Home Blog Page 218

वीज बिल भरले नाही म्हणून केडीएमसीच्या सिग्नल यंत्रणेची महावितरण नी कापली वीज..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बसवण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेचा वीज बिल भरले नसल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडीत केल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरातील सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा खंडीत केल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. तर सिग्नल यंत्रणेचे व्यवस्थापन असणाऱ्या ‘स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन’ मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे.

कल्याण-डोंबिवलीत गेल्या वर्षभरापासून ‘स्मार्ट सिटी’ योजने अंतर्गत महत्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यानूसार कल्याण मधील महत्वाचा रस्ता असणाऱ्या कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरातही सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र वीजबिल बाकी असल्याचे सांगत महावितरणने त्याचा वीजपुरवठा खंडीत केल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या माहितीला दुजोरा दिला. केडीएमसीच्या लालचौकी येथील सिग्नलचे १३६ दिवसांचे ११ हजारांचे बिल असून ते न भरल्याने सिग्नल यंत्रणेचा वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तर यासंदर्भात ‘स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन’च्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. तसेच आमच्याकडे वीजबिल प्राप्त झाल्यावर आम्ही लगेचच ते भरत असतो. प्रत्येक सिग्नलचे वीजबिल न भरता सर्व सिग्नल यंत्रणेचे वीजबिल दर महिन्याला एकत्रित भरत असतो. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधणे आवश्यक होते. तसेच या संपूर्ण प्रकाराबाबत आपण माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू अशी प्रतिक्रिया प्रशांत भगत यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान अवघ्या काही हजारांच्या वीजबिलासाठी सिग्नल यंत्रणेच्या वीज पुरवठ्यासोबत केडीएमसीचे नाकही कापले गेल्याची भावना नागरिकात व्यक्त केली जात आहे.

तोकडे कपडे घातले म्हणून प्रेमी युगुलांना मारहाण करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी केले गजाआड..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

तोकडे कपडे घातल्याचा वाद घालून मलंग गडच्या पायथ्याशी फिरायला गेलेल्या दोन प्रेमी युगुलांना तेथील टवाळखोरांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची नुकतीच घटना घडली होती. तर हे टवाळखोर तरुण इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला होता. या गुन्ह्यातील त्या ५ जणांच्या टोळक्याला हिल-लाईन पोलिसांनी अटक केली आहे. यातील ५ पैकी ३ आरोपी अल्पवयीन आहेत. अशी माहिती झोन – ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.

त्याबाबत माहिती देताना झोन-४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले की रविवारी संध्याकाळच्या सुमारास उल्हासनगर परिसरात राहणारे दोन तरुण, आपल्या मैत्रिणीला घेऊन मलंगगडाच्या नजीक असलेल्या कुशवली गावाच्या हद्दीत निर्जनस्थळी गेले होते. त्यावेळी कुशवली गावातील ५ जणांचे टोळके अचानक येऊन या तरुण-तरुणींना ‘तोकडे कपडे का घातले’, याचा जाब विचारून चौघांनांही काठीने बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. शिवाय दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला होता. या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा हिल-लाईन पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला होता.

खबऱ्यां मार्फत आरोपीपर्यंत पोहचले पोलीस

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पीडित तरुणाने दिलेल्या आरोपींचे वर्णन आणि परिसरातील गावात खबऱ्यांचे जाळे पसरवून पोलीस त्या आरोपीपर्यंत पोहचले. पाचही आरोपी आदिवासी समाजाचे असून, मजुरीकाम करणारे आहेत. या पाच पैकी २ आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. तर बाकीच्या ३ अल्पवयीन जणांची भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे असे हिल लाईन पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत ८ हजार २०५ सदनिकांसाठी सोडत – गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत ८ हजार २०५ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आज मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सोडतीची जाहिरात २३ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सोडत काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

सोडतीमध्ये समाविष्ठ एकूण सदनिकांपैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७० %, अल्प उत्पन्न गटासाठी २७ % (म्हणजेच ९७ % अत्यल्प व अल्प गटासाठी) घरे उपलब्ध होतील. अर्जाची किंमत ५६० रुपये (मूळ किंमत ५०० + ६० जी एस टी = रू ५६०/-) असेल. अर्जासमवेत भरावयाची अनामत रक्कम अत्यल्प उत्पन्न गटासाठी ५ हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी १० हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार रुपये तर उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार रुपये इतकी असेल.
प्रवर्ग निहाय उत्पन्न मर्यादा (मासिक) अत्यल्प उत्पन्न गटासाठी २५ हजार रुपये पर्यंत,अल्प उत्पन्न गटासाठी २५ ते ५० हजार रुपये पर्यंत, मध्यम उत्पन्न गटासाठी ५० हजार ते ७५ हजार रुपये पर्यंत तर उच्च उत्पन्न गटासाठी ७५ हजार रुपये पेक्षा जास्त अशी असेल व संपूर्ण सोडत पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती गठीत असून त्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सोडतीमध्ये अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने परतावा करण्यात येईल.

