Home Blog Page 200

राज्य AJFC फोर्स पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदी सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार शहाजहान आत्तार यांची एक मताने निवड!

कोल्हापूर, (१० सप्टेंबर) : आज कोह्लापुर येथे संघटनेची बैठक मा.विवेक म्हमाने पाटील केंद्रीय खजिनदार यानी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार शहाजहान आत्तार  सोलापूर यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
यावेळी केंद्रीय सचिव हाजी अब्दुलभाई शेख उपस्थित होते. नूतन राज्य अध्यक्ष शहाजहान आत्तार यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मा.अशोक पद्मने साहेब उपस्थित होते.
आत्तार यांच्या नियुक्ती बद्दल संपूर्ण राज्यात अभिनंदन होत आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या. नियुक्ती नंतर बोलताना आत्तार यानी संपूर्ण राज्याचा दौरा करुन राज्यातील प्रत्येक तालुक्यात सदर संघटना पोहचविण्याचा निर्धार व्यक्त केला व जिल्हाअध्यक्ष निवड लवकर करणार असल्याचे जाहीर केले.

शासन दरबारी पत्रकारांना पेंशन योजना मोफत, एसटी बस, रेल्वे प्रवास, शासनाच्या खुल्या जागांवर प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचे कार्यालय पत्रकार भवन पत्रकार घर संकुल हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले व राज्य अधिस्वीकृति समितीवर AJFC चे दोन प्रतिनिधी घेणे बाबत शासनास भाग पाडू व या सर्व मागण्या बाबत  तीव्र लढा संपूर्ण राज्यभर उभा करू असे जाहीर केले. याबाबत केंद्रीय अध्यक्ष व पदाधिकारी यांना घेऊन मा. मुख्यमंत्री व संबधित अधिकारी यांना शिष्टमंडळ घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले.

तसेच AJFC पदाधिकारी व सदस्य यांचा अभ्यास दौरा शासन आयोजित करणार असल्याचे सांगितले. शेवटी केंद्रीय सचिव हाजी अंदुल भाई शेख यानी पुष्प गुछ देऊन त्याना शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले. केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल यांच्या मार्गदर्शना खाली एकमताने निवड केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोघांना लाच घेताना एसीबी कडून रंगेहात अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

फसवणूकीच्या गुन्ह्यात जामिनासाठी मदत करण्यासाठी एकाकडून पाच लाखांची लाच मागणाऱ्या विमानतळ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी पकडले.

एक लाख रुपये स्वीकारता ही कारवाई करण्यात आली

सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील आणि संतोष भाऊराव खांदवे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या वडिलांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराने वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जामीनांस विरोध न करणे तसेच अनुकुल अभिप्रायासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती. तडजोडीत तक्रारदाराने तीन लाखांची लाच देण्याचे मान्य केले. लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाखांची मागणी करण्यात आली होती.

बपाटील यांनी त्यांचा ओळखीचे खांदवे याला तक्रारदाराकडून लाच घेण्यासाठी लोहगाव परिसरात पाठविले. दरम्यान, या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून खांदवेला एक लाखांची लाच घेताना पकडले. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

नारायण राणे यांच्या पत्नी नीलम आणि मुलगा नितेश यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राणे यांच्या पत्नी नीलम आणि मुलगा, भाजप आमदार नितेश यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रांचकडून लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना विरुद्ध राणे कुटुंब असा वाद रंगला आहे. त्यात लुकआऊट नोटीसची आता भर पडली आहे.

आमदार नितेश राणे आणि त्यांच्या मातोश्री नीलम राणे यांनी ‘डीएचएफएल’ कंपनीकडून ४० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यातील २५ कोटी रकमेची परतफेड झाली नाही. त्यामुळे ‘डीएचएफएल’ कंपनीने राणे कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी नितेश राणे आणि नीलम राणे यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. राणे कुटुंबाने ‘डीएचएफएल’ कंपनीकडून ‘आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड’साठी कर्ज घेतलं होतं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे हे सहअर्जदार आहेत.

महत्वाची बाब म्हणजे हे कर्ज खातं हे मुंबईचं आहे. मग पुणे पोलिसांनी कारवाई कशी केली? असा प्रश्नही विचारला जात आहे. दरम्यान, ‘डीएचएफएल’ने तक्रार दिली होती. त्यामुळे राहिलेलं कर्ज न देता राणे कुटुंब परदेशात पळून जाऊ शकतं, त्यामुळे हे लूकआऊट नोटीस देण्यात आल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे.

याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, केंद्र सरकारकडून एक पत्र गृह विभागाला प्राप्त झालं होतं. त्यानंतर ते पत्र आम्ही पुणे पोलिसांना पुढील कार्यवाहीसाठी दिले.

दुसरीकडे राणे कुटुंबीयांना लुकआऊट नोटीस दिली असेल तर केवळ राजकीय सुडबुद्धीने राज्य सरकार कारवाई करतंय. ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक झाली तसेच हे राज्य सरकारचं पुढचं पाऊल आहे असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला.

आम्ही हायकोर्टात आव्हान देणार : नितेश राणे

दरम्यान, यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे सर्क्यूलर पुणे पोलिसांनी काढलं आहे. पण आमचे ‘डीएचएफएल’चे खाते मुंबई ब्रांचमध्ये आहे. त्यामुळे पुणे क्राईम ब्रांचला हा अधिकार कसा?, तसेच आम्ही ५ महिन्यापूर्वी सबंधित बँकेला आम्हाला लोन सेटल करायचं आहे, असं अधिकृत पत्र दिलेलं आहे. त्यामुळे अशा नोटिसीचा उपयोग नाही. याप्रकरणात आम्ही हायकोर्टात जाऊन आव्हान देणार आहोत. नारायण राणेंच्या कुटुंबाच्या अडचणी नाही तर आता क्राईम ब्रांचच्या अडचणीत वाढ होणार आणि महाविकास आघाडीची अडचण होणार आहे.

हे सर्क्यूलर कुणी काढलं असेल यावर बोलतांना नितेश राणे म्हणाले, सर्क्यूलर कुणी काढलं हे या ठाकरे सरकारला विचारा. यांची झोप आम्ही उडवत आहोत. आता यांचे सगळे भ्रष्टाचाराचे विषय बाहेर निघणार आहेत. त्यामुळे अडचणी आमच्या वाढणार की ठाकरे सरकारच्या वाढणार हे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात कळेलच. तसेच लुकआउट नोटिस संदर्भात आम्ही हायकोर्टात बोलू.

गणेशोत्सव काळात दर्शन ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यभर कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने २९ जून २०२१ रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

  • सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
  • कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
  • यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
  • श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणपतीकरिता 2 फूटांच्या मर्यादेत असावी.
  • यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.
  • उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / शिबीरे (उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
  • लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही.
  • आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
  • श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • दिनांक ८ सप्टेंबर २०२१ च्या शुद्धीपत्रकानुसार, गणेशमूर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्यात यावे.
  • श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.
  • महापालिका विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
  • कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आले आहे.

मीरारोडच्या नयानगर परिसरात एकाच घरात आढळले तीन मृतदेह! परिसरात उडाली खळबळ

मिरारोड: मिरारोडच्या नयानगर परिसरातील नरेंद्र पार्कच्या एका इमारतीत एकाच घरातील तीन जणांचे मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नयानगरच्या नरेंद्र पार्कमधील जुही को-आप हा.सोसायटी या इमारतीच्या बिल्डिंग नंबर 2 सी विंगमधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र.३२ मध्ये ही घटना घडली आहे. मृतदेहामध्ये आई, मुलगी व मुलगा यांचा समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

मिरारोडमधील नयानगर परिसरातील नरेंद्र पार्क जुहू सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील सदनिका ३२ मध्ये तीन मृतदेह आढळून आले आहे. यामध्ये आईसह दोन मुलांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळी घरातील एका वयोवृद्ध व्यक्तीच्या उठल्यावर लक्षात आले की, आपल्या मुलीसह नातवंडे बेशुद्ध पडले आहेत याची माहिती त्यांनी शेजारी व्यक्तींना दिली. स्थानिकांनी नयानगर पोलिसांना माहिती दिली असता घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले होते. संशयास्पद मृत्यू असल्याने पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवली आहेत.

आत्महत्या केलेली महिला आपल्या वडिलांच्या घरी राहत होती. एक वर्षापूर्वी महिलेचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून महिलेची अर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्यामुळे ती महिला मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती शेजारच्या लोकांनी दिली आहे. मृत महिलेला तिची दोन्ही मृत मुले गतिमंद असल्याने इमारतीच्या आवारात देखील मुलांना खेळण्यास पाठवत नव्हती.

महिलेच्या घरात झोपेच्या गोळ्या आढळून आल्या आहेत, त्यामुळे सदर महिलेने झोपेच्या गोळ्या स्वतः खाऊन मुलांना देखील देऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या संदर्भात पोलिसांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या तिघांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला? हे स्पष्ट होणार आहे.