Home Blog Page 197

‘बार्टी’ला निधी कमी पडू दिला जाणार नाही ही वलग्ना, अत्यल्प निधी मंजूर करणाऱ्या ठाकरे सरकार तसेच सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात.. – अमित गोरखे, प्रदेश मंत्री भाजपा महाराष्ट्र प्रदेश


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यभरात रोष निर्माण झाल्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला आज अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३०० कोटी पैकी केवळ ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी खोटी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे केली असली तरी सहा महिने होऊन देखील केली गेलेली अल्प तरतूद ही आघाडी सरकारची अनास्था स्पष्ट करीत असून मी याचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. अत्यल्प निधी मंजूर करणाऱ्या अर्थ विभाग व सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात असल्याचा माझा स्पष्ट आरोप ठाकरे सरकारवर आहे.

‘बार्टी’ मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी ९० कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समिती साठी दीड कोटी असे एकूण ९१.५० कोटी रुपये आज स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आले आहेत.

गेली सहा महिने ‘बार्टी’च्या योजनांची केली जाणारी दुरावस्था पाहता अनुसूचित जाती मध्ये तसेच समाज माध्यमांमध्ये बार्टीच्या योजना बंद पडणार अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. यांपैकी कोणतीही योजना बंद पडणार नाही, यांची काळजी ठाकरे सरकारने घेणे गरजेचे आहे.

राज्य सरकारने केलेली अल्प तरतूद अनुसूचित जातीच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. सरकारने जाणीवपूर्वक गेली सहा महिने निधी मंजूर करण्यात चालढकल केली आहे. सामाजिक न्यायमंत्री त्यांच्याच “घरातील” मालिकेत अडकुन पडल्याने त्यांची धडपड स्वतःचे मंत्रिपद वाचविण्यासाठी सुरू आहे. आघाडी सरकारने आरक्षित वर्गाच्या पदोन्नती मध्ये आरक्षण नाकारले, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला १०० कोटीची घोषणा विधिमंडळात केली परंतु ती अजूनही कागदावरच आहे, ह्या ठाकरे सरकारने आपला डाव अनुसूचित जातीच्या योजना बंद करून त्यातील तरतूद इतरत्र वळविण्यासाठी टाकला आहे असे दिसते .

तरी अनुसूचीत जातीसाठीचा सर्व निधी ,सर्व महामंडळाचा निधी या सरकारने ताबडतोब द्यावा नाहीतर राज्यभर याचे पडसाद उमटतील, असा इशारा भाजपा प्रदेश मंत्री व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी प्रसिध्दी पत्रका द्वारे दिला आहे.

 

‘रोटरी हेल्थ सेंटर’ म्हणजे एक समाजोपयोगी ऊपक्रम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन, या क्लबची स्थापना २८ वर्षांपूर्वी झाली आणि तेंव्हापासून हा क्लब सतत समाजोपयोगी काम करीत आला आहे.

असाच एक समाजोपयोगी आरोग्य सेवा देणारा उपक्रम म्हणजे ”रोटरी हेल्थ सेन्टर”. हा फेब्रुवारी २०२० मध्ये रो. संजय पाटील, संस्थापक अध्यक्ष यांच्या नेत्रूत्वाखाली व रो. अनिल हीरावत यांच्या संकल्पनेने ह्या क्लबने ३०० स्क्वे. फूट च्या छोट्या जागेत सुरु केला. याला गरजु लोकांचा भरघोस प्रतीसाद मीळाला. या सेंटरमधे पॅथॉलॉजिकल,डायग्नोस्टिक, डेंटल सर्व्हिस, ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर , तसेच जनरल ओपीडी या सेवांचा वाजवी दरामध्ये समावेश आहे.
कोविड च्या साथीमध्ये सुद्धा या सेंटरने भरघोस कार्य केले. आरोग्य सेवेची तीव्र गरज लक्षात घेऊन यावर्षीचे क्लबचे अध्यक्ष जितेंद्र नेमाडे रोटरी हेल्थ सेंटरच्या विस्ताराला प्राधान्य देण्याचे ठरविले आणि रोटरी हेल्थ सेंटरच्या कमिटी मेम्बर्सनी ही हा उपक्रम उचलून धरण्याचे मान्य केले आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे सर्व कमिटी तसेच इतरही सदस्य कामाला लागले आणि आता छोट्या जागेतून हे सेन्टर १२०० स्क्वे. फूट च्या मोठ्या जागेत स्थलांतरित झाले आहे.

