Home Blog Page 177

देशात सातत्याने होत असलेली इंधन दरवाढ व महागाई विरोधात युवासेना प्रमुख मा.आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर केंद्र सरकार विरोधात थाळी बजाव आंदोलन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सातत्याने होत असलेली देशातील इंधन दरवाढ व महागाई विरोधात युवासेना प्रमुख मा.आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना सचिव मा. वरून सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर केंद्र सरकार विरोधात थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.

डोंबिवली युवासेने तर्फे बाजीप्रभू चौकात सदर आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात युवासेना, शिवसेना, युवतीसेना, महिला आघाडी पदाधिकारी व सहकारी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सर्वांनी थाळी वाजवून सामान्य नागरिकांचा आवाज केंद्र सरकार पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सदर आंदोलनात वाचा थंड बसा, पेट्रोल डिझेल १०० के पार.. हेच का अच्छे दिन मोदी सरकार ?, बहुत होगई महंगाई की मार.. होश मे आओ मोदी सरकार, ना नीती, ना मेल.. बस मेहंगा पेट्रोल डिझेल!, देश संभाले संता-बंता.. बेहाल होगई सारी जनता! अशा घोषणा देण्यात आल्या.

युवासेना जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, युवासेना डोंबिवली शहर अधिकारी सागर जेधे, युवासेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे, युवासेना उपजिल्हा अधिकारी आशु सिंह, युवासेना डोंबिवली विधानसभा अधिकारी सागर दुबे, नगरसेवक नितीन पाटील, प्रतिक राणे, युवतीसेना कल्याण लोकसभा अधिकारी लिना शिर्के, जिल्हा समन्वयक पुर्विका म्हात्रे, जिल्हा समन्वयक वैशाली मोंडकर,महिला आघाडी उपशहर संघटक शिल्पा मोरे व सर्व शिवसैनिक आदी उपस्थित होते.

 

कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने उपनिरीक्षक सुधाकर कदम या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जाहीर सत्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

विठ्ठलवाडी येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशन मधील गेले ३७ वर्ष पोलीस खात्यात अविरत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कदम हे दि.३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. बशीर शेख यांनी त्यांना त्यांच्या पोलीस खात्यातील उत्कृष्ट सेवा बजावल्या बद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मोठ्या दिमाखात त्यांचा जाहीररीत्या सत्कार केला.

त्यांच्या ३७ वर्षे पोलीस खात्याच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचे सहकारी उपनिरीक्षक पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बोचरे यांनी सुधाकर कदम यांच्या कार्याची स्तुति करत त्यांचे कौतुक केले व पोलीस स्टेशन च्या त्यांच्या इतर सहकार्‍यांनी कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांनी त्यांना पुढील निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.


पोलीस खात्यात भरती झाल्यापासून सुधाकर कदम यांनी मिळवलेली उपलब्धी व थोडक्यात कारकीर्द व ठळक वैशिष्ठ्ये :

