Home Blog Page 161

आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार ; मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ ला जय महाराष्ट्र..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार हे आता स्पष्ट झाले आहे.

या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला आणि शिवसैनिकांना भावनिक साद घातली. परंतु एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निश्चित केले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ‘वर्षा’ सोडलं आणि मातोश्रीवर मुक्काम हलवला. यापुढे ठाकरे पुन्हा वर्षाची पायरी चढणार नाहीत अशीही चर्चाही रंगत आहे.

सोमवारपासून सुरू झालेल्या या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत, यावर चर्चा आणि विचार मंथन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ, नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

तर, दुसरीकडे गटनेतेपदी स्वतः एकनाथ शिंदे कायम राहत, विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून सुनिल प्रभू यांना हटवून त्यांच्या जागी भरत गोगावले यांची नेमणूक केल्याचे दोन ठराव पारित करून पक्ष प्रमुखांचे आदेश धुडकावले. तसेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीची राजकीय कोंडी झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळेच त्यांनी उशिरा रात्री वर्षा निवासस्थानातील मुक्काम मातोश्रीवर हलवला आणि मुख्यमंत्रीपदाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचे ठरवले.

 

‘हैप्पी स्ट्रीट’ या ओला सुका कचरा वर्गीकरण करण्याकरीता ठाकुर्लीतील ‘सृष्टी रेसिडेन्सी’ चा एक आकर्षक उपक्रम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज दि १९.०६.२०२२ रोजी मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखली ठाकुर्ली (पूर्व) येथील ९० फीट रोड या ठिकाणी ‘हैप्पी स्ट्रीट’ या उपक्रमाखाली सृष्टी रेसिडेन्सी ‘डी’ विंग ठाकुर्ली (पूर्व) या सोसायटी तर्फे “स्वच्छ ठाकुर्ली” या उपक्रमाखाली ९० फीट रोड स्वच्छ ठेवण्यासाठी तसेंच ओला कचरा व सुखा कचरा याचे वर्गीकरण व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वछ ठेवणे ही आपलीच जबाबदारी, अशा अशायचे पत्रक वाटून एक वेगळा उपक्रम राबवला आणी लोकांचे आकर्षणाचा विषय बनला.

सदर उपक्रमास मा.खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे, मा.पोलीस उपायुक्त कल्याण परिमंडळ – ३ चे श्री.सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुनील कुराडे, श्री प्रशांत मोरे सहायक पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली. या वेळी सृष्टी रेसिडेन्सी सोसायटी चे डॉ. भूषण पाटील यांनी जमलेल्या उपस्थित पत्रकारांना सदर माहिती दिली.

 

दोन वर्षानंतर सुरू झालेल्या मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांचा पाहिला दिवस गणवेश विना!

शाळेच्या पहिल्या दिवशी महापौर, आयुक्तांनी पुष्गुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत!

मिरा भाईंदर: कोरोनाच्या साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा बुधवार १५ जून रोजी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. मिरा भाईंदर शहरातील महानगर पालिकेच्या शाळेतील नव्या शैक्षणिक वर्षात पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांचे महापौर ज्योत्स्ना हसनाले व आयुक्त दिलीप ढोले यांनी महानगर पालिकेच्या इतर अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थतीत पुषपगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र या प्रसंगी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे पहिल्याच दिवशी शाळेत आलेले जवळपास सर्वच विद्यार्थी शाळेचा गणवेश आणि पायात चप्पल बूट न घालता आलेले दिसत होते.

या संदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितनुसार विद्यार्थ्यांच्या गणवेश, पादत्राणे, बॅग आणि इतर शालेय वस्तू मागविण्यासाठी गेल्या फेब्रुवारी महिन्यातच स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया करून विद्यार्थ्यांच्या गणवेश व शालेय वस्तू मागविण्याचा कार्यादेश संबंधित ठेकेदारास देणे अपेक्षित होते. परंतु तत्कालीन सहायक आयुक्त प्रियांका भोसले आणि उपायुक्त अजित मुठे या दोघांमधील हेव्यादाव्यामुळे निविदा प्रक्रियाच करण्यात आली नाही आणि त्यामुळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश आणि इतर शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आलेले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला ह्या कामाचा ठेका देण्याच्या चुरशिमुळे गणवेश व शालेय वस्तूंच्या कामाची निविदा काढण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे करदात्या नागरिकांच्या लेकिन पैशातून लाखों रुपये खर्च करून मौजमजेसाठी शहरातील सर्व पक्षाचे नगरसेवक, अधिकारी मेघालय सारख्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात परंतु त्याच ठिकाणी शहरातील विद्यार्थी मात्र गणवेश विना शाळेत जात आहेत ही बाब महानगर पालिका आयुक्त आणि शहरातील लोकप्रतिनिधींसाठी लाजिरवाणी असल्याचे बोलले जात आहे.

