Home Blog Page 173

मध्य रेल्वेच्या दादर – माटुंगा दरम्यान दोन एक्सप्रेसची धडक ! उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मुंबई रेल प्रवासी संघाची मागणी.. 


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मध्य रेल्वेच्या दादर – माटुंगा स्टेशन दरम्यान उशिरा संध्याकाळी २१.४५ वाजता दोन एक्सप्रेसची धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रेन क्र. ११००५ चे ३ डबे रुळावरून घसरले. त्यामुळे कल्याण कडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातात सध्या तरी कोणाला ही दुखापत झाली नाही असे वर्तवले जात असून नवीन अपघात विरोधक प्रणाली “Anti Collision Technology”  का अपयशी ठरली ? व ह्या अपघातामागील दोषी व्यक्तींवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुंबईतील सगळ्यात मोठ्या आणि जुन्या प्रवासी संघटना यांनी केली आहे.

“मुंबईकरांचा” रेल्वे प्रवास सुरक्षित कधी होणार ?

माननीय राम नाईक यांनी केलेल्या प्रयत्नामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्र येऊन “मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन” ची निर्मिती केली. ह्या मागे मुंबईतील रेल्वे प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत, त्यासाठी लागणारी जमीन हस्तांतरण लवकर व्हावे , रेल्वे अपघात कमी करणे आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा ही कारणे होती. केंद्र सरकारने आक्रमक पणे सगळ्या प्रकारे सहकार्य केले, माननीय सुरेश प्रभू , पियुष गोयल यांनी सढळ हस्ते मुंबईसाठी आर्थिक निधी मंजूर केला. तरीपण मुंबईकरांचे हाल कमी होण्या ऐवजी वाढतच आहेत.

मुंबई बाहेरून येणाऱ्या अधिकारी यांना मुंबईच्या समस्ये विषयी काहिही माहिती नसते. त्यांची कुशलता लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस चालवण्यात असते. हेच कारण मुंबईच्या प्रवाश्यांच्या मुळावर आले आहे.
नवीन ५-६ ट्रॅक बांधला लोकल रेल्वे साठी आणि चालवत आहेत मेल आणि एक्सप्रेस ??

करोडो रुपये खर्च करून नवीन ५-६ वा ट्रॅक बांधण्यात आला, मुंबईकरांच्या लोकल वेळेत चालवल्या जाव्यात म्हणून, परंतु अत्यंत चुकीची निर्णय क्षमता असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करून जुने ३-४ ट्रॅक मेल आणि एक्सप्रेस साठी राखीव असूनही नवीन ट्रॅक वर मेल चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नवीन ट्रॅक पूर्ण होऊनही मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. सध्याचे रेल्वे अधिकारी किती अकार्यक्षमपणे काम करत आहेत ह्याची उदाहरणे रोजच होणाऱ्या अपघातामध्ये दिसत आहे.

नाय जमत तर चालते व्हा !

कोणताही मोठा अपघात होण्या अगोदर अनेक छोटे अपघात होतात, आजचा अपघात हा मुंबईकरांसाठी डोळे उघडणारा आहे. मोठा अपघात होण्या अगोदर माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि माननीय रेल्वे राज्य मंत्री राव साहेब दानवे साहेबांनी त्वरित अश्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी प्रवासी संघटनेचे मधू कोटीयन (अध्यक्ष) व सिद्धेश देसाई (जनरल सेक्रेटरी) हे करत आहेत.

 

पेट्रोल आणि डिझेलचा खर्च ५० टक्क्यांनी कमी होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा मुकाबला करण्यासाठी देशाला पर्यायी इंधन स्त्रोतांचा वापर करावा लागेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे म्हणणे आहे. तसेच मालवाहतूक जलमार्गांना चालना द्यावी लागेल कारण ते वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त असून अनेकांचे बजेट कोलमडले आहे.

