Home Blog Page 228

कल्याण पूर्वेतील ‘सम्राट अशोक’ शाळेचा सतत बाराव्या वर्षी शंभर टक्के निकाल; अंतर्गत मूल्यमापनात विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढली !

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

नुकत्याच लागलेल्या शालांत परिक्षेच्या निकालात या वर्षीही १०० टक्के निकालाचे सातत्य राखत कल्याण पूर्व येथील ‘सम्राट अशोक’ विद्यालयाने सलग १२ व्या वर्षीही १०० टक्के निकालाचा इतिहास घडवला आहे. कोरोना महामारीच्या महाभयंकर संसर्गामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळा भरल्याच नाहीत. मात्र इयत्ता नववीचा वार्षिक निकाल व इयत्ता दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. अंतर्गत मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत बाजी मारली. अनेक विद्यार्थ्यांना आवश्‍यक पेक्षा जास्त गुण मिळालेत. विद्यार्थ्यांना कोरोनाची भीती होती परंतु महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे परीक्षा रद्द करण्याच्या शासन निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थी खूष होते. आता निकाल लागल्यावर भरमसाठ गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

‘पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट’ संचालित ‘सम्राट अशोक विद्यालयात’ शिक्षकांचा प्रयत्न व विद्यार्थ्यांच्या मेहनतीने सलग गेल्या बारा वर्षापासून शंभर टक्के निकाल लागत आहे.

याही वर्षी शंभर टक्के निकाल लावून ‘सम्राट अशोक विद्यालयाने’ आपले सातत्य ठेवले आहे. रश्मी तांबे ९२.६० टक्के गुण मिळवून प्रथम , जान्हवी गायकवाड ९१.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर विशाल कडू या विद्यार्थ्याने ९०.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. शाळेने गुणवंत मुलांचे पुष्प व मिठाई देऊन स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की पुढे कोरोना असो वा नसो आरोग्य सांभाळून पुढील शिक्षणाचा अभ्यास करत रहा. परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाइन होऊ द्यात परंतु आपलं वाचन-लेखनाच सातत्य कायम असू द्या. कोरोना काळातही शिक्षकांनी ऑनलाइन तासिका घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली म्हणून संस्थेचे अध्यक्ष पी.टी.धनविजय यांनी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्यासह शिक्षकांचे आभार मानले.

शिस्तबद्ध रितीने आरोग्याचे नियम पाळून चित्रीकरण करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे, यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोविड तपासणी करावी, लसीकरण होईल हे पाहावे अशा सूचना दिल्या.

चित्रपट निर्मात्यांच्या सर्वात मोठी संस्था असलेल्या प्रोड्युसर्स ‘गिल्ड’च्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कोविडविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पाडले जाईल अशी ग्वाही दिली.

या बैठकीस हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या प्रमुख संस्था असलेल्या प्रोड्युसर ‘गिल्ड’चे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा हे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव यांनीही बैठकीत सहभागी होऊन सूचना केल्या. आदेश बांदेकर यांनी बैठकीचे सूत्रसंचलन केले.

बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे देखील सहभागी होते.

गेल्या काही महिन्यांपासून हिंदी व मराठी चित्रपट आणि मालिकांचे निर्माते कोरोना काळात नियमांचे पालन करून चित्रीकरण करीत आहेत परंतु चित्रीकरणाच्या वेळेत वाढ करणे गरजेचे आहे, सायंकाळी 4 नंतर देखील चित्रीकरण करण्यास परवानगी मिळाल्यास सर्वतोपरी काळजी घेऊन व नियमांचे पालन करून चित्रीकरण करता येणे शक्य आहे असे प्रोड्युसर ‘गिल्ड’चे म्हणणे होते.

पथकाचे लसीकरण व कोरोना तपासणी आवश्यक..

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, निर्बंध टाकून तुम्हाला अडविणे आम्हालाही आवडत नाही पण महारष्ट्र आणि केरळसह देशातील इतर काही राज्यांमधून कोरोनाचा संसर्ग अजूनही सुरूच आहे. संरक्षित अशा बायो-बबलची व्यवस्था करूनही काही क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमादरम्यान संसर्ग झालेला दिसतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देखील आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नसून जगातील इतर देशांत परत तिसरी लाट उसळल्याचे दिसते, त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेत राहणे आवश्यक आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांनी कोविड संदर्भात आपल्या कलाकार व कर्मचाऱ्यांची विशिष्ट दिवसानंतर कोरोना चाचणी करीत राहणे, पथकातील कुणाला ताप जरी आला असेल किंवा काही लक्षणे दिसत असतील तर त्वरित दखल घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांचे दोन्ही डोसेससह लसीकरण असणे गरजेचे आहे.

