Home Blog Page 194

कल्याण गुन्हे शाखा घटक-३ पोलीसांकडून बेकायदेशीर रित्या कार मधून हातभट्टीची गावठी दारू वाहतुक करणाऱ्यास केले जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत 

डोंबिवलीत दि. ०२/१०/२०२१ रोजी पोशि अजितसिंग राजपूत यांना गुप्त बातमीदारातर्फे बातमी मिळाली की, कल्याण-शीळ रोडवरील गोळवली येथे एस.जी मोटर्स च्या समोरील मोकळ्या मैदानातील बैठ्या चाळीजवळ एक इसम ईऑन मोटर कार गाडीतुन गावठी हातभट्टीची दारू विकण्यासाठी येणार आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विलास पाटील व पथकाने कल्याण-शीळ रोडवरील गोळवली येथे एस.जी मोटर्स च्या समोरील मोकळ्या मैदानाच्या बाजूला सापळा लावून रात्री २३:४० वाजण्याच्या दरम्यान एक ह्युंडाई कंपनीची ईऑन मोटर कार क्र. एमएच-०४ एफझेड ४२१ (परी) व गाडीचालक योगेश शालीक देवकर (वय ३० वर्षे) रा. स्वतः चे घर, मोठी देसाई, पोस्ट:पडले, कल्याण-शीळ रोड, ठाणे यास शिताफीने ताब्यात घेतले. मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये ३०० लिटर हातभट्टीची गावठी दारूचे फुगे सापडले असून सदर कारवाईमध्ये एकूण १,१५,७४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत पोहवा मंगेश शिर्के, नेमणूक कल्याण गुन्हे शाखा घटक-३ यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाणे गु.राजि.नं ५३३/२१ मुंबई प्रोहिबिशन कायदा कलम ६५ (अ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर ताब्यात घेतलेल्या इसम योगेश शालीक देवकर (वय ३० वर्षे) याच्या गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता त्याच्यावर रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन गुन्हे मुंबई प्रोहिबिशन कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे नोंद असल्याचे दिसून आले आहे. जप्त मुद्देमाल व ताब्यात घेतलेला इसम यांस पुढील कारवाई व तपासासाठी मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पोलीस निरीक्षक श्री.विलास पाटील, पोउनि मोहन कळमकर, पोहवा शिर्के, पोशि राजपूत, सचिन वानखेडे व पोशि नावसारे यांनी केलेली आहे.

दीपक खांबीत गोळीबार प्रकरणामुळे अधिकाऱ्यांचेच पितळ उघडे पडण्याचीच अधिक शक्यता!

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांचेवर झालेल्या गोळीबारामुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी या प्रकरणामुळे अधिकाऱ्यांचेच पितळ उघडे पडण्याची शक्यता जास्त असल्याचे बोलले जात आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर ओंकारेश्वर मंदिराजवळ गोळीबार झाला होता. मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञान इसमांनी हा गोळीबार केला असल्याची माहिती मिळाल्या नंतर मुंबई पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. तर या प्रकरणाचा समांतर तपास मिरा भाईंदर पोलीस देखील करत आहेत.

दरम्यान हा हल्ला कोणी केला? कसा केला? आणि का केला? याचा पोलीस अधिक तपास करत असताना मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी डॉ. महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे फिरवून उत्तर प्रदेश येथून एका आरोपीला अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून त्या आरोपीला विमानातून मुंबईला घेऊन आले असून त्याला पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.

