Home Blog Page 204

कोरोना चाचणी बनली चाकरमान्यांसाठी संतापाची लाट!

संपादक: मोईन सैय्यद/प्रतिनिधी: गणेश नवगरे

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांवर करोना चाचणीची किंवा लसीकरणाची अट घालण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.  मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्यातरी अशा अटी घालणे शक्य नसल्याचे स्पष्ट करीत याबाबत तोडगा काढण्याचे सूतोवाच रविवारी केले. त्यामुळे  दोन्ही जिल्हाधीका-यांच्या निर्णयामधे बदल केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रवेश करण्याच्या ७२ तास आधी करोना चाचणी अहवाल बंधनकारक करण्याचा किंवा दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच कोकणात प्रवेश देण्याचा निर्णय येथील  जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच घेतला. परंतु त्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

त्यामुळे याप्रकरणी आरोग्यमंत्री टोपे यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. ”लसीकरण कमी असल्याने दोन लसमात्रा घेतलेल्यांना कोकणात प्रवेश किंवा करोना चाचणी बंधनकारक करणे सध्यातरी शक्य नाही. परंतु याबाबत दोन ते तीन दिवसांत तोडगा काढला जाईल”, अशी माहिती टोपे यांनी दिली.

करोनाची लक्षणे वगैरे असतील, तर चाचणी करणे योग्य आहे. दोन लसमात्रा घेतलेल्यांचे प्रमाणही कमीच आहे. त्यामुळे शारीरिक अंतर ठेवणे आणि मास्क बंधनकारक करणे हे नियम योग्य आहेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. सध्या सिंधुदुर्गात करोनाबाधितांचे प्रमाण ३.२४ टक्के आणि रत्नागिरीत २.६५ टक्के आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या स्पष्टीकरणानतर बहुधा उद्याच जिल्हाधिका-यांनी दिलेल्या निर्णयात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता गुगल मॅपवर समजणार प्रवासाआधीच टोलची रक्कम

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह

मुंबई: गुगल मॅपमुळे अनेकदा प्रवास सोपा आणि आरामदायी वाटतो. रस्ता शोधणे, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या मार्गावर ट्रफिक आहे, याची माहिती गुगल मॅपमुळे मिळते. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना लोक गुगल मॅपला प्राधान्य देतात. युजर्सच्या सोयीसाठी येत्या काही महिन्यांत गुगल मॅप्सचे नवे अपडेट येणार आहे.

नव्या फिचरमुळे गुगल मॅप मार्गात येणाऱ्या टोल्सची किंमतही सांगेल. यामुळे प्रवास सुरू करण्याआधीच प्रवासादरम्यान किती टोल टॅक्स भरावा लागेल, याची माहिती मिळेल. कंपनी सध्या या फिचरवर काम करत आहे.

आधीपासूनच गुगल मॅप देशातील सर्व मार्गांवरील टोल ओळखतात आणि दाखवतात. या आधीच्या फिचरचा वापर करत त्याला अपडेट करत युजर्सला टोलची अंदाजे किंमत देण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे.

याअंतर्गत प्रवासाआधी टोलच्या किमती ड्रायव्हिंग मार्गावर दाखवल्या जातील. लांब पल्ल्याच्या रोड ट्रीपसाठी जाणाऱ्या लोकांसाठी हे अतिशय उपयुक्त फिचर ठरणार आहे.