ठाणे,पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरे

या योजनेतून उपलब्ध होणारी घरे ही ठाणे जिल्हयातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरारोड येथे, पालघर जिल्ह्यातील विरार बोळींज व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आहेत.

म्हाडाच्या विभागीय मंडळातर्फे १० हजार घरांची निर्मिती करणार

राज्यातील एकंदर घरांची मागणी लक्षात घेता तसेच पुणे येथील सोडतीचे यश पाहून म्हाडातर्फे आगामी काळात नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद अशा विभागीय शहरांमध्ये १० हजार घरांची निर्मिती करण्यात येईल व ही घरे दर्जेदार असतील अशी माहितीही गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

राज्यातील जनतेला केंद्रीय योजनांचाही लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न

राज्यातील जनतेला जास्तीत जास्त घरे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने, त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी लवकरच ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह नवी दिल्लीत केंद्रीय नगरविकास मंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे व येत्या ३ वर्षात वरळी बीडीडी चाळीचे चित्र बदललेले असेल असा विश्वासही गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. यावेळी म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन उपस्थित होते

पोलीसांच्या नियुक्त्या व बदल्यांतील भ्रष्टाचारांची माहिती देण्यास सरकारचा नकार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘सीबीआय’ची सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव..

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्ह्याच्या तपासाप्रकरणी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी ‘सीबीआय’ने उच्च न्यायालयाकडे केली. पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाशी संबंधित तपशिलाची मागणी राज्याच्या गुप्तचर विभागाकडे पत्रव्यवहाराद्वारे केली गेली. परंतु ही कागदपत्रे फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंधित असल्याने ती उपलब्ध करण्यास सरकारतर्फे नकार दिला जात आहे. त्यामुळे ही कागदपत्रे उपलब्ध करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी ‘सीबीआय’ने याचिके द्वारे केली आहे.

देशमुख यांच्यावर दाखल गुन्ह्यातील पोलिसांच्या नियुक्त्या व बदल्यांमधील भ्रष्टाचाराशी संबंधित असलेला भाग वगळण्याची मागणी करणारी राज्य सरकारची याचिका उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात फेटाळली होती. माजी गृहमंत्री देशमुखांशी संबंधित पोलिसांच्या बदल्या व नियुक्त्यांबाबतच्या आरोपांची सीबीआयने चौकशी करावी, असेही न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले. न्यायालयाने या आदेशाला स्थगिती देण्यासही नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही आदेशाला स्थगिती दिलेली नाही. असे असतानाही राज्य सरकारने उपरोक्त तपशील देण्यास नकार देणे हे उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन असल्याचा आरोपही ‘सीबीआय’ने केला आहे.

‘ओला टॅक्सी’ चालकाच्या मारेकऱ्याला भिवंडी गुन्हे शाखा घटक-२ च्या पोलिसांकडून अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘ओला टॅक्सी’ चालकाच्या मारेकऱ्याला भिवंडी गुन्हे शाखा घटक-२ च्या पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे.
इतर दोन आरोपी अजूनही फरार असून त्यांचा तपास सुरू आहे.
३१ जुलैच्या रात्री ११ वाजता माणकोली ब्रिज येथे एक ओला टॅक्सी चालकाचा खून करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यापासून खळबळ उडाली होती. भिवंडी पोलीस या प्रकरणाचा तपस करत होते. मयत ‘ओला टॅक्सी’ चालकाचे नाव प्रभाकर गंजी (वय ४३ वर्षे) असून तो भिवंडीचाच राहणारा होता. अज्ञाताने गळा आवळून त्याचा खून केला होता.

भिवंडी गुन्हे शाखा घटक-२ च्या पोलिसांकडून तांत्रिक तपस केला असता यातील मुख्य आरोपी संतोष रेड्डी हा गायत्री नगर भागात राहत असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मयताची पत्नी आणि तिची मैत्रीण तसेच ओळखीचा एक इसम नितेश वाला यांनी संगनमत करून संतोष रेड्डी याला प्रभाकरला मारण्याची सुपारी दिली असल्याचे कळले. यासाठी ४ लाखांपैकी एक लाख ऍडव्हान्स संतोष रेड्डी याला दिले गेले होते. याआधीही २७ जुलै ला प्रभाकरला मारण्यासाठी हे आरोपी गेले असता त्यांचा प्रयत्न फसला होता. यानंतर प्रभाकरच्या पत्नीने त्याच्या खुनासाठी संतोष रेड्डी यांच्याकडे तगादा लावल्याने त्याने ३१ जुलै रोजी प्रभाकरला फोन करून भाड्याने गाडी करून जाण्याच्या बहाण्याने गाडीत बसला आणि माणकोली ब्रिज वर गाडी थांबवून गळा आवळून प्रभाकरचा खून केला.
नंतर हे सर्व आरोपी फरार होते. संतोष रेड्डी या आरोपीला आज अटक करण्यात आली असून इतर दोघांचा भिवंडी गुन्हे शाखा घटक-२ चे पोलीस शोध घेत आहेत असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.