Home Blog Page 168

परिचारिका दिनानिमित्त वोक्हार्ट रूग्णालया तर्फे परिचारिकांचा सोन्याची नाणी देऊन सत्कार!

मिरा भाईंदर: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून मिरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालया तर्फे परिचारिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ३५ ते ४० परिचारिका सहभागी झाल्या होत्या.

रूग्णांची सेवा करण्यासाठी परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असते. त्या रूग्णाच्या गरजा ओळखून त्यांच्या आरोग्याची पुरेपुर काळजी घेतात. वेळप्रसंगी रूग्णांना मानसिक आधार देण्याचं काम देखील या परिचारिका करताना दिसतात.

अशा या परिचारिकांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वॉक्हार्ट रूग्णालयाद्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक वर्ष रूग्णालयात अविरतपणे काम करत आपले कर्तव्य बजावणाऱ्या परिचारिकांना सोन्याची नाणी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारा आणि इंस्टाग्रामवर महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकणाऱ्यास विष्णुनगर पोलीसांनी केली अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नफा मिळवून देण्याचे बहाण्याने आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारा आणि इंस्टाग्रामवर महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकणाऱ्या अनिल पेदुरी आणि कुंजन शहा यांना विष्णुनगर पोलीसांनी अटक केली आहे.

मोबाईल नंबर वरून दोन वेग-वेगळ्या फिर्यादी अभिषेक कामत यांच्याशी संपर्क साधून त्यांना पैशाची गुंतवणूक करण्यास सांगून नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून रोबो टेंडरला रक्कम जमा करा असे सांगून फिर्यादीची ४,५०,००० रुपये फसवणूक केली असल्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोलीसांनी तपास करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे सुरत या ठिकाणाहून अनिल पेदूरी यास अटक केली गेली आहे.

तसेच कुंदन शहा याने फिर्यादी महिलेचे इंस्टाग्राम वर खोटे अकाऊंट तयार करून त्याद्वारे फिर्यादी महिलेच्या सासरच्या लोकांच्या मोबाईल नंबर वर आणि सदर इंस्टाग्राम वर फिर्यादी महिलेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करून फिर्यादीची बदनामी केली असल्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीसांनी तपास करून वडोदरा गुजरात या ठिकाणी सापळा रचून कुंदन शहा यास अटक केली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ परिमंडळ-३ कल्याण, सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी मोरे डोंबिवली विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुलदिप मोरे, पोना पवार, पोशि के.ए.भामरे यांनी केली आहे.

समाजसेवक व धडाडीचे कार्यकर्ते अमित बनसोडे यांची डोंबिवली शिवसेनेच्या उपशहर प्रमुखपदी नियुक्ती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जवळच दृष्टीपथात येऊन ठेपलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्षांनी आपापल्या पक्षाची मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यातच पक्षाच्या मोठ्या पदावर चांगल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागत आहे. तसे असतानाच सामाजिक कार्यकर्ता व ‘पोलीस वृत्तांत’ मासिकाचे संपादक श्री. अमित बनसोडे यांची नियुक्ती डोंबिवलीतील शिवसेना उपशहर प्रमुख पदी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख श्री.गोपाळ लांडगे यांनी डोंबिवली शहरप्रमुख श्री.राजेश मोरे, ‘पोलीस वृत्तांत’ मासिकाचे सल्लागार श्री. विजय अंबावकर यांच्या आणि श्री.अमित बनसोडे यांना त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले व त्यांच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये शेकडो झाडांची कत्तल करून स्वतःचा ‘विहंग’ विकास करणार आमदार प्रताप सरनाईक?

मिरा भाईंदर: शिवसेनेचे आणि पर्यायाने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे लाडके आमदार प्रताप सरनाईक येनकेन प्रकारेण कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत असतात. अशाच प्रकारे आता देखील आमदार प्रताप सरनाईक पुन्हा चर्चेत आले आहेत मात्र यावेळेस चर्चा आहे ती त्यांच्या आलिशान बंगल्याच्या प्रकल्पासाठी शेकडो झाडांच्या कत्तलीची.

मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील मौजे चेने, सर्वे क्र. 97, 98 या भूखंडावर आमदार प्रताप सरनाईक यांचा आलिशान बंगल्याचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. हा संपूर्ण परिसर ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन अंतर्गत येत असून हा परिसर ना-विकास क्षेत्रा मध्ये देखील समाविष्ट आहे. असे असून देखील मिरा भाईंदर महानगर पालिका द्वारे या भूखंडावर आलिशान बंगल्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी ज्या वादग्रस्त वास्तुविशारदाने बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव केला आहे तो ‘मे. अनिश असोशियेट्स’ हा राज्यात गाजलेल्या यूएलसी घोटाळा प्रकरणा सह अनेक प्रकल्पातील घोटाळ्याचा मुख्य आरोपी असून सद्ध्या तो जामिनावर सुटलेला आहे. ही सर्व माहिती असून सुद्धा आमदार प्रताप सरनाईक यांनी त्याला आपल्या ह्या बंगल्याच्या प्रकल्पासाठी वास्तू विशारद नेमला असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता त्यांनीच ह्या प्रकल्पात बाधा ठरणाऱ्या 96 झाडांच्या कत्तलीची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला असून महानगर पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने देखील तत्परता दाखवत शेकडो झांडाच्या कत्तलीसाठी हरकती सूचना मागविल्या असल्याचे उघड झाले आहे.

महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी देखील या नियमबाह्य प्रकल्पासाठी पायघड्या घातल्या असल्याचे दिसत असून या प्रकल्पासाठी उत्खननाची परवानगी देण्यात आली असून ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन असलेल्या या परिसरात आज ही दिवस रात्र हजारो ब्रास बेकायदेशररित्या मातीचा भराव केला जात आहे.

