Home Blog Page 169

घरगुती वापराचा गॅस सिलेंडर महागला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर महागाईचा जो भडका उडाला आहे, तो अजूनही थांबलेला नाही. इंधन, दुध, भाजीपाला, घरगुती व व्यावसायिक गॅस अशा दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू महाग होत आहेत. ऑटो, बांधकाम सेक्टरमध्येही महागाईने आपला झटका दाखवला आहे. अशातच आता अजून एक मोठी बातमी समोर आलेली आहे ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचा खिसा कापला जाणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना महागाईचा जोरदार झटका बसला आहे.

१४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. आजपासून घरगुती सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर ९९९.५० रुपयांवर पोहोचले आहेत. १ मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता घरगुती सिलिंडरचे दर देखील वाढवण्यात आले आहेत.

दिल्लीत १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर १०२.५० रुपयांनी वाढून २३५५ रुपये प्रति सिलिंडर झाले. यापूर्वी १ एप्रिल रोजी कमर्शिअल सिलिंडरचे दर २६८.५० रुपयांनी वाढले होते. आरबीआयने महागाई वाढल्यामुळे काही दिवसांपूर्वीच अचानक मिटिंग घेत रेपो रेट वाढविले होते. यामुळे लोकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदर वाढणार आहेत. त्यातच आता गॅसच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढणार आहे.

 

राजद्रोहाचं राणा दाम्पत्यावर कलम लावणं चुकीचं; मुंबई सत्र न्यायालय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

हनुमान चालीसा प्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे. राणांना कालच जामीन मिळाला असून त्यावेळी न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे. राणांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं. पोलीसांनी नोटीस दिल्यानंतर ते घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे.

राणा दाम्पत्याला जामीन देताना न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिलेल्या निकालात न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई पोलीसांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राजद्रोहाचा थेट आरोप एखाद्यावर दाखल करणं चुकीचं आहे. कारण राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचं जे आंदोलन पुकारलं होतं, ते आंदोलन करू नये यासाठी मुंबई पोलीसांनी त्यांना नोटीस दिली होती. या नोटिसीनंतर राणा दाम्पत्याने आपलं आंदोलन मागे घेतलं असून ते दोघेही आपल्या खार इथल्या निवासस्थानातून बाहेर पडले नव्हते. त्यानंतर मुंबई पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर आणि चुकीची असल्याचा ठपका मुंबई सत्र न्यायालयाने ठेवला आहे.

 

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकास प्रकल्पांकडे नगरविकास खात्याचे दुर्लक्ष ; भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. रवींद्र चव्हाण यांचा आरोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी मंजूर केलेल्या विकास प्रकल्पांकडे नगरविकास खाते दुर्लक्ष करत आहे. या कारभाराविरोधात आपण पावसाळी अधिवेशनापूर्वी एमएमआरडीए कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले की, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोट्यवधींचा निधी जाहीर करण्यात आला. कल्याण -डोंबिवली क्षेत्रात सिमेंट रस्ते बांधण्यासाठी फडणवीस सरकारने १५० कोटींची तरतूद केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने विकासात राजकारण आणत रस्त्यांचे हे प्रकल्प रद्द केले.

सर्वाधिक वाहतूक कोंडीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण – शीळ हा रस्ता ६ पदरी करून या रस्त्यावर एलिव्हेटेड पद्धतीने मेट्रो सुरु करण्याची मागणीही आ. रवींद्र चव्हाण यांनी केली. ते म्हणाले की, नगरविकास विभाग कल्याण-डोंबिवली क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आपण यापूर्वीही अनेकदा आवाज उठवला होता. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासकावर नगरविकास विभागाचे नियंत्रण आहे. विकास प्रकल्पांबाबत प्रशासक आणि नगरविकास विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या सुस्ततेमुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर नगरविकास विभागाने या क्षेत्रातील विकास प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले आहे.

डोंबिवलीहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीत मोठी वाढ झाल्याने या मार्गावर मिनी मेट्रो सुरु करावी, मोठ्या टाऊनशिपमधील रहिवाशांना करात सवलत द्यावी अशा मागण्याही आ.रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केल्या.

 

आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ८ व्या महिला एशियन बीच च्या हँडबॉल स्पर्धेत भारतीय संघाला द्वितीय उपविजेतेपद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बँकॉक थायलंड येथे २५ ते ३० एप्रिल या दरम्यान झालेल्या ८ व्या महिला एशियन बीच हँडबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय महिला संघाने द्वितीय उपविजेतेपद पटकावले आहे. यात कल्याण ठाणे जिल्हा येथे राहणारी खेळाडू आणि भारतीय महिला संघाची कर्णधार रेखा अर्जुन कांबळे हिने द्वितीय उपविजेतेपदाची ट्रॉफी उंचावत कल्याणकरांचे नाव उंचावले आहे.