या कामी कमीटी सदस्य संस्थापक अध्यक्ष संजय पाटील, रो.अनील हीरावत, रो.अजय कुलकर्णी, रो.जीतेंद्र नेमाडे, रो.डॉ.लीना लोकरस, रो.गुलाब पावळे, रो.संदीप खापरे ह्यांचे सहकार्य लाभले आहे.

आता विस्तारीत सेवेमधे वरील सेवेसोबतच डेंटल,फिजिओथेरपी आणि पुढील काळात डोळयांचा दवाखाना, मेडीकल ऊपकरणे ईत्यादी आरोग्य सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार असून आत्तापर्यंत हजारो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. आता जागेची अडचण दूर झाल्याने आणि ह्या सर्व सेवा वाजवी शुल्कात उपलब्ध झाल्याने  अधिकाधिक नागरिकांना ह्याचा लाभ घेता येईल. तसेच  वरील उपचारासाठी अतिशय निष्णात डॉक्टर ही येथे कंन्सल्टंट म्हणून लाभणार आहेत.

या विस्तारीत नवीन जागेचे दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी सध्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मयुरेश वारके यांच्या हस्ते उद्घाटन झाले व माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मोहन चंदावरकर हे उपस्थित होते.डोंबीवली मीडटाऊनचे सदस्य, डोंबीवलीतील इतर रोटरीचे सदस्य तसेच परीसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास ऊपस्थीत होते.

 

नोकरीच्या बहाण्याने बोलावून केली होती हत्या; मारेकऱ्या चौकडीला मानपाडा पोलिसांनी शिताफीने केले अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू नव्हे तर खून झाल्याचा प्रकार मानपाडा पोलिसांनी नुकताच उघड केला आहे. विशेष म्हणजे साक्षीदार किंवा इतर कोणतेही धागेदोरे उपलब्ध नसतानाही मानपाडा पोलिसांनी केवळ एका कॉलच्या सहाय्याने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

११ सप्टेंबरला दुपारी १२:०० च्या सुमारास खंबाळपाडा परिसरात एक व्यक्ती जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत असल्याचे वाहतूक पोलीस बी.एस. होरे यांना आढळून आले होते. कृष्णमोहन तिवारी (वय वर्षे ४७) असे या व्यक्तीचे नाव असून रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यु झाला. मात्र त्याच्याकडे असणाऱ्या आधारकार्ड वरून त्याचे नाव आणि घराचा मिळवत मानपाडा पोलिसांनी घरी चौकशी केली. मात्र पोलीसांना त्यातही विशेष असे काहीच आढळून आले नाही. परंतू त्याच्या मुलीने सकाळी १०:३० च्या सुमारास एक फोन आला आणि त्यानंतर वडील घराबाहेर पडले अशी माहिती पोलीसांना दिली. त्याआधारे पोलीसांनी आपल्या तपासाची सूत्र हलवत कॉल रेकॉर्डची माहिती मिळवली आणि आणखी खोलात तपास करत पोलीसांनी या सर्व खुनाच्या हत्येचा उलगडा केला.

मयत कृष्णकुमार हा मेकॅनिकल इंजिनिअर होता आणि लॉकडाऊनमूळे कतार मधील नोकरी गमावल्याने तो नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी दिव्यातील एका ‘प्लेसमेंट सेंटर’ कडे त्याने आपली माहिती दिली होती. या ‘प्लेसमेंट सेंटर’ मधील माहितीच्या आधारे आरोपी रिहान शेखने याने त्याला मोबाईलवर संपर्क केला होता आणि नोकरीसाठी त्याला कल्याण पूर्वेच्या कचोरे भागात भेटायला बोलावले. त्यानंतर रिहानने साथीदार सागर पन्नालाच्या सहाय्याने आणि सुमित सोनावणे याच्या रिक्षेत बसवत लूटमार करत त्याचा खून केल्याची माहिती कल्याण झोन-३ चे उपयुक्त श्री. विवेक पानसरे यांनी पत्रकारांना दिली. रिहानने अशाप्रकारे आणखीही काही जणांना लुटले असल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली असून त्यादृष्टीने पुढील तपास मानपाडा पोलीसांकडून सुरू असल्याचे सांगितले.

