Home Blog Page 178

ऍक्सीस बँकेचे एटीएम फोडताना मानपाडा पोलीसांनी सुशिक्षित चोराला रंगेहात पकडले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील मानपाडा पोलीसांच्या हद्दी मध्ये बंद असणाऱ्या एटीएम मशिनच्या गाळ्यातून ड्रीलमशीनचा आवाज येत असल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लागलीच सतर्कता बाळगून चोराला रंगेहात पकडले असून महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील एटीएम मशीन तांत्रीक पध्दतीने फोडुन गुन्हे केले असावेत असा संशय मानपाडा पोलीस व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे हा चोर उच्च शिक्षित असून तो सिस्को कंपनीत काम करत असल्याचे चौकशी दरम्यान सांगितले.

मध्य प्रदेश येथे राहणारा राहुल चोरडीया (वय ३५ वर्षे) यास अटक करण्यात आली असुन, त्याचेकडुन एटीएम फोडण्यासाठी लागणारे ₹ १४,३००/- चे साहित्य त्यात ड्रील मशीन, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पिन, एमसील अशा वस्तु मिळुन आलेल्या आहेत. शनिवारी रात्री दोन वाजता मानपाडा सर्कलचे ठिकाणी असलेल्या ऍक्सीस बँकेच्या एटीएमचे शटर हे बंद अवस्थेत होते. मात्र आतून कसला तरी आवाज येत असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. शटर ठोठावले असता आतून आवाज येणे बंद झाले. त्यामुळे पोलीसांचा संशय अधिक बळावला.

त्यानंतर पोलीसांनी हळूच शटर उघडल्या नंतर त्यानी पोलीसांना धक्का देऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी त्याची गचांडी गुंडाळत मुसक्या आवळल्या आहेत. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या काळया रंगाचे बॅगमध्ये एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहीत्य मिळुन आले, त्याने सदरचे साहित्य एटीएम मशीन तोडुन त्यातील पैसे चोरण्यासाठी जवळ बाळगले असल्याचा कबुली जबाब दिला. परंतु त्याचा चोरी करण्याचा सदरचा प्रयत्न गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलीसांच्या सतर्कपणामुळे अयशस्वी झाला आहे.

अधिक तपास उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

 

सावधान ! १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवायला दिल्यास त्यांच्या पालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई होणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

१८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवायला दिल्याने डोंबिवलीतील पालकांना थेट कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
डोंबिवलीत शहर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण विभागाकडून सतत कारवाई केली जात आहे. त्यातच आता १८ वर्षाखालील अल्पवयीन मुले सरार्सपणे वाहन चालवताना आढळून येत आहेत. त्यामुळे वाहतुक नियंत्रण विभागाच्या पोलिसांनी या मुलांच्या पालकांना संपर्क साधत थेट वाहतूक विभागाच्या कार्यालयात बोलवून घेत त्यांच्या पाल्याने केलेल्या वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच हजार ते दहा हजारापर्यंत दंड पालकांकडून आकारण्यात आला आहे.

तसेच त्याचवेळी त्यांचे समुपदेशन देखील केले जात आहे.आणि जे कोणी पालक आपल्या १८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यासाठी देत असतील तर त्यांना यापुढील कारवाईसाठी सामोरे जावे लागणार असल्याचे डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे. याच बरोबर अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नये आसे आवाहन देखील पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील शाळांमध्ये अनुचित घटना घडू नयेत यासाठी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसण्यासाठी शासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य संग्राम थोपटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य जयकुमार गोरे, देवयानी फरांदे यांनी भाग घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने ०७ एप्रिल २०१६ च्या शासन परिपत्रकान्वये सर्व शाळांना दिलेल्या आहेत. शासनाच्या जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येही सीसीटीव्ही बसविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत राज्यातील ६५६८६ शाळांपैकी १६२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविलेले आहेत उर्वरीत सीसीटीव्ही लवकरात लवकर बसवावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे अशी माहिती, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील सर्व माध्यमांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविणे बाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व ते सुरू असतील याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केले.

शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड म्हणाल्या, राज्यातील शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सी.सी.टी.व्ही बसविण्या संदर्भात धोरण ठरविण्यात आले आहे. राज्यात एकूण शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सुमारे ६५ हजार शाळा आहेत, त्यापैकी सद्यस्थितीत १६२४ शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

उर्वरित शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने सी.सी.टी.व्ही. बसविण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. याकरीता येणारा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधी (डीपीडीसी / DPDC) / स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी / सी.एस.आर. फंड किंवा लोकसहभागातून तसेच लोकप्रतिनीधींच्या विकास निधीमधून करण्याबाबत सूचना देण्यात येतील.

राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींकरीता निकोप आणि समतामुल्य वातावरण निर्मितीसाठी व सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सखी-सावित्री समित्या गठीत करण्याचे निर्देश शासन निर्णय दि. १० मार्च २०२२ अन्वये देण्यात आले आहेत. या समित्या पुढील १५ दिवसात गठित करण्यात येतील.

