताची सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. नुकतीच दोन दिवसांपूर्वी नगर परिषदांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत ९२ नगरपरिषदांच्या आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा केली आहे. खरं तर या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी करण्यात आली होती. कारण या निवडणूक पुढच्या महिन्यात भर पावसात नियोजित करण्यात आलेल्या होत्या. या मागणीचा विचार करता निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

पण सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या निवडणुका १८ आणि १९ ऑगस्टला नियोजित होत्या. या निवडणुकींसाठी १८ ऑगस्टला मतदान होणार होतं. तर १९ ऑगस्टला मतमोजणी होणार होती. पण या निवडणुकीवरुन ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर प्रश्न उपस्थित केले जात होते.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय या निवडणुका होवू नये, अशी मागणी केली जात होती. दुसरीकडे पावसाचा मुद्दा उपस्थित करत काही राजकीय पक्षांनी या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन १२ जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घोषित केला आहे.

 

मोदी सरकारची कोरोना लशीच्या ‘बुस्टर डोस’ संदर्भात मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य स्वरूपाची होती. मात्र, त्यानंतर आता कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट देशावर घोंघावत आहे. त्यासंदर्भात आता मोदी सरकारने सावधगिरीची भूमिका घेत तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

महत्वाचं म्हणजे ‘बुस्टर डोस’ घेणाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कारण बूस्टर डोस संदर्भात मोदी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशात आता १८ पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लशीचा बुस्टर डोस म्हणजेच प्रिकॉशन डोस फ्री दिला जाणार आहे, अशी घोषणाच केंद्र सरकारने केली आहे.

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, पत्रकार तसेच ६० पेक्षा जास्त वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सध्या भारतात मोफत बुस्टर डोस दिला जात आहे. यांना सरकारी लसीकरण केंद्रावर हे डोस उपलब्ध आहेत. तर १८-५९ वयोगटातील नागरिकांसाठी खासगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस दिले जात आहेत. मात्र,१८-५९ वयोगटातील नागरिकांना या बूस्टर डोससाठी पैसे मोजावे लागत होते. मात्र, आता या वयोगटातील नागरिकांनाही ‘बुस्टर डोस’ मोफत देण्यात येणार आहेत, तसा निर्णयच मोदी सरकारद्वारे जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, हा मोफत ‘बूस्टर डोस’ १५ जुलैपासून १८-५९ वयोगटातील नागरिकांना उपलब्ध होईल.

१५ जुलैपासून ७५ दिवस बुस्टर डोसची विशेष मोहीम देशभरात राबवण्यात येईल. ज्यात १८ वर्षांवरील सर्वांना खासगी लसीकरण केंद्रावर कोरोना लशीचा तिसरा म्हणजे ‘बुस्टर डोस’ दिला जाईल असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा अधिकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये थेट मतदान करता येईल असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

त्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.ज्यांच्याकडे दहा आर इतकी जमीन असेल अशा १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि पाच वर्षांमध्ये किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीत आपल्या कृषी मालाची विक्री केली असेल, अशा शेतकऱ्याला थेट मतदान करता येईल.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व खातेदार शेतक-यांना थेट मतदानाचा अधिकार दिल्यामुळे ७/१२ धारक खातेधारक शेतकरी हाच निकष ठेऊन प्रचलित अधिनियमात सुधारणा करुन पुढीलप्रमाणे फायदे होणार आहेत –

बाजार समितीचे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत मतदार संघ हे मर्यादीत स्वरूपाचे मतदार संघ संपुष्टात येतील.

सध्या ग्रामपंचायत मतदार संघामधून बऱ्याच ठिकाणी शेती नसणारे ग्रामपंचायत सदस्य मतदान करतात, जे शेतक-यांचे प्रतिनिधीत्व करत नाही म्हणून शेतकरी खातेदारामधून निवडणूक झाल्यास शेतकरी प्रतिनिधीची निवड प्रत्यक्ष शेतकऱ्यामधून होईल.

 

मिरा भाईंदरचे शिवसेनेचे १८ नगरसेवक शिंदे गटात गेल्याचा आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा खोटा?

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी

मिरा भाईंदर: शिवसेनेच्या बंडखोर गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक, अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचा दावा केला आहे. मात्र संध्याकाळ पर्यंत ह्या बातमीची शहानिशा केली असता आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा निखालस खोटा असल्याचे निष्पन्न झाले असून १९ नागरसेवकांपैकी फक्त आठ नगरसेवक आमदार प्रताप सरनाईकां सोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याचे सिद्ध झाले आहे.

याबाबत अधिक माहिती करिता मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे प्रवक्ते शैलेश पांडे यांचेशी संपर्क केला असता “शिवसेनेत कोणताही वेगळा गट नाही जे नगरसेवक, पदाधिकारी आहेत ते सर्व शिवसैनिकच आहेत. आज काही मोजके नगरसेवक, काही पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात गेले होते हे जरी सत्य असले तरी त्यापैकी कुणीही अद्याप कुठेही गेलेले नाही ते सर्व शिवसेनेतच आहेत” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मिरा भाईंदर शहरात शिवसेनेच्या अधिकृत चिन्हांवर निवडून आलेले एकूण २२ नगरसेवक होते त्यापैकी अनिता पाटील आणि दीप्ती भट यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये आधीच प्रवेश केलेला आहे. एक नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता सध्यस्थितीत मिरा भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनेचे एकूण १९ अधिकृत नगरसेवक असून विक्रम प्रतापसिंह हे नामनिर्देशित नगरसेवक आहेत. त्यापैकी फक्त आठ नगरसेवक आमदार प्रताप सरनाईक सोबत आज मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या आठ नागरसेवकांपैकी देखील हेलन बोर्जिस आणि एलायस बांड्या या दोघांना आधी प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात एका दुसऱ्या कामाचे कारण सांगून बोलावून घेतले आणि मग तिथून पुढे काहीही न सांगता मुंबईला घेऊन गेले असे हेलन बोर्जिस आणि एलायस बांड्या या दोन्ही नगरसेवकांचे म्हणणे आहे.

मुळात मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे एकेकाळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे दिसत होते आणि म्हणूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेच्या प्रवक्ते पदावर नियुक्त केले होते. प्रताप सरनाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत आल्या पासूनच एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये गेली अनेक वर्षे शीत युद्ध सुरु असल्याचे बोलले जात होते. मिरा भाईंदर शहरातील विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असो कि, पक्षाचा काही अधिकृत कार्यक्रम असो प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री असूनही एकनाथ शिंदे क्वचितच त्या कार्यक्रमाला उपस्थित राहात होते. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागण्यामागचे कारण देखील शिंदे-सरनाईक यांच्यातील वितुष्ट असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. मग आता अचानक प्रताप सरनाईक यांचे मन परिवर्तन कसे झाले? प्रताप सरनाईक उद्धव ठाकरे यांच्याशी बंड करुन एकनाथ शिंदे गटात सामील कसे झाले? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून. शिंदे-सरनाईक यांच्या घनिष्ठ संबंधाचे कारण ईडीचा कारनामा तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे.

मिरा भाईंदर शहरात शिवसेनेत आपले किती वर्चस्व आहे हे दाखविण्यासाठीच आमदार प्रताप सरनाईक यांनी आजचा केविलवाणा खटाटोप केला असला तरी मात्र शिवसेनेचे सर्व नगरसेवक त्यांच्या सोबत असल्याचा त्यांनी केलेला दावा फोल ठरला असल्याचे सिद्ध झाले आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांचे सोबत गेलेल्या नगरसेवकांची नावे.-
1.राजू भोईर
2.कमलेश भोईर
3.धनेश पाटील
4.श्रीमती संध्या पाटील
5.अनंत शिर्के
6.इलायस बंड्या
7.हेलन बोर्जिस
8.सौ वंदना पाटील

आमदार प्रताप सरनाईक यांचे सोबत न गेलेल्या नगरसेवकांची नावे.-
1.सौ नीलम ढवण (गटनेत्या)
2.प्रवीण पाटील
3.जयंती पाटील
4.श्रीमती तारा घरत
5.सौ स्नेहा पांडे
6.सौ भावना भोईर
7.सौ अर्चना कदम
8.दिनेश नलावडे
9.सौ कटलीन परेरा
10.सौ शर्मिला बगाजी
11.सौ कुसुम गुप्ता

गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले गुरूंना अभिवादन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरू स्व.आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.

गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे आधी मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे आणि नंतर ठाण्यातील आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळ येथील समाधीचे दर्शन घेऊन वंदन करून दोघांना अभिवादन केले.

टेंभी नाक्यावरील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमामध्ये ही शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व.आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करीत नमन करून त्यांना अभिवादन केले. आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, रविंद्र फाटक, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींसह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्धी आणि प्रसार माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गुरूपौर्णिमेनिमित्त आज शिवसेना प्रमुख बाळासेहब ठाकरे आणि वंदनीय स्व.आनंद दिघे या त्यांच्या दोन्ही गुरुवऱ्यांना त्यांनी वंदन केले. या दोघांची शिकवण आचरणात आणून सामान्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी स्व.आनंद दिघे यांना वंदन करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी रांगा लावून मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्विकार केला व त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.