मुलीने आंतरजातीय लग्न केले म्हणून बहिष्कृत देशमुख कुटुंब वाळीत प्रकरणी नंदिवाले समाजाने सामंजस्य भूमिकेतून आपला बहिष्कार मागे घेतला; महाराष्ट्र अंनिस च्या मध्यस्थीने ऐतिहासिक निर्णय..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सातारा दि. २६ ऑगस्ट २०२१ मेढा ता. जावळी येथील रहिवासी शशिकांत देशमुख यांच्या मुलगी रोमाली देशमुख हिचा विवाह तिच्या पसंतीनुसार व सर्व समाजाला सांगून विवाहाला निमंत्रित करून आंतरजातीय केला असतानाही त्यांच्याच समाजातील नंदिवाले समाजातील जात पंच यांनी देशमुख कुटुंबियांना बहिष्कृत केले. त्यांनंतर समाजातील अनेक कार्यक्रमांना त्यांना बोलावले नाही. या बहिष्कार प्रकरणात पोलादपूर जि.रायगड नागेवाडी सातारा मेढा जि.सातारा रत्नागिरी असे तीन जिल्ह्यातील जात पंच सहभागी होते.याबाबत सातारा जिल्हा अंनिस कडे जुलै २१ रोजी लेखी तक्रार आली होती. याची गंभीर दखल घेऊन सातारा पोलीस अधीक्षक मा.बन्सल साहेब यांची अंनिस शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करून सामाजिक बहिष्कार कायदा अस्तित्वात असूनही अशा घटना घडत आहेत याकडे लक्ष वेधून संबंधित पंच व तक्रादार यांना बोलवून चर्चा करावी व सामंजस्य करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करावा अन्याय रीतसर सामाजिक बहिष्कार कायद्याच्या कलमान्वये कायदेशीर कारवाई करावी असे आदेश दिले. या अनुषंगाने मेढा पोलीस स्टेशन चे सपोनि. अमोल माने व सातारा जिल्हा अंनिस आणि संबंधित सर्व पंच तसेच तक्रारदार यांचे समक्ष आज सामंजस्य बैठक झाली. बैठकीत सर्व बाजूनी चर्चा करून जात पंचायत या द्वारे दिले जाणारे अन्यायकारक निर्णय यापुढे घेतले जाणार नाहीत. देशमुख कुटुंबातील सर्वाना यापुढे सामावून घेऊन कार्यक्रम घेतले जातील. याही पुढे जाऊन सर्वच जात पंच यांना एकत्रित करून जातपंचायत बरखास्त करून एक आदर्श निर्माण करू असे आश्वासन सर्वच उपस्थित पंचांनी दिले.

तसेच समाजातील आंतरजातीय लग्न केलेल्या व बहिष्कृत केलेल्या सर्व जोडप्याना व इतर लोकांना एकत्रित बोलावून परत समाजात घेण्याचा निर्णय व त्यांचा सत्कार करू असेही नियोजन भविष्यात करू असे एकमुखाने सर्वांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर प्रशांत पोतदार जात निर्मूलन चे राज्य सदस्य शंकर कणसे बुवाबाजी संघर्ष राज्य सदस्य भगवान रणदिवे जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने शाखा कार्याध्यक्ष डॉ. दीपक माने जावळीचे अंनिस कार्यकर्ते प्रतापराव सकपाळ श्री.कांबळे ऍड. दयानंद माने हे सर्वच जण बैठकीला उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला.

नोव्हेल’ संस्थेच्या हॉटेल मॅनेजेंट कॉलेज मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना यशस्वी प्रशिक्षण..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांसाठी ‘नोव्हेलस् एन.आय.बी.आर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ निगडी, येथे खानपान सेवा व्यवस्थापन आणि शिष्टाचार ह्या विषयी तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित करून विशेष प्रशिक्षण दिले गेले, कोविड महामारीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना गेले दीड वर्ष सर्वतोपरिने अहोरात्र मदत करणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन ‘नोव्हेल’ने अभिनव पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली.

पंचतारांकित हॉटेल्समधील प्रमाणांनुसार, पोलीस आयुक्तालयात आलेल्या अतिथिंचे आदरातिथ्य कसे करावे आणि खानपान सेवा पुरवताना कोणते शिष्टाचार पाळण्यात यावेत याबद्दल सहभागी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उत्साही आणि जिज्ञासू कर्मचाऱ्यांनी ही कार्यशाळा उत्तमरीत्या पुर्ण केली. मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून हे कर्मचारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अतिथी सेवेला वेगळ्या उंचीवर नेतील अशी अपेक्षा आहे.

