Home Blog Page 199

९ वर्षाच्या मुलाचे ४० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौकडीला कल्याण क्राईम ब्रँच घटक-३ ने ठोकल्या बेड्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंबरनाथमधील वडापाव विक्रेत्याच्या ९ वर्षीय मुलाचे ४० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौघांना अटक करण्यात क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिट-३ ला यश आले आहे. अंबरनाथ पूर्वेकडे राहणाऱ्या सोनूकुमार बारेलाल सविता यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सोनू कुमार यांच्या कृष्णा नावाच्या नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. कृष्णा चौथ्या इयत्तेत ‘न्यू डेक्कन इंग्लिश स्कूल’मध्ये शिक्षण घेतो. सद्या शाळा बंद असल्यामुळे तो घरीच होता. परंतु जवळच असलेल्या ट्युशनसाठी जात होता. बुधवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ नंतर ‘परशुराम रेसिडेन्सी’ येथून येत असताना अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केले. आई-वडिलांना कृष्णा सुखरूप परत हवा असेल तर चाळीस लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी इंटरनेट कॉल वापरून अपहरणकर्त्याने दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण तपास यंत्रणा कामाला लागली. कृष्णाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणण्यासाठी क्राईम ब्रँचचा तपासाला वेग वाढला होता. त्यासाठी घटना घडलेल्या परिसरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यावरून संशयित इसमाचे फोटो तयार करण्यात आले. संशयिताच्या वर्णनाप्रमाणे कुणी व्यक्ती या परिसरात आली आहे अगर कसे याविषयी सर्व ठिकाणी स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रँचने सर्वत्र शोध घेतला. संगणक तज्ज्ञांची देखील मदत घेण्यात आली. तांत्रिक विश्लेषण व प्रत्यक्ष फिल्डवरील माहितीचे साह्य घेऊन कृष्णाचे अपहरण करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणांनी तपास चक्रांना वेग दिला.

क्राईम ब्रँचच्या युनिट-३ चे विनोद चन्ने, किशोर पाटील आणि बाळा पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वपोनि विलास पाटील, सपोनि भूषण दायमा, फौजदार मोहन कळमकर यांच्यासह पथकाने सापळा रचला आणि अपहृत कृष्णाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणले. त्याचबरोबर खंडणीसाठी कृष्णाच्या अपहरणाचा कट रचणाऱ्या प्रभात कुमार अमरसिंह वय ३० वर्ष, अमजद मन्सूर खान २३ वर्ष, योगेंद्र जवाहरलाल सिंग २० वर्ष, सुनिल सिताराम लाड ५७ वर्ष या चार अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. अपहरणकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून कृष्णाशी ओळख वाढवली. त्याच्यासोबत क्रिकेट खेळणे, चॉकलेट देणे, गप्पा मारण्याच्या माध्यमातून त्यातील एकाने कृष्णाशी मैत्री केली. मात्र स्वतःचे नाव कृष्णाला कळू दिले नाही. अपहरणकर्त्यांनी कृष्णाचे अपहरण केले मात्र त्याला काहीही कळू न देता त्याच्या आई-वडिलांकडे चाळीस लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुमच्या मुलाला ठार मारण्यात येईल, अशीही अपहरणकर्त्यांनी धमकी दिली होती. मात्र अपहरणकर्त्या चौघांच्या तावडीतून कृष्णाची सुखरूप सुटका करण्यात क्राईम ब्रँचला यश आले. सर्वच स्तरातून कल्याण क्राईम ब्रँच घटक-३ चे कौतुक होत आहे.

 

डॉ. उज्वला चक्रदेव यांची ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर येथील ‘मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’च्या प्राचार्या डॉ. उज्वला शिरीष चक्रदेव यांची ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी’ (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी दि. ११ सप्टेंबर रोजी डॉ. उज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.

डॉ. उज्वला चक्रदेव (जन्म २७.०८.१९६२) यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्हीआरसीई येथून वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम.टेक तसेच वास्तुविद्याशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी प्राप्त केली. डॉ. उज्वला चक्रदेव यांनी ‘मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी पर्यवेक्षक म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर ३६ वर्षांचा अनुभव लाभला आहे.

‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ २ जुलै २०२१ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती न्या. यतिंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. पुणे येथील आयआयटीचे महासंचालक डॉ. अनुपम शुक्ला व राज्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. उज्वला चक्रदेव यांची पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

 

कसलाही विलंब न करता तात्काळ आरोपींना फाशी द्यावी; केंद्रीय पत्रकार संघ, (सी.पी.जे.ए) चे राज्य सरकारला निवेदन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी मुंबईतील साकिनाका परिसरात अमानवी स्वरूपात जो एका महिलेवर बलात्कार केला गेला हे मुंबई सारख्या उच्च शिक्षित व विकसित शहरात घडणं हे अतिशय लज्जास्पद व घृणास्पद आहे असे केंद्रीय पत्रकार संघ, (सी.पी.जे.ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी म्हटले आहे. दुर्दैवाने त्या महिलेचा राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

खरंच महिला या मुंबईत सुरक्षित आहेत का ?

