Home Blog Page 226

शैक्षणिक बनावट प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती..

शैक्षणिक बनावट प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण ८ शैक्षणिक वर्षातील सुमारे १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत. यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे सुलभ होणार आहे. शिवाय यामुळे योग्य उमेदवारांचीही होणारी गैरसोय रोखली जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

यासाठी ‘क्रॉसफोर्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ द्वारा विकसित लेजीटडॉक हे इथरियम ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून या प्रणालीच्या मदतीने बनावटरहीत डिजिटल कागदपत्रे १० सेकंदात जगभरातून कोठूनही ऑनलाईन पडताळणी करता येऊ शकतील. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत घेण्यात आलेल्या स्टार्टअप मेळाव्यातून ही संकल्पना पुढे आली असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रमाणपत्रांच्या हाताळणीकामी वापरले जाणारे मंडळाचे मनुष्यबळ आणि त्यांच्या वेळेचीही बचत होणार आहे, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या उपक्रमाची नुकतीच जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कौशल्य विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव, मंडळाचे सचिव कृष्णा शिंदे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक योगेश पाटील, लेजीटडॉक स्टार्टअपचे सहसंस्थापक फ्रान्सिस, नील, विष्णू आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री मलिक म्हणाले की, बनावटमुक्त शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी जगातील सर्वात मोठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य झाले आहे. यामुळे सुमारे १० लाख टँपरप्रूफ, डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे ऑनलाईन पडताळणीसाठी त्वरित उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक दस्तऐवज नोंदणीची आतापर्यंत माल्टा, सिंगापूर आणि बाहरिन या तीनच देशामध्ये पूर्ण अंमलबजावणी झाली आहे. त्यांच्यात सामील होऊन महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास मंडळ हे जगातील सर्वात मोठे चौथे सरकारी संस्था बनले आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रांकरिता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाचे अभ्यासक्रम वरदान..

मंत्री मलिक म्हणाले की, अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ठ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम (ॲड ऑन कोर्सेस) चालविण्यात येतात. सध्या मंडळांतर्गत विविध २८ गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार, तसेच सहा महिने कालावधीचे १५६, एक वर्ष कालावधीचे १०० आणि दोन वर्ष कालावधीचे ४५ अर्धवेळ (२३४) व पूर्णवेळ (६७) असे एकुण ३०१ अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम जिल्हा, तालुकास्तरावर तसेच ग्रामीणभागात मंडळाने मान्यता दिलेल्या १ हजार २६९ संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. विशेषत: खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतात, असे त्यांनी सांगितले.

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी संपादीत जमिनीच्या मोबदल्यावर खाजगी दलाल व महसूल अधिकाऱ्यां कडून लूट..

संपादक: मोईन सय्यद/ पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

मुंबई- वडोदरा या आठ पदरी द्रुतगती महामार्गासाठी पालघर जिल्ह्यात आवश्यक भुसंपादनाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.या द्रुतगती महामार्गाचे पालघर जिल्ह्यातील एकूण अंतर ७८ किमी असून यासाठी सुमारे ९०१ हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे काम सुरू असून ५१ गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी बाधीत होणार आहेत. प्रस्तावित महामार्गाच्या भूसंपादन आणि मोबदला प्रक्रीयेसाठी पालघर आणि डहाणू प्रांत कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या प्रक्रीयेत गरीब अशिक्षित जमीन मालकांच्या अज्ञानाचा फायदा घेत संपादीत जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी त्यांच्यासोबत दलालांच्या अनेक टोळ्या सक्रीय झाल्या असून यामध्ये राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आणि आदीवासी संघटनांचे कार्यकर्ते यांचा देखील समावेश पाहायाला मिळत आहे.

डहाणू तालुक्यातील दाभोण येथील गट नंबर १९० मधील ३६२४६ चौ.मी.आणि गट नंबर १९१ मधील ८२५ चौमी जमीन संपादित होणार आहे. यापोटी एकूण ६ कोटी ९९ लाख ५० हजार ४४६ रुपये मोबदल्या पैकी ५० वर्षांपासून जमीन कसत असलेल्या व सध्या जमीन ताब्यात असलेल्या ४ कुटुंबांना फक्त ५६ लाख मोबदला मिळाला असून ज्यांचा या संपादित जागेशी सध्या काही संबध नाही अशा खातेदारांना उर्वरित ६ कोटी ४३ लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे जमीन संपादनाचा मोबदला वाटप करताना मूळ मालकांवर मोठा अन्याय झाल्याची भावना आदिवासी समाज्यातील शेतकऱ्यानीं वेक्त केली आहे.

वारकरी संप्रदायाने काढला मोर्चा; पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन

संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

पालघर- आषाढी एकादशीला पंढरपूरची वारकरी संप्रदायची वारीसाठी शासनाने निर्बंध लावताना बंड्या तात्या कराडकर यांना अटक करून स्थानबद्ध केल्याप्रकरणी निषेध नोंदवत त्यांची तात्काळ मुक्तता करावी, यासाठी वारकरी संप्रदाय बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्या जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केल्या.

शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला पंढरपूरची वारी सुरू करण्यासाठी तसेच बंड्या तात्या कराडकर यांची तात्काळ मुक्तता करण्यासाठी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या निवेदनात पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांचे भर रस्त्यात भगवे कपडे वस्त्रे उतरवायला लावले. तसेच वारकरी संप्रदयाची भगवी पताका काढायला लावल्याने वारकरी संप्रदायाने संबंधित पोलीस प्रशासनाचा निषेध करत केला ज्या वारकऱ्यांना जागोजागी ताब्यात घेतले आहे. त्यांची तात्काळ मुक्तता करून ५० वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी परवानगी द्यावी. यासाठी टाळ मृदुंग भजन करत हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत मोर्चा काढला.

वारकरी संप्रदाय याकडून कोहरा महाराज तसेच प्रदीप महाराज यांच्यासोबत विश्व हिंदू परिषदचे मुकेश दुबे तसेच बजरंग दलाकडून चंदन सिंग यांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. तर पालघरच्या नगरसेवक अरुण माने, अलका राजपूत व इतर कार्यकर्ते या मोर्चासाठी सहभागी झाले होते. पंढरपुरात लग्न सोहळे राजकीय कार्यक्रम त्याच बरोबर पंढरपुरातील पोटनिवडणूक या काळात करुणा संकट नव्हते का? असा प्रश्न वारकरी संप्रदायाने विचारला आहे.

पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठकीला फक्त तीन मिनिटे उपस्थिती; विरोधकांचा संताप..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्या (सोमवार) पासून सुरू होत आहे. त्या आधीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी पडली आहे. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ तीन मिनिटांसाठीच हजर राहिल्याने विरोधकांचा तीळपापड उडाला. पंतप्रधानांच्या या कृतीवर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला शेवटची तीन मिनिटे उपस्थित राहिल्याबद्दल बैठकीतच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे नेते, खासदार डेरेक ओब्रायन यांनी मोदींसमोरच नाराजी व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांच्या भावना समजून घेण्यासाठी पंतप्रधानांनी या बैठकीला सुरुवातीपासूनच उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु, पंतप्रधानांनी हा पायंडा मोडला, असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे.

सरकारने पळ काढू नये
दरम्यान, देशातील कोव्हिड परिस्थिती, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि वाढती महागाई या विषयांवर आपल्याला चर्चा हवी आहे, सरकारने या मुद्यांपासून पळ काढू नये, अशी भूमिका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केली. दरम्यान या सर्वपक्षीय बैठकीला ३३ पक्षांचे ४० नेते सहभागी झाले होते. यावेळी अनेक नेत्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला सल्ले दिले. तसेच काही सूचनाही केल्या. बहुतेक सदस्यांनी कृषी कायद्यावरून सरकारला अनेक सूचना केल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या १९ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात तीन अध्यादेशांसहीत २३ विधेयके मंजूर करण्यात येणार आहेत. त्यात १७ नवे विधेयक आहेत. दरम्यान, या बैठकीत सरकार प्रत्येक मुद्दयांवर चर्चा करायला तयार असल्याचं मोदींनी स्पष्ट केल्याचं सूत्रांनी सांगितले.

अंथरुणाला खिळून (बेड रिडन) असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहे आणि ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आहे त्यांच्यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी व्यक्ती अंथरुणाला खिळून आहे व पुढील सहा महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ही विशेष सुविधा आहे.

अशा व्यक्तींची नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण आणि सदरची व्यक्ती, रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी माहिती covidvacc2bedridden@Gmail.com या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जेणेकरून अशा व्यक्तींचे लसीकरण पथका मार्फत करणे सोयीचे होईल.

अंथरूणाला खिळून असलेली व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचा दाखला तसेच या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तींने लसीकरणासाठीचे संमतीपत्र माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.