या भूखंडावर 200 पेक्षा जास्त झाडे असून त्यापैकी अनेक झाडे आधीच छाटण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने या वादग्रस्त प्रकल्पात आंबा, पिंपळ, करंज, जांभूळ सारखी महत्त्वाची 96 झाडे बाधित होत असल्याचे कारण सांगून ती तोडण्यासाठी नागरिकांच्या हरकती व सूचना मागिविल्या नंतर शेकडो नागरिकांनी लेखी व ईमेल द्वारे हरकती दाखल केल्या असून संबंधित सर्व विभागाकडे तक्रारी देखील दाखल केल्या आहेत.

भाजपचे कार्यकर्ते रणवीर बाजपेयी यांनी तर त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून या झाडांच्या कत्तलीच्या विरोधात समाज माध्यातून एक जनजागृती मोहीम सुरू केली आहे तर पत्रकार आणि पर्यावरण प्रेमी राजेश सिंह यांनी या प्रकल्पाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांचा हा वादग्रस्त बंगल्याचा हा प्रकल्प यापूर्वी देखील चर्चेत राहिला असून आदिवासी नागरिकांसाठी मंजूर झालेला रस्ता आपल्या ह्या प्रकल्पाकडे वळविला असल्याचे उघड झाले होते त्यामुळे महापालिका आयुक्त, नगर रचना विभागातील अधिकारी आणि महसूल विभागातील अधिकारी हे सर्व आमदारांच्या या प्रकल्पास नियमाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन सहकार्य करीत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत.

मिरा भाईंदर महानगर पालिकेकडून एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत असून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जात आहे. या अभियानाच्या जाहिरातीवर आता पर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला गेला आहे. तर दुर्दैवाने त्याच ठिकाणी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या कार्यकाळात मात्र शहरातील हजारों झाडांची कत्तल केली जात आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांची पर्यावरण रक्षणाचा भूमिका म्हणजे निव्वळ दिखावा असल्याचा आरोप शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देशात पर्यावरण प्रेमी म्हणून ओळखले जाते. देवेंद्र फडणवीस यांची सत्ता असताना त्यांनीच हजारों झाडांची कत्तल रोखण्यासाठी आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड उभरण्याला कडाडून विरोध करून महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर हा प्रकल्प इतर ठिकाणी स्थलांतरित करून आरेच्या जंगलाला ‘संरक्षित वन’ म्हणून घोषित केले आहे. मात्र आता त्यांच्याच पक्षाचे आमदार आपल्या खाजगी आलिशान बंगल्याच्या प्रकल्पासाठी ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये शेकडो झाडांची कत्तल करणार आहेत आता त्याला देखील विरोध करून हा प्रकल्प रद्द करण्याचे आदेश आपल्याच पक्षाच्या आमदारांना करतील का? आणि हा संपूर्ण परिसर ‘संरक्षित वन’ घोषित करतील का? असा सवाल सामान्य नागरिकांकडून केला जात आहे.

पॉलिश करायला दिलेले दागिने घेऊन पसार झालेल्या कारागीराच्या अखेर बाझारपेठ पोलीसांनी दोन वर्षांनी आवळल्या मुसक्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पॉलिश करण्यासाठी दिलेले २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन कारागीर पसार झाला होता. त्या कारागीराला कल्याणच्या बाजारपेठ पोलीसांनी दोन वर्षांनंतर अखेर अटक केली आहे. मिराजउद्दीन सीराजउद्दीन शेख (वय: ४२ वर्षे) असे त्याचे नाव असून तो मूळचा पश्चिम बंगाल राज्यामधील हुगळी जिल्ह्याच्या आरामबाग तालुक्यातील आमग्राम (पो. हरीनखोला) गावचा रहिवासी आहे.

बाजारपेठ पोलीसांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील संतोषी माता मंदिर रोडवरील चिखलेबागेतील गणेश नगरमध्ये राहणारे मुबारक तोहीब शेख (वय: ४५ वर्षे) यांचा सोन्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. २४ ते २५ नोव्हेंबर २०१९ दरम्यान कारागीर मिराजउद्दीन सीराजउद्दीन शेख याच्याकडे मालक मुबारक शेख यांनी २०० ग्रॅम वजनाचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होते. त्याची किंमत ६ लाख रुपये इतकी होती. मात्र, दागिने पॉलिश करून परत न करता हा कारागीर दागिन्यांसह पसार झाला.

पश्चिम बंगाल मधील मूळ गावातून आरोपी अटक..

मुबारक शेख यांनी अखेर ९ जानेवारी २०२० रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्यासह सपोनि. सुजित मुंढे, भोसले, इंगळे, चव्हाण यांना हा कारागीर पश्चिम बंगालमध्ये त्याच्या मूळ गावी लपला असल्याची खबर मिळाली. सपोनि. सुजित मुंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिराजउद्दीन शेख याला तो राहत असलेल्या आमग्राम (पो. हरीनखोला) या गावातून अटक केली.

आरोपीला पश्चिम बंगालमधून कल्याणला आणले..

त्यानंतर पोलीस कोठडीदरम्यान त्याने मालकाकडून लांबविलेल्या दागिन्यांपैकी उर्वरित सोने आई आजारी असल्याचे कारण सांगून पश्चिम बंगालमधल्या सोन्याच्या दुकानदारांना विकल्याचे कबूली दिली. मात्र, पोलीसांनी त्याच्याकडून १९८.३७० ग्रॅम वजनाचा ७ लाख ८९ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.