डिझेलला मिथेनॉल हा पर्याय

एका कार्यक्रमात मंत्री गडकरी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन त्यांचे स्वस्त आणि सहज उपलब्ध पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे. डिझेलला मिथेनॉल हा पर्याय असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, ते डिझेलपेक्षाही स्वस्त आहे आणि डिझेल इंजिनला मिथेनॉलवर चालणाऱ्या इंजिनमध्ये रूपांतरित करण्याचे तंत्रज्ञानही उपलब्ध आहे त्यामुळे डिझेलला पर्याय निर्माण होऊ शकतो.

मिथेनॉलमुळे खर्च ५० टक्क्यांनी कमी

जलमार्गाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देताना ते म्हणाले की, यामुळे व्यापार वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. नितीन गडकरी यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना मिथेनॉलच्या वापराचा विचार करून जलमार्गातून अधिक मालवाहतूक करण्याचा पर्याय पाहण्याची सूचना केली. नितीन गडकरी म्हणाले की, मालवाहतुकीसाठी जलमार्गांचा अधिक वापर केला पाहिजे. रस्त्याने वाहतुकीचा खर्च १० रुपये असेल तर तो रेल्वेमार्गे ६ रुपये आहे. दुसरीकडे, जलमार्ग वापरल्यास हा खर्च केवळ १ रुपयापर्यंत खाली येतो. सध्या वाहतूक खर्च खूप जास्त आहे. ते कमी करणे आवश्यक आहे.

मिथेनॉलवर चालणारी सागरी इंजिने विकसित करू

केंद्रीय मंत्री म्हणाले की, मिथेनॉलच्या वापरामुळे इंधनाचा खर्च ५० टक्क्यांनी कमी होईल. मिथेनॉलवर चालणारी सागरी इंजिने विकसित करू शकतो आणि डिझेल इंजिन त्यात बदललं जाऊ शकतं. आसाममध्ये दररोज १०० टन मिथेनॉलचे उत्पादन होते. हे उत्पादन दररोज ५०० टनांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तंत्रज्ञानात बदल करून डिझेल इंजिनचे रूपांतर मिथेनॉल इंजिनमध्ये केले तर त्याचा फायदा आसामला होईल. डिझेल इंजिनांना मिथेनॉल इंजिनमध्ये रूपांतरित करण्याचे तंत्रज्ञान स्वीडिश कंपनीकडे आहे, असंही यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

 

तिकीट आरक्षण बुकिंगच्या नियमात भारतीय रेल्वेने बदल करत घेतला मोठा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

तिकीट आरक्षणाच्या बुकिंगबाबत भारतीय रेल्वेने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेचे तिकीट काढताना प्रवाशांची होत असलेल्या मोठ्या त्रासातून सुटका मिळाली आहे.

पत्ता भरणे होते आवश्यक

रेल्वेने अनेक दिवस गाड्या बंद ठेवल्या होत्या. यानंतर गाड्या परत सुरू करतानाही अनेक तरतुदी लागू ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वेने पुन्हा एकदा डब्यात प्रवाशांना उशी – ब्लँकेट परत देण्यास सुरुवात केली आहे. आता विविध गाड्यांमधील प्रवाशांना रात्री झोपण्यासाठी उशी आणि ब्लँकेट दिले जात आहेत, महामारीच्या काळात हे देखील बंद करण्यात आले होते. रेल्वे मंत्रालयाने डेस्टिनेशन बाबत आदेश जारी केला आहे. डेस्टिनेशनच्या ऍड्रेसने साथीच्या आजारादरम्यान कोविडच्या पॉझिटिव्ह केसेस शोधण्यात मदत केली. जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा त्याला रोखण्यासाठी अनेक निर्णय घेतले गेले. मग रेल्वेनेही अनेक निर्बंध लागू केले. हा देखील त्यापैकीच एक होता.

आता पत्ता भरावा लागणार नाही

प्रवाशांना यापुढे रेल्वे तिकीट काढताना त्यांना जिथे जायचे आहे त्या ठिकाणचा पत्ता आता भरावा लागणार नाही. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे, रेल्वे तिकीट बुक करताना आयआरसीटीसी (IRCTC) च्या वेबसाइट आणि ऍपवर डेस्टिनेशन पत्ता भरणे पूर्वी अनिवार्य करण्यात आले होते. ते भरल्याशिवाय तिकीट काढता येत नव्हते. त्यामुळे नागरिकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आता प्रवाशांना त्या त्रासातून दिलासा मिळणार आहे.

