Home Blog Page 229

सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसाला पोलिसाचा जल्लोष; वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवस सोहळ्यात सहभागी झाल्या प्रकरणी जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर अडचणीत आले आहेत. गुन्हेगारास केकचा तुकडा भरवतानाची चित्रफीत समाजमाध्यमांतून प्रसारित होताच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तालयाने दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत नेर्लेकर यांची बदली विभागीय नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.

याआधी भांडुप पोलीस ठाण्यात असाच एक प्रसंग घडला होता. दानिश शेख असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, दंगल, मारहाण आदी गुन्हे दाखल आहेत. तो वास्तव्याला असलेल्या इमारतीच्या कार्यालयात त्याचा वाढदिवस साजरा झाला. या सोहळ्यास नेर्लेकर उपस्थित होते. इतकेच नव्हे तर त्यांनी केकचा तुकडा दानिशला भरवल्याचे चित्रफितीत दिसते. दोन आठवड्यांनी ही चित्रफीत व्हायरल झाली व त्यावरून पोलीस दलावर टीका सुरू झाली.

ही बाब लक्षात येताच आयुक्तालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. साकिनाका विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या माहितीस पोलीस उपायुक्त डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा दिला. चौकशी पूर्ण होईपर्यंत नेर्लेकर यांच्याकडून जोगेश्वरी पोलीस ठाण्याची जबाबदारी तात्पुरत्या स्वरुपात काढून घेण्यात आली आहे आणि त्यांना पश्चिम प्रादेशिक विभागात हलविण्यात आले आहे, असे रेड्डी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

टीकेवर नेर्लेकर यांचे उत्तर..

दरम्यान ही चित्रफीत जुनी आहे, असे नेर्लेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. इमारतीत महापालिके कडून पाडकाम सुरू होते, त्यासाठी तेथे गेलो होतो. असे उत्तर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे.

“ईंटरॅक्ट क्लबऑफ डोंबिवली मिडटाऊन” क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा “झूम माध्यमाद्वारे” संपन्न..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

“म. गांधी विद्यालय ईंटरॅक्ट क्लबऑफ डोंबिवली मिडटाऊन” ह्या क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा कु. योगिनी वडनेरे व कार्यकारिणी यांचा पदग्रहण सोहळा दिनांक १५ जुलै, २०२१ रोजी “झूम माध्यमाद्वारे” संपन्न झाला. आजच्या ह्या पदग्रहण सोहळ्याला डिस्ट्रिक्ट एव्हेन्यु चेअर रो. सेनेक्ट बालन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीले व त्यांनी सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे, शिक्षक वृंदाचे, क्लब युथ डायरेक्टर डाॅ.मनोहर अकोले ह्यांचे कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन केल्याबद्दल विशेष कौतुक केले. मावळती अध्यक्षा कु. प्राची बागवे हिने टाळेबंदी असूनही केलेल्या कामांचा आढावा घेतला, तसेच नवनिर्वाचित अध्यक्षा कु.योगिनी वडनेरे व सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षा कु.योगिनी वडनेरे हिने येत्या वर्षांत ठरवलेल्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. पालकत्व असलेल्या रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे अध्यक्ष रो.जितेंद्र नेमाडे ह्यांनी क्लब संचालित रोटरी हेल्थ सेंटर मार्फत माफक दरात दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांची माहिती दिली व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ. अकोले ह्यांनी गत इतिहासाची उजळणी मांडली व सर्वांचे विशेष कौतुक केले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन व रूपरेषा आखण्यास शाळा शिक्षिका सौ. प्रिया जोशी, श्री.ऊल्हास झोपे सर ह्यांनी विशेष मेहनत घेतली, तसेच ह्यासाठी मुख्याध्यापक श्री.आहेर सर ह्यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सलोनी मोहिते व कु.सलोनी बने ह्यांनी चोखपणे केले. कु.प्रियंका म्हात्रे हिने आपल्या मधुर आवाजात ईश स्तवन व स्वागत गीत सादर केले. कु.सलोनी मोहिते हिने आभारप्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता कु.सायली कान्हेरे हिने संत ज्ञानेश्वर रचित पसायदानाने केली.

