Home Blog Page 210

‘डेल्टा प्लस’ विषाणूचे तीन प्रकार महाराष्ट्रात आढळून संसर्गाचा धोका वाढला..’

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्यात एकीकडे कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण होत असताना दिसत आहे. आता दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या ही ५ ते ६ हजारांच्या आसपास असल्याचं समोर येत आहे. ही आकडेवारी जरी जास्त असली तरी गेल्या काही दिवसांपूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत खूपच कमी आहे. मात्र, असे असले तरी आता चिंता पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटने महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटच्या तीन वेगवेगळ्या विषाणूंनी तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. तज्ज्ञांच्या मते, ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे नवं रूप इतकं खतरनाक आहे की याच्या संक्रमण दराच्या संदर्भात अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

अलीकडेच व्हायरसच्या जीनोम सिक्वेंसींगमध्ये असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे एकूण ६६ रुग्ण आढळून आले आहेत. ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंट ग्रुपचे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. Ay.1, Ay.2 आणि Ay.3. आता तज्ज्ञांनी ‘डेल्टा प्लस’ विषाणूच्या आणखी १३ उप-वंशांचा शोध लावला आहे जो Ay.1, Ay.2 आणि Ay.3 पासून सुरू होतो आणि १३ पर्यंत आहे. ‘डेल्टा’ व्हेरिएंटमध्ये म्युटेशन झाल्यावर ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंट तयार होतो.

राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ‘डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ६६ वर पोहोचली आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे जळगाव जिल्ह्यात असून त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’ विषाणूचे रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ६६ ‘डेल्टा प्लस’ रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३४ स्त्रिया आहेत असे आकडे समोर आले आहेत.

७५ व्या ‘स्वातंत्र्य दिनी’ जन्मलेल्या नवजात बाळांना मोफत कपडे,मोजे व बाळंतीणींना मास्कचे वाटप..

संपादक: मोईन सय्यद / /प्रतिनिधी: अवधुत सावंत

७५ वा ‘स्वातंत्र्य दिना’ निमित्त दिनांक १५/०८/२०२१ रोजी ‘कुराश असोसिएशन महाराष्ट्र सलग्न पोलिस मित्र समिती, महाराष्ट्र राज्य’ या संस्थेच्या वतीने आणि संस्थेचे अध्यक्ष श्री.किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने, डोंबिवली पश्चिमेकडील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर शासकीय रूग्णालयात ‘७५ व्या स्वातंत्र्य दिनी’ नुकत्याच जन्माला आलेल्या नवजात बालकांना नवीन कपडे, मोजे, आणि त्यांच्या आईला मास्क चे मोफत वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम डोंबिवलीतील ‘पोलीस मित्र समिती’ सदस्य श्री.विशाल विठ्ठल शेटे यांनी आयोजित केला आणि एकूण ५० नवजात बालकांना नवीन कपडे व मोजे आणि त्यांच्या मातांना मास्क चे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांच्या सोबत श्री.नितिन पवार, श्री.साईनाथ घनपट, श्री.कैलास सणस यांनी सहभाग घेतला.

मृतदेहाचे तुकडे करुन बोअरवलेमध्ये फेकले; एका सिगारेटसाठी अंगावर धावलेल्या मित्रावर कोयत्याने केले सपासप वार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सिगारेट आणण्यासाठी उशीर झाला म्हणून अंगावर धावून गेलेल्या मित्राची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीतल्या मिरजेमधील भोसे गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकंच नव्हे तर हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकण्यात आले होते.

यानंतर मित्रांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान उघड झालेल्या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. २९ जुलैला पंढरपूर महामार्गावरील बंद कारखान्यात मित्रांनी दारु, अंडी पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी सागर सावंत आणि अमोल खामकर सिगारेट आणण्यासाठी गेले होते. दोघांनाही येण्यास उशिर झाल्याने दत्ता झांबरे त्यांच्या अंगावर गेला. यावेळी चिडलेल्या सागर सावंतने कोयत्याने दत्ता झांबरेवर वार केले. यावेळी अमोलने दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला. यानंतर दोघांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि बोअरवेलमध्ये टाकले.

पीडित दत्ता झांबरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. आरोपींनी पोलीस ठाण्यात दत्ता झांबरे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता हत्या झाल्याचं उघड झालं. पोलिसांनी सागर आणि अमोल या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अमोल करोनाबाधित असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान सध्या पोलिसांसमोर मृतदेहाचे तुकडे मिळण्याचं आव्हान आहे.

