Home Blog Page 170

मुंबई उच्च न्यायालयाने राज ठाकरे यांच्या सभे विरोधातील जनहित याचिका फेटाळली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे १ मे रोजी होणाऱ्या सभे विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली.

या सभेवर बंदी घालावी किंवा सभेचे थेट प्रक्षेपण न करता त्यांनी केलेले भाषण न्यायालय व पोलीसांनी तपासावे व नंतर त्याचे प्रक्षेपण करावे अशा मागणीची जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी दाखल केली होती.

काल दुपारी याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना १ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. पुढील ३ दिवसात दंडाची रक्कम भरण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

 

रेल्वे प्रवाश्यांना एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्के घट – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रेल्वे प्रवाश्यांना यंदाच्या उकाड्यात गारेगार प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर एसी लोकल रेल्वे मुंबई सीएसटीएम ते कसारा, कर्जत आणि चर्चगेट ते डहाणू व पनवेल या मार्गावर सुरु करण्यात आली. त्यातच या एसी गाड्यांच्या फेऱ्या कमी प्रमाणात असल्याने या गाड्याने प्रवास करण्याचे रेल्वे प्रवाश्यांकडून टाळले जात होते. तसेच या लोकलचे तिकिट दरही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर होते. त्यामुळे एसी लोकलच्या गाड्या अनेकदा विना प्रवाशीच धावत असल्याचे चित्र पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर एसी लोकल गाड्यांच्या प्रवासी तिकिट दरात थेट ५० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जाहीर केला.

पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा सर्व रेल्वे मार्गावर मिळून जवळपास ९० लाखापर्यंत लोक हे दररोज लोकलने प्रवास करतात. सीएसएमटी ते पनवेल-कसारा-कर्जत असा मध्य रेल्वेचा पसारा असून चर्चगेट ते डहाणू असा पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवेचा पसारा आहे. या दोन्ही मार्गावर एकुण २९०० लोकलच्या फेऱ्या दररोज होत असतात.

असं असतांना या मार्गांवर विविध ठिकाणी एसी लोकल (वातानुकूलित लोकल) च्या अत्यंत मर्यादीत फेऱ्या सुरु करण्यात आल्या. मात्र या एसी लोकलचे तिकीटाचे आणि दैनंदिन पासचे दर हे अव्वाच्या सव्वा असून सर्वसामान्यांच्या बजेटच्या पलीकडे असल्याने या एसी लोकलकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यातच काही एसी लोकलच्या फेऱ्या या ऐन गर्दीच्या वेळी सुरु केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कारण एक लोकल कमी करत ही एसी लोकल आल्याने, यामधून फार कमी प्रवासी प्रवास करत असल्याने या लोकलच्या मागे-पुढे असलेल्या लोकलमधील गर्दी वाढलेली बघायला मिळाली. त्यामुळे या एसी लोकल बंद करण्याची मागणी प्रवाशांकडून व्हायला लागली होती.

आज भायखळा इथे झालेल्या रेल्वेच्या एका कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राबसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या तिकीटाचे दर हे ५० टक्क्यांनी कमी करत असल्याचे जाहीर केले. यामुळे सीएसएसटी ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या एसी लोकलमधील प्रवासाला एका तिकीटासाठी १३० रुपये मोजावे लागाचे ते आता ९० रुपये आकारले जाणार आहे. तर चर्चेगेट ते वसई रोड या ५२ किलोमीटरच्या प्रवासाला २१० रुपये द्यावे लागायचे ते आता १०५ रुपये द्यावे लागणार आहेत.

असे असतील सुधारीत दर

किमी         सध्याचे दर      सुधारीत दर
 ०५                  ६५                  ३०
 २५                १३५                  ६५
 ५०                २०५                 १००
१००                २९०                 १४५
१३०                ३७०                १८५

असं असंल तरी रेल्वे राज्यमंत्री यांनी तिकीटाचे दर हे ५० टक्क्यांनी कमी केले आहेत, याची अंमलबजावणी कधीपासून केली जाणार हे मात्र स्पष्ट केलेले नाही. मात्र कार्यक्रमानंतर प्रसिद्धी व प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, आज मी घोषणा केली आहे. लवकरच दिल्लीला जाणार असून त्यानंतर यासंदर्भातील नोटीफिकेशन काढण्यात येईल. नोटीफिकेशन काढलेल्या दिवसापासून मग ५० टक्के म्हणजेच अर्ध्या तिकिट दरात एसी लोकलने प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

अनेक वर्षांपासून रखडलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्यामुळे “कहीं खुशी, कहीं गम” सारखी अवस्था!