• सुधाकर कदम यांची पोलीस भरती दिनांक १ / ११ / १९८५ रोजी झाली.
• ते एक उत्कृस्ट फुटबॉलपटू व फुटबॉल प्रशिक्षक आहेत.
• महाराष्ट्र पोलीस टिम मध्ये ते सलग ५ वर्ष फुटबॉल खेळले.
• सन १९९५ खंडणी विरोधी पथकात काम करुन मंचेकर टोळीचा व अरूण गवळी टोळीचा त्यांनी बिमोड केला.
• सन २००६ – २००७ मध्ये डोंबिवलीच्या ‘पेंढारकर कॉलेज’च्या मुला-मुलींना फुटबॉल चे मोफत प्रशिक्षण दिले.
• प्रथमच डोंबिवलीतील ‘महिलांची फुटबॉल टिम’ तयार करण्याचे भाग्य त्यांना प्राप्त झाले.
• त्यामधीलं १९ वयो गटातील ३ मुलींचे नॅशनल फुटबॉल टिम मध्ये निवड झाली.
• त्यानंतर आजतागायत डोंबिवलीतील गरीब होतकरू मुलांना एकत्र करून ‘ऑलफ्रेन्ड्स’ नांवाचा फुटबॉल क्लब मोफत सुरू केला व आजही कार्यरत आहे.
• सन २०१३ मध्ये विभागीय PSI परिक्षा पास होवून अंबिवली येथील मोहना सारख्या संवेदनशील ठिकाणी २ वर्ष इन्चार्ज म्हणूण काम करीत असतांना ४ वर्ष ठाणे भिवंडी कल्याण ईत्यादी पो.स्टे च्या मोका केस मध्ये फरारी असलेल्या अट्टल आरोपी गुलाम इराणी या कुख्यात गुंडास अटक केली व सध्या तो आजही आधारवाडी कारागृहात बंदीस्त आहे.
• पुर परिस्थिती उद्भवलेली असताना त्यांनी जनतेची नि:स्वार्थ सेवा केली.
• कोरोना सारख्या भीषण महामारीच्या कालावधीत सुद्धा रजा न उपभोगता अखंडीत सेवा बजावली
• मुंबई जेल कैदी पार्टी मध्ये मगरुर आरोपीने पोलीसावर थुंकून बिभत्स वर्तन केले ती क्लिप सोशल मीडिया वर वायरल झाली होती त्यावर गुन्हा दाखल करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता कारण कैदी पार्टीचे ते इंन्चार्ज होते.
• आजही शाळेतील मुलांनी त्यांना सेवा निवृत्ती नंतर फुटबॉल शिकविण्याची विनंती केली असून लवकरच मुलांच्या शालेय परिक्षा संपताच विजयनगर (कल्याण पूर्व) येथे मोफत फुटबॉल प्रशिक्षण ते सुरू करणार आहेत.

त्यांची लग्नानंतर ची थोडक्यात वैयक्तीक माहिती :

• त्यांनी त्यांच्या पत्नीस कल्याण येथील ‘बिर्ला कॉलेज’ मध्ये ऍडमिशन करून MA चे पदवियुत्तर शिक्षण दिले.
• त्यांना २ मुली असून त्यांची मोठी मुलगी BAMS वैध्यकीय पदवी घेऊन डॉक्टर झाली तर छोटी मुलगी MBBS पदवी करिता परदेशात शिक्षण घेत आहे.

 

सहा वर्षाच्या मुलीचा स्विमिंग पूल मध्ये पडून दुर्दैवी मृत्यू! या घटनेला जबाबदार कोण?

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर : भाईंदर पश्चिमेकडील उत्तन परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या पालकां सोबत पिकनिकसाठी गेलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकलीचा स्विमिंग पुलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी उत्तन सागरी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी ज्या बंगल्याच्या स्विमिंग पुलमध्ये मुलगी पडली तिथे जीव रक्षक तैनात न केल्या बद्दल त्या बंगल्याच्या मालकावर मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मिरा भाईंदर शहरातील भाईंदर पश्चिमे कडील उत्तन हा निसर्गरम्य परिसर असून त्याठिकाणी अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. अशाच प्रकारे शुक्रवारी आयसीसीआय बँकेत काम करणारे कुटुंब पिकनिकसाठी उत्तनच्या ऑन द रॉक्स या बंगल्यात थांबले होते.

सकाळी १०.३० च्या सुमारास मुलीचे आई वडील नास्ता करण्यासाठी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर गेले असता त्याच वेळी सहा वर्षाची चिमुकली आणि सहा वर्षाचा मुलगा हे दोघे खाली स्विमिंग पुल जवळ आले. त्याच वेळी सहा वर्षाची चिमुकली स्विमिंग पुल मध्ये पडली. तिच्या सोबत असलेल्या मुलाने आरडाओरडा केली असता पहिल्या मजल्यावर असलेल्या एका महिलेने पाहिले आणि तिने धावत खाली येऊन मुलीला स्विमिंग पूल मधून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले असता तिचा रुग्णालयात आणण्याच्या आधीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरानी सांगितले.

या प्रकारणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अशी माहिती उत्तन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लहांगी यांनी दिली.

मात्र सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ज्या वेळी उत्तन येथील अनेक बंगल्यावर नागरिक पर्यटनासाठी येत असतात त्यावेळी ज्या बंगल्यात स्विमिंग पुल आहेत त्या ठिकाणी जीव रक्षक म्हणजेच लाईफ गार्ड तैनात ठेवणे बंधनकारक असते. परंतु उत्तन परिसरातील अनेक बंगल्यात स्विमिंग पूल तर आहेत परंतु त्या स्विमिंग पुलावर लक्ष देण्यासाठी बंगल्याचे मालक पैसे वाचविण्यासाठी जीव रक्षक किंवा लाईफगार्ड तैनात करीत नाहीत. अनेक बंगल्यात आगी पासून सुरक्षा करणारी यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात देखील अश्या प्रकाराची दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याच बरोबर उत्तन परिसरात सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक अनधिकृत बांधकामे करून त्याचा वापर परस्पर खाजगी बंगले, हॉटेल, रिसॉर्ट भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय बेकायदेशररित्या केला जात आहे व त्यामुळे महापालिका प्रशासनाचा कोट्यवधींचा महसूल देखील बुडवला जात आहे. असे असून देखिल महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळेच महापालिके कडून या सर्व अनधिकृत बंगल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही असा आरोप केला जात आहे.

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या भाईंदर विभाग या कार्यक्षेत्र असलेल्या उत्तन परिसरात असलेल्या या अनधिकृत बंगल्यात वेश्यावसाय, रेव्ह पार्ट्या, जुगार असे अनेक प्रकारचे अनैतिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचे आरोप-तक्रारी अनेक वेळा केल्या असून देखील पोलीस प्रशासन मात्र याकडे ‘अर्थपूर्ण’ रित्या दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप केले जात आहेत.

गुढपाडव्याच्या पूर्व संध्येला एका कुटंबातील सहा वर्षाच्या चिमुकलीला आपला जीव गमावावा लागला आणि त्यामुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी कसून तपास करून संबंधित बंगल्याच्या मालकांवर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे जेणेकरून भविष्यात अश्या घटना पुन्हा घडू नयेत.

काशिमिरा ते घोडबंदर परिसरात अवैध वाहतुकीचा सुळसुळाट! युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली तक्रार!

मिरा भाईंदर: काशिमिरा ते घोडबंदर महामार्ग परिसरात अवैध वाहतूकीचा सुळसुळाट झाला असल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचा माफियाराज निर्माण झाला आहे.

गेली कित्येक वर्ष घोडबंदर वरसावे येथील फाऊंटन नाक्यावर मारुती इको गाड्यांच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. सदर बाबतीत स्थानिक घोडबंदर वासियांना रोजगार नाकारत, खानिवडे विरार चारोटी मनोर येथील, कल्पेश भोईर उर्फ कुमार भोईर नावाच्या व्यक्ती कडून दमदाटी केली जात आहे. त्यांच्या मार्फत शेकडो गाड्या वापी सुरतच्या दिशेने अवैध प्रवासी वाहतुकीसाठी दररोज चालवल्या जात आहेत.

या संदर्भात २०२० पासून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सातत्याने तक्रारी करून त्यांचा पाठपुरावा करीत असून, घोडबंदर येथील स्थानिक तरुणांना कायदेशीररीत्या प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करता यावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र कल्पेश भोईर व त्याचे साथीदार बाहेरून मिरा भाईंदर शहरात येऊन स्थानिक तरुणांना दमदाटी करून अनधिकृत रित्या सदर अवैध वाहतूक करीत असतात.

या बाबत युवक काँग्रेस तर्फे गेली दीड वर्षांपासून काशिमीरा येथील वाहतूक पोलीस विभागाशी पत्रव्यवहार केला असून यावर तोडगा काढण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे.

घोडबंदर मधील तरुण ज्यावेळी वाहतुकीच्या व्यवसाय करण्यास पुढे येतात तेव्हा कल्पेश भोईर व त्याच्या गटातील गाडी चालक गुंडांकडून घोडबंदरच्या तरुणांवर हायवेच्या एकांत जागेत गाड्या थांबवून मारहाण करणे, त्यांच्या गाड्यांची तोडफोड करणे व आता तर नाक्यावर येऊन ह्या गरीब तरुणांच्या आई बहिणींना सुद्धा धमक्या देणे असे प्रकार सातत्याने सुरू झाले आहेत.

