Home Blog Page 196

विश्वास वळवी याच्यावर जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

पालघर: ठाणे कोलशेत येथील एका जमीन खरेदी प्रकरणात आदीवासी कुटुंबाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता आणि समाजसेवक विश्वास वळवी याच्यावर ठाणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ माजली आहे.

ठाणे कोलशेत येथील दत्तू नथू बारे यांच्या नावे सर्वे क्र.२८२/१ मध्ये एकूण १६७९० चौमी कब्जे वहीवाटीची जमीन होती. ही जमीन दत्तू बारे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ४ वारसांकडून विश्वास दाविद वळवी याने १४,९४,३१,००० रुपयांना खरेदी केली होती. या व्यवहारामध्ये विश्वास वळवी याने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जमीन खरेदी विक्रीची परवानगी मिळवण्यासाठी ४ वारसदाराना प्रत्येकी ३,७३,५७,८८५ रुपयांचे धनादेश देऊन पुन्हा ते धनादेश तुम्हाला नंतर देतो असे सांगून परत स्वत:कडे ठेवून घेतले होते.

त्यानंतर विश्वास वळवी यांनी ४ वारसदारांपैकी १ वारसदार असलेल्या बाजीबाई तुकाराम कोम यांना वारंवार मालाड येथील पंजाब नॅशनल बँकेत नेऊन त्यांच्या आशिक्षीतपणाचा फायदा घेत तुझे बँक खाते उघडून तुझ्या खात्यात कोलशेत येथील जमिनीचे तुझ्या हिश्श्याचे पैसे जमा करतो असे सांगून चेकबुक, कोरे कागद तसेच काही फॉर्मवर अंगठे घेतले व बाजीबाई कोमच्या खात्यावर जमा असलेली करोडोंची रक्कम इतर कंपन्यांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे वळती करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार बाजीबाई कोम यांचा मुलगा साजन कोम याने कापुरबावडी पोलिस स्टेशनमध्ये केली होती.

या तक्रारीनंतर जमीन खरेदी विक्री प्रकरणात आदीवासी कुटुंबाची करोडो रुपयांची फसवणूक झाल्याच्या या घटनेची गंभीर दखल घेत हे प्रकरण ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात मोठी बँनरबाजी करत शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणार्‍या विश्वास वळवी याच्यावर एका आदीवासी कुटुंबाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी भा.दं.वि. ४२० आणि ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कोषाध्यक्षपदासाठी चंद्रजीत जाधव व धनंजय भोसले यांच्यात लढत; अध्यक्षपदी अजितदादा पवार व सरचिटणीसपदी नामदेव शिरगावकर तर ऊर्वरित कार्यकारिणी बिनविरोध..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुणे येथील ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटने’ च्या सरचिटणीसपदी ‘मॉडर्न पॅन्टॉथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ चे नामदेव शिरगावकर यांची बिनविरोध निवड झाली. जय कवळी, धनंजय भोसले, चंद्रजीत जाधव आणि नामदेव शिरगावकर हे चौघे सरचिटणीसपदासाठी इच्छुक होते. परंतु, जय कवळी, धनंजय भोसले, चंद्रजीत जाधव यांनी माघार घेतली आणि नामदेव शिरगावकर यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली.

गेल्या काही दिवसांपासून सरचिटणीसपदी कोणाची निवड होणार हा राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात चर्चेचा विषय होता. नामदेव शिरगावकर यांच्या बिनविरोध निवडीने या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत शनिवारी अनेक घडामोडी नंतर विविध पदांची निवडणूक बिनविरोध झाली. सरचिटणीसपदासाठी दावेदारी असलेले चंद्रजीत जाधव आणि धनंजय भोसले यांच्यात कोषाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. कोषाध्यक्ष या एकमेव पदासाठी निवडणूक होणार आहे. अन्य पदांवर बिनविरोध निवड झालेली आहे.

गेली अनेक वर्षापासून सरचिटणीसपदी असणारे बाळासाहेब लांडगे यांनी वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला नवा सरचिटणीस लाभणार हे स्पष्ट झाले होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची बिनविरोध निवडून आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे:

अध्यक्ष – उपमुख्यमंत्री अजित पवार (महाराष्ट्र कबड्डी संघटना),

वरिष्ठ उपाध्यक्ष – बाळासाहेब लांडगे (महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटना),

उपाध्यक्ष (चार पदे)
संजय शेटे (महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना),
जय कवळी (महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना),
प्रदीप गंधे (महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना),
अशोक पंडीत (महाराष्ट्र रायफल संघटना),

सचिव – नामदेव शिरगावकर (मॉडर्न पॅन्टॉथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र),

सहसचिव (चार पदे)
प्रशांत देशपांडे (महाराष्ट्र आर्चरी संघटना),
सुंदर अय्यर (महाराष्ट्र राज्य टेनिस संघटना),
प्रकाश तुळपुळे (महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना),
दयानंद कुमार (महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना)

कार्यकारी सभासद (नऊ पदे) : दीपक मेजारी (स्वीमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र),
संदीप चौधरी (रम्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र),
नीलेश जगताप (महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशन),
अमेय छाजेड (महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना),
सोपान कटके (ऑल महाराष्ट्र वुशू संघटना),
राजाराम राऊत (हँडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र),
गोविंद मुथ्थुकुमार (महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना),
उदय डोंगरे (महाराष्ट्र तलवारबाजी संघटना), स्मिता यादव (महाराष्ट्र रोइंग संघटना).

