Home Blog Page 205

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची तैयारी सुरू! एकेरी प्रभाग रचनेमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे पत्ते होणार कट?

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी

मुंबई: कोरोना महामारीमुळे राज्यातील वसई-विरार सारख्या अनेक महानगरपालिकेची मुदत संपली असून देखील निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाची प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाण्यासह 18 महत्वपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असून त्याची तयारी आता राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या महानगरपालिकांचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

निवडणूक आयोगाने 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांना हे पत्र पाठवले आहे यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी- निजामपूर, मीरा-भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे.

या सर्व महापालिकांची लोकसंख्या आणि व्यापकता लक्षात घेता निवडणुका वेळेवर घेण्यासाठी आत्तापासूनच नव्याने प्रभाग रचना करणे आवश्यक असल्याच्या निवडणूक आयोगाच्या महापालिका आयुक्तांना सूचना आहेत.

राज्य सरकारने बहुसदस्य प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्य प्रभाग पद्धत लागू केली आहे त्यामुळे राज्यात यापुढे पॅनेल पद्धती बंद होणार असून प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असणार आहे. यापूर्वी काही महापालिकांमध्ये प्रत्येक प्रभागात किमान ३ तर काही महानगरपालिकांमध्ये ४ सदस्य होते.

भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्यातील महानगरपालिका निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने म्हणजेच पॅनेल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याचा भाजपला फायदा देखील झाला होता. मात्र आता आघाडी सरकारने एक सदस्य प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात राजकीय पक्षांची त्यातही विशेषतः भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

बहुसदस्यीय प्रभाग रचना संपुष्टात आल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असून एकाच प्रभागात अनेकांची दावेदारी केली जाणार असल्यामुळे सगळ्याच नगरसेवकांना तिकीट देऊन समाधान करणे शक्य नसल्यामुळे पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्याचे एक मोठे आव्हान राजकीय पक्षांसाठी ठरणार आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ३ पक्षांची महाविकास आघाडी झाल्यानंतर पहिल्यांदाच महत्त्वाच्या शहरांच्या महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. यात ३ पक्षांचं आघाडी सरकार तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच जनतेकडून काय कौल येतो? तो या ३ पक्षांच्या बाजूने असेल की भाजपाच्या बाजूने? हे दिसून येणार आहे.

एकीकडे काँग्रेसने स्वबळावर महानगरपालिका निवडणुका लढवण्याचं ठरवले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिका निवडणुकांच्या बाबतीत आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही.

शिवसेनेने देखील एकाला चलो रे ची भूमिका कायम ठेवल्याने ते या निर्णयावर शेवटपर्यंत कायम राहतात का? आणि यानंतर काँग्रेसला, शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला किती यश मिळतं हे देखील स्पष्ट होणार आहे. तर भाजपची एकाकी लढत त्यांना किती यश मिळवून देईल हे देखील स्पष्ट होणार असून येणाऱ्या काळात जनतेचा कौल कोणत्या पक्षाच्या बाजूने असेल हे देखील स्पष्ट होणार आहे.

२ वर्षांपासून फरार आणि घरफोडीच्या ७ गुन्ह्यात हवा असलेला सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट-३ च्या जाळ्यात..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज दिनांक २५/०८/२०२१ रोजी मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि. ६६५/२०१८ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४,४११,४१४ शस्त्र कायदा ४,२५ सह म.पो.का.क.३७(१)१३५ प्रमाणे दाखल  ८,४३ ९०० रुपयांची डोंबिवलीतील सोनारपाडा येथील डी.एस.एजन्सी नावाचे गोडाऊन चे शटर उचकटून लोखंडी तलवार सोबत बाळगत झालेल्या चोरीच्या  गुन्ह्यातील हवा असलेला फरार आरोपी नामे आकाश ऊर्फ बाटल्या राजू सिंग (वय: २१ वर्ष) राहणार अनंत शिंगटे चाळ, खरवई गाव, रामबाग बदलापूर (पूर्व) यास गुन्हे शाखा युनिट-३ च्या पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात त्यास अटक केली आहे.