मिरा भाईंदर: तब्बल अठरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिरा भाईंदर महापालिकेच्या दहा कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्याच बरोबर अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे, दिलीप रणवरे, धनंजय कनोजे यांना देखील अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे मात्र आणखीन चार अभियंत्यांना पदोन्नती पासुन वंचित राहावे लागले आहे. इतर सहा अभियंत्यांचे न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असून त्यांची विभागीय चौकशी देखील सुरू असल्यामुळेच त्यांना पदोन्नती देण्यात आलेली नसल्याचे बोलले जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महानगर पालिकेने सेवा ज्येष्ठता यादीच अद्ययावत केली नसल्यामुळे अनेक अधिकारी कर्मचऱ्यांची पदोन्नती रखडलेली होती. मिरा भाईंदर महानगर पालिकेचे एकूण १६ कनिष्ठ अभियंते २००४ सालापासून राज्य शासनाकडून कायम स्वरूपी विविध विभागात कार्यरत असताना सेवा प्रवेश नियमानुसार ३ वर्षानंतर त्यांना शाखा अभियंता पदावर वाढीव वेतनश्रेणी देऊन पदोन्नती देणे आवश्यक होते. परंतु २०१४ साली मिरा भाईंदर महानगर पालिकेचे सेवा प्रवेश राज्य शासनाने मंजूर केल्यामुळे त्या सेवा प्रवेश नियमानुसार त्यांना सेवेत रुजू झाल्यानंतर सर्व कनिष्ठ अभियंत्यांना ८ वर्षांनंतर उपअभियंता पदावर पदोन्नती देण्याची तरतूद करण्यात आलेली होती.

पात्र ठरत असलेल्या अभियंत्यांची संख्या जास्त आणि मंजूर पदांची संख्या कमी असल्यामुळे नेमकी पदोन्नती कुणाला द्यायची? हा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यामुळे सर्वच १६ कनिष्ठ अभियंत्यांना महापालिका पदोन्नती देण्याचे टाळत होती. या प्रश्नावर आयुक्त दिलीप ढोले वेगळाच तोडगा काढला असून १० पात्र अभियंत्यांना उप अभियंता पदावर पदोन्नती न देता शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या नियमानुसार महापालिका आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंत्यांना दर तीन वर्षांनी उपअभियंता पदावर पदोन्नती देण्याची तरतूद आहे. याच धर्तीवर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग व ग्राम विकास विभागाच्या सर्व जिल्हा परिषदामध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांना तात्काळ पदोन्नती देण्यात आलेली होती. मात्र याला मिरा भाईंदर महानगरपालिका मात्र अपवाद ठरलेली आहे. महापालिका आस्थापनेवरील काही अभियंत्यांचे ४५ वर्ष वय पूर्ण झालेले असून त्यांना उप अभियंता पदावर पदोन्नती न देता महापालिकेच्या शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आलेली असल्यामुळे एका अर्थाने त्यांच्यावर अन्यायच झाला असल्याचे बोलले जात आहे.

मंगळवार २६ एप्रिल रोजी महापौर दालनात मिरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले व महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या हस्ते १० कनिष्ठ अभियंता व तीन अग्निशमन अधिकाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश देण्यात आले.

ज्या १० कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती दिली आहे. त्यामध्ये शिरिषकुमार पवार, प्रांजल कदम, सतीश तांडेल, राजेंद्र पांगळ, अरविंद पाटील, भुपेश काकडे, उत्तम रणदिवे, उमेश अवचर, सचिन पाटील आणि यतीन जाधव यांची नावे आहेत. त्याच प्रमाणे अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे, दिलीप रणवरे, धनंजय कनोजे यांना अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली.

