Home Blog Page 191

समाजसेवक वरीष्ठ पत्रकार निसार अली यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!

संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी

मुंबई: दैनिक सकाळ व दैनिक पुढारीचे पत्रकार, प्रसिद्ध समाजसेवक निसार अली सय्यद यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा पत्रकार पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार दिनांक 15 व 16 नोव्हेंबर रोजी, अकोला अंत्री येथे होणाऱ्या ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या एकमेव पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने 15 व्या वार्षिक संमेलनात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असताना केलेल्या पत्रकारिता क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात निसार अली सय्यद यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा तर केलीच त्याच बरोबर पत्रकारितेत देखील उल्लेखनीय कार्य केले आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या या भरीव योगदानाबद्दल त्यांना ‘कोरोना योद्धा पत्रकार’ हा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती एजेएफसी चे केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल तसेच प्रदेशाध्यक्ष अजिंक्य गोवेकर यांनी दिली आहे. यापूर्वी देखील पत्रकार निसार अली यांना पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदाना करिता विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

निसार अली सय्यद यांना कोरोना योद्धा पत्रकार म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

किरीट सोमय्यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

  भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरिट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. किरीट सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्या विरोधात नागपूर कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल केली आहे.

पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम किरीट सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. किरीट सोमय्या यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के काँग्रेसला मिळतो असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात अतुल लोंढे यांनी आज नागपूर न्यायालयात किरीट सोमय्या यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल केली आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे वितरण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आज वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ४ मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. आज राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये एका शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती यांच्या हस्ते वर्ष २०२० मधील पहिल्या टप्प्यातील पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. वर्ष २०२० मध्ये विविध क्षेत्रातील ७ मान्यवरांना पद्म विभूषण, १६ मान्यवरांना पद्म भूषण आणि ११८ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील १३ मान्यवरांचा समावेश आहे. आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये महाराष्ट्रातील ४ मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. रमण गंगाखेडकर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री गंगाखेडकर हे वरिष्ठ विषाणूशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल ऍण्ड रिसर्च (ICMR) या संस्थेच्या सारथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणून काम केलेले आहे. सरिता जोशी यांना हिंदी, मराठी, गुजरातीमध्ये अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री प्रदान करून गौरविण्यात आले. गेल्या ७ दशकात त्यांनी दूरचित्रवाणी, नाटक आणि सिनेजगतात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. कंगना राणावत यांना हिंदी सिनेसृष्टीतील अभिनय क्षेत्रातील कार्यासाठी आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिनेक्षेत्रातील गायनासाठी अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. श्री सामी हे संगीतकारही आहेत.

 

ठाणे शहराच्या आधुनिकीकरणात ठाण्यातील आर्किटेक्ट व इंटिरियर डिझायनरचे भरीव योगदान

संपादक:मोईन सय्यद/ठाणे प्रतिनिधी

ठाणे : इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स या सेवाभावी संस्थेच्या ठाणे चॅप्टरची म्हणजेच ठाणे, मुंबई ,नवी 9मुंबई शहरातील गृह तसेच कार्यालयांची सजावट करणाऱ्या आर्किटेक्टस, इंटिरियर डिजायनर्र्स, ट्रेड व या व्यवसायासंबंधित सभासद यांच्या पुढील दोन वर्षासाठी नियुक्ती केलेल्या कार्यकारिणीचा स्थापना समारंभ नुकताच ठाणे शहरात पार पडला.

तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख आता गगनचुंबी इमारती, मेट्रो, प्रशस्त मॉल्स, फ्लायओव्हर, तारांकित हॉटेल, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्था अशी झाली असून या सर्व जडण घडणीत ठाण्यातील आर्किटेक्ट व इंटिरियर डिझायनर यांचा सिंहाचा वाटा आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनरच्या ठाणे चॅप्टरची सभा ठाण्यामध्ये झाली असून या संघटनेचे माजी चेयरमन व जेष्ठ आर्किटेक्ट श्री संजीव ठाकूर यांनी आढावा घेतला. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. पेट्रोल डिझेलच्या भाववाढीचा बांधकाम क्षेत्राला सुद्धा मोठा फटका पडला आहे या सर्व आव्हानाचा सामना करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्सची ठाणे चॅप्टर ही संघटना नव्या चेहऱ्यांना घेऊन सज्ज झाली आहे.

यावेळी या संघटनेचे नवनियुक्त चेयरमन व जेष्ठ आर्किटेक्ट श्री संदीप नरेश जोशी म्हणाले, ” पुढील दोन वर्षांसाठी आम्ही कार्यकारणी जाहीर केली असून यामध्ये आमची संघटना आर्किटेक्चर व इंटिरिअर क्षेत्रात येणाऱ्या युवा पिढीकडे जाणार आहे कारण आमचे क्षेत्र हे क्रिएटिव्ह क्षेत्र असून आमच्या क्षेत्रातील ठाण्यातील दिग्गज आर्किटेक्ट्स या युवापिढीला योग्य मार्गदर्शन करू शकतील. म्हणूनच आम्ही संवाद या उपक्रमाचे आयोजन करणार आहोत. तसेच आर्किटेक्चर व इंटिरियर क्षेत्रातील व या व्यवसायामधील आमचे सहकारी आमचे प्रायोजक ईंटीरियर वस्तू बनविणारे कारखानदार यांच्या कारखान्यांना भेट देणार आहोत. याकरीता आम्ही विविध वर्कशॉप घेणार आहोत व तसेच पहिल्यांदा कल्चरल व स्पोर्टस कमिटीची स्थापना केलेली आहे, असे अनेक उपक्रम आम्ही येत्या दोन वर्षात राबविणार आहोत.

इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स ही राष्ट्रीय संस्था असून भारतातील सुमारे आठ हजार पाचशे आर्किटेक्टस, इंटिरियर डिजायनर्स, ट्रेड मेंबर्स हे यात सहभागी आहेत तसेच संपूर्ण भारतात ३३ चॅप्टर कार्यरत असून आर्किटेक्चर व इंटिरिअर डिजायनर्स च्या क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी ही संस्था प्रयत्नशील असते.”
या सभेचे ठळक वैशिष्ट म्हणजे या सभेला इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आर्किटेक्ट जबीन झकारियास खास कोचीवरून ठाण्यामध्ये आल्या होत्या. त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व आर्किटेक्टना, डिजायनर्स व ट्रेड मेंबर्सना संबोधित व मार्गदर्शन करताना सांगितले, “भारतीय इंटिरियर डिझायनर्स संस्थेची स्थापना १९७२ साली झाली असून सदस्यांमध्ये चांगल्या व्यावसायिक आणि व्यापार पद्धती आणि नैतिकता स्थापित करण्यासाठी आणि इंटीरियर डिझाइन व्यवसायाची प्रतिमा ठळक करण्यासाठी झाली आहे तसेच परदेशातील तत्सम संस्थांशी माहितीची देवाणघेवाण या माध्यमातून आम्ही करीत आहोत.

ठाणे चॅप्टर हा एक देशातील महत्वाचा चॅप्टर असून येत्या काळात ठाणे शहर हे जागतिक पटलावर एक विकसित शहर म्हणून ओळखले जाणार आहे व यात ठाण्यातील आर्किटेक्ट व इंटिरियर डिझायनर्स यांची महत्वाची भूमिका राहणार आहे.” इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स ठाणे चॅप्टरचे जनसंपर्क अधिकारी आर्किटेक्ट श्री श्रेयश आत्माराम सरमळकर यांनी वरील माहिती दिली आहे.

वोक्हार्ट रूग्णालयानं पक्षाघात आजाराच्या जागरूकतेसाठी बनवला सर्व्हायव्हर ग्रुप

संपादक: मोईन सय्यद/मिरारोड प्रतिनिधी

दोन वर्षाच्या कार्यकाळात २३० पक्षाघात रूग्णांवर यशस्वी उपचार

पक्षाघातून बरे झालेले रूग्ण सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून करणार जनजागृती…

मिरारोड : पक्षाघात या आजाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयाने सर्व्हायव्हर ग्रुप बनवला असून यावेळी खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाघातातून वाचलेल्या ३० हून अधिक रूग्णांनी यात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात पक्षाघात या आजारावर यशस्वीरित्या मात करून आयुष्य़ जगणाऱ्या शीन फिगेरेडो या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

मेंदूला ऑक्सिजन व पोषणमूल्यांचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार झाल्याने किंवा त्या वाहिन्या फुटल्याने पक्षाघात होतो. पक्षाघाताचे दोन प्रकार आहेत. रोहिण्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने इस्केमिक स्ट्रोक येतो. तर रक्तवाहिन्या फुटल्यावर रक्त वाहून जाते आण‌ि त्यामुळे हेमोराजिक स्ट्रोक येतो. सध्या तरूणांमध्ये पक्षाघाताचा धोका वाढताना दिसून येत आहे. धुम्रपान, मद्यपान, मधुमेह, लठ्ठपणा, विनाकारण औषधांचा वापर आणि कौटुंबिक इतिहास हे यामागील मुख्य कारणं आहेत.

मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन पै म्हणाले की, “पक्षाघातामुळे दरवर्षी लाखो लोकांना जीव गमवावा लागतो. पक्षाघाताचा झटका आल्यास रूग्णाला ५ तासात उपचार मिळणे गरजेचं असतं. वेळीच उपचार न झाल्यास रूग्ण दगावू शकतो. सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत २३० पक्षाघात झालेल्या रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी १४४ पुरूष आणि ८६ महिलांचा समावेश होता. यातील ३१-४० वयोगटातील २३ रूग्ण, ४१-५० वयोगटातील ३६ रूग्ण, ५१-६० वर्ष वयोगटातील ५९ रूग्ण ६१-८० वयोगटातील १०० रूग्ण आणि ८० वर्ष वयोगटातील १२ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहे. पक्षाघाताबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी यातून बरे झालेल्या रूग्णांचा एक स्ट्रोक सर्व्हायव्हर्स ग्रुपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ३० रूग्णांचा सत्कार करण्यात आला. हा कार्य़क्रम दर तीन महिन्यांनी घेतला जाईल. जेणेकरून रूग्ण आपले अनुभव सांगू शकतील.”

स्ट्रोक सर्व्हायव्हर शीन फिगेरेडो म्हणाले, “पक्षाघात होईपर्यंत मला या आजाराबद्दल काहीही माहिती नव्हतं. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मला पुन्हा जगण्याची संधी मिळाली आहे. पक्षाघात रूग्णावर वेळीच उपचार होणं गरजेचं आहे, याबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी रूग्णालयाने स्ट्रोक सर्व्हायव्हर ग्रुप तयार करून चांगला पुढाकार घेतला आहे.”