 

मुंबई व दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने डब्ल्यूएचओ ने दिला सतर्कतेचा इशारा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. व्हायरस अजूनही संपलेला नाही असं देखील डब्ल्यूएचओ (WHO) ने म्हटलं आहे. भारतात बुधवारी कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढवली आहे. मृत्यूदर जरी नियंत्रणात असले तरी देखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. डब्ल्यूएचओ ने म्हटलं की, कोरोना व्हायरसमुळे अजूनही जीविताचा धोका कायम आहे.

अमेरिकेत झपाट्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ

ओमायक्रॉन व्हायरसचा बीए.२ व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाच्या न्यूझीलंडमध्ये बुधवारी कोरोनाचे ९,४९५ नवे रुग्ण वाढले. ज्यापैकी १,८२८ रुग्ण हे ऑकलँडमध्ये आढळले आहेत. चीनमध्ये २९,३१७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघायमध्ये २५,००० हून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. या भागात लॉकडाऊन लागू आहे.

दिल्लीत मंगळवारी २०२ रुग्ण

कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी असल्याने चिंता नसली तरी देखील सतर्क राहण्य़ाची गरज आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे ७३ नवीन रुग्ण वाढले आहेत. १७ मार्चनंतर ही सर्वात मोठी वाढ आहे. ज्यामध्ये ६८ जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. राजधानी दिल्लीत बुधवारी मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ५० टक्के वाढ पाहायला मिळाली. पण मृतांमध्ये वाढ झालेली नाही. दिल्लीत मंगळवारी २०२ रुग्ण वाढले होते. तर बुधवारी २९९ रुग्ण वाढले आहेत. दिल्लीत ५०४ रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.

 

रोज होणार वीजपुरवठा खंडित; राज्यात भारनियमन अघोषित..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील नागपूर येथे अनेक भागांत दहा वर्षांनंतर प्रथमच अघोषित भारनियमन सुरू झाले आह़े. मागणीच्या तुलनेत तब्बल अडीच ते तीन हजार मेगावॉट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने उन्हाच्या चटक्याबरोबरच नागरिकांना वीज भारनियमनाच्या झळाही बसू लागल्या आहेत़.

मराठवाडा व प. महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत

मराठवाडय़ातील वीज मंडळाच्या औरंगाबाद, नांदेड व लातूर तीन परिक्षेत्रातील ५६६ फिडरवर सध्या सरासरी तीन तास भारनियमन होत आह़े नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक ३७१ फीडरवर सरासरी दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित होतो. औरंगाबाद शहरातील १६० फीडरवर सरासरी दोन तास वीजकपात केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चारही जिल्ह्यांत दोन-चार तासांपासून ते दहा-बारा तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत आहे. या अघोषित भारनियमनामुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागांतही जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावात तर ७२ तासांत अवघा दीड तास वीज उपलब्ध होती.

वीजगळती अधिक असलेल्या भागांत भारनियमन

वीजगळती अधिक असलेल्या भागांत सध्या भारनियमन सुरू आह़े त्याचा उत्तर महाराष्ट्रात मालेगावातील तीन लाख यंत्रमागांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील २४ हजार २०० पैकी १३०० फीडरवर (संचयक) सध्या अडीच ते तीन तासांचे भारनियमन सुरू आह़े त्यात महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारितील नागपुरातील २२१, कोकण विभागातील ४९०, पुणे विभागातील २३५ फिडरचा समावेश आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ आह़े शिवाय, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आह़े तसेच पुढे रमजान ईदही आहे. या सर्वाना भारनियमनाचा फटका बसण्याचे संकेत आहेत़. वीजेअभावी ग्रामीण भागांत पिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी सुद्धा येत आहेत.