अटक आरोपी याच्या गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता त्याच्यावर खालीलप्रमाणे गुन्हे नोंद आहेत.
१) बदलापूर पोलिस ठाणे गु.रजि.६१/२०१८ भादवी कलम ३७९,३४
२) बदलापूर पोलीस ठाणे गु.रजि.१७१/२०१७ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४
३) बदलापूर पोलीस ठाणे गु.रजि.३०/२०१८ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४
४) शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.रजि.३२९/२०१७ भादवी कलम ४५४,४५७,३८०
५) शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.रजि. १९०/२०१६ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४
६) शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.रजि.२३५/२०१६ भादवी कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे दाखल आहेत.
सदर आरोपीवर एकूण घरफोडीचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी हा रात्री घरफोडी करण्यात अत्यंत हुशार आणि चपळ आहे. घरफोडी करताना त्याच्या जवळ तीक्ष्ण धारदार हत्यार बाळगायची त्याला सवय आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील खतरनाक गुन्हेगार असून घरफोडीचे बदलापूर पोलीस स्टेशनला ३ गुन्हे दाखल आहेत, बदलापूर शिवाजीनगर पोलीस स्टेशन ला ३ गुन्हे दाखल आहेत, आणि डोंबिवली येथील मानपाडा पोलीस स्टेशनला १ गुन्हा दाखल आहे असे एकूण ७ घरफोडीचे गुन्हे दाखल असून सदर आरोपीस आज मा. न्यायालयात हजर केले असता त्यास दि.२७/०८/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पी.एस आय मोहन कळमकर करत आहेत.

प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासाची कामगिरी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील, सपोनि भूषण एम.दायमा, पोउनि मोहन कळमकर, पोहवा दत्ताराम भोसले, मिथुन राठोड, अरविंद पवार, संदीप भालेराव, राजेंद्र खिलारे, प्रकाश पाटील,सचिन साळवी, मंगेश शिर्के, गोरक्ष शेकडे, गुरुनाथ जरग, राहुल ईशी, चित्रा इरपाचे, स्वाती काळे यांनी यशस्वीरित्या केलेली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात कल्याण-डोंबिवलीत जोरदार निदर्शने करत शिवसैनिक आक्रमक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून कल्याण-डोंबिवलीतही ठिकठिकाणी शिवसेनेने केलेली आक्रमक निदर्शने पाहायला मिळाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतून ही याप्रकरणी शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया आलेली पाहायला मिळत आहे. डोंबिवली पूर्व येथील इंदिरा चौकात शिवसेना-युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारहाण करत तसेच कोंबड्या हवेत उडवून यावेळी शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.

डोंबिवलीप्रमाणे कल्याण पूर्वेतील गुंजाई चौकातही शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी निदर्शने करण्यात आली. नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून यावेळी शिवसेनेने आपला संताप व्यक्त केलेला दिसून आला.

भाजपा नगरसेवकाला उल्हासनगर मध्ये आज काळे फासून चोपले..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आज उल्हासनगर महानगरपालिकेबाहेर शिवसैनिकांनी भाजपा नगरसेवकाला काळे फासून चोप दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा उल्हासनगर मधील सेना-भाजपा वाद उफाळून आला आहे. आज उल्हासनगर मधील सात ते आठ शिवसैनिकांनी भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्या तोंडाला काळे फासत चांगलाच चोप दिला.

या हल्ल्याबद्दल रामचंदानी यांनी म्हटलं की उल्हासनगरचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी हा हल्ला केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी, चौधरी यांच्या अनधिकृत बांधकामाबद्दल तक्रारी करत होतो. याचा राग मनात धरून हा हल्ला चौधरी यांच्या माणसांनी केला आहे.

उल्हासनगर मध्ये नारायण राणेंवर टीका करताना सेनेच्या ‘या’ आमदाराची जीभ घसरली
दरम्यान, प्रदीप रामचंदानी यांनी केलेल्या आरोपाबद्दल राजेंद्र चौधरी यांना विचारलं असता त्यांनी अनधिकृत बांधकाम कोण करत आहे हे सर्वांना माहीत असून, प्रदीप हे ‘सोशल मीडिया’वर शिवसेनेची अनेकदा बदनामी करत असतात. तसेच नारायण राणें यांनी केलेल्या वक्तव्यावर आज आम्ही राणेंच्या पिलावळी शोधतच होतो, तेव्हा महानगरपालिकेबाहेर शिवसैनिकांना रामचंदानी भेटले आणि त्यांना शिवसेना स्टाईल मध्ये उत्तर दिलं आहे. असे, राजेंद्र चौधरी म्हणाले.

आता या मारहाण प्रकरणी उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात प्रदीप रामचंदानी यांच्या फिर्यादीवरून सात ते आठ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे मध्यवर्ती पोलीस स्टेशन कडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली होते. मात्र पोलिसांकडे कोणतंही अटक वॉरंट नसल्याचा दावा भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला. अखेर नाशिक पोलिसांच्या सूचनेनुसार रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली असून त्यांना रत्नागिरी कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

अटकपूर्व जामीनासाठी नारायण राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात जामीन अर्जाची याचिका दाखल केली होती. पण न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तातडीनं याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यासाठीही राणेंच्या वकिलांनी प्रयत्न केले. पण मुंबई उच्च न्यायालयानंही याप्रकरणावर तातडीनं सुनावणी देण्यास नकार दिला आहे.

नाशिक पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना नारायण राणे यांना ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांची सरकारी डॉक्टरांकडून वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे