Home Blog Page 152

वसई दरड दुर्घटना: मृतांना प्रत्येकी ६ लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत.

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी २ लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी ६ लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात वीजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात २०१८ मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह  येथे  झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज कुमार सौनिक, अपर मुख्य सचिव नियोजन नितिन गद्रे, नगर विकास-२ विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, कृषी विभागाचे  सचिव एकनाथ डवले. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक संजय खंदारे, मेडाचे महासंचालक रवींद्र जगताप, तसेच  विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा थकित कृषिपंपाचा मार्च २०२२ पर्यंतचा अनुशेष दूर करण्यात यावा आणि कृषिपंपाचा अनुशेष दूर करताना सौरऊर्जेला प्राधान्य देत, मार्च २०२२ पर्यंतचे संपूर्ण उद्दिष्ट पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करावेत, यासाठी केंद्र सरकारची ‘कुसुम’ योजना आणि शासनाची योजना अशा दोन्ही योजनांचा वापर करीत अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत विकेंद्रित सौर निर्मितीतून ४५०० मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेत आहे. अशा प्रकल्पांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि गतीने ही योजना कार्यान्वित करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. याशिवाय उपसा सिंचन योजनासुद्धा सौर उर्जेवर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, तसेच किमान ३० टक्के फिडर यावर्षी सौर उर्जेवर जातील, या दृष्टीने तात्काळ नियोजन करण्यात यावे आणि त्यादृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. खासगीसोबतच महावितरणनेसुद्धा स्वनिर्मितीचे जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करावे, असेही श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने उद्धव ठाकरेंवर शरद पवार नाराज..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रातील सत्तेत नुकताच मोठा फेरबदल झालेला पाहायला मिळाला. शिवसेनेमध्ये आमदारांनी बंडखोरी केली. परिणामी, आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. महाविकासवआघाडी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिंदे गटाने भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. मात्र, आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदार देखील बंड करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या खासदारांनी बंड करू नये यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. मात्र, आता काँग्रेससह राष्ट्रवादीनेही उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता जवळ आली असून या पदासाठी द्रोपदी मुर्मू या एनडीएच्या उमेदवार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी एनडीएला पाठिंबा जाहीर केल्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र समोर आलं आहे. शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे, सर्व खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. अखेरीस खासदारांच्या दबावापुढे उद्धव ठाकरेंना हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद पेटला असल्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीने यावर नाराज व्यक्त केली आहे. भाजपच्या उमेदवारला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँगेस पक्षात देखील नाराजीचा सूर आहे. यूपीएच्या यशवंत सिन्हा यांना सेनेने पाठिंबा न दिल्याने महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे.

 

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवाजी पार्क, दादर येथील स्मृतीस्थळावर दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले की, सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बोलतो आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत.पण दुर्देवाने तशी वेळ आल्यास त्या ठिकाणी तत्काळ आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पोहचतील असे प्रयत्न आहेत. आतापर्यंत ज्यांना स्थलांतरित केले आहे, त्यांना जेवण तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.’

 

कारचालकाने ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलीसाला फरफटत नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली स्टेशन जवळील एस.के.पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे (वय ४४) हे आपले कर्तव्य बजावत असतानाच यांना एका चारचाकी गाडीने धडक देत फरफटत नेल्याची घटना बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास डोंबिवलीत घडली आहे. गाडीला काळ्या काचा आणि मोठ्याने डेक लावला असल्याने हवालदार होरे यांनी गाडी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा दिला असता त्याने गाडी न थांबवता होरे यांच्या अंगावर घातली. होरे यांनी गाडीचे बोनेट पकडले असता चालकाने त्यांना फरफटवत गाडी चिपळूणकर रोड मार्गे बालभवन पर्यंत पळवत नेली. तेथे होरे यांना गाडीवरून खाली पाडत चालकाने पुन्हा मागे गाडी वळवून तेथून पळ काढला.

दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून यादरम्यान कारचालकाने एका रिक्षाचालकास देखील धडक दिली असून रिक्षाचालक देखील जखमी झाला आहे. यात होरे यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडी चालकावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे व पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.