शाळा स्तरावरील सखी-सावित्री समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, महिला शिक्षक प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला प्रतिनिधी), पोलीस पाटील, महिला ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला पालक प्रतिनिधी, शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी (२ विद्यार्थी व २ विद्यार्थीनी) इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. सखी-सावित्री समितीमार्फत शाळांमध्ये निकोप, समतामुलक व आरोग्यमय वातावरण निर्माण होईल याबाबत काळजी घेण्यात येईल. तसेच सदर समितीला दर महिन्याचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्याची जबाबदारी देण्यात येईल. त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास समिती त्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीकडे करेल व तक्रारीचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल.

सर्व शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत किंवा नाही, सखी-सावित्री समित्यांचे गठण व नियंत्रण याबाबतची जबाबदारी आयुक्त (शिक्षण) यांची राहील.शाळांमध्ये मुलींना मार्गदर्शन करण्याकरीता एका महिला शिक्षकेवर जबाबदारी देण्यात येईल.

पोलीस विभागामार्फत पोलीस स्टेशन पातळीवर पोलीस काका / पोलीस दीदी संकल्पना राबविण्यात आली असून या पोलीस काका व पोलीस दीदींची तसेच सखी-सावित्री समितीतील महत्वाच्या सदस्यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक शाळेच्या दर्शनी भागावर ठळकपणे दर्शविण्यात येतील. राज्यातील आदर्श शाळांमध्ये चांगला स्पर्श-वाईट स्पर्श (Good touch – Bad touch) या संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सदरची मोहीम व्यापक स्वरूपात येणाऱ्या वर्षभरामध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येईल.

अज्ञात व्यक्तींच्या सूचनांचे / निर्देशांचे पालन करू नये याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येईल.प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याच्या सुचना देण्यात येतील.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नोंदी दोन वेळा म्हणजेच सकाळी आणि शाळा सुटण्याच्या प्रसंगी ठेवण्यात येतील. तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनद्वारे विचारणा करण्यात येईल, असेही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी बोलताना प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

महाराष्ट्र राज्यात १ एप्रिलपासून सीएनजी स्वस्त.. सीएनजी वाहन चालकांसाठी मोठी खुशखबर !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पामध्ये घोषणा केल्याप्रमाणे संकुचित नैसर्गिक वायू म्हणजेच सीएनजी (CNG) इंधनावरील मुल्यवर्धित कराचा (VAT) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल (शुक्रवारी) केली. याबाबत अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अधिसुचना जाहीर केली गेली. यामुळे महाराष्ट्रात १ एप्रिलपासून सीएनजी स्वस्त होणार असल्याने सीएनजीवरील वाहन चालवणाऱ्या चालकांसाठी ही एक खूशखबर आहे.

अधिसूचनेप्रमाणे इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (VAT) १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून सीएनजीचे सुधारित दर लागू होणार आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे १ एप्रिलपासून महाराष्ट्रात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे. त्यामुळे सीएनजीवरील वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. सीएनजीचे दर कमी झाल्याने आता अशा वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाला देखील अटकाव बसू शकतो. प्रदूषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे.

 

मिरा भाईंदर महानगरपालिकेने साजरा केला जागतिक जल दिन!

पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा आयुक्त यांच्या हस्ते सन्मान!

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर: जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन पाणी पुरवठा विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका तर्फे नगरभवन येथे जागतिक जल दिवस साजरा करण्यात आला.

महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जल दिवस सन्मान समारोह सपन्न् झाला. सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे व कार्यकारी अभियंता किरण राठोड उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास आयुक्त दिलीप ढोले यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना जागतिक जल दिवसाचे महत्त्व सांगताना महानगरपालिकेच्या पाणी व मलनि:सारण केंद्रा संबंधित विविध उपक्रमांची माहिती दिली.

मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना जागतिक जल दिवसाच्या शुभेच्छा देऊन जल संवर्धनाचे मुख्य उद्देश अधोरेखित केले. शहरातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळावे, पाण्याच्या स्तोत्राचे संरक्षण करणे, जनप्रबोधन करून नागरिकांमध्ये जल साक्षरतेचे महत्त्व पटवून देणे, विहीर पुनर्भरण तंत्र, पाण्याचा अपव्यय टाळणे इत्यादी गोष्टी लक्षात ठेवून शहरातील नागरिकांना जल संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी देखिल पाण्याचे महत्त्व पटवुन देताना सर्व कर्मचाऱ्यांचे वर्षभरात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी सर्व कर्मचारी कनिष्ठ अभियंता यांचे आभार व्यक्त करत पाणी पुरवठा विभागात सुरु असलेले विविध उपक्रम लोकांच्या गरजा आणि आवश्यकतेनुसार उपाययोजना व भविष्यातील कार्यक्रम या संबंधि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमामध्ये पाणी पुरवठा विभागात कार्यरत मेस्त्री, प्लंबर, वॉलमन आणि मीटर वाचक यांचा सन्मान करून वर्षभरात त्यांनी केलेले काम आणि सहकार्य यांचा एकत्रित मिलाप करुन आज त्यांना महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते गौरविण्यात आले.