Home Blog Page 209

ठाणे- पालघर जिल्ह्यातील तंझिम संघटनेची महाड-चिपळूण परिसरातील पूरग्रस्तांना मदत!

संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

२२ जुलै २०२१ दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने  रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील महाड, चिपळूण परिसरातील बहुसंख्य गांवाना महापुरांचा फटका बसला असून अनेक गावांतील कुटूंब उध्वस्त होऊन जीवीत हानी ही मोठ्या प्रमाणात झाली आहे, या महापुरात उध्वस्त झालेल्या लोकांना अनेक सेवाभावी संस्थानी मदतीचा हात दिला आहे.

सर्वत्र मदतीचा ओघ वाढत असून, ठाणे-पालघर जिल्हा ग्रामीण येथील मुस्लिम उत्कर्ष संघटना (तंझिम) या संघटनेने कोकणातील महापुरात नुकसान झालेल्या कुंटूंबियांना अन्नधान्य, कपडे, औषधी व गरजू वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत, असे तंझिम संघटनेचे अध्यक्ष समीर डांगे यांनी एका लेखी पत्राद्वारे सांगीतले आहे.


महाड आणि चिपळूण मधील मोहल्ले पुरग्रस्त झाले असून तंझिम संघटनेचे पदाधिकारी येथील पांसरे, खारखेड मोहल्ला, मधारी नाका, कोंडवीते, राजवाडी, पेठमाप, मिठानगरी, तरे मोहल्ला, काशीगांव, मेबल मोहल्ला ह्या ठिकाणी पुराचे पाणी उतरत असतांना त्यात अडकलेल्या लोकांना अन्न- धान्य, खाऊ, पिण्याचे पाणी उपलब्ध करून येथील चिखलमय परिसरातील लोकांना आरोग्याचे दृष्टिने मोबाईल व्हँनसह डॉक्टर व औषधांचे वाटप करण्यात आले.


तंझिम मदत कार्याचे, मुंबई जामा मशिदीचे मुफ्ती अशफाक, अहमद काझी यांचे मार्फत चिपळूणचे मौलाना इलियास, मौलाना सादिक व नगरसेविका हमिदा शेखनाग यांनी कौतूक केले.
या कामात तंझिमचे सरचिटणीस ईस्माईल खान, शाहिद मुल्ला, तकी नाचन, शादाब पटेल, मोहसीन मुरूमकर, जुबेर बोटके, डॉ. इरफान पटेल यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोरोना काळातील भत्ते व अनेक मागण्या प्रलंबित; अंबरनाथमध्ये मनसेच्या कामगार सेनेचं आमरण उपोषण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या कामगार सेनेने अंबरनाथमध्ये ‘आमरण उपोषण’ सुरु केलं आहे. कोव्हीड भत्ता, सातव्या वेतन आयोगाचा फरक आणि अन्य मागण्या पूर्ण करण्याची मागणी या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात

अंबरनाथ नगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचारी मिळून ७१४ कामगार कार्यरत आहेत. तर सेवानिवृत्त झालेल्यांची संख्या २५० ते ३०० च्या घरात आहे. या कामगारांना सातव्या वेतन आयोगाचा फरक अजूनही मिळालेला नाही. सेवेची १२ आणि २४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणारा भत्ता अजूनही मिळालेला नसून निवृत्त कर्मचारीही या भत्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर कोव्हीडच्या काळात अक्षरशः घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणाऱ्या या कामगारांना ‘कोव्हीड भत्ता’ अजूनही मिळालेला नाही.

अनुकंपा तत्त्वावरील भरती रखडल्याचा मनसेचा आरोप

अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रियाही रखडलेली आहे. या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ‘मनसे कामगार सेने’च्या माध्यमातून अनेकदा पत्रव्यवहार आणि आंदोलनं करण्यात आली. मात्र तरीही दरवेळी फक्त आश्वासनंच मिळाल्याचा कामगार सेनेचा आरोप आहे. त्यामुळेच आता अखेरचा पर्याय म्हणून कामगार सेनेने ‘आमरण उपोषण’ सुरु केलं आहे.

आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते आणि कामगारही सहभागी

कामगार सेनेचे अंबरनाथ पालिका युनिटचे अध्यक्ष सूर्यकांत अनार्थे आणि उल्हासनगरचे मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते आणि कामगारही सहभागी झाले आहेत. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांकडून
प्रसार माध्यमांसमोर देण्यात आला आहे.

कोविड लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी असून पण अद्याप ट्रेनला पहिल्यासारखी गर्दी नाही..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य सरकारकडून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन १५ दिवस झाल्यानंतर लोकांना ट्रेनचे ट्रॅव्हल पास दिले जात आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांचे प्रमाण फारच कमी आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे सरकारने १५ ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकाग्रहात्सव ‘लोकल ट्रेन’ने प्रवास करण्याची परवानगी दिली होती. परंतु, पहिल्या दोन दिवसांत निर्बंध शिथील होऊनही ट्रेनमध्ये पहिल्यासारखी गर्दी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्य सरकारकडून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस होऊन गेलेल्या लोकांना ट्रेनचे पास दिले जात आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांचे प्रमाण फारच कमी आहे. सध्या लोकल ट्रेनने ‘ज्येष्ठ नागरिक’ आणि ‘अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी’ मोठ्याप्रमाणावर प्रवास करताना दिसून येत आहेत. मात्र, त्यांना पूर्वीपासूनच लोकल प्रवासाची अनुमती होती. त्यामुळे ‘१५ ऑगस्ट’नंतर लोकल ट्रेन सामान्यांसाठी खुली होऊनही अजूनही गर्दीचे प्रमाण फारसे वाढलेले दिसून येत नाही.

मुंबईत सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २०३०५४९ इतकी आहे. तर ६७२३४८ ज्येष्ठ नागरिकांनी आतापर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. कोरोना लसीचा दुसरा डोस पूर्ण झालेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या ८६४७१४ इतकी आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील १७३८२९ नागरिकांना आतापर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

कोकणातील चिपळूणच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जन संग्राम संस्थेचे भरीव कार्य

संपादक: मोईन सय्यद/मीरा भाईंदर प्रतिनिधी

जुलैमध्ये आलेल्या महापुरात कोकणातील अनेक जिल्ह्यातील शेकडो गावं पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे हजारों कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहेत. अशाच प्रकारे कोकणातील चिपळूण मधील हजारो कुटुंब बाधित होऊन उध्वस्त झाले आहेत.

चिपळूणमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून जन संग्रामचे अध्यक्ष सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली तांदूळ, दाळ, बटाटे, साखर, चहा पावडर, तेल, फिनाईल, साबण तसेच महिला आणि मुलींसाठी साडी, पंजाबी असे कपड्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी जन संग्रामच्या रुची मोरे, मांडवी दुबे, तृप्ती सावंत, यश मोरे, ऋषभ साठे, समीर देसाई, अखिल ब्राम्हण प्रतिष्ठाणचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेशजी पांडे, महिला अध्यक्ष सुषमा मिश्रा, गुरुब्रम्हांचे संजय वरेकर, सुधीर आठले, चिपळूणचे दाबके आणि सुनील कुलकर्णी यांनी उपस्थित राहून पूरग्रस्तांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले.
जन संग्रामच्या या मदत कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

मॉलमध्येही आता मिळणार १८ वर्षाखालील मुला-मुलींना रात्री १० वाजेपर्यत असा प्रवेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

# ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी..

अखेर राज्य सरकारने मॉल्सनाही रात्री १० वाजेपर्यत सुरु ठेवण्यास मान्यता दिली असून १८ वर्षा खालील मुला-मुलींचे अद्याप लसीकरण सुरु झालेले नसल्याने त्यांना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने आज सुधारणा करण्यात आली. यासंदर्भात राज्य सरकारने सुधारीत आदेश आज जारी केले.

राज्यात १८ वर्षाखालील मुला-मुलींचे लसीकरणास अद्याप सुरूवात न झाल्याने १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश देतांना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक असणार आहे, असे आज निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व शॉपींग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्याचे आणि दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखविण्याबाबत यापूर्वीच निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.