Home Blog Page 183

आयकर विभागाची शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी धाड..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवाब मलिक यांच्या वर ईडी च्या अटकेनंतर नंतर दोनच दिवसात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाचे पथक दाखल झालं आहे. कारवाईचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी नंतर आता शिवसेना केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवरआहेत का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

इनोव्हा गाड्यांमधून पथक यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले. CISF टीम देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. यशवंत जाधव हे शिवसेना उपनेते आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी यामिनी यशवंत जाधव या भायखळा मतदार संघाच्या आमदार आहेत. त्यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने आज सकाळीच छापेमारी सुरु केली आहे. त्यांच्या घरासमोर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची ‘मनी लॉन्ड्रिंग’ केल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते.

 

एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी – आमदार रविंद्र चव्हाण यांचा आरोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून डोंबिवलीतील काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा स्पष्ट आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा गौप्यस्फोट आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. एकनाथ शिंदे हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खबळजनक आरोप त्यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. याबाबत शिंदे यांनी काढलेल्या आदेशाच्या प्रतीच माध्यम प्रतिनिधींसमोर पुरावे म्हणून आमदार यांनी सादर केल्या.

भाजपा सरकारमध्ये राज्यमंत्री असताना डोंबिवलीत दर्जेदार रस्ते व्हावेत म्हणून एमएमआरडीएच्या माध्यमातून काम करावे अशी संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर मी डोंबिवलीचा आमदार या नात्याने सर्वप्रथम मांडली. माझ्या मागणीस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली. केडीएमसी पेक्षा एमएमआरडीए अधिक चांगल्या प्रकारे रस्ते बांधणी करेल असेही ठरले. या कामासाठी ४७०.८२ कोटी रुपये मंजूर झाले त्यातून डोंबिवलीतील ३५ रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे निश्चित झाले.

रस्त्यांचा हा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एमएमआरडीएने सुमारे ९ कोटी रुपये खर्च केला असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. पुढे ते म्हणाले की मी गेले दोन अडीच वर्षे याबाबत पाठपुरावा करत होतो. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची “सहन होत नाही व सांगताही येत नाही ” अशी देहबोली स्पष्ट दिसत होती. अधिकारी वर्ग याबाबत प्रचंड दबावाखाली होते. प्राधिकरणाच्या तर्फे ३० रस्ते कामे रद्द करण्यात आल्याचे खासगीत सांगत होते. जेव्हा कागदपत्रे प्राप्त झाली तेव्हा लक्षात आले की ही डोंबिवलीच्या विकासात खरा अडथळा निर्माण करण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच होत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना गेली २५ वर्षे सत्तेत आहे. आजपर्यंत महापालिकेच्या ५ सार्वत्रिक निवडणूका झाल्या. या निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजपा एकत्र व विरोधात अशी राजकीय लढाई लढलो. पण भाजपाने शहर विकासाबाबत कायमच सकारात्मक भूमिकाच निभावली. उलट शिवसेनेनं स्थानिक पातळीवरील भाजपा कार्यकर्त्यांच्या, नगरसेवकांच्या कामाला शिवसेनेने कायम खोडा घातला. राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकांमध्ये युतीत इतके वर्ष लढूनही शिवसेनेचे ठाण्याचे नेतृत्व कल्याण डोंबिवलीत विकास कामामध्ये झारीतील शुक्राचार्याचे काम करत होते असा आरोपही आमदार चव्हाण यांनी केला.

भाजप नगरसेवकांच्या फायली महापालिकेत दाबून ठेवणे, भाजपा आमदारांच्या फायली आयुक्तांवर, प्राधिकरण प्रमुखांवर दबाव टाकून निगेटिव्ह करणे, चांगल्या कंत्राटदारांना महापालिकेत येऊच न देणे हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महापालिकांमध्ये सर्रास सुरु आहे. या विरोधात आम्ही आमच्या पातळीवर संघर्ष करतच असतो असेही चव्हाण यांनी
सांगितले. स्वार्थी हेतूने शहराच्या विकासात अडथळा टाकण्याचं काम गेल्या २० वर्षापासून शिवसेना करत आहे हे मुंबई, ठाणे व कल्याण डोंबिवलीकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच कामे रद्द केल्याने शासनाच्या पैशांचा चुराडा तर झालाच आहे पण डोंबिवलीकर चांगल्या रस्त्यांपासून वंचित ठेवल्याचे पाप एकनाथरावांनी केले आहे. डोंबिवलीकर जनता हे लक्षात ठेवेल असा इशारा आमदार चव्हाण यांनी दिला.

