Home Blog Page 156

सीबीआय च्या १० ठिकाणी धाडी; माजी पोलीस आयुक्त संजय पांडे अडचणीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना आता एक मोठी बातमी आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयने १० ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. बेकायदा कृत्य केल्याचा संजय पांडे यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे सीबीआय कडून १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. संजय पांडेसह एनएसई माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण विरूद्ध कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

नॅशनल स्टॅाक एक्स्चेंजच्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी संजय पांडे यांना ईडीने समन्स जारी केला होता.
ईडीच्या समन्सनंतर दि. ५ रोजी चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आता सीबीआय कडून १० ठिकाणी धा़डी टाकल्या आहेत. त्यामुळे संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कोण आहेत संजय पांडे ?

संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती.

 

पी.टी उषा, इलयाराजा यांच्यासह एकूण ४ नामवंताची राज्यसभेसाठी नामनियुक्ती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची निवड राष्ट्रपती द्वारा राज्यसभेवर केली जाते. नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे पार पडली त्यावेळी चार नामवंत व्यक्तींची नावे सुचविण्यात आली होती. प्रसिद्ध धावपटू पी.टी उषा, संगितकार इलयाराजा, के.व्ही विजयेंद्र व विरेंद्र हेगडे यांचा नामनियुक्त व्यक्तींमध्ये समावेश आहे.

नामनियुक्त चारही व्यक्ती दक्षिण भारतीय असून पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. के.व्ही विजयेंद्र हे प्रसिद्ध पटकथाकार आहेत, तर इलयाराजा दक्षिण भारतीय संगित क्षेत्रातील दिग्गज संगितकार आहे. लवकरच या चारही नामवंताची राज्यसभेवर वर्णी लागणार असून नवीन राष्ट्रपती निवडीनंतर त्यांना राज्यसभेचे खासदार पद देण्यात येईल असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

अपघातातील वारकऱ्यांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये देणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या महाराष्ट्रातील वारकरी पंढरपूरकडे पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. हजारोंच्या संख्येने भाविकांच्या दिंड्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी मिरज-पंढरपूर मार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यात केरेवाडी या ठिकाणी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीला अपघात झाला होता. भरधाव जिप गाडी दिंडीमध्ये घुसल्याने १७ वारकरी गंभीर जखमी झाले होते.

या सर्वांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सध्या हे सर्व वारकरी या ठिकाणी उपचार घेत आहेत. या जखमी वारकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली. महत्वाचं म्हणजे, त्याआधी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाशी देखील संपर्क केला होता.

या दुर्घटनेत एकूण १९ वारकरी जखमी झाले होते त्यापैकी ३ जणांना घरी सोडण्यात आले आहे, तर उरलेल्या १४ लोकांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात फोन करून जखमींना योग्य उपचार करण्याचे आदेश दिले होते. या रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसतील, मात्र गरज पडली तर वारकर्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, त्यांच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो अशा शब्दात त्यांनी डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या.

जखमी वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात येतील अशा सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. स्वतः मुख्यमंत्री जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आलेले पाहून बंडखोर आमदार अनिल बाबर वारकऱ्यांच्या भेटीला धावले आहेत. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात अनिल बाबर यांनी वारकऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जखमी वारकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आमदार बाबर यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडून जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी २५ हजारांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, खानापूरचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर आणि सांगली शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अधिकारी रुग्णालयात उपस्थित होते. यावेळी जखमी झालेल्या १७ वारकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार अनिल बाबर यांनी यावेळी केली.

 

रस्त्यांवरील खड्डे ताबडतोब शास्त्रोक्त पद्धतीने बुजविण्याची राष्ट्रवादीची मागणी! जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी दिला आंदोलनाचा इशारा!

मिरा भाईंदर: पावसाळा सुरू होताच मिरा-भाईंदर शहरामध्ये रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसून येत असून त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. या वर्षी जून महिन्याच्या अखेरीस नुकताच पावसाळा सुरु झाला असताना मिरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याचे दिसत आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळेच निष्कृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्यात आल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे.

अशाच प्रकारे गेल्या मंगळवारी (5 जून) घोडबंदर रोड येथील काजुपाडा येथे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये एका 37 वर्षीय दुचाकीस्वार अचानक अडखळून पडला आणि त्याच्या अंगावरून मागून येणारी एसटी बस गेली त्यामुळे त्या दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्या घटनेमुळे मीरा-भाईंदर शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मीरा-भाईंदर शहराचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना लेखी पत्र देऊन मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे शास्त्रोक्त पद्धतीने ताबडतोब बुजविण्याची मागणी केली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने जर त्वरित कारवाई करून शहरातील सर्व खड्डे ताबडतोब बुजविले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोठे जन आंदोलन केले जाईल असा इशारा अरुण कदम यांनी दिला आहे.

मीरा-भाईंदर शहरामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण आणि नव्याने होत असलेले काँक्रिटचे रस्ते यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अनेकदा केलेले ऐकायला मिळतात. शहरातील अनेक ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचे रस्ते बनविले गेले असून त्याचा परिणाम असा होतो की काही दिवसातच त्या रस्त्यावर ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले जातात. पावसाळा सुरू झाला असला तरीही मिरा भाईंदर शहरात अनेक ठिकाणी काँक्रिट रस्त्यांचे, नाल्यांचे, गटरांचे काम चालू आहे. त्यासाठी ठेकेदारांनी रस्ते, नाले खोदून ठेवले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत.

पावसाळ्याच्या आगोदरच सर्व नाल्यांची सफाई केली जावी, शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती केली जावी, रस्त्यांची, नाल्यांची, गटारांची नवीन कामे केली जाऊ नये असे असताना भर पावसात देखील अनेक ठिकाणी काँक्रिट रस्त्यांचे, नाल्यांचे, गटारांची विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी ठेकेदारांनी रस्ते खोदून ठेवले आहेत. यावरून महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या कामकाजात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. तर ठेकेदारांच्या फायद्यासाठीच पावसाळ्यात देखील टेंडर काढली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

शहरातील अनेक ठिकाणी या खड्ड्यांमुळे पादचारी नागरीक किंवा दुचाकीस्वार घसरून पडून जखमी तर होतातच तर काही प्रसंगी मृत्यू देखील झाले आहेत. त्यामुळे मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणा सोबतच भ्रष्टाचाराचा करदात्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

घोडबंदर रोडवरील काजुपाडा येथे रस्त्यावरील खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराला मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन महानगरपालिकेस ताबडतोब रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. आणि जर प्रशासनाने तात्काळ कारवाई करून रस्ते दुरुस्ती केली नाही तर मोठे जन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

आता मिरा भाईंदर महानगर पालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कारवाई करते का? हे पाहावे लागेल. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांची दुरुस्ती सध्या तरी करणे शक्य नाही असेच दिसत आहे.

शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सहभागी; ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे महत्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेविरुद्ध बंड पुकारले. त्यानंतर शिवसेना आणि अपक्ष मिळून जवळपास ५० आमदार या बंडात सहभागी झाले, परिणामी राज्यातील महविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. शिंदे गट आणि भाजपने बहुमत सिद्ध करून राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र, राज्यातील या सत्तातरानंतर उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण, ठाण्यात शिवसेनेला आता मोठं खिंडार पडलेलं आहे.

नगरसेवकांमधील शिवसेनेतील मोठा गट शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातले शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे ठाणे महानगरपालिकेतील अर्धे नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत आहेत.

६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. माजी महापौर नरेश म्हस्केंसमवेत ६६ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी आपलं समर्थन शिंदे गटाला दिलं. विशेष म्हणजे, शिवसेनेचा एकही नगरसेवक आता ठाणे महानगरपालिकेत राहिलेला दिसत नाही.

ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा शब्द सर्वस्व मानला जातो. मुंबई प्रमाणेच ठाणे महानगर पालिकाही शिवसेनेसाठी तितकीच महत्त्वाची आहे. अशातच शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला ठाण्यात मोठं खिंडार पडलं आहे.