Home Blog Page 219

शैक्षणिक क्षेत्रात खाजगी शाळांत ‘१५ टक्के फी माफी’चा घोळ..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत 

गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के सवलत देण्याचे निर्देश दिले होते. कोरोना काळात उत्पन्न घटलेल्या पालकांना हा मोठा दिलासा असल्याचे मानले जात होते. सर्वोच्च न्यायालयात पालकांनी दाद मागितली होती. राजस्थान सरकार खासगी शाळांना १५ टक्के फी माफ करण्याचा आदेश काढू शकते, तर महाराष्ट्र सरकार का नाही, असा पालकांचा युक्तिवाद होता. मुंबई उच्च न्यायालयाने जरी पालकांना दिलासा दिला नाही, तरी सर्वोच्च न्यायालयाने तो दिला. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी विहित मुदत घालून दिली असली, तरी राज्य सरकारने निर्देशाची तातडीने अंमलबजाणी करायला हवी होती, परंतु सरकारने फक्त २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांचे खासगी शाळांचे शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याने अवघ्या दोनच दिवसांत शासन आदेश काढले. परंतु १५ टक्के शैक्षणिक शुल्क माफीच्या निर्णयाचा कोणताही बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार नसताना राज्य सरकारने सात दिवसांत अजून आदेश काढलेला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर खासगी शिक्षण संस्थांनी त्याविरोधात काहूर उठविले. राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याची भाषा वापरली. वास्तविक गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे ग्रंथालये, मैदान, परीक्षांसह अन्य सुविधांचा वापर होत नाही. आॅनलाईनच्या नावाखाली किती शिकविले जाते, कसे शिकविले जाते आणि त्याचा विद्यार्थ्यांना कितपत फायदा होतो, हा वेगळ्या संशोधनाचा भाग आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार १५ टक्के शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलायला हवी होती. महाधिवक्ता आशुतोष कुंभकर्ण यांचा सल्ला घेऊन राज्य सरकार तातडीने आदेश काढणार होते. ‘तातडी’ची व्याख्या काय हे एकदा राज्य सरकारने स्पष्ट करायला हवे. अगोदरच शाळा बंद असल्याने शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन करता येत नाही, विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी झाल्याने फी वसुलीही फारशी होत नाही, अशा तक्रारी खासगी शिक्षण संस्था चालक करतात. आतापुरत्या त्या खऱ्याही असतील. परंतु यापूर्वी त्यांनी मनमानी पद्धतीने वसूल केलेल्या शुल्काचे काय ? हा प्रश्न उरतोच. कोरोनामुळे आम्ही अगोदरच २५ टक्के शैक्षणिक शुल्क कमी केले आहे, असे संस्थाचालक म्हणत असतील, तर खरेच त्यांनी तसे केले का, शैक्षणिक शुल्क अगोदर वाढवून नंतर कमी केले का ? या प्रश्नांची उत्तरे सरकारला आधी शोधावी लागतील.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार कमी झाले. अशा वेळी शैक्षणिक संस्थांनी पालकांची कोंडी केली. मुलांचे दाखले दिले नाहीत. पनवेलमध्ये तर पालकांना कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला. राज्य सरकारने दाखले देण्याबाबत पालकांची अडवणूक करू नका, असे स्पष्ट आदेश देऊनही शाळा त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. खासगी शैक्षणिक संस्थांच्या या मनमानीला चाप लावण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर शुल्कात १५ टक्के कपात करण्याबरोबरच शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांला ऑनलाइन किंवा तत्सम वर्गातून बेदखल करण्यास न्यायालयाने शाळांना मनाई केली आहे. ‘शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमा’त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात येईल,’ असे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी सांगितले होते. ज्या पालकांनी वर्षांच्या सुरुवातीलाच संपूर्ण सत्राचे वा वर्षांचे शुल्क भरले आहे, त्यांनाही या अध्यादेशाद्वारे दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. हे अतिरिक्त शुल्क पुढील सत्रात किंवा वर्षांत समायोजित करण्याचे आदेश सरकार देऊ शकते. खासगी शिक्षण संस्थांच्या शैक्षणिक शुल्क माफीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत, असे सांगितले गेले; परंतु कोरोना काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद असल्याने शाळांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारला मर्यादित अधिकार आहे. शिवाय आता सर्वोच्च न्यायालयानेच निकाल दिल्याने तसा अधिकाराचा प्रश्न ही प्रश्न उरलेला नव्हता. राजस्थान सरकार विरुद्ध खासगी संस्थाचालक या निकालाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्याच मे, २०२१ मध्ये दिलेल्या निकालाचा संदर्भ न्यायालयाने दिला होता. कोरोनामुळे शाळा ऑनलाइन सुरू असल्याने शाळेतील अनेक भौतिक सुविधांचा वापर होत नाही. त्यामुळे या सुविधांचे शुल्क घेण्यात येऊ नये, अशी पालकांची मागणी आहे. त्यातच टाळेबंदीमुळे अनेक पालकांचे उत्पन्न बुडाल्याने शुल्कात कपात करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. काही शाळा तर वर्षभराचे शुल्क वसूल केल्याशिवाय मुलांना ऑनलाइन वर्गात सहभागी करून घेत नाहीत. त्या सर्व बाबींचा विचार करून सरकारने शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने जो अध्यादेश काढायला हवा होता, तो काढला नाही. कायद्यानुसार प्रत्येक शाळेत असलेल्या ‘पालक-शिक्षक संघटणा’च्या कार्यकारी समितीला संबंधित शाळेचे शुल्क ठरविण्याचे अधिकार आहेत. खासगी संस्थांसाठी खर्चावर आधारित शुल्क ठरते. शाळेच्या समितीने ठरवून दिलेल्या शुल्काबाबत वाद असल्यास ‘विभागीय शुल्क नियामक समिती’कडे पालकांना दाद मागता येते, तरीही शुल्कासंदर्भातील वाद न मिटल्यास ‘राज्यस्तरीय पुनरीक्षण समिती’कडे हा प्रश्न सोपविला जातो मात्र कायद्यातील काही तरतुदींमुळे पालक-शिक्षक संघाने ठरवून दिलेल्या शुल्करचनेविरोधात विभागीय किंवा राज्यस्तरीय समितीकडे दाद मागणे कठीण बनते. दुसरीकडे, या वादात राज्य सरकारलाही फारसा हस्तक्षेप करता येत नाही, असा बचाव शैक्षणिक संस्था करतात; परंतु त्याला काही अर्थ नाही.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी खासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कात (फी) पंधरा टक्के कपातीची घोषणा केली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे या घोषणेची अंमलबजावणी रखडल्याचे सूत्रांकडून समजते. शिक्षणमंत्र्यांची घोषणा अंमलात आणण्यासाठी अध्यादेश काढावा की शासन निर्णय जारी करावा याचा निर्णय अद्याप झालेला नाही. शासन निर्णय जारी केला, तर खासगी शिक्षण संस्थांचे चालक या निर्णयाला आव्हान देण्याची शक्यता आहे. अध्यादेश काढावा तर सर्वोच्च न्यायालयाने तशी स्पष्ट सूचना दिलेली नाही. यामुळे शिक्षण विभागाचे अधिकारी गोंधळात पडले आहेत. अधिकारी परस्पर चर्चेतून हा प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप मार्ग निघालेला नाही. जोपर्यंत अध्यादेश किंवा शासन निर्णय यापैकी काहीही जारी होत नाही तोपर्यंत खासगी शाळांवर शुल्क कपातीची सक्ती सरकारकडून होणार नाही. शिवाय निर्णय जारी झाला तरी ज्यांनी आधीच यंदाच्या शैक्षणिक वर्षाची फी भरली आहे, त्यांना सवलतीचा लाभ कसा मिळणार हा एक अनुत्तरित प्रश्न उपस्थित आहे.

