Home Blog Page 195

राज्यातील तब्बल 10 लाख वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नोटिसा

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह

मुंबई: वाहतूक पोलिसांकडे आगोदर पावती पुस्तिका होती. वाहतूक नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या नावे पावती फाडावी लागत होती. मात्र, सध्या नव्या ई-चलन नियमांचा राज्यात अधिक वापर होताना दिसत आहे. तर, ई-चलानाद्वारे वाहचालकांवर ठोठावण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा दंड थकलेला आहे. या वसुलीसाठी लोकअदालत घेण्यात येणार असून जवळपास 10 लाख वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नोटिसा बजावल्या आहेत.

वाहतूक विभागाने 2016 साली ई-चलन प्रणाली सुरू करण्यात आली. वाहतुकीचा नियम मो़डणा-या वाहनचालकांवर पावती ऐवजी ई-प्रणालीच्या माध्यमातून दंड ठोठावण्यास सुरुवात केली. त्यामुळे पावतीच्या ऐवजी चलन मशिन वाहतुक पोलिसांना देण्यात आले. त्यामुळे सध्या राज्यात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. सिग्नल ठिकाणी बसवण्यात आलेले कॅमेरे वाहतुक नियमन डावलणा-यांच्या गाडीचा नंबर कॅच करते. या अशा सर्व कारणास्तव आता दंडाची रक्कम वाढली आहे. मात्र, वसुली अद्याप होताना दिसत नाही.

वाहतुक पोलिसांकडून आवाहन…

25 सप्टेंबरपासून लोकअदालत सुरू करण्यात येणार आहे. ही लोकअदालत 3 दिवस चालणार आहे. यामध्ये प्रकरणे मिटविण्यावर भर दिला जाणार आहे. ज्यांना नोटिसा मिळालेल्या नाहीत, त्यांनी वाहतूक पोलिसांच्या ॲपवर जाऊन थकीत रक्कम तपासून घ्यावी तसेच पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ही रक्कम तात्काळ भरावी असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

या सर्व प्रकारामुळे पूर्वीची पावती पुस्तिकाच बरी होती का? निदान त्यामुळे जागेवरच दंड वसूल केला जात होता, अशा प्रकारे लाखों लोकांना नोटीस बजावणे, त्यांना कोर्टात हजर करणे इत्यादी व्याप तरी वाढले नसते अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी केला बलात्कार! डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार! नऊ महिन्यांपासून आरोपींनी पीडितेला दिल्या नरक यातना!

संपादक: मोईन सय्यद/ प्रतिनिधी: मिलन शाह

डोंबिवली : काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका याठिकाणी देशाला हादरवणारी महिला अत्याचाराची घटना घडली होती. येथील एका ३० वर्षीय महिलेवर अतिशय अमानुष पद्धतीने बलात्कार करून नराधमांनी तिची हत्या केली होती. ही घटना ताजी असताना, सामूहिक बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली आहे. डोंबिवलीतील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत २३ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास मनपाडा पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना डोंबिवलीतील भोपर परिसरातील आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेवून सामूहिक बलात्कार केला आहे. नराधमांनी जानेवारी २०२१ पासून २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत पीडितेला नरक यातना दिल्या आहेत. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने काल रात्री मनपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारसह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत २३ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संबंधित सर्व आरोपींनी पीडितेला डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, राबळे अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन आरोपी अल्पवयीन आहेत, बाकीचे सर्व आरोपी १८ वर्षांपुढील आहेत. पोलीस घटनेची गंभीरता ध्यानात घेऊन पुढील तपास करीत आहेत.

४० व्या कुमार-मुली ‘राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत’ महाराष्ट्राच्या मुलांची विजयी सलामी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भुवनेश्वर येथे दि.२२ सेप्टेंबर (क्री. प्र.), बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान भुवनेश्वर, ओडीसा येथे सुरू झालेल्या ४० व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार-मुली खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी सलामीच्या सामन्यात नागालँडवर ३२-६ असा १ डाव राखून २६ गुणांनी सहज विजय मिळविला.

सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात महाराष्ट्राकडून सूरज जोहरे, विवेक ब्राह्मणे व भगतसिंग वसावे यांनी प्रत्येकी ५ गडी टिपत महाराष्ट्रचा विजय सोपा केला. भगतसिंगने नाबाद १.५० तर सौरभ अहिरने २.३० मिनीटे संरक्षण करून विजयाची पायाभरणी केली. रवी वसावे (१.२०मिनिटे संरक्षण व २ गडी ) व आदित्य कुदळे (१.३० मिनिटे संरक्षण व ४ गडी) यांनी अष्टपैलू खेळ करताना मोठा विजय साजरा केला.

मुलींचा नागालँड संघ न आल्यामुळे मुलींच्या संघाला पुढे चाल मिळाली.

महाराष्ट्रचे संघ सोलापूरहून रेल्वेने रवाना झाले होते. तत्पूर्वी येथील ह.दे. प्रशालेत निरोप समारंभावेळी महाराष्ट्राचे कुमार व मुलींचे दोन्ही खो-खो संघ यंदा सुवर्ण पदक कायम राखतील, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केला होता.

उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने दोन्ही संघास शुभेच्छा दिल्या गेल्या. रामचंद्र जाधव मित्र परिवाराच्या वतीने खेळाडूंना किट बॅग देण्यात आल्या. त्यांच्या आणि राज्य शासकीय प्रशिक्षक सत्येन जाधव, ह.दे. प्रशालेचे हनुमंत मोतीबने, खो-खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, दक्षिण तालुका खो-खो असोसिएशनचे तुळशीराम शेतसंदी, समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संस्थापक अध्यक्ष संजय सावंत, रेल्वेचे जाकिर आत्तर, उमेश जाधव, उत्कर्ष क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष रविंद्र नाशिककर व खजिनदार उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते किट बॅग देण्यात आली. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे यांनी प्रस्ताविक केले. अजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

 

कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या सोयीसाठी ‘बाहय रुग्ण सेवा’ (OPD) आता सायंकाळी देखील सुरु !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यभरात गेली दिड वर्ष कोविड साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका अनेक विविध उपायोजना राबवित आहे. आगामी कालावधीत कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता तसेच सदयस्थितीत साथरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेच्या ‘आरोग्य सुविधा’ कल्याण-डोंबिवली च्या नागरिकांपर्यत पोहोचविणे आवश्यक आहे. महापालिकेच्या रुग्णालयात मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येते.

सदर गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने व रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून रुग्णांच्या घरालगतच्या ‘नागरी आरोग्य केंद्रावर’ संध्याकाळी देख्रील ‘बाहयरुग्ण सेवा’ (ओपीडी) उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण मधील महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र, चिकणघर नागरी आरोग्य केंद्र, मोहना नागरी आरोग्य केंद्र, कोळसेवाडी नागरी आरोग्य केंद्र , तिसगाव नागरी आरोग्य केंद्र, खडेगोळवली नागरी आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे डोंबिवलीतील पाटकर, मढवी, दत्तनगर, महाराष्ट्र नगर या नागरी आरोग्य केंद्रांवर सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत बाहयरुग्ण सेवा (ओपीडी) सुरु करण्यात येत आहे. डोंबिवली तील मंजूनाथ नागरी आरोग्य केंद्र लवकरच नवीन मोठया जागेत स्थलांतरीत होत आहे. तद्नंतर तेथेही बाहयरुग्ण सेवा नागरिकांच्या सेवेकरीता सुरु करण्यात येणार आहे. तरी या सुविधेचा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील व प्रतिभा पानपाटील यांचेमार्फत परिसरातील समस्त नागरिकांना करण्यात येत आहे.

 

नवी मुंबई पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत केले पाच आरोपींना जेरबंद; प्रतिबंधित गुटका, रोकड, देशी बनावटीचे अग्निशस्त्र, आयशर ट्रक व पिकअप टेम्पो मिळून ८० लाखांचा मुद्देमाल केला जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वाशी येथे मा. पोलीस आयुक्त, पोलीस सह आयुक्त व अप्पर पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे “नशामुक्त नवी मुंबई” या विशेष मोहीम अभियाना अंतर्गत कारवाई सुरू आहे. त्या अनुषंगाने दिनांक १७/०९/२०२१ रोजी गुन्हे शाखेचे वपोनि कोल्हटकर यांना मिळालेल्या बातमीवरून सेक्टर ३०/ए, ओरीसा भवन, वाशी नवी मुंबई परिसरात करण व त्याचे साथीदार हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला पानमसाला व तंबाखू (सुगंधीत) मालाची अवैधरीत्या विक्री करण्यासाठी आणून तेथे दुसऱ्या वाहनांमधून वितरित करणार आहेत बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दिनांक १७/०९/२०२१ रोजी पहाटेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन बी.कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून कारवाई केली. ओरीसा भवन समोरील निर्जन रोडवर एका आयशर ट्रक मधून बोलेरो पिकअप जीप मध्ये काही इसम गोण्यामध्ये असलेला विमल पानमसाला व वी-१ सुगंधित तंबाखू भरत असताना पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेण्यासाठी घेराव घातला असता तेथील इसमांनी पोलीसांशी झटापट केली तसेच एक इसम पळून जात असताना शिताफीने त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यादरम्यान तेथील पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत आरोपी करण राम साळुंखे याने त्याच्याकडील अग्निशस्त्र पोलीसांवर रोखून धाक दाखवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत कायदेशीर कारवाईस अडथळा निर्माण करून सदर ठिकाणाहून अंधार व गोंधळाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

सदर ठिकाणाहुन कारवाई दरम्यान आयशर टेम्पो, बोलेरो पिकअप जीप, फॉरच्युनर कार या वाहनांमध्ये २८,९३,८८०/- रुपये किंमतीचा मानवी जिवितास हानिकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकाराचा पानमसाला व तंबाखू (सुगंधीत) असा मालाचा साठा व त्यासाठी वापरण्यात आलेली वाहने फॉरच्युनर कारमध्ये मिळून आलेली रोख रक्कम, एक देशी बनावटीचे पिस्तुल, मोबाईल फोन व इतर सुमारे ७९,००,८८०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याबाबत वाशी पोलीस ठाणे गु.र.नं ३२३/२०२१ भा.द.वि कलम ३०७, ३५३, १८८, २७२, २७३, ३२८, ३४ सह अन्नसुरक्षा कायदा कलम २६ (२)(I), २६ (२)(IV), २७ (३)(D), २७ (३)(E) भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), (३)/१३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील ०५ आरोपींना दि.१८/०९/२०२१ रोजी ०१:३४ वा. अटक करण्यात आली असून त्यांना दि.२३/०९/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.