Home Blog Page 155

रिझर्व्ह बँकेने चार सहकारी बँकांना दणका देत त्यांच्यावर कठोर निर्बंधासह व्यवहारावर आणली बंदी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशातील प्रमुख बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे बँकिंग व्यवसायाच्या वित्तीय नियमन व नियंत्रणाची जबाबदारी असून बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर पर्यायाने कठोर कारवाईची कृती देखील रिझर्व्ह बँकेतर्फे वेळोवेळी करण्यात येते. आता देशांतील विविध चार सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने पुढील सहा महिन्यांकरिता कठोर कारवाई केली आहे सोबत या बँकांवर दंडही आकारण्यात आला आहे. येथे महत्वपूर्ण असे की या सर्व बँकांना दंड सक्तीने भरावा लागणार आहे.

साहेबराव देशमुख सहकारी बँक (मुंबई), शारदा महिला सहकारी बँक (तुमकूर, कर्नाटक), सांगली सहकारी बँक (मुंबई) व रामगढिया सहकारी बँक (नवी दिल्ली) अशी कारवाई करण्यात आलेल्या बँकेची नवे आहे. या सर्व बँकांची आर्थिक स्थिती अतिशय खालावली असून भविष्यात व्यवसायाच्या दृष्टीने दिवाळखोरी होण्याची शक्यता अधिक असल्याने रिझर्व्ह बँकेने निर्बंधाची कारवाई सदर बँकांवर केली आहे.

शुक्रवारी उशिरा कामकाज आटोपल्यानंतर सदर बँकांवर निर्बंध लादण्यात आले असून यानंतर पुढील सहा महिन्यापर्यंत या सर्व बँकांना ठेवी स्वीकारण्यास, कर्ज देण्यास, गुंतवणुकीकरिता मज्जाव घालण्यात आलेला आहे. येथे सर्वात वाईट बातमी खातेधारकांसाठी असून या निर्बंधामुळे त्यांना खात्यातून रक्कम काढण्यावरही बंधने असेल. सध्यस्थितीत या बँकांचे परवाने रद्द न करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे, परंतु भविष्यात दंड न भरल्यास कारवाई अधिक कठोर होऊ शकते व परवाने देखील रद्द होऊ शकतात असे प्रसिद्धी माध्यमांना कळवले आहे.

 

AJFC या राष्ट्रीय पत्रकार संघटनेची पत्रकार कार्यशाळा पनवेलमध्ये होणार!

पनवेल/प्रतिनिधी: एजेएफसी ही राष्ट्रीय पत्रकार संघटना गेली पंधरा वर्षे पत्रकारांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. यामुळे समाजातील चांगल्या-वाईट घटना समोर आणणे आणि सामान्य जनतेवर होणा-या अन्यायाला वृत्तपत्रात बातम्याच्या माध्यमातून प्रसिद्ध करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या क्षेत्रात काम करीत असताना अनेक ठिकाणी पत्रकारांवर हल्लेही होत असतात. अशा वेळी त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि पत्रकारितेत टिकून राहण्यासाठी पत्रकारांनी नेमके काय करावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक २३/७/२०२२ रोजी सकाळी दहा वाजता बी. एड. काॅलेज, एस.टी. स्टॅंड पनवेल येथे करण्यात आलेले आहे.

या कार्यशाळेसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेश शिर्के, रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील, संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यशाळेसाठी नवीमुंबई, मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विवीध वर्तमानपत्रातील पत्रकारांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन ajfc संघटनेचे केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विठ्ठलाची महापूजा करू शकणार नाही ? ऐनवेळी एक नवा खोळंबा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मागच्या बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेलया राजकीय नाट्याच्या पहिल्या अंकाला पूर्णविराम लागला असं म्हणता येईल. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला यंदाची विठ्ठल महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार हे स्पष्ट झालं. नुकतीच काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यामुळे शिंदे यांनाच शासकीय महापूजेचा मान मिळणार आहे. उद्या म्हणजे रविवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल.

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. मात्र, दुसरीकडे राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. निवडणूक आयोगाद्वारे परवानगी मिळाल्यासच मुख्यमंत्र्यांना पंढरपूर दौरा करता येणार आहे.

खरं तर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर नेमक्या कोणत्या कार्यक्रमांना निवडणूक आयोग परवानगी देईल, यावर मुख्यमंत्र्यांचा दौरा अवलंबून असेल. मात्र अशा प्रकारची वेळ पहिली नाही. मागील काही वर्षांपूर्वी कार्तिकी यात्रेला आचारसंहिता लागू झाली होती. त्यावेळेस तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांना शासकीय महापूजेस परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापूजेची परवानगी मिळेल अशी माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान, विश्रामगृह येथे ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी!’ याचा समारोप सोहळा होईल. एकादशीच्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम नियोजित आहे. तसंच सकाळी ११ वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास हजेरी लावणार आहेत.

 

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात सुरक्षेकरिता स्पेशल प्रोटोकॉल नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहन चालकांना मनःस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

याबाबत त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून त्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गिकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करून कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांना दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपी पेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्रथम प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतूक रोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याने गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्त्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत जर अडकून पडली तर रुग्णाच्या जीवाला नाहक धोका होऊ शकतो व तो दगावू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा उगाचंच त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यामागील भूमिका आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

 

अखेर संजय राऊत यांच्या विरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट जारी !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना धक्का देणारी महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे किरीट सोमय्या यांच्यातील वैर आता सर्वश्रुत आहे. दोघेही संधी मिळेल तसे एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळतात. अशातच, संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

यादरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचाही उल्लेख राऊतांनी केला होता. याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत शिवडी कोर्टाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.

मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात आपल्यावर वारंवार बिनबुडाचे आरोप केल्याची तक्रार शिवडी न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश देवूनही संजय राऊत हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरोधात आता कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी राऊत यांना मोठा झटका बसणार असल्याचा धमकीवजा इशारा दिला होता. अखेर कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्यामुळे आता राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. त्यापैकी १६ शौचालये बांधण्याचं कंत्राट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, या वॉरंटनंतर राऊत काय भूमिका घेतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.