या सगळ्या प्रकरणाची सत्यता काय ती लवकरच सगळ्यांच्या समोर येणार असली तरी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. तपासाचा भाग म्हणून कार्यकारी दीपक खांबीत यांच्या मोबाईल फोनचे सगळे कॉल डिटेल्स तपासून पाहत असून त्यामुळे अनेक भन्नाट माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रालयात बसणारे आणि महापालिका प्रशासनातील हे बडे बडे अधिकारी कुणा कुणाशी बोलतात? त्यांचे कुणा कुणाशी संबंध आहेत? त्यांचे कुणाशी आर्थिक व्यवहार आहेत? त्यांच्या बेनामी संपत्ती कुठे कुठे आहे? त्यांचे कुणाशी अनैतिक संबंध आहेत का? ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता असून दीपक खांबीत गोळीबार प्रकरणामुळे अनेक बड्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दीपक खांबीत आपले दिवसभराचे काम संपवून त्यांच्या कारने बोरिवली येथील घरी जात असताना सायंकाळी बोरिवली येथे महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली असताना आणि अत्यंत गर्दीच्या ठिकाणी अचानक गोळीबार करण्यात आला होता. हा गोळीबार पैशाच्या व्यवहारातून झाला? की खंडणीसाठी केला गेला? की या प्रकरणात आणखीन काही वैयक्तिक कारण होते? हे लवकरच जगासमोर येणार असले तरी या प्रकरणाचे गांभीर्य आणि अनेकांची पोलखोल होईल या दृष्टीने पाहता या प्रकरणाचे खरे आरोपी आणि खरी माहिती समोर येईल की नाही शंका व्यक्त केली जात आहे.

अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी करणाऱ्या महिला व त्यांच्या साथीदाराला नौपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नौपाडा पोलीसांनी उल्लेखनीय कामगिरी करत ठाण्यातील दोन मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी करणाऱ्या महिला व त्यांच्या साथीदाराला मोठ्या शिताफिने नौपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर दुसऱ्या गुन्ह्यात अनाथआश्रमांना दान करायचे आहे अशी बतावणी करून व्यवसायिकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला गजाआड केले आहे.

पहिल्या गुन्ह्यात नौपाडा पोलीसांकडे अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल होता, त्या प्रमाणे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ व पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी पोलीस उप निरीक्षक विनोद लभडे यांच्या टीमने तपासाला सुरुवात केली, ज्या ठिकाणी चोरी झाली तेथील सिसिटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्या मध्ये काही महिला चोरी करताना दिसून आल्या व एक व्यक्ती बाहेर फिरत असताना दिसून आला, त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या ठिकाणी काही महिला चोरी करत असताना पहिले व त्यांच्या सोबत एक ऑटो रिक्षा असल्याचे सांगितले, या रिक्षाचा शोध घेत असताना व आठ ठिकाणाचे सिसिटीव्ही फुटेज पहिले असता ही रिक्षा कळवा नाका मार्गे नवी मुबंईच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले, पोलिसांना फुटेज मध्ये रिक्षाचा नंबर स्पष्ट पणे दिसून आला, त्या वरून रिक्षा मालकाचा शोध घेतला असता, ही रिक्षा मालकाने आकाश कच्छि या इसमास चालवण्यास दिल्याचे समजले, त्या प्रमाणे त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने चोरी केल्याची कबुली जवाब दिला व त्याच्या बरोबर त्यांची बायको शीतल काच्छि त्याची नातेवाईक सुमन कच्छि, त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या नंदिनी गायकवाड व रुक्मिणी कांबळे या असल्याचे सांगितले या महिलांना पोलीसांनी मुकुंद कंपनी, ईश्वरनगर संजीवनी शाळेच्या मागे भोला शेठ कळवा येथून ताब्यात घेतले व त्यांनी चोरलेला ६९ हजार रुपयाचा २३ पाण्याच्या मोटरी, ४० हजार रुपयाच्या टेबल ड्रॉवर चॅनेल, २० हजार रुपयाचे आल्यूमिनिम सेक्शन, ४० हजार रुपयाचे ड्रीलिंग स्टॅन्ड व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ३,१९,०००/- रुपये किंमतीचा माल ताब्यात घेतला.

दुसऱ्या गुन्ह्यात चरई येथील ज्योती बुक स्टोअर्स यांना एका इसमाने फोन करून आपण एनजीओ मधून सचिन शहा बोलत असून आश्रमातील गरीब विद्यार्थाना वाटप करण्यासाठी अप्सरा पेन्सिलचे १०८० बॉक्स हवे आहेत, असे सांगुन ही ऑर्डर भिवंडी येथे पोहच करण्यास सांगुन ऑर्डर मिळाल्यावर तुमची रक्कम देतो असे सांगितले, तिथे माल घेऊन गेल्यावर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगितले, त्या नंतर नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे मी रक्कम देतो तो पर्यंत तुम्ही हा माल मला द्या वस्तूंचे मुलांना वाटप करायचे आहे, प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत, आणि कार्यक्रमाला वेळ होत असे सांगुन माल दुसऱ्या गाडीत टाकून ती घेऊन पसार झाला, या बाबत पोलीस पथकाने या इसमाचा शोध घेतला असता ह्या आरोपीने यापूर्वी ही अशाप्रकारचे गुन्हे मुबंई, नवी मुंबई, ठाणे परिसरात केल्याचे निष्पन्न झाले, हा आरोपी मालाड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलीस तेथे पोहचले असता तो थोड्याच दिवसांपूर्वी तेथून पसार झाल्याचे समजले, त्या नंतर पोलीसांना बोरिवली, उल्हासनगर येथेही त्याचे वास्तव्य असल्याचे समजले पण आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने तो त्याचे ठिकाण वारंवार बदलत होता,पोलीसांना त्याचा शोध घेणे अतिशय खडतर झाले होते, पण काही दिवसांनी पोलीसांना माहिती मिळाली हा आरोपी आपलं अस्तित्व लपवून विरार या ठिकाणी वावरत आहे त्या प्रमाणे तांत्रिक तपास करत पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले, त्याची चौकशी केली असता त्याचे नाव सचिन प्रवीण शहा वय ४० वर्ष असून तो मूळ राहण्यास मुलुंड येथील चंद्रभवन चाळ येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले , त्याच्या कडे चोरलेल्या मुद्देमालची चौकशी केली असता त्याने हा लंपास केलेला माल आश्रम शाळेत दोन, चार हजारला विकून टाकला, पोलीसांनी त्याला अटक करून कोर्टासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर झाला गोळीबार! खांबीत किरकोळ जखमी!

संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी

भाईंदर, 29 सप्टेंबर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर ओंकारेश्वर मंदिराजवळ गोळीबार झाला आहे. मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञान इसमांनी हा गोळीबार केला असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

दीपक खांबीत गोळीबाराच्या सदरील घटनेत सुखरूप असले तरी त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान हा हल्ला कोणी केला? कसा केला? आणि का केला? याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

दीपक खांबीत आपले दिवसभराचे काम संपवून त्यांच्या कारने बोरिवली येथील घरी जात असताना सायंकाळी बोरिवली येथे महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली असताना आणि अत्यंत गर्दीच्या ठिकाणी अचानक झालेल्या या गोळीबारामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. सद्ध्या पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहात आहेत.

पोलीस आयुक्तालय अंतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या; पण ते बदलीच्या ठिकाणी हजर होणार कधी? अधिकारी-कर्मचारी वर्गात पसरली नाराजी!

संपादक : मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर, 26 सप्टेंबर: ठाणे शहर वगळता मिरा भाईंदर, वसई-विरार आणि संपूर्ण ठाणे जिल्हा यापूर्वी ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रा अंतर्गत येत होता. भरपूर मोठा परिसर, वाडा, जव्हार, मोखाडा सारखा अतिदुर्गम परिसर त्यातच अपुरा कर्मचारी-अधिकारी वर्ग त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांवर कामाचा खूपच ताण पडत होता. अनेक पोलीस अधिकारी-कर्मचारी बाहेरच्या शहरातून लांबून याठिकाणी कामावर येत असल्यामुळे त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक विपरीत परिणाम होत होते.