 

पुण्याचे ॲड. संतोष शिंदे यांची विश्व रजक महासंघच्या नेशनल लॉ कमिटी प्रेसिडेंट पदावर झाली नियुक्ती

पुणे, प्रतिनिधी: विश्व रजक महासंघ भारतातील एकमात्र रजक संघटना असून संपूर्ण भारतातील धोबी/रजक समाजात एकता, सदभाव, समता, बंधुत्व वाढवून स्वाभिमानी नागरिक म्हणून सर्वांना संघटित करून राष्ट्रीय स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगे महाराजांच्या उपदेश व विचारधारे नुसार मार्गक्रमण करून हुंडा पद्धती बंद करणे, व्यसनमुक्त, नशामुक्त समाज निर्माण करणे, जाती प्रथा-भेदभाव दूर करून रजक समाजातील सर्व लोकांना पूर्ण भारतात एका छताखाली आणून भारतातील धोबी समाजाला मागासवर्ग (schedule cast चे आरक्षण ) या एकाच श्रेणीमध्ये आणण्यासाठी कार्यरत आहेत.

भारतातील धोबी/रजक समाजावर होणाऱ्या अन्याया बाबत आवाज उठवून संपूर्ण धोबी समजासाठी रजक/धोबी आयोग त्वरीत गठन होण्यासाठी संघर्ष करून पूर्ण समाजाला एकत्र आणण्याचे कार्य विश्व रजक महासंघ संपुर्ण भारतभर करीत आहे. या महासंघाच्या नेशनल लॉ कमिटी प्रेसिडेंट पदावर पुण्याचे ॲड. संतोष शिंदे यांची नुकतीच महासंघाचे संस्थापक रंजीत कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष चिंतामणी, राष्ट्रीय सेक्रेटरी मुन्नालाल कनोजिया,  वरिष्ठ जनरल सेक्रेटरी सी डी राम कनोजिया यांनी नियुक्ती करून तसे पत्र दिले.

संपुर्ण भारतातील सर्व धोबी समाजातील लोकांनी एकत्र येवून या कार्याला हातभार लावण्याचे आवाहन संतोष शिंदे यांनी केले असून त्यांचा संपर्क क्रमांक 7507004606 हा आहे.

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या संस्थेच्या वृत्तपत्र लेखन चळवळीसाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीराम मांडवकर आणि दत्ताराम गवस यांना जीवन गौरव पुरस्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत


  २२ ऑगस्ट १९४९ रोजी फोर्टच्या तांबे उपाहारगृहात स्व.प्रभाकर पाध्ये व स्व.श्रीकांत पालेकर यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या संमेलनात ‘मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हापासून संस्था सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि वृत्तपत्रलेखनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. ७३ वर्षाच्या या वाटचालीत वृत्तपत्र लेखन चळवळीसाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानाने गौरविण्यात येते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सन २०२१ चा पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही. शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता धुरू हॉल, दासावा, छबिलदास लेन, दादर-पश्चिम, मुंबई मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्रीराम मांडवकर आणि दत्ताराम गवस यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी घोषित केले आहे.

मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. संघाच्या सभासदांसह वृत्तपत्र लेखकांनी या कार्यक्रमास अगत्याने उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.

खाद्यतेलाचा भाव २८० रुपयांनी स्वस्त करण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद l प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. या मालिकेत आता सरकारने कच्च्या पामतेलावरील प्रभावी सीमाशुल्क ५.५ टक्क्यांवर आणले आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्यास आणि ग्राहकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

अधिकृत अधिसूचनेनुसार, कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर आता क्रूड पाम तेलावर ५ टक्के आकारला जाईल, जो आतापर्यंत ७.५ टक्के होता. या कपातीनंतर कच्च्या पाम तेलावरील प्रभावी सीमाशुल्क ८.२५ टक्क्यांऐवजी ५.५ टक्के होईल.

किती कमी होणार भाव :

व्यापाऱ्यांच्या मते, या कपातीमुळे भाव २८० रुपये प्रति क्विंटलने कमी होऊ शकतात. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्येही सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली होती.

भारत आपल्या खाद्यतेलाच्या ६० टक्क्यांहून अधिक गरजा आयातीद्वारे भागवतो. इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताला RBD पामोलिन आणि क्रूड पाम तेलाचे प्रमुख पुरवठादार आहेत.

साठवणूक मर्यादेबाबत निर्णय घेतला आहे:
अलीकडेच केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठवणुकीची मर्यादा ३० जून २०२२ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. स्टोरेज मर्यादा आदेश केंद्र सरकार आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठवण, वितरणाचे नियमन करण्याचे अधिकार देतो. यामुळे देशातील खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा रोखण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना चालना मिळेल.