गेल्या २८ मार्च रोजी सकाळी अशाच प्रकारची एक घटना घोडबंदर येथे राहुल जगळपुरे यांच्या सोबत घडली. कल्पेश भोईर याने फाऊंटन नाक्यावर येऊन त्यास धमकावले, त्याचे व त्याच्या आईचे पुढील महिन्याभरात कसे बरेवाईट करतो याबद्दल भरचौकात धमकी दिली.

या घडलेल्या प्रकारावर राहुल जगळपुरे यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर काशिमीरा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी घोडबंदर मधील तरुणांना पोलीस ठाण्यात बोलावून उलट राहुल याने गुन्हा दाखलच का केला? असा उलट सवाल केला गेला. यावरून वाहतूक पोलिस देखील अशा प्रकारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गुंडांना सहकार्य करीत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

घोडबंदर येथील वर्सोवा पुलाजवळ या अवैध वाहतुकीचा मुख्य नाका तयार झाला आहे. त्याच प्रमाणे मीरारोड पूर्वेकडील काशिमिरा नाका, दहिसर चेकनाका, मीरारोड येथील शिवार गार्डन, गोल्डन नेस्ट नाका या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याची दादागिरी खूपच वाढली असून त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या विषयाचे गांभीर्य ओळखून मिरा भाईंदर शहरातील युवक काँग्रेस शिष्टमंडळाने पोलीस उपयुक्त अमित काळे यांची भेट घेतली. पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी तातडीने वाहतूक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्याच बरोबर काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना संबंधित आरोपींवर चॅप्टर केस तातडीने दाखल करण्याचे देखील आदेश दिले. या विषयाला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे अशी भूमिका युवक काँग्रेस ने यावेळी घेतली. या शिष्टमंडळात, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रतिनिधी, दीप काकडे नवनियुक्त मिरा भाईंदर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश राणे, युवक ब्लॉकचे अध्यक्ष अश्फाक शेख व घोडबंदर गावातील तरुण व स्थानिक सहकारी सहभागी होते.

असे असले तरी घोडबंदर परिसरातील अवैध प्रवासी वाहतूक अद्याप ही थांबली नसल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गुंडांची दहशत वाढली असून त्यामुळे परिसरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

“घोडबंदर फाऊंटन नाक्यावरील अवैध प्रवासी वाहतूक आता माफिया राज स्वरूप धारण करीत आहे. घोडबंदर मधील तरुणांवर महामार्गावर होणारे हल्ले, आणि त्यांच्या आई बहीणीवर जर गावगुंडांची वाईट नजर पडणार असेल तर युवक काँग्रेस कदापि शांत बसणार नाही. आमचा मिरा भाईंदर पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. आयुक्त श्री सदानंद दाते यांनी सदर विषयात तातडीने लक्ष वेधून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत आहोत! – दीप काकडे (युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी)

यवतमाळ मध्ये शिवभोजन केंद्रातील धक्कादायक किळसवाणा प्रकार झाला उघडकीस ! शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी करत शौचालयात धुतली जाताहेत जेवणाची भांडी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

यवतमाळ मध्ये ग्रामीण भागातील गरीब नागरिक शहरात आल्यानंतर त्यांना उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी द्यावयास सुरू केले. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवभोजन थाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आले आहे. या केंद्रात ग्राहकांना दिली जाणारी शिवभोजन थाळी शौचालयातील पाण्याने धुतली जाते. यवतमाळ जिल्ह्यातील संबंधित शिवभोजन केंद्रावरील व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे.

शिवभोजन केंद्रातील किळसवाणा प्रकार सोशल मीडिया वर दाखवणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हे शिवभोजन थाळी केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीचे असल्याची माहिती मिळाली आहे. गरिबांना कमी दरात चांगले व पोषक जेवण मिळावे या हेतूने ठाकरे सरकारनं शिवभोजन थाळी सुरू केली. मात्र यवतमाळमधील प्रकार पाहता सरकारच्या हेतूलाच हरताळ फासला गेला आहे. अशाप्रकारे गलिच्छ जागेवर भांडी धुऊन त्याच थाळीत पुन्हा भोजन दिले जात असल्याने सरकार एक प्रकारे गरिबांची थट्टाच करत असल्याचे दिसून येत आहे. आता या शिवभोजन केंद्र चालकावर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.