कल्याण आरपीएफची मोठी कारवाई; कोणार्क एक्स्प्रेस मधून बारामद केला २१ किलो गांजा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या ‘कोणार्क एक्सप्रेस’ च्या डी/२ बोगीतील एका सीट खाली सापडलेल्या बेवारस बॅगेतून २ लाख ७ हजार रुपये किंमतीचा २१ किलो अंमली पदार्थ (गांजा) कल्याण आरपीएफ च्या पोलीसांने जप्त केला आहे. हा अमली पदार्थ (गांजा) नारकोटिक्स विभागाला सुपूर्द करण्यात आला असून हा गांजा कोणी आणि कुठून आणला आहे याचा तपास कल्याण आरपीएफ पोलीसांकडून सुरू आहे.

शुक्रवारी पहाटे २ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास ‘उडीसा’ हून ‘कल्याण’ स्थानकात येत असलेल्या ‘कोणार्क एक्सप्रेस’ च्या डी/२ बोगीतील एका सीट खाली बेवारस बॅग असल्याची माहिती प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी आरपीएफ ला सूचना देण्यात आल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ‘कल्याण आरपीएफ’ चे स्टेशन प्रभारी भुपेंद्र सिंह आणि त्यांच्या टीमने ‘कोणार्क एक्सप्रेस’ रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकातील ७ नंबर फलाटावर दाखल होताच आरपीएफ ने सुरक्षेच्या कारणास्तव एक्स्प्रेस ची संपूर्ण बोगी रिकामी करत तपासणी सुरू केली असता सीट खाली ‘लाल रंगाची ट्रॉली बॅग’ आणि ‘काळ्या रंगाची सॅक बॅग’ आढळून आली.

आरपीएफ कल्याणचे एएसआय राजकुमार भारती यांच्यासह कल्याण स्टेशनचे आरक्षक एस एन.मुंडे यांच्या टीमने या बॅगेची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात हिरव्या रंगाचे गवतासारखे दिसणारा २० किलो ७८० ग्राम वजनाचा अंमली पदार्थ (गांजा) असल्याचे आढळून आले ज्याची अंदाजे बाजारभाव किमंत रुपये २ लाख ७ हजार ८०० इतकी असल्याचे आरपीएफ कडून सांगण्यात आले. हा गांजा ‘नारकोटिक्स’ विभागाला सुपूर्द करण्यात आला असून हा गांजा कोणी आणि कुठून आणला आहे याचा तपास कल्याण आरपीएफ पोलीसांकडून सुरू आहे.

‘क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन’ (एनजीओ) चे संस्थापक राजेंद्र वखरे ‘सेवा संस्कार २०१९-२१’ पुरस्काराने सन्मानित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आज दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी डोंबिवलीत झालेल्या सत्कार समारंभात गेल्या १९९१ पासून सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार, तथा ‘क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन’ (एनजीओ) चे संस्थापक राजेंद्र वखरे यांना ‘सेवा संस्कार पुरस्कार २०१९-२१’ हा मानाचा समजल्या जाणारा ‘जान्हवी मल्टी फाऊंडेशनचा सेवा संस्कार पुरस्कार २०१९-२१’ जाहीर झाला असून, तो आज दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता, स्थळ ‘जान्हवी मल्टी फाऊंडेशन,’ डोंबिवली (पश्चिम) येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून सन्मानित करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षापासून ‘जान्हवी मल्टी फाऊंडेशन’चे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे व डॉ. प्रेरणा कोल्हे हे सदर कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.

यावर्षी समाज सेवा व पत्रकारिता या क्षेत्रातून श्री.राजेंद्र श्रावण वखरे यांची निवड करण्यात आलेली आहे. ते सन २०१० पासून ‘क्राईम बॉर्डर’ (साप्ताहिक) चे व श्री स्वामी सखा (मासिकाचे) मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

यासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात विशेष कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची पुरस्कारासाठी (जे.एम.एफ ची टीम) निवड करीत असते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी (जे.एम.एफ.) ची टीम परिश्रम घेत आहे.

 

कोणत्याही परवानगी शिवाय अनाधिकृतरीत्या गॅस सिलिंडर भरणारे अटकेत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-६ ने गोवंडी शहराच्या पूर्व उपनगरातील शिवाजी नगर भागातून कोणत्याही परवानगीशिवाय अनाधिकृतरीत्या गॅस सिलिंडर भरणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. पोलीसांनी असे म्हटले की, या गोष्टीमुळे स्फोट होण्याचा धोका असल्याचे माहिती असून ही आरोपी हे काम कोणतीही परवानगी घेतल्या शिवाय करत होते.

अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट-६ ने शिवाजी नगर येथील वर्कशॉप वर छापा टाकला. तेव्हा पोलीसांना तेथे पाच जण हे रेग्युलेटर बदलण्यासह मोठ्या गॅस सिलेंडर मधून लहान गॅस सिलेंडर
मध्ये गॅस रिफिलिंग करत होते. यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी सुद्धा घेतली नव्हती.

पोलीसांना वर्कशॉप मधून १४ भारत गॅस सिलिंडर, १०५ लहान भरलेले सिलिंडर आणि ५४१ रिकामे सिलिंडर त्यांना घटनास्थळी मिळाले. ज्या गोष्टी ते हाताळत होते ते अत्यंत ज्वलनशील होते. मात्र जरा जरी लहान अपघात झाला असता तर तेथे राहणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण झाला असता.