डोंबिवलीचे एसीपी जयराम मोरे, मानपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक निरीक्षक अविनाश वनवे, अनिल भिसे, पोलीस हवालदार काटकर, कदम, चौधरी, पोलीस नाईक यादव, घुगे, सोनवणे, भोसले, डी. एस.गाडगे, किनरे, पवार, पाटील, कांदळकर, आर.जी.खिलारे, कोळी, मंझा यांनी हा गुन्हा उघडकीस आणला असे झोन-३ चे डीसीपी विवेक पानसरे यांच्या कडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

डोंबिवलीत साकारली पुण्यातील श्रीमंत दगडूशेट हलवाई यांच्या गणपतीची हुबेहूब प्रतिकृती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेकडे मानपाडा रोडवरील आयकॉन हॉस्पिटल जवळ असणाऱ्या
‘श्री कॉम्प्लेक्स सोसायटी’ च्या गणपती चे यंदा १० वे वर्ष असून डेकोरेशन संकल्पना आणि निर्मिती श्री.संजय निकते यांची असून दरवर्षी वेगवेगळ्या थीम वर श्री. संजय निकते यांच्या संकल्पनेतून डेकोरेशन साकारले जाते.

या वर्षीची श्रीं ची मूर्ती ही पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या गणपतीची हुबेहूब मूर्ती आणि मंदिर साकारले असल्याने डेकोरेशन ही त्या मूर्तीला साजेसे असे बनविले गेले आहे. त्यामुळे ही कलाकृती पाहण्यासाठी आणि ह्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी डोंबिवलीकरांची गर्दी होत आहे.

‘श्री कॉम्प्लेक्स सोसायटी’ ने सध्याच्या कोविड परिस्थितीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत दर्शन घेणाऱ्या भक्तांना मास्क परिधान करून सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाळत कोरोना सारख्या महाभयंकर रोगाची लागण अथवा त्याचा प्रसार होणार नाही याची पूर्णतः खबरदारी व काळजी घेतली आहे.

 

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा; भाजपा आमदार अतुल भातखळकरांची पोलिसांत तक्रार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता भाजपाने आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली. यामुळे या मुद्द्यावरून आता शिवसेना विरुद्ध भाजपा हा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत ? असा सवाल त्यांनी उपस्थित करत मुख्यमंत्र्यांविरोधात कलम १५४अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असे अतुल भातखळकर यांनी सांगितले. तसेच, उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला ‘सामना’ या दैनिकात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या राज्यात कायद्याचे राज्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तीन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावू, असे भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

याचबरोबर, तक्रार दाखल करण्याआधी मुख्यमंत्री ठाकरे यांचा निषेध करताना भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता परप्रांतीयांचा हिशोब ठेवणार आहेत. परप्रांतीय कुठून येतात, कुठे जातात याबाबत पोलीस परप्रांतीयांच्या नोंदी ठेवतील असे मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्र्यांना असे सांगताना लज्जा वाटायला हवी होती. कारण याच परप्रांतीयांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही ‘लाही-चणा’ हा कार्यक्रम ठेवता. ‘केम छो वरली’ म्हणता. काँग्रेसच्या सोबत जाण्यामुळे काय तुम्ही रोहिंग्यो मुसलमानांना विसरून गेलात का ? बांगलादेशी मुसलमानांच्या कारनाम्यांना विसरलात का ?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत.

उद्धव ठाकरे यांचे पोलिसांना निर्देश

१) गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच, स्थानिक पोलीसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे.

२) इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.

३) जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.

४) निती आयोगाच्या उद्या (मंगळवारी) होणाऱ्या बैठकीत जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी.

५) शक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर दिला जाईल.

६) महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी संवाद साधून, विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये.