Home Blog Page 206

*महिन्यातून एकदा महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम..*

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील एक दिवस ‘पार्किंग प्लाझा’ येथे महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरात आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणामध्ये महिलांची संख्या कमी असल्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला असून या उपक्रमाची सुरूवात येत्या सोमवारपासून करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेने आजपर्यंत ९ लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.त्यामध्ये ४ लाख ७७ हजार ५५० पुरूषांचे तर ४ लाख २३ हजार ४८८ महिलांचे लसीकरण झाले आहे. महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस ‘पार्किंग प्लाझा’ येथे महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिर आयोजित असणार आहे.

सेना – मनसे श्रेयवाद

ठाणे शहरातील महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिर आयोजित करण्याची मागणी १८ ऑगस्ट रोजी पालिकेकडे केली गेली होती. त्यांनतर महापौरांनी महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिराची घोषणा केली, असा दावा मनसे च्या महिला ठाणे शहराध्यक्ष समिषा मार्कंडे यांनी केला आहे. ही घोषणा म्हणजे मनसे चे श्रेय लाटण्याचा उद्योग महापौरांनी केला. परंतु या घोषणेचे श्रेय फक्त आणि फक्त मनसे ला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेअरबँड मधून लपवून आणलेलं सोनं कस्टम विभागाच्या ताब्यात..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

विविध देशातून सोनं आणि इतर मौल्यवान वस्तूंची तस्करी करण्यासाठी तस्कर नवे नवे मार्ग शोधून कस्टम एजन्सींना चकवा देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, तस्करी विरोधात सज्ज असलेल्या कस्टम एजन्सी तस्करांच्या या नव-नवीन पद्धती आणि प्रयत्नांना वारंवार चुकीचं ठरवत असतात.

असंच एक ताजं प्रकरण कर्नाटकातील मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलं आहे. मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम विभागाने चक्क हेअर बँडद्वारे केली जाणारी सोन्याची तस्करी पकडली आहे. तस्करीची ही पद्धत अनोखी असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दुबईहून एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट क्रमांक ‘आय एक्स ३८४’ मध्ये महिलांच्या हेअरबँड मध्ये बसवलेल्या मण्यांच्या आतमधून सोन्याची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी कस्टम विभागाने मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. ११५ ग्रॅम वजनाच्या हेअरबँडची एकूण किंमत ५ लाख ५८ हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, सोन्याची पुनर्प्राप्ती कमी असू शकते. परंतु, तस्करीची ही पद्धत अक्षरशः अनोखी आहे.

तस्करीच्या ‘या’ दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सोनं जप्त..

एका घटनेत अधिकाऱ्यांनी ब्लेंडरच्या आर्मेचरमधून सोन्याची तस्करी आणि इतर वैयक्तिक सामानासह केरळमधील कासारगोड येथील एका प्रवाशाला अडवलले. यावेळी त्याच्याकडून १६.८५ लाख रुपये किंमतीचं निव्वळ ३५०.३३ ग्रॅम वजनाचं सोनं जप्त करण्यात आलं आहे अशी माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.

रक्षाबंधन उत्सवानिमित्त फॉर फ्युचर इंडिया संस्थेने राबविली कांदळवन स्वच्छता मोहिम

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर: फॉर फ्युचर इंडिया ही संस्था प्रत्येक आठवड्याला समुद्र किनारा स्वच्छ करण्याची म्हणजेच आपल्या निसर्ग सौंदर्यात भर घालण्याची मोहीम अतिशय उत्साहाने राबवत आहे. प्रत्येक आठवड्याला शनिवारी व रविवारी कोणत्या न कोणत्या समुद्र किनाऱ्यावर साफ-सफाई करण्याचे उपक्रम राबवत आहे.

यावेळी रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने भाईंदर पुर्व खाडी येथील कांदळवन स्वछता मोहिम व कांदळवनास राखी बांधुन कांदळवनाचे रक्षण करण्याची जबाबदारी हाती घेतली. कांदळवन स्वछता मोहिम करताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा, घरगुती कचरा, इमारत, घर व इतर बाधंकामामध्ये तयार होणार कचरा काढण्यात आला.

सोबतच स्थानिक नागरिकांसोबत या उपक्रमात कांदळवनाविषयी जनजागृती करण्याचे कार्य केले. फॉर फ्यूचर इंडिया सह या उपक्रमात खेलो मिरा भाईंदर खेलो, महाराष्ट्र वनविभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मॅन्ग्रोव्ह फॉउंडेशन, चाईल्ड हेल्प फॉउंडेशन संस्थे सोबत मॅंग्रोव्हमॅन धीरज परब, पोलिस सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, महाराष्ट्र वनविभाग अधिकारी सुचित्रा पाले व सहकारी, मिरा भाईंदर महानगरपालिका स्वच्छता विभाग अधिकारी, भाईंदर पश्चिम येथील व्हिन्सेंट डी-पॉल हायस्कूल शाळा उपस्थित होते.

गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या पोलीस नाईकासह सात जणांना अटक!

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर : चकमकीत ठार मारण्याची धमकी देऊन भाईंदर येथील गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. नवघर पोलिसांनी या प्रकरणी एका पोलिस नाईकसह, बोगस पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ता असे एकूण ७ जणांना अटक केली असून आणखीन दोन आरोपी फरार आहेत.

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहिती नुसार भाईंदर पूर्वेकडील गांजा विकणारा व्यापारी समीर सकपाळ (वय ३५) यांचे १४ ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते.

अपहरणकर्त्यांनी सकपाळ यांना अज्ञातस्थळी नेले आणि आपण पोलीस असून “तुझ्या इनकॉउंटरची ऑर्डर निघाली आहे तुला चकमकीत ठार मारू” अशी धमकी देत १२ लाखांची खंडणी मागितली.

यावेळी आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून सकपाळ याच्याकडील ५० हजार रोख रक्कम, भ्रमणध्वनी आणि सोन्याचे लॉकेट असा ऐवज काढून घेतला होता.
नवघर पोलिसांनी याप्रकरणी तपास करून ७ जणांना अटक केली.

आरोपी दादासाहेब दिनकर मिसाळ (वय ४१) हा नवी मुंबई पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर काम करतो.
या प्रकरणात एकूण ९ जणांवर गुन्हे दाखल केले असून ७ जणांना अटक केली आहे,
तर दोन आरोपी फरार आहे, अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

दिवसभरात जवळपास ११ लाख नागरिकांचे लसीकरण करत लसीकरणात महाराष्ट्र राज्याचा नवा विक्रम !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमे अंतर्गत महाराष्ट्राने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे ११ लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या कामगिरीची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे. दिवसाला १० लाखापेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते हे आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले असून याहीपेक्षा अधिक लसीकरणाची क्षमता राज्याची असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या वतीने त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सायंकाळी सात वाजेपर्यंत ५२०० लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना लस देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली आहे. राज्यातील आतापर्यंत दिलेल्या डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली असून देशभऱात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभरात १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले. यापूर्वी ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती त्यानंतर स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन राज्याने आधीचा विक्रम मोडला असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.