सरकारने केली तिकीट दारात ९ ते १२ टक्क्यांपर्यंत वाढ; विमान प्रवास महागणार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशांतर्गत आता विमान प्रवास हा महागणार आहे. सरकारने केवळ दोन महिन्यांतच सलग दुसऱ्यांदा देशांतर्गत विमान तिकीटांच्या किंमती ९ ते १२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. नागरी उड्डान मंत्रालयाने नवीन आदेश काढले आहेत. त्यानुसार, ४० मिनिटांपेक्षा कमी कालावधीतील उड्डाणांच्या तिकिटांची किंमत ₹ २६०० वरून ₹ २९०० करण्यात आली आहे. सदर किंमतीत तब्बल ११.५३ टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे.

तर, ४० मिनिटांच्या प्रवासासाचे जास्तीत जास्त भाडे १२.८२ टक्क्यांनी वाढवून ₹ ८८०० करण्यात आले आहे. ४० ते ६० मिनीटांच्या प्रवासासाठीचे कमीत कमी भाडे ₹ ३३०० रुपयांएवजी ₹ ३७०० असेल. यामध्ये १२.२४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून शुक्रवारपासून जास्तीत जास्त भाडे हे ११ हजार रुपये असेल. याशिवाय ६० ते ९० मिनीटांच्या प्रवासाचे कमीत कमी भाडे ₹ ४५०० असेल.

यामध्ये १२.५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर, जास्तीत जास्त भाड्यात १२.८२ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून ते ₹ १३२०० असेल. मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार आता ९०-१२०, १२०-१५०, १५०-१८० आणि १८०-२१० मिनिटांच्या देशांतर्गत प्रवासासाठी कमीत कमी भाडे अनुक्रमे ५३०० रुपये, ६७०० रुपये, ८३०० रुपये आणि ९८०० रुपये असेल. १२०-१५० मिनिटांच्या प्रवासासाठीच्या कमीत कमी भाड्याच्या किमतीत ९.८३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून ते ६७०० रुपये करण्यात आले आहे.

वास्तविक तिकीट दर जास्त असणार

वास्तविक तिकीट दर या दरांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कारण यामध्ये प्रवासी सुरक्षा शुल्क (passenger security fee), विमानतळावरील इतर चार्जेस आणि वस्तू आणि सेवा कर यांचा समावेश नाही. विमान भाड्याच्या मर्यादेत यंदा चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी फेब्रुवारी, मे आणि जूनमध्ये तिकीट दरात वाढ करण्यात आली होती.

मेलद्वारे शिवीगाळ आणि ‘मुंबई विद्यापीठ’ बॉम्बने उडवून देण्याची धमकी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई विद्यापीठ बॉम्बस्फोट घडवून उडवू अशी धमकी अज्ञाताकडून देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठात परीक्षांच्या निकालांचे कामकाज सुरु आहे. अज्ञाताकडून मुंबई विद्यापीठाला बी.कॉम चे निकाल लवकर लावा यासाठी शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई विद्यापीठाला १०, ११ , १२ ऑगस्ट या तारखांना धमकीचे मेल आले आहेत. मुंबई विद्यापीठाने धमकीचे मेसेज प्राप्त झाल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. विद्यापीठाच्या तक्रारीनुसार सायबर पोलीसांनी तपास सुरुकेला आहे. काही दिवसांपुर्वी मंत्रालयात बॉम्ब स्फोट घडवण्याबाबत फेक कॉल करण्यात आला होता.

मुंबई विद्यपीठात परीक्षांच्या निकालांबाबतचं कामकाज सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांचे निकाल रखडले आहेत. अज्ञात व्यक्तीने निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी मुंबई विद्यापीठाला धमकीचा मेल केला आहे. या धकमीच्या मेलमध्ये अज्ञाताने बी.एस.सी, बी.ए व बी.कॉम या कोर्सेसच्या अंतिम म्हणजेच ६ व्या सेमिस्टरचे निकाल लवकरात लवकर लावले नाही तर मुंबई विद्यापीठ बॉम्ब स्फोटने उडवून टाकू अशी धमकी दिली आहे. या मेलमध्ये बॉम्ब स्फोटाची चित्रे पाठवून धमकी दिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या इमेल आयडीवरील आलेले मेल तपासत असताना अज्ञात व्यक्तीने १०,११ आणि १२ तारखेला धमकीचे मेल पाठवल्याचे सापडले आहे. या मेलमध्ये निकाल लवकरात लवकर लावा असे म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनानं या प्रकरणी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीसांनी तात्काळ या गुन्ह्याचा तपास करायला सुरुवात केली आहे.