मनसुख हिरेनला 45 लाखांची सुपारी देऊन ठार मारण्यात आले? फन्डिंग कुणी केली? केंद्रीय तपास यंत्रणांची दिल्लीत जाऊनही केली चौकशी

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत

मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाजवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी एक नवीन खुलासा समोर आला आहे. मंगळवारी न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सांगितले की, मनसुखला ठार मारण्यासाठी 45 लाख रुपये देण्यात आले होते. एनआयएने या प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी 30 दिवसांची वेळ मागितली आहे.

9 जून रोजी विशेष न्यायालयाने एनआयएला मनसुख प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. एनआयएचे म्हणणे आहे की, या प्रकरणात पैसे कोणी दिले हे शोधण्याची गरज आहे. तपास यंत्रणेने असेही सांगितले की, आतापर्यंत 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एका टीमने तपासासाठी दिल्लीला जाऊन काही लोकांची चौकशीही केली आहे.

मनसुख हिरेनच्या हत्येमुळे कुणाला फायदा होऊ शकतो? किंवा त्याचे कुणाशी काही वाद-विवाद होते का? या सर्व बाबी तपास यंत्रणा तपासून पाहात आहेत.

केरळमध्ये एव्हढ्या झपाट्यानं का वाढला कोरोनाचा संसर्ग?

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत

भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या केरळमध्ये देशातल्या कोरोना रुग्णांपैकी निम्मे रुग्ण आहेत. लसीकरण मोहीम, नियमांचं पालन असं सगळं असतानाही केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या का वाढते आहे? हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारी 2020 मध्ये केरळमध्ये भारताचा पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. चीनमधल्या वुहान इथे शिकत असलेला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. देशातल्या कोरोना संसर्गाची ती सुरुवात होती. केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली आणि ते हॉटस्पॉट बनलं. मार्च 2020 पर्यंत देशातल्या अधिक राज्यांमध्ये केरळपेक्षा कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती.

टेस्ट-ट्रेस-आयसोलेट या त्रिसुत्रीला प्रमाण मानत केरळने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कोरोना वाढीला आळा घेतला. कोरोनाचा आलेख घसरणीला लागल्याचं चित्र केरळने देशाने दाखवलं होतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत केरळने विषाणूला रोखण्यात यश मिळवलं. कोरोना मृत्यूदरही कमी होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान केरळमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण झपाट्याने वाढलं. ऑगस्ट महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोना वाढीला आळा घातल्याचं चित्र असताना केरळमध्ये मात्र कोरोना शमण्याची चिन्हं नाहीत. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केरळमध्ये केवळ तीन टक्के लोकसंख्या राहते परंतु कोरोना रुग्णांच्या बाबतीत हेच प्रमाण व्यस्त आहे. देशातल्या कोरोना रुग्णसंख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त टक्के रुग्ण केरळमध्ये आहेत. कोरोना विषाणूची पुनरुत्पादनाच्या क्षमतेतून विषाणूची लोकांना संक्रमित करण्याची क्षमता वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. सोप्या शब्दात कोरोनाच्या एका विषाणूने एकापेक्षा जास्त माणसांना संक्रमित केलं आहे.

याचा परिणाम म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली झपाट्याने वाढ. हे रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि अन्य काही उपाय करणं आवश्यक आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आढळणाऱ्या लोकांचं प्रमाण दर महिन्याला 10 टक्के एवढं आहे. केरळ राज्यात आतापर्यंत 3.4 दशलक्ष लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 16,837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भीतीदायक वाटणारे हे आकडे खरी कहाणी उघड करून सांगत नाहीत असं संसर्गतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना ‘बूस्टर डोस’ घ्यावा लागेल का?

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत

कोरोनाविरोधी लशीचे दोन डोस पूर्ण झालेल्यांना बूस्टर डोस गरजेचा आहे का? असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारला आहे. कोरोना व्हायरसचे म्युटेट होणारे नवीन व्हेरियंट पाहता, देशभरातील तज्ज्ञांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोसची गरज असल्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॅा. शशांक जोशी बीबीसीशी बोलताना सांगितलं, “बूस्टर डोसबाबत अजूनही संशोधन सुरू आहे. यावर सद्यस्थितीत भाष्य करणं योग्य होणार नाही.” तर केंद्राने राज्यसभेत तज्ज्ञांच्या समितीने बूस्टर डोसबाबत अद्याप कोणतीही शिफारश केलेली नाही, अशी माहिती दिलीये.

