कोरोना सारख्या भीषण महामारीच्या काळात सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर चा वापर तसेच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे शहरातील बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करीत १५ लेडीजबारवर कारवाई करत सील केले. ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकाद्वारे धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे.
साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ तसेच आपत्ती व्यवस्था कायदा २००५ च्या साथरोग सर्व संबंधित तरतुदीनुसार शासनाने कोविड-१९ आजाराचा प्रसार रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या त्रिसुत्रीचे पालन करणे, सर्व बार अँण्ड रेस्टॉरंट, लेडिज बार व इतर सोमवार ते शुक्रवार ५० टक्के बैठक क्षमतेने सायं ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे तसेच सायं ४ वाजल्यानंतर व शनिवार आणि रविवार फक्त टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलिव्हरी सेवा सुरु ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले असून या नियमांचे उल्लंघन केलेल्या १५ आस्थापनावर ठाणे महापालिकेने कारवाई करत आज सील केल्या.
बया कारवाई अंतर्गत ठाण्यातील तलावपाळी येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील अॅन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापुरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाईट बार, ओवळा नाका येथील स्टर्लिंग बार, मॉडेला नाका येथील अॅन्जेल बार, उपवन येथील सुर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी आणि मैफील बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाड्यातील मनिष बार आणि कापूरबावडी येथील सनसिटी बार असे एकूण १५ लेडीजबार सील करण्यात आले आहेत.
सदरच्या सर्व कारवाया अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ.अनुराधा बाबर, प्रणाली घोंगे, शंकर पाटोळे आणि विजयकुमार जाधव यांनी यांनी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केल्या.
पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या संपन्न झालेल्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांकडूनच करोना नियमांचा तसेच सोशल डिस्टनसिंगचा तीन तेरा वाजल्याचे दिसून आले. यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केल्याने जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कोणालाच भान नव्हते.
उपस्थिति सर्व जेष्ठ मंत्राच्या तोंडावर मास्क मात्र राजकीय पक्षाचे पदाधिकारी मात्र मुखवटा दर्शक!
नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्षांच्या दालनात अनेक राजकीय नेत्यांच्या तोंडावर मास्क देखील नसल्याचे छायाचित्रांमध्ये दिसून येत आहे.
यामुळे सामान्य नागरिकांवर करोना नियमांचे पालन न केल्याने कारवाई करणारे पालघरचे जिल्हा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक पालघर आता या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांवर काही कारवाई करणार का? असा सवाल पालघर जिल्हावासीयांनी उपस्थित केला आहे.
मुंबईतील श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. यापुढे कोणतेही पाळीव प्राणी दुकाने, श्वान प्रजनन व विपणन केंद्र महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरु ठेवता येणार नसल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा मुंबई शहर प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीचे अध्यक्ष यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
सर्व पाळीव प्राणी दुकान व श्वान प्रजनन व विपणन केंद्र चालवू इच्छिणाऱ्या व्यक्तीस आवाहन करण्यात येत की, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम २०१८ व पाळीव प्राणी दुकानांची व श्वान प्रजनन व विपणन नियम २०१७ अन्वये श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. आपण आपल्या दुकान केंद्राची नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज Maharashtra State Animal Welfare Board यांच्या नावे रुपये ५०००/- (अक्षरी-पाच हजार रुपये मात्र ) च्या धनाकर्षासह (Demand Draft) महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण मंडळ, पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेज समोर औंध, पुणे. ६७ या पत्यावर दाखल करावा. हा अर्ज पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून जिल्हाधिकारी, मुंबई शहर तथा अध्यक्ष, प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी मुंबई शहर यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात १० वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर ११ वी प्रवेशाकरिता ऐच्छिक ‘सीईटी’ परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. यानुसार आता ११ वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २१ ऑगस्ट दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे.
राज्यात एकाच वेळी ही परीक्षा सर्वत्र घेतली जाणार आहे, असे राज्य सरकार कडून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे १० वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता ‘सीईटी’ करिता तयारीला लागण्याची गरज आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता ११ वी प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी येणाऱ्या १९ जुलै दिवशी ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी यावेळी दिली आहे.
११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘सीईटी’ परीक्षा ‘ओएमआर’ उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने या परीक्षा घेण्यात येणार आहेत. १९ जुलै या दिवसापासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्याकरिता ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी १० वी मधील गुणांच्या आधारे ११ वी ची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क घेतले जाणार नाही असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाच्या धोक्याचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरित्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील सूचना केल्या.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या, त्या पुढीलप्रमाणे आहेत :
विशेषत: दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर मलबा पसरून प्राणहानी झाली ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी देखील मलबार हिल येथे टेकडीचा भाग अचानक खचला होता.
उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदार राहण्यास सांगावे.
काही ठिकाणी भूमिगत वाहनतळामध्ये पाणी घुसले व वाहनांचे नुकसा झाले आहे तसेच भांडूप येथे जल शुद्धीकरण केंद्रच बंद पडल्याची घटना घडली आहे हे पाहता अधिक सावधगिरी बाळगावी.
पावसाचा जोर रात्री वाढतो आहे हे ९ जून आणि आत्ता काल झालेल्या पावसाने लक्षात आले आहे हे पाहता रात्री देखील पाणी उपसा करणारी यंत्रणा, कर्मचारी काम करीत राहतील हे पाहावे.