कार्यशाळेच्या अंतिम सत्रात, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. कृष्ण प्रकाश, नोव्हेल ग्रूपचे संस्थापक-अध्यक्ष श्री. अमित गोरखे आणि प्राचार्य श्री. वैभव फंड ह्यांनी प्रशिक्षनार्थिंचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

याप्रसंगी श्री. कृष्ण प्रकाश यांनी आपल्या भाषणात प्रशिक्षण यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल ‘नोव्हेल कॉलेज’चे अभिनंदन केले. अशा कार्यशाळा कर्मचाऱ्यांच्या बहुअंगी विकासाकरता अतिशय उपयुक्त असून, मनोबल वाढविण्यास पूरक ठरतात असे मत त्यांनी मांडले. संस्थेच्या कामावर विश्वास ठेऊन प्रशिक्षणाची जबाबदारी ‘नोव्हेल’ला दिल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे आभार मानून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे एकत्रित काम करण्याचा आशावाद श्री. अमित गोरखे यांनी व्यक्त केला. कार्यशाळेच्या माध्यमातून कोविड योध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली याबद्दल प्राचार्य श्री. वैभव फंड यांनी आनंद व्यक्त केला व प्रशिक्षणार्थींची जिज्ञासू वृत्ती, सृजनशीलता आणि तत्परता ह्या गुणांचे कौतुक केले.

प्रशिक्षणाची संकल्पना पोलिस उपायुक्त मा. श्री. सुधीर हिरेमठ यांची होती तर आयोजनात सहा. सह आयुक्त श्री. नंदकुमार पिंजन यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रशिक्षण देण्याची जबाबदारी प्रा. शंतनु देशपांडे यांनी प्रा. यशवंत सटानकर, प्रा. सतीष ब्राम्हणे व नोव्हेल कर्मचारी वृंदाच्या मदतीने पार पाडली.

 

प्रथम मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा !! ठाकरे सरकार राजकीय दहशतवाद पसरवत आहेत – राधाकृष्ण विखे पाटील

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नारायण राणेंच्या समर्थनार्थ भाजपाचे शिर्डीत आंदोलन

राज्यात शिवसेनेचे स्वतःला मोठे नेते समजणारे काही, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या स्तरावर जावून टिका टिप्पणी करतात. मात्र ‘भारतीय जनता पक्ष’ कधीच अशा प्रकारे कारवाईचा बडगा दाखवत नाही. आता आम्हाला देखील जून्या रेकॉर्डिंग काढून पुरावे सादर करावे लागतील. तेव्हा पोलीस प्रशासन अशा नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार का ? असा सवाल शिर्डीचे आमदार तथा भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या आंदोलनाच्या वेळी उपस्थित केला.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सवी वर्ष’ की ‘हिरक महोत्सव’ हेच माहीत नसावं ही शोकांतिका असून यावर भाष्य करतांना नारायण राणे बोलले. मात्र सर्वात आधी मुख्यमंत्र्यांनीच माफी मागणे अपेक्षित आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष झालीत हेच जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच माहीत नसेल तर प्रथम त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला पाहीजे अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी बोलताना केली.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सवी वर्ष’ असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी ‘हिरक महोत्सव’ हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘अमृत महोत्सव’ असल्याचं सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज ७४ वर्षे पूर्ण करुन ७५ व्या वर्षात हिरक महोत्सवी… नाही अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुनच केंद्रीय मंत्रो नारायण राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखालीच लगावली असती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या विधाना नंतर राज्यात याचे पडसाद उमटून आले. यानंतर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. तर त्याच बरोबर रात्री उशिरा जामीन मंजूर झाला. नारायण राणे यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्ष ऍक्शन मोडवर आला. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यभर आंदोलन छेडणाचा ईशारा दिल्यानं शिर्डीत भारतीय जनता पार्टीचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वावाखाली आंदोलन करण्यात आले.

शिर्डीतील प्रांतअधिकारी कार्यलयासमोर राधाकृष्ण विखे पाटलांसह भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, नगरसेवक रविंद्र गोंदकर, रविंद्र कोते, ज्ञानेश्वर गोंदकर यांच्या उपस्थित महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे सरकारने राज्यात राजकीय दहशतवाद सुरु केला असून पोलीस प्रशासनाचा चुकीचा वापर करत खोटे गुन्हे दाखल करत आहे. राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच या घटनेची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन शिर्डी प्रांतअधिकारी गोंविद शिंदे यांना देण्यात आले.