बुधवार १५ जून रोजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांनी भाईंदर पश्चिम येथील शाळेला व अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (शिक्षण) अजित मुठे यांनी काशिगाव शाळा क्रमांक ४ आणि ५ व नवघर येथील शाळा क्रमांक १३ या ठिकाणी भेट देऊन नव्या शैक्षणिक वर्षात पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. या प्रसंगी सभागृह नेता प्रशांत दळवी, सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग संजय दोंदे, मुख्याध्यापक, शिक्षक व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

दोन वर्षाच्या अंतराने अखेर मनपाच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी देखील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व शालेय वस्तूंचे वाटप झालेले नाही. आता येणाऱ्या काळात उशिराने का होईना विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

येणाऱ्या दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार.. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोजगाराच्या मुद्द्यावरून अनेकदा विरोधी पक्षांच्या टीकेला सामोरे जावं लागणाऱ्या मोदी सरकारने रोजगार देण्याची मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारचे विविध विभाग आणि मंत्रालयांमधली रिक्त पदं भरण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मिशन मोडमध्ये भरती मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार आपल्या विविध विभागांमध्ये पुढील दीड वर्षात १० लाख जणांची भरती करणार आहे. या संदर्भात ‘पीएमओ इंडिया’ या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करण्यात आलं आहे.

पीएमओ इंडियाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, की ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालयं आणि विभागांमधल्या मनुष्यबळाचा आढावा घेतला आहे. यासोबतच येत्या दीड वर्षात मिशन मोडमध्ये १० लाख जणांची भरती करण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत. भरती प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण व्हावी, असे पंतप्रधानांचे स्पष्ट आदेश असल्यानं सर्व विभागांना तातडीने कार्यवाही करावी लागणार आहे.

येत्या दीड वर्षात दहा लाख जणांना नोकऱ्या देण्याच्या पीएमओच्या घोषणेवर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, “या देशात लोकशाही पायदळी तुडवली गेली आहे. बेरोजगारीत ऐतिहासिक वाढ झाली आहे. पंतप्रधान किती दिवस ट्विटर ट्विटर करत राहणार? दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं होतं. ८ वर्षांत १६ कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या. आता ते सांगत आहेत, की २०२४ पर्यंत फक्त १० लाख नोकऱ्या दिल्या जातील. केवळ सरकारमध्ये ६० लाख पदं रिक्त आहेत, तर केंद्र सरकारमध्ये ३० लाख पदं रिक्त आहेत. किती काळ जुमलेबाजी करणार?”

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी गेल्या वर्षी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितलं होतं, की १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ८.७२ लाख पदं रिक्त होती. आता हा आकडा वाढला असेल. केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकूण ४० लाख ४ हजार पदं आहेत. त्यापैकी ३१ लाख ३२ हजार पदांवर सध्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असंही सिंह यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारच्या विभागांमध्ये गेल्या दोन वर्षांत फारशी भरती झालेली नाही. अशा परिस्थितीत पीएम मोदींची ही घोषणा तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आज (१४ जून) संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या खात्यांमधली रिक्त पदं भरण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. या वर्षी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यानंतर २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. हे पाहता केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.

 

सामाजिक संघटनांची आघाडी ही काळाची गरज: पुरोगामी संघटना स्नेहमेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ज्याप्रमाणे देशाच्या राजकारणात आजच्या घडीला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी राजकीय आघाडी शिवाय पर्याय राहिलेला नाही त्याचप्रमाणे देशातील धर्मांधतेच्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र येणे ही काळाची गरज झालेली आहे. या देशात सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी सर्व पुरोगामी, समविचारी संघटनांनी एकत्र येवून काम करण्याची अत्यावश्यकता निर्माण झालेली आहे, असे मत डॉ. हमीद दाभोलकर यांनी डोंबिवली येथे पुरोगामी विचारांच्या संघटनांच्या स्नेहमेळाव्यात बोलताना काढले.आपल्या निवृत्तीनंतरच्या काळात समाजातील सर्व पुरोगामी संघटनांची आघाडी उभी करण्यासाठी प्रा. प्रवीण देशमुख यांनी पुढाकार घ्यावा अशी इच्छा व्यक्त करीत त्यांनी प्रा. प्रवीण देशमुख यांना निवृत्ती निमित्त शुभेच्छा दिल्या.

प्रा. प्रवीण देशमुख हे व्हीजेटीआय या जगप्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयातून ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. या निवृत्त पूर्व सोहळ्याच्या निमित्ताने प्रा. प्रवीण देशमुख यांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक लाखाचा धनादेश डॉ. हमिद दाभोळकर यांच्या हस्ते सुपूर्द केला.

रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणी राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतील ठाकूर हॉल येथे विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून सतत कार्यरत असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा प्रवीण देशमुख यांच्या निवृत्ती पूर्व सोहळ्याच्या निमित्ताने पुरोगामी संघटनांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्यात राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी सदस्य डॉ.हमीद दाभोळकर, लोकभारती चे राज्य अध्यक्ष श्री अशोक बेलसरे हे प्रमुख वक्ते उपस्थित होते. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील ४० पेक्षा अधिक विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांनी प्रा. प्रवीण देशमुख यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देताना आपल्या अध्यक्षीय भाषणात राजकारणासह सामाजिक क्षेत्रात सुद्धा सर्वत्र कटुता निर्माण झालेली आहे ही खंत व्यक्त केली. सामाजिक क्षेत्रात पुरोगामी म्हणवणाऱ्या संघटनांमध्ये सुद्धा अंतर्गत दुहीचे बीज पाहायला मिळते आहे.

प्रा. प्रविण देशमुख हे टेक्स्टाईल इंजिनिअरिंग चे तज्ञ आहेत. ज्या प्रमाणे ते विविध रंगाच्या धाग्यांना एकत्रितपणे गुंफून सुंदर वस्त्र विणतात त्याचप्रमाणे आपल्या दीर्घ सामाजिक-राजकीय अनुभवाच्या जोरावर सामाजिक संघटना मधल्या कटुता दूर करून, सर्व पुरोगामी संघटनांना एकत्रित आणण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अनेक जुन्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या शिबिरांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये वाटचाल सुरू केली याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. राष्ट्र सेवा दल ते पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते उद्योजक आणि पुन्हा राष्ट्र सेवा दल असा त्यांचा प्रवास त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात उलगडून सांगितला.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटवून आणि त्यामागील विज्ञान उलगडून सांगून तसेच गायन विशारद शालिनी मेखा यांनी सादर केलेल्या ‘खरा तो एकचि धर्म’ या गाण्याने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर आकाश पवार आणि साथींनी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी ज्वलंत विषयांवरील अनेक गाणी दमदारपणे सादर केली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अशोक वानखेडे यांनी या स्नेह मेळाव्या मागची पार्श्वभूमी आपल्या प्रास्ताविकात मांडली.

सेवानिवृत्तीनिमित्त केवळ माझा सत्कार न करता या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सर्व पुरोगामी विचारांच्या, समविचारी संघटनांच्‍या साथींना एकत्र करण्याची संकल्पना प्रा. प्रवीण देशमुख यांनी सुचविली. समाजातील अनेक विषयांवर, अनेक संघटना आपापल्या परीने कार्य करीत असतात, परंतु त्यांचा एकमेकांशी संवादच नसतो. आपण जे काही करतो, ते आपलेच कार्य आहे इतर कोणी त्यामध्ये सहभागी होणार नाही किंवा होऊ नये अशा प्रकारची मानसिकता दृढ झालेली दिसते. त्यामुळे त्या संघटनांचे, संस्थांचे विचार समाजामध्ये तेवढ्या प्रभावीपणे पुढे जातांना दीसत नाही आणि ही विचार करायला चिंता करायला लावणारी ही बाब श्री.अशोक वानखडे यांनी आपल्या प्रास्ताविकात अधोरेखित केली.

‘मी म्हणजेच संघटना’ ही प्रवृत्ती संघटनेच्या वाढीला अडथळा ठरते आहे. एखादी सामाजिक समस्या म्हणजे केवळ माझीच समस्या आणि त्याला मीच सोडविणार हा अट्टाहासामुळेही सामाजिक संघटनांमधील अंतर्गत कटुता वाढीला लागलेली आहे..!
सर्वच संघटनांना थोडा-अधिक प्रमाणात या ‘मी’ पणाने ग्रासलेले आहे. या ‘मी’ पणा मुळेच चळवळ आणि विचार पुढे जात नाही आणि हे पुरोगामी विचारांच, विवेकाचं लक्षण नव्हे, यावर प्रत्येकाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे असं आम्हाला ठामपणे वाटतं म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन आहे, अशी भूमिका प्रा.प्रवीण देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना मांडली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विवेकशील विचारांनी मागील ३२ वर्ष कार्य करीत आहे तर राष्ट्र सेवा दल ८० पेक्षा जास्त वर्षांहून साने गुरुजींच्या ‘जगाला प्रेम अर्पावे’ या विचाराने कार्यरत आहे. एवढा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या दोन संस्थांनी समाजातील अनेक विखुरलेल्या संस्था आणि संघटनांना एकत्रित आणण्याचं दायित्व स्वीकारायलाच हवं असे ठाम मत प्रा.प्रवीण देशमुख यांनी बोलताना व्यक्त केलं. आणि याच भावनेतून या कार्यक्रमाची आखणी केली गेली. विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीं व पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. यामध्ये व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.डी पी. काकड उपाध्यक्ष गोपाळ धारपवार, प्राचार्य राम नेमाडे यांच्यासह, ख्रिश्चन असोसिएशन, साउथ इंडियन असोसिएशन, रोटरी क्लब, महिला मुक्ती संघटना, श्रमिक दल अश्या विविध क्षेत्रात, सामाजिक घटकात काम करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचाच याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला.

लोकसत्ता, लोकमत, स्थानिक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यासह अनेक पत्रकार मित्र, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री.रोहित सामंत, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिक्षण मंडळाचे सदस्य व ठाणे जिल्हा लायब्ररी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.रमेश दिनकर, माजी नगरसेवक आणि डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे कार्याध्यक्ष श्री.नंदू मालवणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष श्री.युवराज पवार, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री.शिवाजीराव मस्के, ‘कायद्याने वागा’ लोकचळवळीचे राज असरोंडकर यांच्यासह शिवसेना, मनसे या पक्षांचे अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. या स्नेहमेळावाच्या आयोजनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तसेच राष्ट्रसेवा दलाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, हा स्नेहमेळावा यशस्वी व्हावा याकरता प्रयत्न केले.

शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया!’ आणि साने गुरुजींच्या,’जगाला प्रेम अर्पूया!’ या विचारांना नमन करून या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा.वृषाली विनायक यांनी अतिशय चोखपणे पार पडली तर राष्ट्र सेवा दलाच्या सौ.कल्पना शेंडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष श्री.अशोक वानखेडे, राष्ट्र सेवा दलाचे कल्याण-डोंबिवली जिल्हा मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश चिंचोले, सल्लागार मंडळ सदस्य डॉ. श्यामकांत जाधव, वंदना ताई शिंदे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी किरणताई जाधव, श्रीप्रसाद खुळे, राजू कोळी, जगदिश संदानशीव, यांच्यासह श्री.सचिन शिर्के, सौ.सुरेखा देशमुख, अक्षिता पाटील, छाया शिर्के, राजेंद्र कोळी, डी. जे. वाघमारे, बापू राऊत, नितीन सेठ, बबन सोनवणे, डॉक्टर नितीन जोशी, डॉ.दुष्यंत भादलीकर, सौ.संध्या देशमुख, श्री.नागले सर, साक्षी डोळस इत्यादी साथीनी परिश्रम घेतले.