कार्यक्रमास मिडटाऊनचे भावी अध्यक्ष रो.अजय कुलकर्णी, सचिव रो.अतुल कुवळेकर, मा. अध्यक्ष ऍड.कैलाश सोनावणे, माजी अध्यक्ष रो. डाॅ.राज शेरे, रो.गुलाब पवळे, रो.संजय पाटील, सार्जंट रो.किशोर अढाळकर, रो. डॉ.तेजल थोरवे व रो. डाॅ. प्रियदर्शिनी जोशी आणि रो. सौ. योगिता सोनावणे ह्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. “झूम माध्यमाद्वारे” संपन्न झसलेल्या पदग्रहण सोहळ्याला एकूण ५३ जण उपस्थित होते.

ओसवाल परीसरातील रस्ता एलईडी दिव्यांनी लखलखणार!

संपादक: मोईन सय्यद/ बोईसर प्रतिनिधी

सरावली ग्रामपंचायत हद्दीतील ओसवाल एंपायर परीसरातील हॉटेल कलश ते गणेश मंदीर दरम्यानच्या रस्त्यावर एलईडी स्ट्रीट लाईटस बसविण्याचे काम ग्रामपंचायती मार्फत सुरू करण्यात आले असून यामुळे कायम अंधारात राहणारा हा परीसर एलईडी दिव्यांनी उजळून निघणार आहे.

सरावली ग्रामपंचायत मार्फत ओसवाल एंपायर परीसरातील हॉटेल कलश ते गणेश मंदीर पर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजकामध्ये वीजेचे पोल टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून त्याठिकाणी लवकरच एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. या रस्त्यावरील वीजेचे खांब गंज लागून जीर्ण झाल्यामुळे तसेच त्यावरील दिवे बंद पडल्यामुळे अनेक दिवंसापासून परीसरात अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे वाहन चालक आणि पादचारी यांना त्रास होत होता. त्यातच बोईसर सरावली भागात अंधाराचा फायदा घेऊन सोनसाखळी चोर्‍या, लूटमार आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने राहीवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन रहीवाश्यांना रात्रीच्या सुमारास बाहेर पडणे त्रासदायक होत होते.

सरावली ग्रामपंचायतीने सध्या कलश हॉटेल ते गणेश मंदीरापर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजकामध्ये नवीन विजेचे खांब बसविले असून त्याठिकाणी लवकरच एलईडी दिवे लावण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे अंधाराचा सामना करणार्‍या ओसवाल एंपायर परीसरातील नागरीकांनी ग्रामपंचायतीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

अखेर दहावीचा निकाल जाहीर..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचा शिक्षण खात्याच्या अथक परिश्रमानंतर अखेर आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के, कोकण विभागाचा निकाल १०० टक्के, मुलांचा निकाल ९९.९४ टक्के, तर मुलींचा निकाल ९९.९६ टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना निकाल http://result.mh-ssc.ac.in आणि http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

राज्यातल्या इतर विभागांचा निकाल खालीलप्रमाणे (निकालाची टक्केवारी)- पुणे ९९.९६, नागपूर ९९.८४, औरंगाबाद ९९.९६, मुंबई ९९.९६, कोल्हापूर ९९.९२, अमरावती ९९.९८, नाशिक ९९.९६, लातूर ९९.९६, कोकण १००.

राज्यातल्या एकूण २२ हजार ७६७ शाळांपैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत हा निकाल ४. ६५ टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात यंदाही दहावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत. यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी केली असून त्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे. तर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्यांची संख्या २८ हजार ४२४ असून त्यांचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे.

कोविड-१९ लसींचे दोन डोस घेतलेल्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणी मधून सूट..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोव्हिड-१९ वरील ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या असतील आणि लसी घेतल्यानंतर १५ दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ या पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ च्या अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य सचिवांनी हा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही सूट लागू असेल असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ही सूट लागू असली तरीही लसीकरण झालेल्या अथवा न झालेल्या सर्व प्रवाशांना कोव्हिड रोखण्यासाठी उचित नियमांचे (चेहऱ्यावर मास्क परिधान करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, शारिरीक अंतर राखणे इ.) पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

इतर सर्व नागरीकांसाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीच्या वैधतेचा काळ ४८ तासांवरून वाढवून ७२ तास इतका करण्यात आल्याचे एका पत्रका मार्फत प्रसिद्धीस देण्यात आले आहे.