तज्ज्ञ म्हणतात, लशीचा प्राथमिक डोस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या डोसला ‘बूस्टर डोस’ असं म्हटलं जातं. आता सामान्यांना प्रश्न पडेल की, बूस्टर डोस म्हणून देण्यात येणारी लस, आम्ही आधी घेतलेल्या कंपनीची असेल का पूर्णत नवीन? याबाबत आम्ही लसीकरण आणि पब्लिक पॉलिसीतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहारिया यांच्याशी संपर्क केला. ते म्हणतात, “बूस्टर डोस म्हणजे काही वेगळी लस देण्यात येत नाही. शक्यतो एखाद्या व्यक्तीने याआधी जी लस घेतली असेल, तीच लस दिली जाते.”
“पण कोरोनाविरोधात विविध लशी उपलब्ध असल्याने, दुसर्या कंपनीचा बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.” लशीमुळे व्हायरस आणि बॅक्टेरियाविरोधात लढण्यासाठी लागणारी रोगप्रतिकारशक्ती वाढते. लसीकरणतज्ज्ञ म्हणतात, आजाराविरोधात लढण्यासाठी गरजेच्या अन्टीबॉडीजची संख्या वाढवण्यासाठी, बूस्टर डोस महत्त्वाचा असतो.

जगभरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी विविध लशी निर्माण करण्यात आल्या आहेत. या लशी म्युटेट झालेल्या कोव्हिड-19 च्या नवीन व्हेरियंटविरोधात प्रभावी आहेत का? यावर लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून संशोधन सुरू आहे. डॉ. लहारिया पुढे सांगतात, “कोरोना संसर्गानंतर आणि कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेल्या अन्टीबॉडीज नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ रहातात, असे पुरावे संशोधनात मिळाले आहेत.”

लशीचा डोस घेतल्यानंतर कालांतराने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे बूस्टर डोसची गरज भासू शकते, असा तर्क लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून दिला जातोय. “शरीरात तयार होणाऱ्या अन्टीबॅाडीज आणि आजारापासून मिळणारी सुरक्षा यांचा थेट संबंध स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे, याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे,” असं ते पुढे म्हणाले. कोरोना व्हायरस दिवसेंदिवस आपलं रूप बदलतोय. जगभरात थैमान घालणारा डेल्टा व्हेरियंट, डेल्टा प्लस, लांब्डा, कप्पा असे अनेक व्हेरियंट तयार झालेत. त्यामुळे कोरोनाविरोधात बूस्टर डोसची गरज असल्याची चर्चा सुरू झाली.

 

परमवीर सिंग खंडणी प्रकरणात २८ जणांविरुद्ध ‘लुक आउट’ नोटीस..

संपादक : मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह खंडणी प्रकरणातील २८ जणांच्या विरूध्द ‘लुक आउट’ नोटीस जारी करा अशी मागणी
या प्रकरणातील फिर्यादी सोनू जालान आणि केतन तन्ना या तक्रारदारांनी केली आहे.

ठाणे नगर पोलीस ठाण्यात केतन तन्ना आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी ही ‘लुक आउट’ नोटीस जारी करण्याची
मागणी केली आहे. ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, विकास दाभाडे अशा २८ जणांनी सोनू जालान आणि केतन तन्ना यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून करोडो रूपयांची खंडणी उकळल्याची तक्रार ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणात मुख्यतः तत्कालीन पोलीस आयुक्तच आरोपी असल्यामुळं पोलीस सावधगिरीने तपास करत आहेत. याच प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्तांसह इतर आरोपी परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या विरोधात ‘लूक आऊट’ नोटीस जारी करावी अशी मागणी जालान आणि तन्ना या दोन्ही तक्रारदारांनी केली आहे.