निर्बंध कायम न ठेवता कोरोना परिस्थितीची पाहणी करून टप्प्याटप्प्याने, सावधपणे, आणि सुरक्षितरित्या ते उठविण्याबाबत राज्य शासन पाउले टाकत आहे. पण यासाठी सर्वांचे मोठे सहकार्य लागणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

..तरच परवानगी..

मुंबई पोलिसांनी देखील प्रत्येक निर्मात्यांचे चित्रीकरणाचे वेळापत्रक, चित्रीकरण ठिकाण व वेळा याबाबतची माहिती निर्मात्यांकडून मागवून घ्यावी आणि एखाद्या अधिकाऱ्यावर समन्वयाची जबाबदारी टाकून व्यवस्थित व नियमांची काळजी घेत असल्याची खात्री करून परवानगी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक, डॉ.शशांक जोशी, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ.प्रदीप व्यास यांनी देखील कोरोना सद्य परिस्थितीबाबत माहिती दिली. पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी देखील यावेळी पोलिसांतर्फे नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याचे ग्वाही देत असल्याचे सांगितले.

‘इको’ कारचे सायलेंसर चोरी करणारी टोळी गजाआड; २५ गुन्हे उघड..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि.६ जून २०२१ रोजी ठाण्याच्या खारेगाव येथील ‘कार्तिकी विला’ येथे राहणाऱ्या सौ.रोशनी राऊत यांनी त्यांची ‘इको’ कार सकाळी ७ वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर सार्वजनिक रोड वर पार्क करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्यांनी या कारचा सायलेन्सर चोरी केला. याबाबत त्याच दिवशी कळवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिसांनी लगेचच घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरातील “सीसीटीव्ही फुटेज” चे रेकॉर्डींवरून संशयित इसमाची पडताळणी आणि खातरजमा केली.

खारेगाव ते कुर्ला, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवरील “सीसीटीव्ही फुटेज” घेऊन पुन्हा पुन्हा पडताळणी करण्यात आली व हे आरोपी कुर्ला येथे वास्तव्यास असल्याचे समजले. याव्यतिरिक्त गुप्त बातमीदारांनी दिलेली माहिती आणि तांत्रिक माहिती मिळवून त्यांच्या नेमका ठावठिकाणा आणि इतर माहिती काढण्यात आली आणि त्यांच्यावर सापळा रचून –
१. शमशुद्दीन मोहोम्मदअदिस शहा (२१ वर्षे)
२. नदीम नवाब कुरेशी (२१ वर्षे)
३. शमशुद्दीन माजुद्दीन खान (२२ वर्षे)
४. सद्दाम मकाईस खान ( २६ वर्षे)
या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. या आरोपींचे इतर २५ गुन्हे ही उघड झाले असून ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड पुणे आणि गोवा राज्यातही त्यांनी असेच अनेक गुन्हे केलेले आहेत. त्यांच्याकडून कळवा पोलिसांनी ६,५०,०००/- रुपये किमतीचे २५ सायलेन्सर हस्तगत केले आहेत.

दहावी निकालाचा खेळखंडोबा; शिक्षणमंत्र्यांची दिलगिरी, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी येत आहेत. यावर आता शालेय शिक्षणमंत्री यांनी दिलगिरी व्यक्त करत दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली करणार असल्याचा इशारा दिला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याची माहिती दिली आहे.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी दिलेल्या दोन्ही वेबसाईट दुपारी एक वाजल्यापासून अद्याप डाऊनच आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. वेबसाईट डाऊन का झाल्या याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, यावर शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आज काही तांत्रिक बाबींमुळे शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दहावीचा निकाल प्राप्त होण्यास अडथळे निर्माण झाले. त्याबद्दल आम्ही दिलगिर आहोत. सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल जेणेकरून घडल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दिलगिरी व्यक्त करत म्हणाल्या आहेत.

वृद्धांना धक्का देऊन मोबाईल चोरी करणारे अटक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

वयोवृद्ध लोकांना जाणूनबुजून धक्का देऊन वाद निर्माण करून त्यांच्या वरच्या खिशातील महागडे मोबाईल ची जबरी चोरी करणाऱ्या दोन जणांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी हे नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शन घेण्यासाठी पायी चालत जात असताना स्विमिंग पूल, एम.जी.रोड, कांदिवली (प) येथे एका अज्ञात इसमाने त्यांना मागून येऊन धक्का मारला व त्यांच्याशी वाद सुरु केला. त्यावेळी त्या इसमाचा जोडीदार हा देखील त्यांच्यामध्ये शामिल होऊन फिर्यादी यांच्याशी वाद सुरु करून त्यांच्या गळ्यात हात टाकून वरच्या खिशात ठेवलेला मोबाईल चोरी करून पळून गेले असल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून कच्चा रस्ता मालवणी येथून दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण ११ मोबाईल किंमत अंदाजे रु.१,६५,०००/- हस्तगत करण्यात आले आहेत. आणि सदर दोघांना अटक करण्यात आली आहे.