कोरोना काळात देशात प्रतिबंध आणि निर्बंध लादल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. यात आता प्रतिबंध आणि निर्बंध शिथिल केल्याने भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाण्याची संधी मिळाली या संधीचे सोने करत भारतीय महिला संघाने द्वितीय उपविजेतेपदाला गवसणी घातली.

टीम चे हेड कोच म्हणून राजस्थान राज्य क्रीडा परिषद चे हँडबॉल कोच श्री. प्रियदीप सिंह यांची निवड झाली होती. हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव डॉ. तेजराज सिंह यांनी टीम चे अभिनंदन केले तसेच कल्याण मध्ये येताच रेखा चे स्वागत करण्यात आले. इंडिया केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष श्री. अप्पा शिंदे, जिजाऊ क्रीडा मंडळ कल्याण येथील राजेश मानवडे तसेच रेखा यांचे पती मनोज जाधव आणि संपूर्ण कुटुंब यांनी तीचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.


भारतीय टीम:
रेखा अर्जून कांबळे (कॅपटन) महाराष्ट्र,
वैष्णवी जाधव, मानसी परब, नताशा भगवान साहनी,(महाराष्ट्र), सिध्दी कौशिक, तान्या सिंह (राजस्थान), बितिका रभा, शेफाली दास (पश्चिम बंगाल), सिमाबेन अश्विनभाई चौधरी (गुजरात), हेड कोच – प्रीयदिप सिंह (राजस्थान), कोच – इंथोनी गोमस (महाराष्ट्र), विष्णूवधन बोड्डू (तेलंगणा) यांनी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करून भारताच्या शिरपेचात एक तुरा खोवला म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

औरंगाबाद येथील सभेला पोलीसांनी घातलेल्या अटी आणि शर्थींचे उल्लंघन करून चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अखेर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला पोलीसांकडून अटी आणि शर्थींसह परवानगी देण्यात आली होती. त्यामुळेच या सभेवर पोलीसांची बारकाईने नजर होती. या सभेत राज ठाकरेंकडून नियम आणि अटींचं उल्लंघन केलं गेलं आहे का? या संदर्भात औरंगाबाद पोलीसांनी एक अहवाल तयार करून तो पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आला त्याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरेंवरील कारवाई बाबत चर्चा झाल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना मिळत आहे.

प्रसिद्धी माध्यमांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यात दुपारी एक बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. त्यानुसार आता औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात निश्चित कारवाई होण्याची शक्यता सूत्रांकडून मिळत आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी याच संदर्भात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या झालेल्या या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली.

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भात विचारले असता त्यांनी म्हटलं, औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. कारवाई करण्यास औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्षम आहेत. आवश्यक असल्यास औरंगाबाद पोलीस योग्य ती कारवाई करतील अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे. जर आवश्यक असेल तर जी काही कारवाई आवश्यक असेल ती आज संध्याकाळपर्यंत होईल असंही पोलीस महासंचालकांनी स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंवर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज ठाकरे यांच्यावर या कलमांतर्गत गुन्हा दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एफआयआरमध्ये राज ठाकरेंना आरोपी नंबर १ करत त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये औरंगाबाद येथील सभेमधील चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक कलमं लावण्यात आली आहेत.

अटींचं उल्लंघन

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधल्या सभेसाठी पोलीसांनी १६ अटी ठेवल्या होत्या. त्यातल्या काही अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमवली असा ठपकाही ठेवण्यात आला आहे.

लावण्यात आलेले कलम –

राज ठाकरे यांच्यावर कलम ११६, ११७, १५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ या कलमांतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कोणत्या कलमात कोणते गुन्हे ?

११६ – गुन्हा करण्यासाठी मदत करणे
११७ – गुन्ह्याला मदत करणे आणि चिथावणीखोर भाषण करणे
१३५ – अटि शर्थींचा भंग करणे
१५३ – दोन समूहात भांडण लावणे

सरकारचा पोलिसांवर दबाव ?

सरकारचा पोलीसांवर दबाव असल्याने राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. सभेसाठी मुद्दामच पाळता न येण्यासारख्या अटी लादल्या होत्या. उद्धव ठाकरे, पवारांच्या सभांना उपस्थितीची मर्यादा कधी लावली होती का ? असा सवालही देशपांडे यांनी केला आहे. गुन्हा दाखल होणार, हे आम्हाला माहिती होतंच, असंही पुढे ते म्हणाले.

मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई

मनसे पदाधिकाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई करायला सुरूवात केली आहे. मुंबईत सर्वात आधी भोंग्यावर हनुमान चालिसा वाजवणारे चांदीवलीचे मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना पोलीसांनी प्रतिबंधक खबरदारी म्हणून ताब्यात घेतलं आहे. तसंच त्यांच्या ऑफिसमधून पोलीसांनी भोंगेही जप्त केले आहेत.