पाऊस थांबल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती अधिक कमकुवत होऊन त्यांचा काही भाग पडून मोठी दुर्घटना घडते. मोडकळीस आलेल्या इमारती मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा.
सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत व आपापल्या नियंत्रण कक्षांना एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहण्यास सांगावे.
कोविड केंद्र व फिल्ड रुग्णालयांतील डॉक्टर्स व वैद्यकीय पथकांना देखील मदतीसाठी तयार ठेवावे.
अर्धवट बांधकामे, मेट्रोची व इतर कामे यामधून भरपूर पाऊस झाल्यास पाणी साचून दुर्घटना होऊ नये तसेच त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टो स्पायरोसिस सारखे रोग पसरु नये म्हणून विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावे.
फिव्हर क्लिनिक्स सुरु करा
यावेळी बोलतांना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असे सांगून महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ते म्हणाले की, पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टो स्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, कोविडचा धोका तर कायम आहे, यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरु करा. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी देखील नागरिकांना त्यांच्या तापाबाबत तपासणी व मार्गदर्शन व्हावे. गृहनिर्माण संस्थांमधून देखील याविषयी जनजागृती करा.
मुंबईत दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत मात्र अशा सर्वच ठिकाणांचा आयआयटी किंवा इतर तज्ज्ञ संस्थेमार्फत अभ्यास करून आणखी काही पर्याय आहेत का किंवा त्यांच्या मजबुती करणासंदर्भात पाऊले उचलता येतील का ते पाहावे. रेल्वे आणि बेस्ट यामध्ये अधिक चांगला समन्वय साधून अशा आपत्तीच्या वेळी प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून हॉटलाईन सुरु करावी.
पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील पुढील तीन दिवस महत्त्वाचे असून मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु राहील याची काळजी घ्यावी व पर्यायी व्यवस्था करावी, असे सांगितले. वीज वाहिन्या व त्यांचे खांब सुस्थितीत राहतील आणि त्यातून विजेचा धक्का लागणार नाही याविषयी कंपन्यांना खबरदारी घेण्यास सांगावे असेही ते म्हणाले.
पालिकेचे अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर
मुंबईतील जोरदार पावसाबाबत माहिती देताना मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, काल रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळून अवघ्या काही तासांमध्ये २०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. या पावसात वाशीनाका परिसरातील वंजारतांडा येथे संरक्षक भिंत कोसळली. तसेच विक्रोळीतील पंचशील चाळीवर दरडीचा भाग कोसळला. या दोन प्रमुख दुर्घटनांसह अन्य एक घटना मिळून एकूण २७ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. या दुर्घटनांच्या स्थळी बचाव आणि मदतकार्य तातडीने करण्यात आले आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह भेटी देवून यंत्रणांना आवश्यक ते निर्देश दिल्याचेही चहल यांनी नमूद केले.
उपनगरीय रेल्वे रुळांवर साचणाऱया पावसाच्या पाण्याच्या अनुषंगाने चहल म्हणाले की, माहूल येथील पर्जन्य जल उदंचन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरु होणार असून हे केंद्र पूर्ण झाल्यानंतर कुर्ला, शीव, चुनाभट्टी इत्यादी परिसरातील पाणी साचण्याचा प्रश्न निकाली निघेल.
मुंबईत पावसामुळे होणाऱ्या भूस्खलन घटना पाहता, संभाव्य ठिकाणांवर महानगरपालिका प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. अशा ठिकाणांवरील नागरिकांचे स्थलांतर व पुनर्वसन करण्याबाबतची कार्यवाही देखील करण्यात येत आहे, असेही आयुक्तांनी नमूद केले.
आजारांचा फैलाव होवू नये म्हणून काळजी
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी म्हणाले की, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो स्पायरोसिसच्या डेंगी आणि डेंग्यू, लेप्टो स्पायरोसिस सारख्या या भयंकार आजारांचा फैलाव होवू नये म्हणून आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना देखील सातत्याने सुरु आहेत. मलेरियाचे प्रमाण यंदाही पूर्णपणे नियंत्रणात असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे श्री. काकाणी यांनी नमूद केले.
जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होत आहे
जोरदार पावसाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात शिरून समस्या निर्माण झाल्यासंदर्भात महानगरपालिकेचे उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर म्हणाले की, भांडुप संकुलातील नवीन आणि जुन्या अशा दोन्ही उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू कार्यान्वित होत आहे. भांडुप येथील मुख्य जलसंतुलन (Main Reservoir) कुंभातील पाणीपातळी उंचावत आहे. असे असले तरी उद्या एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. सर्व यंत्रणा कार्यान्वित होताच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती राठोर यांनी दिली.
हवामान विभागाचा ‘ऑरेंज अलर्ट’ चा इशारा
यावेळी बोलताना हवामान विभागाचे जयंता सरकार म्हणाले की मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ असून ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. २३ तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो.
याप्रसंगी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी देखील माहिती दिली.
बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील मार्गदर्शन केले व यंत्रणांनी अधिक समन्वय ठेवावा असे सांगितले. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव असीम गुप्ता, मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, सर्व पालिका उपायुक्त उपस्थित होते.