यावेळी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, पालिका आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त मारुती गायकवाड यांच्यासह शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी दिपक खांबीत इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला पकडुन बाजारपेठ पोलीसांनी केले गजाआड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मिळालेल्या माहितीनुसार कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा व आपले शोक पूर्ण करण्याचा उद्देशाने मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जावेद हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यासाठी गांधी चौक येथे येणार असल्याची खबर पोलीस नाईक बाविस्कर व पोलीस नाईक राज सांगळे यांना मिळाली होती त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वपोनि श्री.नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली बाजारपेठ डिटेक्शन ब्रांच चे सपोनि. अरुण घोलप, पोहवा पावशे, शिवा जातक, पोना. सचिन साळवी, बाविस्कर, सांगळे यांनी आरोपी जावेद अस्मात डोन (वय: ३५ वर्षे) राहणार डॉन हाऊस पारसी गल्ली, कल्याण याला सापळा रचून शिताफीने पकडुन त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण ४०,०००/- रुपये किंमतीची ऍक्सेस मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी वपोनि. नरेंद्र पाटील, पोनि. राजेंद्र अहिरे (गुन्हे) सपोनि. अरुण घोलप, पोहवा. पावशे, पोहवा. शिवा जातक, पोना. सचिन साळवी, पोना. परमेश्वर बाविस्कर, पोना. राज सांगळे यांनी केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशन चे गुन्हे डिटेक्शन अधिकारी करीत आहे.

 

नवरा बायकोच्या घरगुती भांडणात मद्यधुंद अवस्थेत असलेला दारुड्या नवऱ्याने पोलीसाच्याच कानशिलात लगावली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवरा बायकोच्या घरगुती भांडणात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नवऱ्याने पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत पोलीसाच्या कानशिलात लगावल्याची घटना आज कोनगाव पोलीस स्टेशन मध्ये घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नवऱ्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेला नवरा दरवाज्यावर लाथा मारत असल्याची पोलीसांना फोनवरून तक्रार आली. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्याने नवऱ्याला पोलीस ठाण्यात पकडून आणले असता, मद्यधुंद नवऱ्याने पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत पोलीसाच्या कानशिलात लगावल्याची घटना येथे घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नवऱ्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रितेश चिंदू चव्हाण (वय: ३४, रा. उल्हासनगर) असे अटक केलेल्या नवऱ्याचे नाव आहे.

नवऱ्याला घाबरून बायकोने केला होता पोलीस ठाण्यात फोन

नवरा रितेश हा उल्हासनगर मधील गजानननगर परिसात राहतो. नवरा बायकोमध्ये घरगुती वाद झाल्याने पत्नीने घटस्फोट मिळावा म्हणून न्यायालयात दावा केला होता. तेव्हापासून नवरा बायकोमध्ये वाद आधीच वाढल्याने आरोपीची बायको भिवंडी तालुक्यातील पिपंळघर येथील एका इमारतीमध्ये एकटी राहते. त्यातच बायको आपल्याला सोडून एकटी राहत असल्याचे पाहून रितेश उल्हासनगरहुन २४ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास ती राहत असलेल्या घरी आला. त्यावेळी बायकोने नवरा आल्याचे पाहून दरवाजा बंद केल्याने त्याने शिवीगाळ करत दरवाज्याला लाथा मारण्यास सुरुवात केली. या घटनेने घाबरून बायकोने कोनगाव पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस नाईक पांडुरंग वणवे हे घटनास्थळी येऊन मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नवऱ्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले.

पोलीस ठाण्यातील दालनातच मद्यपी नवऱ्याने घातला धिंगाणा

पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पवार यांच्या दालनात त्याला हजर करून पवार यांनी त्याच्याकडे नाव, पत्ता विचारला असता त्याने सांगण्यास नकार देऊन पोलीस ठाण्यातील दालनातच धिंगाणा घातला. हे पाहून पोलीस नाईक वणवे यांनी त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र आरोपी नवऱ्याला त्याचा राग येऊन खाकी वर्दीत असलेले पोलीस नाईक वणवे यांना शिवीगाळ व धमकी देत, त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे पोलीस ठाण्यात अधिकच गोधंळ उडाला होता.

मद्यपी नवऱ्याची रवानगी पोलीस कोठडीत

त्यानंतर पोलीसांनी नवऱ्याला ताब्यात घेऊन पोलीस नाईक वणवे यांच्या तक्रारीवरून विविध कलमांनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आज (२५ एप्रिल) आरोपी नवऱ्याला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील करत आहेत.