Home Blog Page 227

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे ब्रिटनमध्ये थैमान; भारतासाठी चिंतेची मोठी बाब..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

लंडन येथील ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने रौद्ररुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. काल तिथे ५१,८७० नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे सहा महिन्यांपूर्वीची रुग्णसंख्या ब्रिटन ने गाठली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदा ५० हजारहून अधिक कोरोना बाधित सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे ब्रिटनचे आरोग्य मंत्रीच कोरोना बाधित झाले आहेत.

चिंतेची बाब म्हणजे ब्रिटनमध्ये ६८ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. असे असले तरी देखील तिसऱ्या लाटेने डोके वर काढल्याने युरोपसह भारताच्या चिंता वाढल्या आहेत. आरोग्य मंत्री साजिद जावेद यांना कोरोनाची लागण झाली आहे. वेगाने कोरोना पसरू लागल्याने माजी आरोग्यमंत्र्यांनी सरकारला पुन्हा कोरोनामुळे लॉकडाऊन करावे लागणार आहे, असा इशारा दिला आहे. तसेच १२०० हून अधिक तज्ज्ञांनी लॉकडाऊन पूर्णपणे हटविणे हे खतरनाक आणि अनैतिक असेल, असा इशाराही दिला आहे.

ब्रिटनमध्ये १९ जुलैपासून सर्व निर्बंध हटविण्याची तयारी सुरु आहे. याच काळात कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्याने मोठी उसळी घेतली आहे. यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. माजी आरोग्य मंत्री जेरेमी हंट यांनी सरकारला पुन्हा लॉकडाऊन लावायची वेळ पडणार आहे, असे म्हटले आहे. कोरोनामुळे हॉस्पिटलाईज होणाऱ्या रुग्णांची संख्या दोन आठवड्यांत दुप्पट होत आहे. यामुळे परिस्थिती धोकादायक बनू लागली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमागे ‘डेल्टा व्हेरिअंट’ आहे. तिसरी लाट ज्या प्रकारे विक्राळ होत चालली आहे, त्यावरून सरकारने निर्बंध हटवू नयेत. असे केल्यास पाप ठरेल असा इशारा जगभरातील १२०० तज्ज्ञांनी दिला आहे. लॅन्सेटमध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे.

एक्स्प्रेसच्या इंजिनखाली येऊनही मोटरमनच्या प्रसंगावधानामूळे वाचला आजोबांचा जीव; कल्याणातील थरारक प्रकार..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या आजोबांचे प्राण थोडक्याय वाचले. कल्याण रेल्वे स्टेशनवर आज दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

मुंबईहुन वाराणसीला जाणारी महानगरी एक्स्प्रेस कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर ४ वरून सुटली. आणि त्याचवेळी काही अंतरावर पुढे एक वयोवृद्ध आजोबा रेल्वेरूळावर आत्महत्या करण्याच्या इराद्याने उभे होते. गाडीनेही अवघ्या सेकंदात वेग धरला होता. रुळांवर असणाऱ्या आजोबांना पाहून एक्स्प्रेसचे मोटरमन एस.के.प्रधान यांनी वारंवार हॉर्नही वाजवला. मात्र गाडी पुढे येईपर्यंत आजोबा अजिबात जागचे हलले नाहीत. मात्र मोटरमन एस.के.प्रधान आणि सहाय्यक मोटरमन रवी शंकर यांनी आपले सर्व कसब आणि अनुभव पणाला लावून एक्स्प्रेसचे अर्जंट ब्रेक दाबले. तोपर्यंत एक्स्प्रेसच्या इंजिनाचा पुढचा भाग आजोबांच्या अंगावरून गेला होता. मोटरमन आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेत इंजिनखाली पाहिले असता हे आजोबा सुखरूप असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी अत्यंत हळुवारपणे आजोबांना इंजिनाच्या पुढील भागातून बाहेर काढले आणि तातडीने रेल्वे स्टेशनवर घेऊन गेले. एक्स्प्रेसचे मोटरमन एस.के.प्रधान आणि रवी शंकर यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे त्यांचे कौतूक होत आहे.

कल्याण लोकसभा समन्वयकपदी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांची नियुक्ती..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीत भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यरचना या सगळ्या गोष्टींकरिता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर लोकसभा आणि विधानसभा या क्षेत्रात काम करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून कल्याण लोकसभा समन्वयकपदी शशिकांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी यापूर्वी लोकसभेचा विस्तारक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या या नियुक्ती बरोबर डोंबिवली विधानसभा प्रमुख संजीव बिडवाडकर, सहप्रमुख मिहिर देसाई, समीर चिटणीस कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख नंदू परब, कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख नाना सूर्यवंशी, सहप्रमुख सुभाष मस्के, कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख स्वप्निल काटे, सहप्रमुख गौरव गुजर, संतोष शिंगोळे, अंबरनाथ विधानसभा प्रमुख अभिजीत करंजुले, सहप्रमुख संतोष शिंदे, राजेश कवठाळे अशी ह्या लोकसभेतील रचना असणार आहे. या नियुक्त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

भाड्याच्या वादातून “अबोली” महिला रिक्षा चालकास मारहाण..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

रायगड जिल्ह्यात पनवेल येथे ‘अबोली’ महिला रिक्षा चालक महिलेस चार प्रवाशांनी रिक्षा भाडे यावरून झालेल्या वादात त्या चार जणांनी मिळून मारहाण केली असून त्या महिला चालक यांना मारहाण करणारे यातील प्रवासी हे एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगी आणि मुलगा असून या चार जणांकडून रिक्षा चालक महिलेला मारहाण करण्यात आली.

त्यावेळी ‘अबोली’ महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष संतोष भगत व बेलापूर नेरुळ विभागीय ‘अबोली’ महिला रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष अंजना शिंदे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरीष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांच्याकडे भेट घेऊन त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक पुरुषास अटक करण्यात आली आहे, तर त्या रिक्षा चालक महिलेस वाशी येथील MGM हॉस्पिटलमध्ये मध्ये ऍडमिट करण्यात आले आहे.

असाच प्रकार अबोली महिला रिक्षा चालकांसोबत घडत राहिला तर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्या खेरीज पर्याय उरणार नाही असे मत संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी व्यक्त केले.

‘ईडी’कडून अनिल देशमुखांची ४ कोटी नव्हे, तर तब्बल ३५० कोटींची मालमत्ता जप्त..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘ईडी’ने ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती काल समोर आली होती. पण ‘ईडी’ने जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ही ३५० कोटी रुपये इतकी असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे. ‘ईडी’ने काल अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी या मालमत्तेची किंमत ४ कोटी २० लाख असल्याचं म्हटलं होतं. पण ही किंमत खरेदीची किंमत आहे. या मालमत्तेची आजच्या बाजार भावाची किंमत तब्बल ३५० कोटी रुपयांच्या आसपास आहे.

अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ‘ईडी’ने मनी लाँन्ड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना तीनदा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. तर त्यांचा मुलगा ऋषिकेश याला एकदा समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, दोघेजण चौकशीसाठी हजर न राहता चौकशी टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. त्यानंतर ‘ईडी’ने अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावलं होतं. त्यांनी ही हजर न राहता आवश्यक ती कागदपत्रे ‘ईडी’ला सादर केली आहेत.

या सर्व घडामोडींनंतर आता ईडीने अनिल देशमुख यांची मालमत्ता जप्त करायला सुरुवात केली आहे. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी काल अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. ‘ईडी’ने वरळी येथील एक फ्लॅट जप्त केला आहे. त्याची खरेदीच्या वेळची किंमत १ कोटी ५४ लाख रुपये आहे. तसेच अनिल देशमुख यांच्याशी संबंधित जमीनही जप्त करण्यात आली आहे.

‘ईडी’ने देशमुखांची रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुमत गावातील ८ एकर ३० गुंठे जमीन जप्त करण्यात आली आहे. ही जमीन मोक्याच्या ठिकाणी आहे. उरण पोर्ट आणि पळस्पे फाटा दरम्यान ही जमीन आहे. संबंधित जमीन ही नव्याने सुरु होत असलेल्या नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावर आहे. मोक्याच्या ठिकाणी ही जमीन असल्याने तिचा भाव प्रचंड आहे. या ठिकाणी एका गुंठ्याचा भाव एक कोटी रुपये आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांची भागीदारी असलेल्या प्रीमियर पोर्ट लिंक प्रायव्हेट लीमिटेड या कंपनीने ही जमीन रोख रक्कम देऊन २००४ ते २०१५ या काळात विकत घेतली आहे. त्याकाळात त्यांनी ही जमीन २ कोटी ६७ लाख रुपयांना विकत घेतली आहे. ८ एकर ३० गुंठे म्हणजे एकूण ३५० गुंठे जमीन झाली. प्रत्येकी एक कोटी रुपये गुंठा इतकी किंमत असल्याने या जमिनीची किंमत सुमारे ३५० कोटी रुपये होते.

मुंबईतील काही बार मालकांनी आपण सचिन वाझे याला पैसे दिल्याचं म्हटलं आहे. ही रक्कम ४ कोटी ७० लाख रुपये आहे. हीच रक्कम अनिल देशमुख यांना मिळाली असावी आणि रक्कम त्यांनी अशा पद्धतीने मनी लाँन्ड्रिग केली असावी, असा ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळेच ‘ईडी’च्या आधिकाऱ्यांनी ४ कोटी ७० लाख रुपयांच्या बदल्यात खरेदी किंमत असलेली ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र, जप्त केलेल्या या मालमत्तेची प्रत्यक्षात बाजार भावाने किंमत ३५० कोटी रुपये आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कथित १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. याच प्रकरणाचा तपास सध्या ‘ईडी’कडून सुरु आहे.