हा संपूर्ण विचार करूनच मिरा भाईंदर शहारा करिता स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. अखेर मिरा भाईंदर आणि वसई विरार या दोन जुळ्या शहराला मिळून एक पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आलेला आहे. तर नव्यानेच स्थापन झालेल्या पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष म्हणून प्रसिद्ध असलेले प्रथम पोलीस आयुक्त सदानंद दाते (भाप्रसे) यांचेवर सोपविण्यात आलेला आहे.

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची नियुक्ती झाल्यानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या मिरा भाईंदर आणि वसई विरार शहरातील पोलीस ठाण्यात त्यांनी अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. आता नुकतेच त्यांनी बिट मार्शल यांना अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज केले असून आपत्कालीन पोलीस मदत क्रमांक ‘112’ कार्यान्वित केला आहे. त्याच प्रमाणे शहरातील सर्व पोलीस ठाणे, बस स्थानक, रेल्वे स्थानक, शॉपिंग मॉल, महापालिका कार्यालय, शाळा, कॉलेज अशा मुख्य ठिकाणी ‘तक्रार पेटी’ ही संकल्पना देखील राबविण्यात येणार आहे.

ठाणे ग्रामीण पोलीस अस्तताना मिरा भाईंदर आणि वसई विरार परिसरातील पोलीस ठाण्यात तैनात असलेले अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, शहापूर अशा दूर दूरच्या ठिकाणावरून कामावर येत होते. एव्हढ्या लांबून कामावर येत असताना त्यांचा बराचसा वेळ प्रवासातच वाया जात होता, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर तर विपरीत परिणाम होतच होता परंतु त्यांना आपल्या परिवाराला देखील पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे त्यांच्यावर मानसीक तणाव देखील वाढत होता आणि या सर्वांचा एकूण परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर देखील होत होता.

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची ही अत्यंत महत्त्वाची बाब ध्यानात घेऊन मिरा भाईंदर आणि वसई विरार शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील मिळून जवळपास 240 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मागणीनुसार सोयीच्या ठिकाणी बदल्या केल्या आहेत. या सर्व अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 23, 26 आणि 29  सप्टेंबर रोजी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी हजर होऊन तसा अनुपालन अहवाल सादर करायचा आहे. त्याच प्रमाणे बाहेरून या शहरात बदली झालेल्या अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या पोलीस ठाण्यात हजर व्हायचे आहे. परंतु मिरा भाईंदर शहरातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी अजूनही कार्यमुक्त केले नसल्यामुळे त्यांना बदलीच्या ठिकाणी अद्यापही हजर होता आलेले नाही आणि त्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचारी वर्गात नाराजी पसरलेली आहे.

नियमानुसार जर एखाद्या अधिकाऱ्याची अथवा कर्मचाऱ्याची बदली झाली असताना त्यांना बदलीच्या ठिकाणी 24 तासांच्या आत हजर होऊन तसा अनुपालन अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा लागतो. परंतु मिरा भाईंदर, वसई विरार शहराच्या पोलीस ठाण्यातील बदली झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले नसल्यामुळे त्यांना अजूनही आपापल्या बदलीच्या ठिकाणी हजर होता आलेले नाही आणि तसा अनुपालन अहवाल सादर करता आलेला नाही त्यामुळे हे बदली झालेले अधिकारी व कर्मचारी काहीसे नाराज झाले आहेत.

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन जवळपास 240 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत परंतु जर हे अधिकारी-कर्मचारी वेळेवर बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत तर त्यांचेवर शिस्तभंगाची नोटीस बजावली जाऊ शकते आणि त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणामच अधिक होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ही बाब ध्यानात ठेऊन बदली झालेल्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांना त्वरित कार्यमुक्त करण्यासाठी संबंधित प्रभारी अधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे.

आता पोलीस आयुक्त सदानंद दाते या गंभीर विषयावर काय निर्णय घेतात? आणि संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना काय आदेश देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.