हा प्रश्न एक मुंबईकर म्हणून सर्वांना नक्कीच पडला असणार. सध्या सर्वच राजकीय पक्ष राजावाडी रुग्णालयाच्या बाहेर उभे राहून आपआपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पण फक्त प्रतिक्रिया देऊन, एकमेकांवर ताशेरे ओढून अश्या गुन्ह्यांवर आळा घालता येऊ शकतो का ? या अगोदरही अश्या बऱ्याच घटना घडल्या आहेत पण त्या नंतर काय झालं ? काही आंदोलन झाली… मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहल्या गेल्या… झालं ? विषय संपला ? या मध्ये फक्त राजकारणी लोकांनी एकमेकांवर तसेच पोलीसांवर बोट दाखवत आपआपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. या मध्ये बळी कोण पडला ? सामान्य नागरिक.
पण आता बस्स… भरपूर झालं…

आम्हाला कोणत्याही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकायच्या नाहीत. तुमच्या राजकारणाला आम्हाला बळी पडायचं नाही. आम्हाला फक्त आशा आहे ती तात्काळ न्याय मिळण्याची. अश्या सैतानवृत्ती असलेल्या नराधमांना भर चौकात फाशी द्या. म्हणजे पुन्हा असे कृत्य करताना असे नराधम थरथर कापतील.

माझे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांना हाथ जोडून निवेदन आहे की कृपया आपण कसलाही विलंब न करता आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यावी असे केंद्रीय पत्रकार संघ, (सी.पी.जे.ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.

त्याचप्रमाणे तमाम महाराष्ट्र वासीयांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना, मुलींना तुम्ही उच्च शिक्षण तर देतच आहात पण सध्या समाजात ज्या गोष्टी घडतं आहेत त्या लक्षात घेता आपल्या मुलींना व मुलांना काही काळासाठी आपला मोबाईल बाजूला ठेवून स्व-संरक्षण कसे करता येईल त्यासाठी कराटे, ज्यूडो, लाठीकाठी, दांडपट्टा, ई. सारख्या शस्त्रांचे प्रशिक्षण सुद्धा द्यावे की जेणेकरून अश्या घटनांना आळा घालण्यास मदत होईल व आपली मुलं ही सुरक्षित राहतील असे केंद्रीय पत्रकार संघ, (सी.पी.जे.ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी म्हटलं आहे.

गुन्हे शाखा कल्याण घटक-३ कडून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण बाजारपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं ३२२/२०२१ भादवि कलम ३९३,३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक-३ कल्याण यांच्याकडून चालू असताना गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईल फोनबाबत तांत्रिक तपास केला असता सदर मोबाईल फोन हा भिवंडी येथील राहणारा एक इसम वापरत असल्याची माहिती समोर आली. सदर उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे भिवंडी येथे गुन्हे शाखा घटक-३ कल्याण च्या पथकाने त्या इसमाचा शोध घेतला असता तो सापडला व त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा फोन जप्त केला.

त्यांनतर सदर इसमकडे चोरीच्या मोबाईल बाबत सखोल चौकशी केली असता तो मोबाईल त्यास त्याच्या एका ओळखीच्या इसमाने दिला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्या दुसऱ्या इसमाचा शोध घेतला असता तो सापडला व त्याच्याकडे विचारपूस केली असता तो उडवा-उडवी ची उत्तरे देत आहे म्हणून सदर दोन्ही संशयित इसमांना पुढील कारवाई करिता भिवंडी शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास भिवंडी शहर पोलीस स्टेशन करत आहेत असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

कल्याण गुन्हे शाखा घटक -३ कडून मटका जुगाराचा अड्डा उध्वस्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याणच्या गुन्हे शाखा घटक-३ चे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना आंबिवली रेल्वे स्टेशनच्या बाजूला, मोहने गाव कल्याण येथे जुगाराचा अड्डा चालू असल्याची गुप्तरीत्या माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार आंबिवली रेल्वे स्टेशनच्या बाजूला मोहनेगाव येथे छापेमारी केली असता सदर ठिकाणी नऊ इसम जुगार खेळताना सापडले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराची साधने व मोबाईल फोन असा एकूण ८८,८५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

त्याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५, सह भादवि कलम १८८, २६९, २७० सह कोविड-१९ उपाय योजना नियम २०२० चे नियम ११ सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम १९९७ चे कलम २,३,४ अन्वये खडकपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर जुगाराच्या ठिकाणी मिळून आलेल्या मुद्देमालासह नऊ जणांना खडकपाडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी करत आहेत.

प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पोलीस निरीक्षक श्री.विलास पाटील, सपोनि भूषण एम.दायमा, पोउनि मोहन कळमकर, सपोउनि विलास मालशेटे, सपोउनि संदीप भालेराव, पोहवा प्रकाश पाटील, पोहवा राजेंद्र खिलारे, पोहवा राजेंद्र घोलप, पोहवा मंगेश शिर्के, पोहवा अनुप कामत, पोना हरिश्चंद्र बांगारा, पोना सुरेश निकुळे, पोना विलास कडू, पोशि मिथुन राठोड, पोशि विलास चन्ने, पोशि विजेंद्र नवसारे यांनी केले आहे.