Home Blog Page 162

खेलो इंडिया युवा क्रीडा खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला दोन्ही गटात सुवर्ण पदक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पंचकुला, हरयाणा, १३ जून, (क्री.प्र.) खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेअंतर्गत हरयाणा येथे संपन्न झालेल्या खो-खो स्पर्धेत शेवटच्या दिवशी अंतिम सामन्यात आज सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी कमालीचा खेळ करत सुवर्ण पदकाला गवसणी घालत महाराष्ट्राला पदक तालिकेत अव्वल ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावली आहे.

आज झालेल्या सकाळच्या सत्रात मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओरिसावर २१-२० (८-६, ७-९, व जादा डावात ६-५) असा अतिशय अटितटिच्या सामन्यात रोमहर्षक विजयाची नोंद केली. नाणेफेक जिकून ओरिसाने संरक्षण घेत महाराष्ट्राला आव्हान दिले. मात्र पहिल्या डावात त्यांचा होरा चुकवत महाराष्ट्राने घेतलेली २ गुणांची आघाडी सुखावणारी होती. मात्र या आनंदावर ओरिसाच्या खेळाडूंनी जोरदार आक्रमण करत बरोबरी साधली. त्यावेळी मात्र महाराष्ट्र खो-खो चे सर्वेसर्वा डॉ. चंद्रजीत जाधव यांनी प्रशिक्षकांपर्यंत कानमंत्र देत जोरदार लढत देण्याचा सल्ला दिला. पुन्हा एकदा गुणफलकावर सर्वांची नजर खिळून होती मात्र महाराष्ट्राला आक्रमणात फक्त ६ गुणांचीच कमाई करता आली. आता सारी दरोमदार संरक्षकांवरच होती. पहिली तुकडी ३:५० मि. गारद झाल्यावर मात्र प्रेक्षकांच्या तोंडचे पाणीच पळाले. जान्हवी पेठे व प्रीती काळे यांनी ओरिसाच्या मनसुब्यांना सुरुंग लावत विजयात मोठी कामगिरी बजावली. या सामन्यात महाराष्ट्राच्या कर्णधार जान्हवी पेठे (१:३५, २:२० मि. संरक्षण ), प्रीती काळे (१:४५,२:४० मि. संरक्षण व २ गुण), संपदा मोरे (१:३०,१:४० मि. संरक्षण व ६ गुण) व वृषाली भोये (४ गुण) यांनी विजयात सुवर्ण कामगिरीची नोंद केली. तर ओरिसाच्या अर्चना (२:१५ १:४५ मि. संरक्षण व २ गुण), स्मरणिका साहू (१:३०, २:१० मि. संरक्षण व ७ गुण) व अनन्या प्रधान (१:४५, १:३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी परभवातही जोरदार कामगिरीची नोंद केली.

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओरिसाचा १४-११ असा एक डाव ३ गुणांनी दणदणीत पराभव केला व सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या सामन्यात महाराष्ट्राच्या शुभम थोरात (२ मि. संरक्षण व २ गुण), नरेंद्र कातकडे (२ मि. संरक्षण व २ गुण), ऋषीकेश शिंदे (२ मि. संरक्षण) व रामजी कश्यप (१:५० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजयश्रीत दमदार कमगिरिची नोंद केली तर ओरिसाच्या टि.जगन्नाथ दास (१:१० संरक्षण व ६ गुण) व संजीतने दिलेली जोरदार लढत अपयशी ठरली.

 

महाराष्ट्र व ओरिसा हे दोन्ही खो-खो संघ अंतिम फेरीत; महाराष्ट्र विरुद्ध ओरिसा अंतिम फेरीत लढणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेअंतर्गत हरयाणा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी पश्‍चिम बंगालचा तर ओरिसाने पंजाबचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मुलांनी दिल्लीचा तर ओरिसाने पश्‍चिम बंगालचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी प. बंगालचा ९-८ (९-३) असा एक डाव १ गुणाने पराभव केला. महाराष्ट्रने प्रथम आक्रमण करताना पश्‍चिम बंगालचे ९ खेळाडूंना बाद केले होते. त्यानंतर फॉलोऑन देऊनही पश्‍चिम बंगालला तेवढे खेळाडू बाद करता आले नाहीत. यामध्ये महाराष्ट्रातर्फे अश्‍विनी शिंदेने २:१ मि. संरक्षण केले, प्रिती काळेने २:२० मि. पळतीचा खेळ करत १ खेळाडू बाद केला. दिपाली राठोडने २:३० मि. नाबाद संरक्षणाचा खेळ केला. मयुरी पवारने २:३० मि., जान्हवी पेठेने १:४० मि. पळतीचा खेळ केला. संपदा मोरेने ३ खेळाडू बाद करताना १:३० मि. संरक्षणाचा खेळ केला. त्यामुळे महाराष्ट्रच्या मुलींनी सहज अंतिम फेरी गाठली. पश्‍चिम बंगालतर्फे इशिता विश्‍वास २:२० मि. संरक्षण करत १ खेळाडू बाद केला.

मुलींच्या दुसर्‍या उपांत्य सामन्यात ओरिसाने पंजाबचा ९-८ (९-३) असा १ डाव १ गुणाने विजय मिळवला. विजयी ओरिसातर्फे एम. कदंबिनीने १:५० मि. तर एम अर्चनाने १:५० मि. संरक्षण करत ३ खेळाडू बाद केले. पंजाब संघातर्फे गुरुवीर कौरने १:५० मि. आणि सनप्रित कौरने १:३० पळतीचा खेळ केला.

उपांत्य सामन्यात मुलांमध्ये महाराष्ट्राने दिल्लीचा १५-९ (१५-५) असा १ डाव ६ गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे आदित्य कुडाळेने २.३० मि. खेळ करत १ गडी, मिलिंद आर्यनने २.३० मि. नाबाद खेळी करत १ गडी तर ॠषिकेश शिंदेने २.१० मि. खेळ करत २ गडी बाद केले. सुफियान शेख आणि अक्षय तोगरेने प्रत्येकी ३ गडी बाद करत आक्रमणाची धुरा उत्तमरितीने सांभाळली. पराभूत दिल्लीतर्फे सत्यमने १.४० मि., अजय कुमारने १.३० मि. खेळ करत २ गडी बाद केले.

 

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा करण्यात येणार शाळेत प्रवेशोत्सव – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मागील दोन वर्षातील महाभयंकर कोरोना विषाणू संसर्ग काळाच्या कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होऊन कायम राखण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात १५ जून रोजी तर विदर्भात २७ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यानुसार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी यासंबंधीच्या परिपत्रकाद्वारे शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना सूचना दिल्या आहेत.

इयत्ता पहिली ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक अधिकाऱ्याने किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रबोधन करावे. फूल देऊन किंवा शालेय उपयोगी साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक राहील असे व्यवस्थापन करावे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील दोन वर्षांच्या काळात विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने शैक्षणिक अध्ययन कमाल पातळीपर्यंत असल्याचे स्पष्ट दिसून येत नाही. तसेच शाळांतील शैक्षणिक सोयीसुविधा अस्त-व्यस्त झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी आणि दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित असल्याने हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सहकार्य करावे. तसेच शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे, असेही याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेअंतर्गत हरयाणा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी बाद फेरीत प्रवेश मिळवत सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल कायम ठेवली आहे. अखेरच्या साखळी सामन्यात मुलींच्या संघाने पंजाबवर सहज मात केली तर महाराष्ट्रच्या मुलांच्या संघाला विजयासाठी पश्‍चिम बंगालने चांगलेच झुंजवले. महाराष्ट्राचे दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला.

हरयाणा येथे सुरु असलेल्या स्पर्धेत तिसर्‍या दिवशी सायंकाळच्या सत्रातील साखळी सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी पंजाब संघावर १०-८ (१०-४) एक डाव २ गुणांनी विजय मिळवला. प्रथम आक्रमण करणार्‍या महाराष्ट्र संघाने पंजाबचे १० गडी बाद केले, मात्र महाराष्ट्रच्या मुलींनी उत्कृष्ट संरक्षण केल्यामुळे पंजाब संघाला फक्त नऊ मिनीटात ४ गडी बाद करता आले. मध्यंतराला महाराष्ट्रकडे ६ गुणांची आघाडी होती. त्यामुळे पंजाबला फॉलोऑन देण्यात आले. दुसर्‍या आक्रमणातही उत्कृष्ट संरक्षणामुळे पंजाबला ४ गडीच बाद करता आल्यामुळे महाराष्ट्रचा विजय सोपा झाला. विजयी संघातर्फे अश्‍विनी शिंदेने २ मि. ३० से, नाबाद १ मि. ३५ से, खेळ केला. तर कौशल्या पवारने २ मि. १० से. खेळ करुन १ गडी बाद केला. त्यांना प्रिती काळेने ३ आणि वर्षाली भोयेने ४ गडी बाद करुन चांगली साथ दिली. पंजाबतर्फे दमनप्रित कौरने १ मि. ४० से तर रमणदिप कौरने १ मि. १० से खेळ करत १ गडी बाद केला. या विजयासह महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुलांमध्ये गटातील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राला विजयासाठी पश्‍चिम बंगालने झुंजवले. मध्यंतराला पश्‍चिम बंगालकडे दोन गुणांची आघाडी होती, मात्र नावलौकिकाला साजेसा खेळ करत महाराष्ट्रच्या मुलांनी मध्यंतरानंतर सामन्याचे चित्र पलटवले आणि १८-१५ (८-१०) असा विजय मिळवला. विजयी संघातर्फे रोहन कोरेने १ मि. ३० से, २ मि. संरक्षण केले तर, आकाश तोगरेने १ मि. ३० से. खेळ करतानाच ४ गडी बाद केले. रामजीने १ मि, संरक्षण करत २ गडी बाद केले, आदित्य कुडलेने १ मि. २० से, संरक्षण करत २ गडी बाद केले. सुफियान शेखने आक्रमणात ४ गडी बाद करुन महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत पश्‍चिम बंगालतर्फे अभिजित चौधरीने २ मि, संरक्षणाचा खेळ केला. त्याला सुमन बर्मनने १ मि. ३० से. खेळ करत ५ गडी बाद करुन आणि एसके अलीने १ मि. ३० सें, संरक्षण करतानाच २ गडी बाद करुन चांगली साथ दिली. मात्र विजय साकारता आला नाही.

सायंकाळच्या सत्रातील मुलींच्या सामन्यात ओडीसाने कर्नाटकाचा १ डाव ४ गुण राखून पराभव केला. तत्पुर्वी सकाळच्या सत्रातील सामन्यात मुलींमध्ये पश्‍चिम बंगालने राजस्थानचा १ डाव २ गुणांनी, हरयाणाने तामिळनाडू संघावर अत्यंत चुरशीच्या सामन्यात १ गुणांनी विजय मिळवला. मुलांमध्ये आंध्रप्रदेश संघाने छत्तीसगड संघावर १ गुण आणि साडेतीन मिनिटे राखून विजय मिळवला. तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या मुलांमधील तेलंगणा विरुध्द हरयाणा सामना बरोबरीत राहीला.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक, मतमोजणी रखडली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातून निवडून देण्याच्या सहा जागांसाठी आज २८८ पैकी २८५ आमदारांनी मतदान केले मात्र दोन्ही बाजूने घेतलेल्या हरकतींमुळे मतमोजणी आणि निकाल रात्री उशिरा पर्यंत लांबला होता.

सहा जागांसाठी सकाळपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान झाले. शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाल्याने आणि राष्ट्रवादीच्या नवाब मलिक तसेच अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने ही परवानगी नाकारल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. मात्र भाजपाच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन्ही आजारी आमदारांनी रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, शिवसेनेचे सुहास कांदे, भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष रवी राणा यांनी केलेल्या मतदानावर दोन्ही बाजूने आक्षेप घेतला गेला मात्र निवडणूक निर्णय अधिकऱ्यांनी तो फेटाळून लावला, तरीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली. तिथून निर्णय येण्याची प्रक्रिया रात्री उशीर होऊनही पूर्ण न झाल्याने याबाबतची मतमोजणी आणि निकाल दोन्हीही लांबले.

नियोजीत वेळापत्रक प्रमाणे सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती मात्र रात्री साडे नऊ वाजून गेले तरीही ती सूरु झाली नव्हती यावरून दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. या धामधूमित शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात कोण विजयी ठरतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.